Search This Blog

Friday, 7 August 2026

कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त

 

कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त

Ø 23 हजार 508 शेतक-यांचा समावेश

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

चंद्रपूर, दि. 07 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 च्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) 36 हजार 757 पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली होती. त्यापैकी शुक्रवारी (दि.7) सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांच्या कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष 55 हजार 144 रुपये बँकेला प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 कोटी 22 लक्ष पात्र शेतक-यांच्या कर्जमाफीची 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम बँकांना वितरीत केली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना, चालू खरीप हंगामात शेती कामांसाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.

विशेष म्हणजे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक अटी व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी तात्काळ करून करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

ऑफलाईन सुध्दा करता येणार तक्रार: ऑनलाईन तक्रार होत नसल्यास, संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे शेतकरी लेखी स्वरुपात ऑफलाईन तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

००००००

बीआरटीसीत ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुरवात



बीआरटीसीत ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुरवात

Ø पहिल्या बॅचचा उद्घाटन सोहळा

चंद्रपूर, दि. 07 : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) येथे भारतातील पहिल्या एआयसीटीई मान्यताप्राप्त ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ या अभिनव अभ्यासक्रमाचा 2026-27 (प्रथम बॅच) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

बांबू क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. देशातील बांबू उद्योगासाठी कुशल व तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सदर अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश व नागालँड राज्यातील विद्यार्थी सुद्धा आहेत. एआयसीटीई मान्यताप्राप्त डिप्लोमा अभ्यासक्रमाची एकूण प्रवेश क्षमता 60 आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बीआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक हृषिकेश रंजन, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वनअधिकारी राजन तलमले उपस्थित होते.

श्री. रामानुजम यांनी महाराष्ट्र व इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन करून येथे पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांच्या लाभ घेऊन आपली प्रगती साध्य करावी, असे आवाहन केले. तसेच इतर मान्यवरांनी बांबू विषयी माहिती देऊन, ब्राझील हा देश इथेनोलचे उत्पादन करून इंधनाच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण झाला, याबद्दल मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची यशस्वी पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमानुसार पार्श्व प्रवेश प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल. 

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार यांनी प्रस्ताविकातून अभ्यासक्रमाचे महत्व या संबंधी माहिती दिली. आभार वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी मानले. यावेळी संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, बांबू उद्योजक आदी उपस्थित होते.

००००००

सिमांकन करून शिवपाणंद रस्ता मोकळा करण्यात येईल


सिमांकन करून शिवपाणंद रस्ता मोकळा करण्यात येईल

Ø म्हसली (विलम) येथील अतिक्रमणाबाबत नागभीड तहसीलदारांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि. 07 :  नागभीड तालुक्यातील म्हसली (विलम) येथील शेतात जाणा-या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतकरी वसंत गुरपुडे यांनी रस्त्यासाठी उपोषण केले होते. याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नागभीड तहसीलदार यांनी कार्यवाही करीत भुमी अभिलेख विभागाकडून सिमांकन करण्याचे आदेशित केले. सिमांकन झाल्यानंतर, रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येऊन सदर रस्ता मोकळा करण्यात येईल, असे नागभीडचे प्रभारी तहसीलदार उमेश कवळे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या आश्वासनानंतर श्री. गुरपुडे यांनी उपोषण मागे घेतले आहे.

विलम येथील गट क्र. 203/1 च्या शेतजमिनीला जाण्याच्या रस्त्यावरून पाण्याचा पाट काढल्याने, शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याचा अर्ज वसंत गुरपुडे यांनी नागभीड तहसील कार्यालय येथे केला. या अर्जाची दखल घेऊन मेंढा किरमीटीचे मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिका-यांना मौका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केल्याशिवाय सदर रस्ता किंवा पाण्याचा प्रवाह सरळ करता येऊ शकत नाही, असा अहवाल मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिका-यांनी सादर केला.

त्यानुसार भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीसाठी 4 ऑगस्ट रोजी कळविण्यात आले. मात्र मोजणी प्रकरणातील सर्व तारखा निर्गमित झाल्या असून मोजणी प्रकरणाचे नोटीस संबंधितांना देण्यात आल्यामुळे तात्काळ भुकरमापक कर्मचारी उपलब्ध नाही. मात्र या प्रकरणात 10 ऑगस्ट रोजी मोक्यावर उपस्थित राहून पाणंद रस्त्याची मोजणी करण्यात येईल, असे भुमी अभिलेख कार्यालयाने कळविले.

त्यानुसार आता 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता म्हसली (विलम) येथील अतिक्रमीत रस्त्याची ग्रामपंचायत सचिव व रोजगार सेवकांच्या उपस्थितीत मोजणी होणार आहे. मोजणीच्या वेळी शिवपाणंद रस्त्यावर ज्याचे अतिक्रमण आढळून येईल, त्यांचे अतिक्रमण काढून रस्ता पुर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे नागभीडचे तहसीलदार श्री. कवळे यांनी म्हटले आहे.

०००००००

लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत


 लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत

Ø माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 07 :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर करीता माजी सैनिक प्रर्वगातून अशासकीय व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने लिपिक टंकलेखक पद भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखाती करीता हजर राहावे. अशासकीय लिपिक टंकलेखक या पदाकरीता इंग्रजी, मराठी टंकलेखन व संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,

असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

 सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

चंद्रपूर, दि. 07 :  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, प्रादेशिक कार्यालय हे मधुबन प्लाझा, मुल रोड चंद्रपूर येथून लगतच्या व्यंकटेश कॉम्प्लेक्स, पहिला माळा, मुल रोड, माउंट कॉनव्हेंट जवळ, चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले आहे, असे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

००००००