Search This Blog

Tuesday, 16 June 2026

'पॉश'चे उल्लंघन पडणार महागात


'पॉश'चे उल्लंघन पडणार महागात

Ø शासकीय, खासगी आस्थापनांमध्ये त्रुटी  आढळल्यास दंडात्मक कारवाई

Ø जिल्हास्तरावरील पथकामार्फत धडक मोहिमेला सुरूवात

चंद्रपूर, दि. १६ : कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी महामंडळ व खाजगी आस्थापनांची तपासणी करून त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हा स्तरावरील पथकाने १५ जून रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे धडक मोहिमेला सुरुवात केली  व मोहिमेअंतर्गत पॉश अॅक्टनुसार माहिती घेण्यात आली. तसेच प्रशासकीय भवनातील महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, जीएसटी कार्यालय व कार्यालयांची तपासणी केली. या धडक मोहिमेमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर व विधी अधिकारी अनिल तानले यांचा समावेश होता

कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम (पॉश) अंतर्गत प्रत्येक संस्थेत तक्रार निवारणासाठी अंतर्गत समिती असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या समित्या कागदावरच असल्याचे तसेच समित्यांची माहिती अद्ययावत नसणे आणि कायद्यातील तरतुदीचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांची जिल्हा स्तरावरील पथकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेमुळे महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊन कायद्याची अंमलबजावणी  अधिक प्रभावी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

१० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती बोर्ड दर्शनी भागात असणे, 'शी-बॉक्स पोर्टलवरील कार्यालयाची नोंद असणे, अंतर्गत तक्रार समिती माहिती नोंद करणे व अद्यावत असणे आवश्यक आहे. त्रुटी आढळल्यास प्रथम वेळी दंड ५० हजार रुपये, दुसऱ्यावेळी  १ लक्ष रुपये दंड व लायसेंस रद्द करण्याचे तरतूद आहे.

महिला सुरक्षिततेसाठी अंमलबजावणीवर विशेष भर : पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, याची पडताळणी केली जाणार आहे. त्रुटी दूर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यामध्ये तपासणीसाठी अधिकारी निश्चित करून त्यांना कार्यक्षेत्र दिले आहे. तपासणी करिता जिल्ह्यातील एकूण १०९ तपासणी अधिकारी/कर्मचारीचा समावेश आहे. पॉश कायद्यानुसार १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनांत 'अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

अशी होणार पडताळणी : १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेतील पॉश धोरण, समितीची रचना, महिला सदस्यांचे प्रमाण, बाह्य सदस्याची नियुक्ती, तक्रार नोंदवण्याची व्यवस्था, जनजागृती कार्यक्रम आणि चौकशी प्रक्रियेतील गोपनीयता यांची पडताळणी केली जाणार आहे. 'शी बॉक्स' पोर्टलवर नोंदवणे आणि नियमित अद्ययावत ठेवणेही आवश्यक आहे. या सर्व बार्बीची तपासणीदरम्यान छाननी होणार आहे.

तरी सर्व आस्थापनांनी, तपासणी सुचीचे अवलोकन करून माहिती अद्यावत करून ठेवावी, जेणेकरून तपासणीमध्ये कायद्याचे पालन होते आहे, हे दिसून येईल, असे  जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

000000

शेतक-यांनो! आतापासूनच शेती व्यवस्थापनात आवश्यक बदल करा

 

शेतक-यांनो! आतापासूनच शेती व्यवस्थापनात आवश्यक बदल करा

Ø एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी व अनियमित पावसाचा अंदाज

चंद्रपूर, दि. १६ : एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये खंड पडणे, पावसाचे प्रमाण कमी असणे किंवा पावसाळा लवकर संपणे, अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज असून यावर्षी एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, कापूस, तूर व ज्वारी तसेच इतर तृणधान्य व गळीतधान्य उत्पादक शेतक-यांनी कृषी तांत्रिक बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

मंगळवारी चंद्रपूर जिल्हयात महसूल मंडळ निहाय ३२.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सदर पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचे अवलोकन केले असता जिह्यातत कोणत्याही महसूल मंडळात ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद झाली नाही. खरीप पिकांची पेरणी सलग दोन ते तीन दिवस किमान ७५  ते १०० मिमी पाऊस होऊन किंवा जमिनीखाली ६ इंच खोलीपर्यंत ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी बाबत निर्णय घ्यावा.

