Search This Blog

Thursday 30 January 2020

चांदा ते बांदा योजनेतुन महिलांना मिळाला आधार : अलकाताई आत्राम


पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळावा
चंद्रपूर, दि. 30 जानेवारी :जिल्ह्यातील शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला उद्योग व्यवसाय व जोडधंदा करू इच्छिणाऱ्या युवक-युवती साठी चांदा ते बांदा योजनेच्या उपयोगिता व त्यातील मिळणाऱ्या लाभाच्या घटकांना समजून घेण्यासाठी पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे 30 जानेवारी रोजी चांदा ते बांदा योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याचे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसेच चांदा ते बांदा  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना नाविन्यपूर्ण असून या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती अलकाताई अत्राम यांनी केले.
चांदा ते बांदा या योजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ व रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून महिलांना कारपेट सतरंजी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून आतापर्यंत पाचशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे मार्गदर्शन चांदा ते बांदा कार्पेटचे प्रशिक्षक मनीष द्विवेदी यांनी यावेळी केले.
कृषी विस्तार अधिकारी शेंडे यांनी संबोधित करताना, कृषी आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या घटकाचा विकास करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन याठिकाणी केले.  सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी ग्रंथालय स्थापन करून यामध्ये शेती संदर्भातील सर्व माहिती पुस्तिका ठेवण्यात आलेली आहे.
बचत गटातील महिलांना चांदा ते बांदा योजना व कार्पेट, सतरंजी युनिट यामुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले, असे मार्गदर्शन सीएमआरसी व्यवस्थापक वंदना बावणे यांनी केले.
या मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अलकाताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती पंचायत समिती पोंभूर्णा ज्योतीताई बुरांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, नायब तहसीलदार जि.एच.रणदिवे     गटविकास अधिकारी धनंजय साळवे तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक पशुधन विस्तार अधिकारी पी. एस. दामले, उमेद अभियान समन्वयक राजेश दुधे, चांदा ते बांदा कार्पेट प्रशिक्षक मनीष द्विवेदी, सी.एम. आर. सी व्यवस्थापक वंदना बावणे, कृषी विस्तार अधिकारी शेंडे, टाटा ट्रस्टचे आकाश वासमवार, महिला आर्थिक महामंडळचे गट सदस्य राजश्री भांडेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे सुधीर आत्राम, नामदेव शेवाळे, सुभाष नगारे, संचालन संजय मेकर्तीवार तर आभार प्रदर्शन विजय जाधव यांनी केले.
000000

मुद्रा बँकेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी चंद्रपूर जिल्हयात करणार प्रचार, प्रसार


चंद्रपूर, दि. 30 जानेवारी : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून नावारुपास आलेली असलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला आज सुरुवात करण्यात आली.
नियोजन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सहभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाला सुरुवात करण्यात आली. हा चित्ररथ जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये फिरणार असून याद्वारे ग्रामिण भागात कर्जा विषयीची माहिती आणि पत्रके दिली जातील.आणि या सोबतच या कर्जाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात यश मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा या चित्रफीतीव्दारे दाखविली जाईल.
जिल्हयात एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 37898 लाभार्थांनी 199.65 कोटी कर्ज घेतले आहेत. तर ही योजना सुरू झाल्यापासून किल्ल्यामध्ये आत्तापर्यंत 600 कोटी रुपयांच्या वरती कर्जाचे वाटप झाले आहे. यातून अनेकांनी हा उद्योग व्यवसाय उभारले असून भरभराटीला प्रारंभ झाला आहे. या योजनेच्या मार्फत 10 हजार ते 10 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. उद्योग व्यवसायामध्ये अभिरुचि असणाऱ्या तरुणांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी  या योजनेला प्रसिद्धीची जोड देण्यात येत आहे.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ.विजयता सोळंकी तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कौशल्य विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांच्या उपस्थितीत आज या चित्ररथाला हीरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते जिल्हास्तरीय मुद्रा बँक समितीमार्फत या प्रचार प्रसिद्धीचे आयोजन करण्यात आले आहे.
0000000

Tuesday 28 January 2020

चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी 223.60 कोटी मंजूर : अर्थमंत्री अजित पवार


