Search This Blog

Wednesday 29 November 2017

उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ दया -- कल्पना निळ



साहित्य, कला, संस्कृतीचा ग्रंथोत्सव थाटात संपन्न

चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर – चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून साहित्य, कला, संस्कृती आणि वाचन चळवळीला उजागर करणा-या ग्रंथोत्सवाचा आज समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने व सहभागाने गाजलेल्या या संमेलनातून वाचन संस्कृतीला बळकटी आणण्याचा संदेश दिला गेला. ‘उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक असल्याचा’, सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी समारोपाच्या कार्यक्रमात गुणवंताना दिला.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद चंद्रपूर, चंद्रपूर माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 28 व 29 नोव्हेंबर या काळात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा वाचन संस्कृतीला बळकटी देणारा समारंभ पारपडला. वाचनाचे विविध अंग म्हणून पुढे आलेल्या व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, वादविवाद, विविध कलागुणांना सादर करण्याची संधी या ग्रंथोत्सवातून देण्यात आली. 28 तारखेला ग्रंथदिंडीने जनजागरण करणा-या या ग्रंथोत्सवाला उत्तोरत्तर चांगल्या कार्यक्रमांनी रंगत भरल्या गेली. ग्रंथोत्सवा दरम्यान झालेल्या परिसंवादामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिटी कन्या विद्यालयाच्या मानसी विश्वकर्मा प्रथम तर ज्युबली हायस्कुलची जेबा सेल्‍वीम व्दितीय ठरली. या परिसंवादचे अध्यक्ष सुरेश चोपणे होते. 13 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कवी संमेलनामध्ये लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुलींनी आपले वर्चस्व नोंदविले. यामध्ये स्मृध्दी आगलावे व मेहवीश शेख या मुलींनी प्रथम व व्दितीय क्रमांक घेतला. या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख होते. 15 विद्यार्थी कवीनी आपल्या रचना सादर केल्या. व्याख्यानाच्या आजच्या पहिल्या सत्रात श्री.प्र.ग.तल्लवार यांच्या अध्यक्षतेत डॉ.पद्मरेखा धनकर, प्रा.अशोक माथनकर यांनी वाचन संस्कृती आणि ग्रंथालय या विषयावर मंथन केले. या सत्राचे सूत्र संचालन अनिता अडबले यांनी केले. कथाकथनामध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कथाकथनामध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या प्रणय उपरे यांनी प्रथम तर प्रियदर्शनी लधवे व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. शिक्षकांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी होते. 13 शिक्षकांनी यावेळी कवीता सादर केल्या. या सत्राचे संचालन भागवतकर यांनी केले. शिक्षकांच्या कवी संमेलनात महात्मा कनिष्ठ महाविद्यालयाचे राहूल दहिवले यांची कवीता उल्लेखनिय ठरली. वादविवाद स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रध्दा खनके व पलक खसारे या विद्यार्थींनी सूत्र संचालन केले. वादविवाद स्पर्धेमध्ये लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची वैष्णवी चिंचोळकर, सिटी कन्या विद्यालयाची दिक्षा चौधरी प्रथम व व्दितीय ठरली.
ग्रंथदिंडी आयोजनाचा प्रभार सुदर्शन बारापात्रे, किरण पराते, किरण कात्रोजवार, संजय अंडूसकर यांनी घेतला. तर जिल्हा परिषद ज्युबली हायस्कूलच्या स्वर्गीता खंडाळे, कादंबी ठेमस्कर यांनी रांगोळी रेखाटून संमलेनाची रंगत वाढविली.
समारोपाच्या कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी सन 2016-17 मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभ्यास करुन वेगवेगळया शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या 23 स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना त्यांनी वाचन ही गुंतवणूक असून विद्यार्थी दशेमध्ये केलेली मेहनत आयुष्य घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनासाठीच्या वेळेचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके होते. या समारोपीय समारंभाचे सूत्र संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी ग्रंथोत्सवाला यशस्वी करण्यासाठी कार्य केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

