Ø पालकमंत्री आपल्या दारी योजनेला नवरगावातून दमदार सुरुवात
Ø हजारो नागरिकांनी विविध योजना व तक्रारींसाठी साधला संवाद
Ø जिल्हास्तरीय यंत्रणेकडून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नागरिकांचे समाधान
Ø तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा बळकट करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय योजना अधिकाधिक लोकाभिमुख व गतीमान प्रशासनासाठी 'पालकमंत्री आपल्या दारी ' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सातबारा वाटप करणारी स्वयंचलीत यंत्रणा उभारणार असल्याचे प्रतिपादन ,राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, खारजमीन विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
नवरगाव येथील लोकसेवा हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आयोजित चंद्रपूर जिल्ह्यातल्या पहिल्या अभिनव 'पालकमंत्री आपल्या दारी ' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ना. विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आजपासून सुरू झाला.चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम माहिन्यातून दोन वेळा होणार आहे. लिखित दिलेल्या तक्रारींचे टोकन क्रमांक बनवून पालकमंत्र्यांनी व्यासपीठावरच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, ताडोबाचे उपसंचालक गुरुप्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड,विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोढे, अॅड.राम मेश्राम, दिनेश पाटील चिटनूरवार, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, नवरगावच्या सरपंच अनीता गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे. शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या समस्यांना दहा दिवसात उत्तर मिळावे ,अशी यंत्रणा उभारण्याचे स्पष्ट केले. जिल्हास्तरीय यंत्रणेपेक्षा तालुकास्तरीय यंत्रणेकडे 95% काम प्रलंबित असते. तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी या रचनेमध्ये अधिक कामांचा राबता व खोळंबा देखील असतो. त्यामुळेच तालुकास्तरीय यंत्रणा आणखी बळकट करण्याचे काम करावे, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे समाधान करताना प्रेमाचे चार शब्द बोलले जावे, अशा सूचना यावेळी केल्या.
नवरगाव या शहराने आपल्यावर कायम भरभरुन प्रेम केले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या साक्षीने आज नवरगावातून ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. त्यांनी मला सत्काराची अट घातली होती. मात्र सत्कारापेक्षा सत्कर्म करावे, म्हणून या पुण्यभूमीतून पालकमंत्री आपल्या दारी ही योजना सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. या मुद्द्याला देखील त्यांनी आपल्या भाषणात हात घातला. आदिवासींच्या आरक्षणासाठी ओबीसींचे आरक्षण चंद्रपूर ,गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी करण्यात आले आहे. ते पूर्ववत 19 टक्के करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या खात्याचे नाव आता बहुजन कल्याण विभाग करण्यात आले आहे. त्यामुळे बहुजन समुदायातील मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पुढील वर्षभरात पाचशे तरुणांना एक लाख रुपये कर्ज छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायासाठी देण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना जिल्हा मुख्यालयात जावे लागू नये, लोकशाही व्यवस्थेमध्ये संपूर्ण प्रशासनच जनतेच्या मदतीसाठी यावे व प्रशासन आणि सामान्य जनता यातील अंतर कमी व्हावे,-!Fकन यासाठी या आयोजनाचे महत्त्व विशद केले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या विविध मागण्या व त्या संदर्भातील अर्ज याठिकाणी मांडल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले. या कार्यक्रमाची भूमिका विषद करताना त्यांनी तालुकास्तरीय विविध यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असून या यंत्रणेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सांस्कृतिक नगरी असणाऱ्या नवरगाव येथून ही योजना सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केला. पालकमंत्री आपल्या दारी या योजनेला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
या कार्यक्रमात तहसील यंत्रणेने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांचा संगणीकृत सातबारा देऊन सातबारा वाटप कार्यक्रमाला सुरुवात केली. याठिकाणी वनजमिनीचे पट्टे, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप, विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, तसेच विविध विभागाच्या वस्तूंचे संदर्भातील अनेक योजनांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते. नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याबाबतचे मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आले. संचलन रवींद्र बीरेवार यांनी केले.
0000000