Ø  चंद्रपूर जिल्ह्यासाठी 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतूदीला अर्थमंत्र्यांची मंजूरी
Ø  नागपूर येथे अर्थमंत्र्यांच्या उपस्थित राज्यस्तरीय बैठक
Ø  मर्यादित नियतव्ययात आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश
Ø  घुगुस,भद्रावती व राजुरा येथे बॅरेजेस बांधण्यासाठी 19 कोटी मंजूर
Ø  विविध प्रकल्पातील थकीत वीज देयकाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

नागपूर, दि. 28 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 2020-21 वर्षासाठी निर्धारित केलेल्या 180 कोटी या नियतव्ययामध्ये 43.60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मंजूर करीत पुढील वर्षासाठी 223.60 कोटीच्या जिल्‍हा वार्षिक योजनेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे मान्यता दिली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आणखी निधीची मागणी केली असून यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारुप आराखडा मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्री अनील देशमुख, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खासदार  सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले याशिवाय सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, तसेच विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधी व प्रस्तावित जिल्हास्तरीय योजनांबाबत तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्याला 2020-21 या वर्षासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 180 कोटी नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात 425.38 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आजच्या बैठकीमध्ये सादर केली. तथापि, जिल्हा वार्षिक समितीच्या निकषानुसारच सर्व जिल्ह्यांना यावर्षी वाढीव निधी दिला जाईल असे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तिजोरीवर कर्जमुक्ती घोषणेमुळे अतिरिक्त ताण पडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला गरजेपेक्षा अधिक किंवा अती आवश्यकता असल्याशिवाय निधी देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, पालकमंत्री, खासदार, आमदार व बैठकीत उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील रस्ते, अंगणवाडी इमारत, पोलीस व अन्य विभागाची वाहने खरेदी व अन्य बाबींसाठी निर्धारित 180 कोटी व्यतिरिक्त 43. 60 कोटी निधी अतिरिक्त देणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
तथापि, या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या काही महत्वाच्या अन्य मागण्यांवर मंत्रालयात मंत्री स्तरावर होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या बैठकीमध्ये सीएसआर फंडाच्या संदर्भात जिल्हास्तरीय नियोजन करताना चौकट आखण्याची मागणी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. अर्थमंत्र्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी नियंत्रण ठेवावे ,असे निर्देश दिलेत.
जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात निधी मागण्यात आला. यासंदर्भात बोलताना अर्थमंत्र्यांनी मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात यासंदर्भात निधी उपलब्ध असून केंद्र शासनाकडून हा निधी मिळत असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत अत्यंत आवश्यक असेल त्याच ठिकाणी या निधीचा वापर करण्याची सूचना केली.
जिल्ह्यातील विविध कार्यालयाच्या संदर्भात 64 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी मांडली. अतिशय आवश्यकता असेल त्याच ठिकाणी यासंदर्भात कार्यवाही व्हावी व त्या-त्या विभागामार्फत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष वेधावे अशा सूचना अर्थमंत्र्यांनी केल्या.
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ व अंगणवाडी आयएससो करण्याच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्याने केलेल्या वेगळ्या कामाची माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या या कामकाजाचे अभिनंदन करीत कौतुक केले.
वीज वितरण कंपनीला सौर व अन्य वीज पंप मिळण्यासाठी जिल्हा नियोजन मधून पैसे देण्याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलतांना अर्थमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीला वीज पंपासाठी निधी देण्यासाठी निर्देश देण्यात येईल असे स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती रस्त्याच्या दिवाबत्ती संदर्भातील थकित निधी देण्यास असमर्थ असल्याचे निर्देशास आणून दिले. यापूर्वी हा निधी जिल्हा परिषदेमार्फत दिला जात होता. सध्या ग्रामपंचायत हा निधी आपल्या कर वसुलीतून भरत असल्यामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचे लक्षात आणून दिले.तथापि, या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत सूचना अर्थमंत्र्यांनी केली
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात प्रवण स्थळांच्या दुरुस्तीसाठी तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दिवाबत्तीसाठी नव्या नळ योजनांना वीज जोडणी देण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा ,अशी मागणी यावेळी केली.
आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यांनी जिल्हा परिषदेमार्फत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी अतिशय अल्प निधी उपलब्ध असल्याबाबतची बाब लक्षात आणून दिली.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शेवटी दीडशे कोटी रुपये अधिक देण्यात यावे अशी, मागणी केली. मात्र जिल्ह्याचे क्षेत्रफळ व अन्य नियमानुसार जिल्ह्याचा नियतव्यय ठरलेला असून त्यामध्ये वाढ करण्याची सध्या राज्य शासनाची स्थिती नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तथापि, यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी जिल्ह्यातील वर्धा नदीवर बॅरेजेस बांधण्याबाबत या बैठकीत मागणी केली. जिल्ह्याच्या वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, घुग्घुस, राजुरा या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे त्यांनी अर्थमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
अर्थमंत्र्यांनी ही बाब अतिशय गंभीरतेने घेत संबंधित विभागांच्या सचिवांना यासंदर्भात बैठकीतून दूरध्वनी लावत भद्रावती, घुग्घुस व राजुरा येथील तीन बॅरेजेसला तात्काळ मंजुरी दिली. यासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा यावेळी केली.
राजुरा येथील विमानतळाला जमीन हस्तांतराची समस्या असून हे विमानतळ भद्रावती नजीक केंद्रशासनाच्या वापरात नसलेल्या जागांवर उभारण्याची मागणी देखील या बैठकीत खासदार धानोरकर यांनी केली. यासंदर्भात अमरावती ,अकोला येथील विमानतळाच्या चर्चेच्या वेळी निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
चांदा ते बांदा या योजनेला कालावधी वाढवून देण्याबाबत मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन डॉ.कुणाल खेमनार यांनी केले.
0000000