000

भद्रावती तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावे - ना. हंसराज अहीर


चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर- भद्रावती तालुक्यातील उपलब्ध असणा-या सर्व योजना पूर्णक्षमतेने कार्यरत करण्यात याव्या. रखडलेल्या योजनांचे सर्वेक्षण करुन गरज पडल्यास खनिज विकास निधीअंतर्गत यासंदर्भातील अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती पंचायत समिती सभागृहात आयोजित जनसंपर्क दिवस कार्यक्रमात उपस्थित अधिका-यांना पाणी पुरवठा योजनांमधील अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्रातील बंद असलेल्या, पाणीस्त्रोत नसलेल्या, स्त्रोत उपलब्ध असूनही पर्याप्त पेयजल नसलेल्या सर्व योजनांचे तातडीने नियोजन करून पाणीपुरवठा योजनांचा नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले. 
दि. 29 नोव्हेंबर रोजी आयोजित या जनसंपर्क दिन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, जि.प.सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्य प्रविण सूर, पं.स. सदस्य प्रविण ठेंगणे, नाजूका मंगाम, महेश टोंगे, नरेंद्र जिवतोडे, वरोराचे उपविभागीय अधिकारी भुसारी, तहसिलदार शितोडे, संवर्ग विकास अधिकारी तुपे, डॉ.एम.जे. खान, विजय राऊत, राहुल सराफ,  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अहीर यांनी या तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्राक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावेत असे निर्देश उपस्थित अधिका-यांना दिले. पाणीपुरवठा योजना नागरिकांना सक्षमतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी भुजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत पाणी स्त्रोतांच्या उपलब्धतेसाठी सर्वेक्षण करवून तसे अहवाल तातडीने उपलब्ध होतील याचीही खबरदारी संबंधित अधिका-यांनी घ्यावी अशी सूचना केली. 
या तालुक्यातील नळ योजनांच्या सक्षमिकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अन्य यंत्राणांनी तात्काळ आराखडा तयार करवून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आढावा घ्यावा असेही ना. अहीर यांनी या बैठकीमध्ये निर्देशित केले. 
पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेल्या पाणीपुरवठा योजनांची तसेच ही कामे पूर्ण झालेल्या योजनांची सविस्तर माहितीही संबंधितांनी त्वरित सादर करावी तसेच ज्या गावामध्ये पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी लोकांना पाणीटंचाईची अडचण निवारणार्थ टॅंकरद्वारा त्वरेने पाणीपुरवठा होईल अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी यावेळी दिल्या. भद्रावती तालुक्यातील गाव पातळीवरून वाहणा-या नाल्यांद्वारे जलसंधारण व जलसंचय वाढीसाठी या सर्व नाल्यांची इत्यंभुत माहिती गोळा करून तसा अहवाल सादर करावा, या सर्व नाल्यांचे सीएसआर निधीतून खोलीकरण केले जाईल असेही ना. अहीर यांनी या कार्यक्रमात सांगितले. जनसंपर्क दिनास उपस्थित नागरिकांनी आपल्या अनेक समस्या ना. अहीर यांच्यापुढे कथन केल्या. लोकांनी विविधांगी समस्यांचे निवेदनेही सादर केले. उपस्थित अधिका-यांनी लोकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होईल या पध्दतीने कार्यवाही करावी अशा सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमास भद्रावती तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.

