Search This Blog

Wednesday, 15 July 2026

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Ø 29 जुलै पूर्वी सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.15: महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 03 ऑगष्ट, 2026 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, हॉल क्रमांक 19, जिल्हा माहिती कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन 03 ऑगष्ट, 2026 ते 15 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत म्हणजेच सुमारे साडेतीन  महिन्यांचे असेल, वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या  स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी 29 जुलै, 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व बैंक पासबुक) छायाप्रतीसह नोंदणी फॉर्म सादर करावा, नोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 30 जुलै, 2026 रोजी घेण्यात येईल, तर निवड यादी 31 जुलै, 2026 रोजी प्रसिध्द केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकाचे संच तसेच प्रतीमाह 1 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रोशन गभाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. मनोज सिडाम (मो. क्र. ९७६४५८०९८६) यांच्याशी अथवा कार्यालयासी संपर्क साधावा.

000000

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि.15: जागतिक युवा कौशल्य दिना निमित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि डाखरे महाराज फाऊंडेशन, वडगांव ता. कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जुलै, २०२६ वेळ स.१०.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, हनुमान मंदिर, वडगांव, ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील १० वी, १२वी, आय. टी. आय., पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळावा आयोजन करण्यात येत आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना व इतर असे एकूण १४५ पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये १. दालमिया सिमेट (भारत) लिमिटेड, २. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर माणिकगड सिमेंट वर्कस) ३. अंबुजा सिमेंट, लिमिटेड उपरवाही तह. कोरपना जि. चंद्रपूर ४. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना ५. सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ६. व्ही.आर इंटरप्राईजेस  ७. सहयोग मल्टिस्टेट क्रेडरेटिव्ह सोसायटी इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे, जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in/ https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/https://pminternship.mca.gov.in  या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करण्याबाबत तसेच उमेदवारांनी सदर रोजगार मेळावा मध्ये सहभाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

000000

'जय सिद्धी विनायक' कंपनीतील गुंतवणूकदारांनी दोन दिवसांत कागदपत्रे सादर करावीत


'जय सिद्धी विनायक' कंपनीतील गुंतवणूकदारांनी दोन दिवसांत कागदपत्रे सादर करावीत

Ø आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : "जय सिद्धी विनायक" (JSV) कंपनीतील गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीसंबंधीची आवश्यक कागदपत्रे तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक खात्याची माहिती तातडीने आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे सादर करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केले आहे.

दि. ८ जुलै २०२६ रोजी भरत बाबुराव दिघोरे (रा. इंदाळा, ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील फसवणूक व विश्वासघाताशी संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण (MPID) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात "जय सिद्धी विनायक" (JSV) कंपनीचे संचालक विजयालक्ष्मी कटेत (भोपाळ), दिनेश टेंभरे (आमगाव), योगेश रेहपाडे (चंद्रपूर) आणि निखिल शेंडे (लाखांदूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी विविध आकर्षक ठेवी योजनांच्या माध्यमातून ६५९ गुंतवणूकदारांची सुमारे ९३ लाख ९२ हजार १७५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण अधिनियमांतर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, भंडारा यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक रक्कम परत करण्याबाबत न्यायालयाने आदेशही दिले आहेत.

यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे सादर केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी आता आधार कार्ड, पॅनकार्ड तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत किंवा बँक खात्याची माहिती दोन दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

कमी पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात

 कमी पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात

Ø डॉ. जी. आर. शामबुवर यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : जिल्ह्यात सुरू असलेल्या अपुऱ्या पावसामुळे भात रोपवाटिकांवर पाण्याचा ताण निर्माण होत असून, रोपांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत भात रोपवाटिकेचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वरिष्ठ तज्ञ डॉ. जी. आर. शामबुवर (वि.कृ.स.के., सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांनी केले आहे.

कमी पावसाच्या परिस्थितीत दुपारी १२ ते ४ या वेळेत रोपवाटिकेवर सुती कापड किंवा हिरव्या नेटची सावली देणे उपयुक्त ठरते. शक्य असल्यास रोपवाटिकेच्या ८ ते १० फूट उंचीवर ग्रीन नेट उभारल्यास पाण्याचा ताण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होते.

रोपवाटिकेतील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी बायोचार, गांडूळ खत किंवा लाकडाचा भुसा यांचा वापर करावा. तसेच पाणी केवळ संध्याकाळच्या वेळी हलक्या प्रमाणात द्यावे. पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्यास झारी किंवा पाठीवरील पंपाद्वारे फवारणी करावी. दुपारच्या कडक उन्हात पाणी देणे टाळावे. ज्या शेतकऱ्यांकडे मर्यादित ओलीताची सुविधा आहे, त्यांनी रोपवाटिकेत पाणी साचवून ठेवू नये. मातीमध्ये आवश्यक तेवढाच ओलावा (वाफसा) राहील इतकेच पाणी द्यावे.

रोपांना पाण्याच्या ताणाचा सामना करण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) द्रावणाची तसेच ०.२ टक्के प्रोलीनची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. यामुळे रोपांची ताण सहन करण्याची क्षमता वाढून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

याशिवाय, २० ते ३० दिवसांच्या रोपांवर बाष्परोधकांची (Antitranspirant) फवारणी केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन रोपे सुरक्षित राहतात. फवारणीपूर्वी एक तास अगोदर साध्या पाण्याची फवारणी करावी. बाष्परोधकांमध्ये पाण्यात विरघळणारे सिलिकॉन, केओलिन किंवा पोटॅशियम क्लोराइड यांचा शिफारशीनुसार वापर करता येतो. यामुळे पानांवर संरक्षणात्मक थर तयार होऊन पाण्याचे बाष्पोत्सर्जन कमी होते आणि रोपांना उष्णतेचा ताण सहन करण्यास मदत मिळते.

डॉ. जी. आर. शामबुवर यांनी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या उपाययोजना राबवून भात रोपवाटिकेचे नुकसान टाळावे, असे आवाहन केले आहे.

000000

16 जुलै रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

 


16 जुलै रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूर दि.14 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 16 जुलै रोजी नियोजन भवन, चंद्रपूर येथील सभागृहात दुपारी 12.00 वाजता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांसंदर्भातील आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र लिमिटेड कंपनीसोबत बैठक घेतील.

त्यानंतर दुपारी 1.00 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कोळसा खाणी व कोल वॉशरीज यांच्याशी संबंधित विविध विषयांबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहून संबंधित विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील.

०००००००