Sunday 26 January 2020

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिव भोजन योजनेला सुरुवात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते थाळी देऊन शुभारंभ



चंद्रपूर, दि.26 जानेवारी : राज्य शासनाची गरीब, गरजू व्यक्तीसाठी सवलतीच्या दरात भोजन देण्याची योजना अर्थात शिव भोजन योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाला सुरू करण्यात आली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः थाळी देऊन या योजनेचा शुभारंभ केला.
 ध्वजारोहणानंतर बस स्टॅन्ड परिसरातील या शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार सुरेश धानोरकर ,आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बस स्टँड परिसर, गंज वार्ड भाजीपाला बाजार, जिल्हा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सध्या जिल्हास्तरावर प्रायोगिक स्तरावर ही योजना राबविण्यात येत असून पुढील काळात तालुका व ग्रामीण स्तरावर देखील ही योजना राबविली जाणार आहे.
000000

पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनाला विविध मान्यवरांना पुरस्काराचे वितरण





चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या जिल्ह्यातील सर्व स्तरातील खेळाडू प्रशासन व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला सन्मानित करण्यात आले.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, खासदार सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात तील नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर या संस्थेचे हॅलो राधा मी रेहाना हे नाटक अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे नाटकाच्या दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे - गावंडे, अभिनेत्री सौ. नुतन धवने, प्रकाश योजनाकार हेमंत गुहे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कठीण व खरतड सेवा केल्याबद्दल पोलीस उपअधिक्षक विलास यामावार, पोलीस निरीक्षक शिवलाल भगत, सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, संतोष अंबिके, रविंद्र नाईकवाड, अब्दूल यासिन मलीक, पोलीस उपनिरीक्षक कु. प्राजक्ता नागपूरे, संदिप हिवाळे, विठ्ठल मोरे यांचा विशेष सेवा पदकांने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
चंद्रपूर नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मडावी यांनी नक्षलग्रस्त भागात कठीण व खरतड सेवा केल्याबद्दल केंद्र शासनाकडून पोलीस आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानीत केले. दिल्ली येथे आयोजीत अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वूशु फायटींग स्पर्धेत कास्यपदक पटकविल्याबद्दल महिला पोलीस नाईल कु. प्रिती बोरकर यांचा पालकमंत्र्याच्या सत्कार करण्यात आला.
सन 2018-19 या वर्षात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ओम अनिल ठावरी, कु. अवंती अनिल गांगरेड्डीवार, अभिषेक नरेश कोचर, भुषण संजय देशमुख, विनोद शंकर निखाडे व पोलीस विभागात कार्यरत असतांना कबड्डी स्पर्धे विशेष कामगिरी केल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सन्मान करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत हॉलीबॉल संघ व सैन्य भरती कालावधीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रदीप जानवे, रामास्वामी कापरबोयना,शाम थेरे, दीपक जेऊरकर, अरुण येरावार ,प्रकाश सुर्वे, प्रवीण गुज्जनवार, डॉक्टर किर्तीवर्धन दीक्षित, आर. एस. गौतम, विक्रम डोग्रा, एन.सी. भंडारी ,दामोदर सोरदे ,डॉ. एम गुलवाडे, एन. ढोलकिया, एम. रुंगठा, राजू सलुजा सत्कार करण्यात आला.
आदर्श स्काऊट शिक्षक आणि गाइड शिक्षिका पुरस्कार भरत नागोराव कुंडले ,सुरेखा रामचंद्र बोमनवार, प्रशांत सुधाकर खुसपुरे, अनु नामदेवराव खानझोडे, यांना देण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीचे उपलेखापाल किसन रतन गिरी, चांदा ते बांदा योजनेसाठी काम करणाऱ्या संजीवनी हरिदास दुर्योधन यांना देखील यावेळी पुरस्कृत करण्यात आले.
000000