0000

पुनर्वसनाच्या कामांना तातडीने पूर्ण करण्यात यावे -- ना.हंसराज अहीर



पौनी व सिनाळा येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात बैठक

चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर – हक्काच्या जमिनी शासकीय प्रकल्पामध्ये गेल्यानंतर प्रकल्प पूर्ण करतांनाच नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी देखील प्रशासनाने जबाबदारीने पारपाडावी. नागरिकांना तातडीने मोबदला मिळावा. त्यांचे पूनर्वसन व्हावे यासाठी प्रशासनाने युध्दस्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त, त्यांच्या संघटना व वेकोली, जिल्हा प्रशासनातील शिर्षस्थ अधिकारी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, वेकोलीचे महाव्यवस्थापक आर.के.मिश्रा, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) कल्पना निळ, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, तहसिलदार संतोष खांडरे, जिल्हा परिषद सदस्य सुनिल उरकुडे, राहूल सराफ, राजू घरोटे आदी उपस्थित होते.
यावेळी मसाळा तुकूम गांव यांच्या पूनर्वसनावर चर्चा झाली. याशिवाय वेकोलीतर्फे देण्यात येणारा मोबदला हा नव्या दरानुसार देण्यात यावा, विवाहित मुलींना देखील मोबदला मिळावा, पूनर्वसनाबाबचे निर्णय तातडीने व्हावे, अनुदानाची रक्कम सर्वांना सारखी राहावी, वेकोलीमध्ये शेतमजूरांना काम मिळावे, बाधीत कुटूंबाच्या पशुसाठी आर्थिक सहाय्य मिळावे, जुन्या घरांचे साहित्य वाहून नेण्यासाठी वाहतूक भाडे मिळावे, पूनर्वसन होईपर्यंत निर्वाह भत्ता मिळावा आदी अधिक मागण्या करण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची मांडणी वरिष्ठ अधिका-यासमक्ष केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना त्यांनी आपल्या समस्या मांडायला सांगितले. जिल्हाधिका-यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या असून तातडीच्या मदतीबाबत लगेच कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत दिले.      
                           0000   
   
4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन

चंद्रपूर दि.29 नोव्हेंबर - सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते.  या लोकशाही दिनानिमित्य नागरीक व शेतकरी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल करतात.
डिसेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा 4 डिसेंबर 2017 रोजी येत असल्यामुळे यादिवशी लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्‍यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाच्या प्रतीसह अर्ज सादर करावे. त्यानंतरच सदर तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल. या लोकशाही दिनात निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत राहील असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

000

Monday 27 November 2017

लाईफलाईन एक्सप्रेस 21 दिवस जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत




तज्ञ डॉक्टरांकडून जिल्हावासियांच्या आरोग्य तपासणीचा बल्लारपूर येथे शुभारंभ
जनतेने मोठया प्रमाणात लाभ घेण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्वत:ची प्रकृती ठिक नसतांना सुध्दा जिल्हयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणा-या लाईफलाईन एक्सप्रेसचा शुभारंभ केला. 27 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत बल्लारपूर येथे भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने महेंद्र फायनान्सच्या सौजन्याने जिल्हयातील नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सर, कुटूंब नियोजन, डोळे, कान या संदर्भातील आजार तसेच दंत चिकित्सा, स्तन आणि गर्भाशयाचे कर्करोगाचे परिक्षण  आदींवर या सात रेल्वेडब्यांच्या लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेच्या या लाईफलाईन एक्सप्रेसचे आगमन झाले. गेल्या 26 वर्षापासून भारतीय रेल्वे, महेंद्र फायनान्स व इन्पॅकट इंडिया फाँऊडेशन यांच्यामार्फत दूर्गम भागातील जनतेला या आरोग्य एक्सप्रेसव्दारे सेवा दिली जाते. देशभरातील दूर्गम भागात ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला अधिकची आरक्षित रेल्वे प्लॅटफार्म आहे. अशा ठिकाणी स्थानिक लोकांच्या प्रतिसादानुसार तज्ञ डॉक्टरांच्या चमूच्या मदतीने या एक्सप्रेसमध्ये आरोग्य सेवा दिली जाते. प्रामुख्याने मोती बिंदूची शस्त्रक्रीया, कानाच्या छोटया शस्त्रक्रीया, चष्म्याचे वाटप, मशीनचे वाटप, फाटलेल्या ओठांवरच्या शस्त्रक्रीया, कर्करोगावरची तपासणी व त्या संदर्भातील आवश्यक शस्त्रक्रीया या एक्सप्रेसमध्ये केल्या जाते. या ठिकाणी मुंबईच्या टाटा ट्रस्ट रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असते. तसेच गरजेनुसार स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली जाते. कॅन्सरसारख्या आजारामध्ये भारतातील सर्व कॅन्सर रुग्णालयातल्या तज्ञांची गरजेनुसार मदत घेतली जाते. क्लीस्ट शस्त्रक्रीयांसाठी संबंधीत रुग्णाला अन्यत्र हलविण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.
या एक्सप्रेसला सात रेल्वे डब्बे असून यामध्ये पहिला कोच संयपाकासाठी राखीव आहे. दुसरा कोच डॉक्टर व प्रशासकीय अधिका-यांसाठी राखीव आहे. तिस-या व चौथ्या कोचमध्ये अद्ययावत शस्त्रक्रीया रुम आहेत. पाचवा कॅन्सर डिटेक्शन कोच आहे. सहावा कुटूंबनियोजन कोच तर सातवा दंत चिकित्सेसाठी राखीव ठेवला आहे. 20 लोकांचा तज्ञ चमू या ठिकाणी काम करीत असून यामध्ये तज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. बल्लारपूर येथील बचत भवनाजवळून प्रवेशासाठी जागा निश्चित करण्यात आली असून याच ठिकाणी रुग्ण नोंदणी कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हयातील दूर्गमभागातील नागरिकांनी या आरोग्य तपासणी मोहीमेचा सकाळी 9 ते 5 या काळात लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आज या संदर्भातील औपचारीक उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हयातील नागरिकांनी या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. उदघाटनच्या कार्यक्रमाला आमदार नानाभाऊ शामकुळे, ॲड.संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, नगराध्यक्ष हरीष शर्मा, महेंद्र ॲन्ड महेंद्र कंपनीचे सुशिलसिंग, विनय देशपांडे, योगेश कुळकर्णी, इन्पॅक्ट इंडिया फॉऊडेशनचे अनिलप्रेम सागर दरशे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी श्रीमती टोंगे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून या आरोग्य सेवेचे रेल्वेस्थानकात उदघाटन केले. डॉक्टरांनी त्यांना भाषण न देण्याचा वैद्यकीय सल्ला दिला असून त्यांचे मनोगत रेल्वेस्टेशन ग्राऊड येथे झालेल्‍या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वाचून दाखविले.

000

टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने 80 कोटी रू. निधी खर्चून चंद्रपूर जिल्‍हयात कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारणार – सुधीर मुनगंटीवार




