चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयामध्ये मनोरंजनासोबत माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या चंद्रपूर आकाशवाणीला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत . मंगळवारी ५ डिसेंबरला एका शानदार सोहळ्यात २५ वर्षाचे सिंहावलकोन करण्यात आले.
चंद्रपूरमध्ये २५ वर्षापूर्वी दिनांक 6 डीसेंबर 1992 रोजी चंद्रपूर आकाशवाणीच्या प्रसारणाला सुरुवात झाली, आणि बघता बघता हा प्रवास २५ वर्षाचा झाला. वनाच्छादित जिल्हा असणाऱ्या चंदपूरमध्ये एक प्रभावी माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीची ओळख आहे . श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद आणि परस्पर संवादाचे माध्यमं म्हणून चंद्रपूर आकाशवाणीने आपले नावलौकिक मिळवले असून आकाशवाणीचे मनोरंजनात्मक व विकासवार्तावरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय ठरले आहे . यामध्ये आरोग्य दर्पण, गीत गुंजन, गीत सरिता, आपली आवड, हॅलो सखी, पत्रावर आधारित प्रतिसाद, ओळख कायदयाची, विविध अधिका-याच्या मुलाखती व मान्यवरांच्या आदी कार्यक्रमाचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्हयात लोकप्रिय ठरलेल्या आकाशवाणीची मंगळवारी सायंकाळी संगीत मेजवानीत रौप्य महोत्सवपूर्व सायंकाळ साजरी करण्यात आली हिंदी -मराठी गाण्यांची ही मैफल साजरी केली हिमांशू रंगारी यांच्या चमूने. यामध्ये संगीता उमरे, मंगेश देऊळकर, शेखर शर्मा, अमोल दुधकर, निखील जिरकुंटवार, आशिष गायगोले, सुनील इंदू वामन ठाकरे आदी कलाकार सहभागी झाले होते .
तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार व आकाशवाणीचे जिल्हा वार्ताहर मधुसुदन व्यास , प्रभारी केंद्र प्रमुख मनोहर पवनीकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली . यावेळी आकाशवाणीच्या माध्यमातून एक जागरूक व प्रतिसाद देणारी पिढी आम्ही निर्माण करण्याचे दायित्व या माध्यमाने पार पाडावे. शासकीय योजना आणि धोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत असून आणखी प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून कार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली . प्रेक्षपणाची फ्रीकवेन्सी वाढवण्यात यावी, तसेच स्थानिक भाषा, स्थानिक समस्या आणि स्थानिक कलाकारांना अधिक वाव मिळावा , अशी मागणीही मान्यवरांनी केली .
या कार्यक्रमाला आकाशवाणी ,दूरदर्शन केंद्रातील कर्मचारी ,नैमितिक उदघोषक, मान्यवर श्रोते उपस्थित होते.
0000000