प्रशासन आणखी लोकाभिमुख करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री आपल्या दारी योजना : विजय वडेट्टीवार






विविधांगी कार्यक्रमांनी चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविधांगी कार्यक्रम आज चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर साजरे करण्यात आले.यावेळी संबोधित करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासन आणखी लोकाभिमुख करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 'पालकमंत्री आपल्या दारी ' ही योजना राबविण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
आज सकाळी नऊ वाजता राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात झेंडावंदन नंतर उपस्थित समुदायाला संबोधित केले. त्यांनी पालकमंत्री आपल्या दारी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील समतोल विकासासाठी महिन्यातून चार दिवस संपूर्ण जिल्हा प्रशासन तालुक्यातील एखाद्या गावांमध्ये यंत्रणा घेऊन जाईल. प्रत्येक तालुक्यात मोठे मेळावे या अंतर्गत घेतले जातील. सिंदेवाई तालुक्यातील नवरगाव येथून पालकमंत्री आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी आज केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आज त्यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी राज्यशासनाने सुरू केलेल्या शिवभोजन या योजनेची सुरुवात केली. तर आजपासूनच जिल्ह्यांमध्ये खाण पर्यटन सुरू झाल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
आज सकाळी पोलीस मैदानावर जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त झालेले मान्यवर, जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, राजकीय ,सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन या मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले, खासदार सुरेश धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह  प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आपल्या मुख्य भाषणात पालकमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ पुढील मे महिन्यापर्यंत मिळालेला असेल असे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यासोबत आधार कार्ड संलग्न करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ 692 खात्यांचे काम बाकी राहिले आहे. त्यामुळे ही योजना शंभर टक्के  यशस्वीपणे राबविली जाईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले.
शेतकऱ्यांच्या शेतीतील खर्च आणि उत्पन्न यावर आधारित नफ्याची रक्कम वाढावी. यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ' स्मार्ट 'योजनेची काटेकोर अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांची स्थापना करून या संघटनांना खाजगी कंपन्यांची थेट जोडण्याचे काम केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500 रुपये भाव मिळत असून धान खरेदी केंद्र व्यवस्थित सुरू राहतील, याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय कापूस व सोयाबीन पिकांवर आधारित उद्योग आगामी पाच वर्षात निर्माण केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त गावांना आरो युक्त पाणीपुरवठा करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ताडोबाच्या पर्यटनाला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने  येतो. मात्र हा पर्यटक चंद्रपूर जिल्ह्यात निवासी राहावा. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाला येत असलेल्या सध्याच्या मर्यादेला लक्षात घेता लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन या ठिकाणच्या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये प्रदूषण वाढीबाबत भारतामध्ये चौथा क्रमांक असलेल्या चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्याबाबत उपाययोजना शोधण्यासाठी एका समितीची घोषणा त्यांनी आज केली. या समितीच्या अहवालावरून प्रदूषण कमी करण्याचे धोरण तयार केले जाईल ,असे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती ,जमाती ,सोबतच विमुक्त जाती,भटक्या जमाती ,यांच्यासाठी आश्रम शाळा उभारणे,तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविणे,अपंग व विधवा परितक्त्या यांच्यासाठी जिल्ह्यात 1 हजार घरे उपलब्ध करणे, ओबीसी तरुणांना 1 लाखांचा वित्तपुरवठा, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळकटी,मेडिकल कॉलेजची प्रलंबित इमारत लवकरच पूर्ण करणे, जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन व कृषी यांत्रिकीकरणामध्ये संख्यात्मक वाढ करणे, जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या ॲनिमिया मुक्त भारत अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ,राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रम योजना, विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्व शाळांना एलपीजी गॅस पुरवणे, शाळा धूर मुक्त करण्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना ही यापुढे देखील सुरू राहील मात्र या योजनेची व्यापकता वाढविण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन मध्ये कामगिरी करणाऱ्या किरण बगमारे यांचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल गौरवोद्गार आपल्या भाषणात काढले.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या पहिल्या भाषणांमध्ये गेल्या सरकारने सुरू केलेल्या चांगल्या कामांना यापुढेही सुरु ठेवले जाईल. समतोल विकासासाठी सर्वांच्या सहभागाची देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचलन मोंटू सिंग, मोहम्मद एजाज रिजवी व मंगळा असूदकर यांनी केले.
000000