लाईफ लाईन एक्‍सप्रेस या आरोग्‍य विषयक उपक्रमाचा बल्‍लारपूरात शुभारंभ

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर - लाईफ लाईन एक्‍सप्रेस हा उपक्रम गरीब, गरजू रूग्‍णांसाठी अतिशय महत्‍वाचा आहे. या उपक्रमाची संकल्‍पना जेव्‍हा माझ्यासमोर मांडली गेली तेव्‍हाच मी हा उपक्रम चंद्रपूर जिल्‍हयात राबविण्‍याचे ठरविले. आरोग्‍य या विषयाला मी नेहमीच अग्रक्रम व प्राधान्‍य दिले आहे. रूग्‍णसेवा हीच खरी ईश्‍वराची सेवा आहे या भावनेने मी या क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने सुमारे 80 कोटी रू. खर्चून सर्व सुविधांनी युक्‍त असे कॅन्‍सर हॉस्‍पीटल चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांच्‍या सेवेत लवकरच रूजु होणार आहे. आरोग्‍य सेवेचा हा वसा असाच अव्‍याहतपणे सुरू राहील अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.
  27 नोव्‍हेंबर रोजी बल्‍लारपूर येथे भारतीय रेल्‍वे, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या सहकार्याने आणि महिंद्रा फायनान्‍स यांच्‍या सौजन्‍याने लाईफ लाईन एक्‍सप्रेस या आरोग्‍य विषयक उपक्रमाचा शुभारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी झालेल्‍या जाहीरसभेदरम्‍यान वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. अंजली घोटेकर, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पापळकर, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, महिंद्रा फायनान्‍सचे सुशील सिंग, विजय देशपांडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 
  यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने संबोधित करताना देवराव भोंगळे पुढे म्‍हणाले, मोठया प्रमाणावर आरोग्‍य विषयक उपक्रम आम्‍ही सातत्‍याने या जिल्‍हयात राबविल्‍या आहेत. मुल येथे आरोग्‍य महामेळावा, कर्करोग निदान शिबीर या उपक्रमांसह मोठया प्रमाणावर नेत्रचिकीत्‍सा शिबीरे आम्‍ही आयोजित केली. यामाध्‍यमातून 35 हजार नागरिकांना निःशुल्‍क चश्‍मे वितरीत केले. 5 हजार नागरिकांवर मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया केल्‍या. शेकडो नागरिकांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून शस्‍त्रक्रिया व उपचारासाठी मदत मिळवून दिली. या जिल्‍हयासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कार्यान्‍वीत केले. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाला मंजूरी मिळाली, या ग्रामीण रूग्‍णालयाचे काम निविदा स्‍तरावर आहे. मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्‍य केंद्र मंजूर करण्‍यात आले. शिरडी संस्‍थानकडून 8 कोटी रू. किंमतीची एमआरआय मशीन मंजूर करण्‍यात आली. जिल्‍हयातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र अद्ययावत करण्‍यासाठी योजना आखून मॉडेल आरोग्‍य जिल्‍हा म्‍हणून चंद्रपूर जिल्‍हा करण्‍याचा आमचा मानस आहे. सीएसआर च्‍या माध्‍यमातून मुल, चिचपल्‍ली, नांदगांव, बेंबाळ, धाबा, घुग्‍गुस, पडोली, बल्‍लारपूर, विसापूर, पोंभुर्णा, ज्‍येष्‍ठ नागरिक संघ चंद्रपूर येथील संस्‍थांना रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून दिल्‍या. आरोग्‍य, शिक्षण, रोजगार या क्षेत्रात भरीव काम करण्‍याचा माझा मानस व संकल्‍प आहे, अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
  बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍टेशनच्‍या प्‍लॅटफॉर्म नं. 1 वर लाईफ लाईन एक्‍सप्रेस चा शुभारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फीत कापून केला. या लाईफ लाईन एक्‍सप्रेस मध्‍ये नेत्रांशी संबंधित उपचार व शस्‍त्रक्रिया, कानांशी संबंधित आजार व उपचार, फाटलेल्‍या ओठांची शस्‍त्रक्रि, कर्करोग निदान तसेच स्‍तन आणि गर्भाशयाचे कर्करोगाचे परिक्षण, परिवार नियोजन व आरोग्‍य सेवा याबाबतच्‍या उपायांची माहिती, मिरगी तसेच दंतचिकीत्‍सा व त्‍या संबंधीचे उपचार याबाबत उपचार व शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टरांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे यासाठी इम्‍पॅक्‍ट इंडिया या संस्‍थेच्‍या तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
  रेल्‍वे स्‍थानकासमोरील झालेल्‍या जाहीरसभेत बोलताना बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलत असल्‍याचे सांगत बस स्‍थानकाचे अत्‍याधुनिकीकरण व नुतनीकरण, अतयाधुनिक पोलिस स्‍टेशनचे बांधकाम, हरीत रेल्‍वे स्‍थानक, नाटयगृहाचे बांधकाम आदी विकासकामे प्रगतीपथावर असुन हे शहर राज्‍यातील प्रमुख विकसित शहर होणार असल्‍याचे सांगीतले.
  सतत लोककल्‍याणाचा विचार उराशी बाळगणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अनेक नागरिकांसाठी देवदूत ठरल्‍याची प्रतिक्रिया वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष  चंदनसिंह चंदेल यांनी व्‍यक्‍त केले. आ. नानाजी शामकुळे यांनी आपल्‍या भाषणात ना. मुनगंटीवार यांनी अर्थ व वनविभागाला नवी ओळख मिळवून दिल्‍याचे सांगत जनहितासाठी सीएसआर निधीचा वापर कसा करावा याचा आदर्श त्‍यांनी प्रस्‍थापित केल्‍याचे सांगीतले. आपल्‍या भाषणात आ. संजय धोटे यांनी आदिवासी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी ना. मुनगंटीवार यांनी निधी देवून आदिवासींसाठी आरोग्‍यदायी निर्णय घेतल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
  यावेळी महिन्‍दा फायनान्‍सचे सुशील सिंग यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात सांगीतले की महिन्‍द्रा फायनान्‍स शिक्षण, आरोग्‍य, पर्यावरण या क्षेत्रावर विशेष भर देवून कार्यरत आहे. लाईफ लाईन एक्‍सप्रेस या उपक्रमाची संकल्‍पना आम्‍ही ना. मुनगंटीवार यांच्‍यासमोर ठेवली. त्‍यांनी घेतलेल्‍या पुढाकारातुनच हा उपक्रम चंद्रपूर जिल्‍यात राबविण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍या वृक्ष लागवडीच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत महिन्‍द्रा फायनान्‍स सुध्‍दा वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेणार असल्‍याचे सांगीतले. यावेळी महिन्‍द्रा फायनान्‍सचे विनय देशपांडे यांनी सुध्‍दा आपले मनोगत व्‍यक्‍त केले. लाईफ लाईन एक्‍सप्रेस हा उपक्रम 30 नोव्‍हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत बल्‍लारपूर येथे राबविण्‍यात येत आहे. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
0000

