Friday, 12 October 2018

समाजाच्या मनामनामध्ये महिलांचा सन्मान वाढवणे काळाची गरज : डॉ . कुणाल खेमनार


महिलांसाठी वनस्टॉप सेन्टरची चंद्रपूरमध्ये सुरुवात

       चंद्रपूरदि.12 ऑक्टोंबर – केंद्र शासन पुरस्कृत संकटग्रस्त महिलांसाठी अभया केंद्र (वन स्टॉप सेंटर) योजना राज्यातील सर्व जिल्हयात सुरु करण्यात आली, ही आनंदाची बाब आहे. परंतु अशा प्रकारच्या सेंटरची आवश्यकता असणे ही खेदाची बाब असून या प्रकारच्या सेंटरची आवश्यकता भासणार नाहीतेव्हाच ख-या अर्थाने पिडीत महिलांना आनंद होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सरस्वती शिक्षण महिला मंडळ चंद्रपूर व्दारा मूल रोड येथे अभया केंद्राचे (वनस्टॉप) उदघाटन करतांना व्यक्त केले.
यावेळी स्वधारगृहाच्या अध्यक्षा ड.विजयाताई बांगडेजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ड.जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, शोभाताई पोटदुखेलिगल सेलचे सदस्य ड.दुर्गे,ड.मोगरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी महिलांवर होणा-या अन्यायाच्या विरोधात उभे होण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली  निवास, पोलीस मदत, विधी, आरोग्य आणि समुपदेशासारख्या उत्तम सुविधा 24 तास उपलब्ध करुन  देण्यात येणार आहे. या महिलांना स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना काम देण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बचत गटाच्या माध्यमातून सुध्दा काम देण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या केंद्रामध्ये अत्याचारग्रस्त महिलांना प्रशासनातर्फे काय काय सुविधा निर्माण करुन देता येईल. यासाठी सदैव प्रयत्न केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
            
यावेळी स्वधार गृहाच्या अध्यक्षा ड.विजयाताई बांगडे म्हणाल्या केंद्र शासनाने अन्यायग्रस्त पिडीत महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करुन देण्याचा चांगला निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महिलांना उत्तम सुविधा निर्माण करुन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न या केंद्राव्दारे करण्यात येणार आहे. तसेच त्यांना इच्छेनुसार काम सुध्दा या केंद्रामध्ये देण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. या केंद्राला आरोग्य विभाग, पोलीस विभाग व महिला व बाल विकास कार्यालयाव्दारे सर्वातोपरी सहकार्य आम्हाला मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बाल व विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी तर संचालन केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रमारमन यांनी केले. आभार प्रदर्शन परिवेक्षा अधिकारी सी.डी.बोरीकर यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
                                                0000

No comments:

Post a Comment