Saturday 25 January 2020

माझ्या पदाचा उपयोग बहुजनांच्या हितासाठी होईल : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले





ओबीसींना स्कॉलरशिप, जुनी पेन्शन लागू करणे, क्रिमिलियरची
मर्यादा वाढविणे, हे विषय अजेंड्यावर  : विजय वडेट्टीवार
चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन
चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : ओबीसींसाठी संघर्ष करणे, बहुजन समाजामध्ये सुधारणा करणे, ओबीसींची जनगणना घडवून आणणे,यासाठीच आपण संघर्ष करीत असून जे ही पद मिळेल त्याचा उपयोग बहुजनांच्या हितासाठीच होईल, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले. चंद्रपूर येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात देशभरातील ओबीसी नेत्यांना एकत्रित करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे मदत व पुनर्वसन,इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग, आंध्र प्रदेशाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रमुख न्यायमूर्ती व्ही. ईश्वरैय्या, सुप्रसिद्ध वक्त्या सुशीलाताई मोराळे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर या कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, माजी आमदार वामनराव चटप, देवराव भांडेकर, मोरेश्वर टेंभुर्डे आदींची उपस्थिती होती.
आजच्या कार्यक्रमांमध्ये ओबीसी जनगणनेसाठी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी ठराव मांडल्याच्या उपलब्धतेसाठी व ओबीसी विभागाचे मंत्री म्हणून पदभार घेतल्या साठी अनुक्रमे नाना पटोले व नामदार विजय वडेट्टीवार यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.या सत्काराला उत्तर देताना उभय नेत्यांनी ओबीसींच्या प्रश्नाला आपल्या व्यासपीठावर वाचा फोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या या पदाचा उपयोग ओबीसींना, बहुजनांना फायदा मिळेल यासाठी निश्चित केला जाईल, याची ग्वाही दिली. नागपुरातल्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा ओबीसी समाजातील मंडळीला होणार आहे. संविधानातील तरतुदीनुसार ओबीसीला न्याय मिळावा यासाठी लढा देण्यास आपण वचनबद्ध आहे. 2021 च्या होणाऱ्या जनगणनेचे नोटिफिकेशन मिळाले, तेव्हा ओबीसीचे कॉलम त्यामध्ये दिसला नाही. त्यामुळे मी विधानसभेत स्वतःहून ठराव मांडला. केंद्र सरकारने नोटिफिकेशनमध्ये दुरुस्ती केली नाही तर ओबीसीसह बौद्ध, आदिवासी सर्वांनी त्यासाठी लढा देण्यास सिद्ध होणे आवश्यक राहील ,अशी सूचना त्यांनी केली.
ओबीसी मंत्रालयाला याच अधिवेशनात निधी मिळून देण्याच्या सूचना देऊ ,असेही त्यांनी सांगितले. ओबीसींची जातिनिहाय जनगणना झाल्यास सर्वांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सध्या या विभागाचा आढावा घेत असल्याचे सांगितले. ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नावर मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. राज्यामध्ये 72 ओबीसी होस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन याप्रमाणे बांधल्या जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. निधीची तरतूद झाल्यानंतर तालुका स्तरापर्यंत ओबीसी मुलांसाठी वसतीगृह बांधण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोकर भरतीमध्ये ओबीसींचे कमी झालेल्या आरक्षण हे चिंतेचा विषय असून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामधल्या भरतीमध्ये ओबीसींसाठी असणाऱ्या आरक्षण वाढविण्यासाठी लवकरच आपण विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वात बैठक लावणार असल्याचे सांगितले. ओबीसींसाठी क्रिमिलियरची मर्यादा वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. क्रिमीलियरवरही विचार करण्यात येईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.
राज्यातील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे. मात्र 2005 नंतर या समाजातील मुलांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन मिळावे अशी मागणी आहे. ही मागणी या सरकारच्या काळात लावून धरू असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारता यावा यासाठी एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद आपल्या विभागामार्फत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी संबोधित केले. बबनराव तायवाडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये ओबीसींच्या आंदोलनासाठी संविधानाच्या कलम 304 मध्ये तरतूद असून त्यासाठी जागरुकतेने काम करण्याचे आवाहन केले. अन्य मान्यवर वक्त्यांनी देखील यावेळी जनगणना हा किती आवश्यक प्रश्न आहे याबाबतचे मत व्यक्त केले.
000000