Saturday 18 November 2017

प्रधानमंत्र्यांच्या स्कील इंडियासाठी सिपेटच्या माध्यमातून काम करु शकल्याचा आनंद -- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर



सिपेटच्या पहिल्या तुकडीला प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कौशल्य विकासाची घोषणा केली होती. चंद्रपूरमध्ये सेन्ट्रल इन्स्टिटयुट ऑफ प्लॅस्टीक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय मंत्री म्हणून या विभागासाठी हे काम करु शकल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
विदर्भातील सर्वात प्रभावी असणा-या या प्रशिक्षणाला आगामी काळात वैभव प्राप्त होणार आहे. पहिल्याच तुकडीतील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील कौशल्य विकास उपक्रमाचे हे जीवंत उदाहरण आहे. चंद्रपूरमधील औद्योगिक संस्थांनी या प्रशिक्षणार्थ्यांना स्थानिक स्तरावरही संधी दयावी, असे आवाहन केले.
केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री असताना मला या प्रशिक्षणाबद्दल कळले होते. त्यावेळी या इन्स्टिटयुटमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच रोजगार उपलब्ध होतो. ही बाब मला लक्षात आली. त्यामुळे ही संस्था आपल्या येथे मिळावी यासाठी प्रयत्न केले, त्याला यश आले. भारतात 27 ठिकाण ही संस्था चालते. त्यात चंद्रपूरचा सहभाग आहे. ही संस्था या ठिकाणी सुरु करुन शकल्याबद्दल आज खरा आनंद होत आहे.  
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांच्यासह आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, वरोराचे नगराध्यक्ष एहेतशाम अली, माजीमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनील फुलझेले, सिपेटचे प्रकल्प प्रमुख मिलिंदकुमार भरणे  उपस्थित होते.
भारत सरकारच्या रसायणे, खते मंत्रालयातंर्गत येणा-या केमीकल आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर येथे सेन्टर यून्स्टिटयुट प्लॉस्टिक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था काम करते. महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत प्रशिक्षण मिळालेल्या 90 टक्के मुलांना चांगल्या कंपनीत हमखास नोकरी मिळत आहे. या संस्थेची सुरुवात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पेट्रोकेमिकल विभाग असताना झाली. ही संस्था चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारी संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हॉटेल एनडीमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हयातील शासकीय, गैरशासकीय औद्योगिक संस्था, विविध व्यापारी संघटना, व्यापार उद्योग समूहातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन सिध्दार्थ दाभाडे यांनी केले. आदिवासी गावातील विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठीत कंपनीत नोकरी लागल्यानंतरचे मनोगत या कार्यक्रमाचे वैशीष्टय ठरले.  या कार्यक्रमाला एससीसी, अल्ट्राटेक, माणिकगड, सिटीपीएस, डल्ब्युसिएल, एमईल, अंबुजा सिमेंट आदी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या कौतुक सोहळयाला उपस्थित होते.