चंद्रपूरच्या क्रीडा वैभवामध्ये भर घालण्यासाठी अद्यावत क्रीडा संकुलाचा उपयोग व्हावा : विजय वडेट्टीवार




चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यासाठी तयार होत असलेले हे नवे रनिंग ट्रॅक नव्या खेळाडूंच्या निर्मितीसाठी पूरक ठरावेत. या माध्यमातून जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर पडावी, अशा शुभेच्छा राज्याचे मदत व पुनर्वसन, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिल्या.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलावर नव्या सिंथेटिक धावनपथाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते बोलत होते. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चंद्रपूर शहरात अशा पद्धतीचे पहिलेच सिंथेटिक धावनपथ या माध्यमातून निर्माण होणार आहे. यावेळी व्यासपीठावर चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा संकुलासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधी देखील आपण मंजूर करू. जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रीडांगण असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता पडणार नाही. मात्र या सर्व सोई सुविधांचा फायदा क्रीडापटूंना व्हावा व चंद्रपूरच्या नावलौकिकात भर पडावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
खासदार सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूर येथे उत्तमात उत्तम धावपटू तयार होण्यासाठी या नव्या ट्रॅकचा वापर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलताना चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील हे सर्वात मोठे क्रीडांगण असून या क्रिडांगणाला सर्वात अद्यावत बनविण्याचा आपला मानस असून त्यासाठी पालकमंत्र्यांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले यासोबतच त्यांनी घुगुस येथील क्रीडा संकुलात बाबतही मदत करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांनी केले. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते. त्यांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला.
00000

बळकट लोकशाहीसाठी आदर्श मतदान पद्धतीचा पुरस्कार झाला पाहिजे : जिल्हाधिकारी





जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : या देशाची बळकटी ही सशक्त लोकशाहीमध्ये आहे. ही बाब प्रत्येक मतदाराला समजेपर्यंत आपल्याला काम करणे आवश्यक आहे. मताधिकार बजावण्यासाठी जनतेमध्ये उत्साह निर्माण करणे. निवडणुकांसारख्या लोकशाहीच्या उत्सवातून जनतेमध्ये यासंदर्भात आत्मीयता निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.
जिल्हा प्रशासनातील निवडणूक विभागाच्या पुढाकारातून आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. तत्पूर्वी आज सकाळी संपूर्ण चंद्रपूर शहरामध्ये सकाळी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. ही रॅली गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगानी सुद्धा आपली उपस्थिती दाखविली.
आजच्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.पी.लोंढे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियंका पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकुमार पुजार उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी निवडणुकांमध्ये धर्म, वंश, जात, भाषा, समाज अशा कोणत्याही घटकांचा प्रभाव दिसता कामा नये. यासाठी अतिशय निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखणे हे निवडणूक कर्मचाऱ्यांचे काम असते. हे काम केवळ शासकीय काम म्हणून न करता एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याची भूमिका नेहमी शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
यामुळेच लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत अतिशय उत्तम काम जिल्ह्यातील सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी केले आहेत. यामध्ये ऐन वेळेवर मोठ्या प्रमाणात मदत करणारा शिक्षक वर्ग असुद्या व शिक्षकेत्तर कर्मचारी असुद्या किंवा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी असुद्या या सर्वांनी जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय निष्ठेने आणि कर्तव्य भावनेतून काम केल्यामुळेच उत्तम प्रकारे आपण या निवडणुका पार पाडू शकलो. यासाठी मी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यावेळी म्हणाले की, आज देशभरात हा दिवस साजरा होत आहे. राष्ट्रीय कर्तव्य अतिशय सक्षमपणे पार पाडल्याच्या भावनेला वृद्धिंगत करण्यासाठी आजच्या दिवशी चिंतन करणे गरजेचे आहे. या देशाची लोकशाही बळकट करणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक काम हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच प्रत्येक कर्मचाऱ्याने पार पाडणे गरजेचे आहे. हे अतिरिक्त काम नसून हे आपले कर्तव्यच आहे याची जाण ठेवून या कामाचे स्वागत निवडणूक कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम काम करणाऱ्या काही प्रमुख विभागांचे विशेष नामोल्लेख करून कौतुक केले. आगामी काळामध्ये जिल्ह्यांमध्ये मतदान नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी केले तर संचलन श्रीमती संतोषवार, आभार प्रदर्शन नायब तहसिलदार साळवे यांनी केले.
तत्पूर्वी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व दौंड स्पर्धा यामध्ये विजयी झालेल्‍या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याशिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम करणारे मुख्य लेखाधिकारी अशोक माटकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव, प्रभाकर गिज्जेवार, तहसीलदार रवींद्र होळी लिपीक सोनाली अशोक लांडे, निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे, अमर श्रीरामे, नायब तहसीलदार एम. बी. जोगदंड, अमोल करपे, नायब तहसीलदार सागर कांबळे, वसंत पर्वते, नायब तहसीलदार व्ही आर दरबे, यु एम लोखंडे, नायब तहसीलदार रमेश कोळपे, शंकर भांदककर, विक्रम आर. येल्ला, डी. एस. बल्की, प्रशांत गटलेवार, गीता आंबोरकर, पुरुषोत्तम येलसेट्टीवार, घनश्याम तिवारी आदींचे देखील यावेळी स्वागत झाले.
0000

Friday 24 January 2020

अद्ययावत हॉस्पिटल जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू करण्यासाठी प्रयत्न करा : विजय वडेट्टीवार


पालकमंत्र्यांकडून मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी
चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : चंद्रपूर महानगराच्या बाय पास परिसरात उभ्या राहात असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आज त्यांनी सकाळी बायपास रोड परिसरात शंभर एकरावर आकारास येत असलेल्या मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली.
आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांनी या दोन्हीही निर्माणाधीन वास्तूला भेट दिली. या वास्तूचे कामकाज नियोजित वेळेनुसार व्हावेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह असे हे हॉस्पिटल व्हावेत यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी निर्माणाधीन वास्तूच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली. बायपास रोडवर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत शंभर एकर जागेत उभी राहत आहे. सुमारे 600 कोटीहून अधिक निधी यासाठी मंजूर झाला असून 640  बेडचे रूग्णालय सुद्धा याठिकाणी उभे राहणार आहे. तर याच परिसरात राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्त्वावर शंभर खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या निर्माण संदर्भात काम करणाऱ्या विविध एजन्सीच्या अधिकारी व समन्वयकांसोबत चर्चा केली. या भागातील जनतेला उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरात लवकर या भव्य वास्तू मधून आरोग्यसुविधा सुरू व्हाव्यात. यासाठी सगळ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000