0000

सामान्य जनतेला समाधान वाटेल अशी खड्डे मुक्त मोहीम राबवा - चंद्रकांत दादा पाटील



चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा
चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर – रस्ते दुरुस्ती, त्यातील तांत्रिक अडचणी व खड्डे दुरुस्ती मोहीम यामध्ये कारणमिमांसा न देता जनतेला समाधान वाटेल, अशा पध्दतीच्या खड्डे मुक्त मोहीमेला धडाक्याने पूर्ण करा. 15 डिसेंबरपर्यंत ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
ना.चंद्रकांत दादा पाटील खड्डे मुक्त महाराष्ट्र मोहीमेसाठी 34 जिल्हयांच्या दौ-यावर आहेत. चंद्रपूर हा त्यांचा या मोहिमेतील 16 वा जिल्हा होता. तत्पूर्वी वर्धा जिल्हयात त्यांनी आज बैठक घेतली. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीनही विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता उल्हास डेबडवार, अवर सचिव करमरकर, आंतर वित्तीय सल्लागार मेश्राम, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे आदी उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व पदावरील अभियंते, सहायक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बालपांडे यांनी चंद्रपूर जिल्हयात सुरु असलेल्या कामाचा आढावा सादरी करणामार्फत मांडला. जिल्हयातील 2510 कि.मी.लांबीच्या रस्त्यामध्ये 450 लहान मोठे पुल असून जवळपास 40 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्यामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-या चिमूर येथील उपविभागीय अभियंता श्री.टिकले, नागभिड उपविभागीय अभियंता श्री.कोठारी, सिंदेवाही येथील उपविभागीय अभियंता श्री.पुपरेड्डीवार यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दादा पाटील यांना सादरीकरण करतांना नियोजन भवनाच्या भव्यतेबद्दल व तांत्रिक वैशिष्ठयाबद्दल माहिती देण्यात आली. या नियोजन भवनाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाची भूमिका असणारे चंद्रपूरचे उपविभागीय अभियंता उदय भोयर, शाखा अभियंता चंद्रशेखर कोडगीलवार, स्थापत्य अभियंता संजय धारणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सामान्य कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यत सर्वांशी संवाद साधतांना मुंबईच्या वाररुमध्ये कशा पध्दतीने काम सुरु आहे, याची माहिती दिली. नागपूर व चंद्रपूरमध्ये नवनवीन उपाय योजना करुन काही जुन्या इमारतींचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षानी वाढविण्यात आले आहे. तांत्रिक दृष्टया योग्य असणा-या या बांधकामाला नवे स्वरुप दिल्याबद्दल त्यांनी विभागाच्या कर्मचा-यांचे कौतुक केले. खड्डेमुक्त जिल्हा करण्यासाठी यावेळी काही तरुण अभियंत्यांनी वेगवेगळे उपाय सूचविले. तर काहींनी वेगळया सूचना केल्या. या सूचनांचे स्वागत करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिमा संवर्धनासाठी जनतेच्या या विभागातील सहभागाबद्दल आग्रही राहा, अशी सूचना त्यांनी केली. सामान्य जनतेला तांत्रिक बाबी माहिती नसल्यातरी त्यांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे खड्डेमुक्त अभियानात देखील काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र समाजातील विविध घटकातील दहा लोकांकडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंचापासून गृहीनी पर्यंत या मोहीमेमध्ये जनसहभाग घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
                                                                       0000