अपुरा पाऊस झालेल्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता असते. सोयाबीन पिकाच्या लवकर येणा-या व कमी कालावधीच्या वाणांची बीबीएफ/सरी वरंभा/बेड पध्दतीने लागवड करावी. या पध्दतीमुळे पावसातील खंडाच्या परिस्थितीत जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. कापसाची लागवड सुद्धा सरी वरंभा बेडवर करावी. यामुळे पावसाचा खंड पडल्यास सरींमध्ये ओलावा टिकून राहतो आणि कमी पाऊस झाला तरी पाणी मुळांच्या कार्यकक्षेत थांबते.

शेतक-यांनी पेरणीपुर्वी घरगुती किंवा कृषी निविष्ठा केंद्रातून घेतलेल्या बियाणांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी. यासाठी १०० बिया ओलसर कागद अथवा गोणपाटावर १० लाईनमध्ये ठेवून पाणी टाकावे. ६ ते ७ दिवस गुंडाळी करून थंड सावलीत ठेवावे. कापूस बियाणे ७० टक्के, सोयाबीन बियाणे ७० टक्के, भात बियाणे ८० टक्के व तूर बियाणे ८० टक्के  बियाणे उगवल्यास पेरणी करावी.

सूक्ष्म सिंचन आणि जलसंधारणावर भर आवश्यक : उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून पिकांच्या मुळांपर्यंत आवश्यक तेवढेच पाणी पोहोचवता येईल. याशिवाय, पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत शेततळे, सिंचन तलाव व जलसाठवण टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी व मातीची धूप रोखण्यासाठी समतल बांध, चर, कंपार्टमेंट बंडिंग यांसारखी मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावीत. जमिनीतील बाष्पीभवन कमी करून ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करावा. यामुळे तणांचे प्रमाणही नियंत्रित राहते. तसेच शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.

महाविस्तार ॲप : जास्तीत जास्त शेतक-यांनी महाविस्तार ॲप डाउलोड करून त्यावर नोंदणी करावी. शासकीय योजना आणि सबसिडी, हवामान आणि पीक सल्ला, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, बाजारभाव, कृषी विभागाचे उपक्रम  इत्यादी बाबींची तांत्रिक माहिती घेवून त्याचा अवलंब करावा. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी  अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी.

000000

परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारकांचे उजळणी प्रशिक्षण


परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारकांचे उजळणी प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. १६ : रस्ता अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवितहानी व वित्तहानी होत आहे. बहुतेक अपघातामध्ये प्रामुख्याने प्रवासी बस, स्कूल बस ट्रक, ट्रेलर, टेम्पो, टॅक्सी, ऑटोरिक्षा इत्यादी वाहन चालकाचा समावेश मोठया प्रमाणात दिसून येतो. सदर वाहन चालकांना उजळणी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यलय, चंद्रपूर येथे 1 जुलै 2026 पासून उजळणी  प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील दर बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षामध्ये आयोजित  करण्यात येईल. अनुज्ञप्ती नुतनीकरण करतांना वाहनधारकांना सदर उजळणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या दोषी वाहनधारकाविरुध्द उदा.  विना हल्मेट, मोबाईलवर बोलने, मालवाहू वाहनातून प्रवास वाहतूक, जादा भार वाहतूक, रेड सिग्नल जंपीग, बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे इत्यादी वाहनधारकांना सदरचे प्रशिक्षण हे बंधनकारक करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

००००००

सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासंबंधी 18 जून रोजी पेन्शन अदालत


सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासंबंधी 18 जून रोजी पेन्शन अदालत

चंद्रपूर, दि. 16 : सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या अडचणीचे निराकरण करणे तसेच सेवानिवृत्ती वेतन प्रकरणावर करावयाची कार्यवाही याबाबत 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे पेन्शन अदालत/कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक यांनी सदर पेन्शन अदालत/कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे  जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 15 June 2026

कर्जाची रक्कम बचत गटांच्या महिलांच्या खात्यात थेट जमा करा




कर्जाची रक्कम बचत गटांच्या महिलांच्या खात्यात थेट जमा करा

Ø माविमच्या क्रेडीट प्लॉन सेमिनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश

चंद्रपूर, दि. १५ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) बचत गटांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर बचत गटाच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा झाल्यावर ती काढून महिलांना रोखे स्वरुपात देण्यात येते. मात्र तसे न करता बचत गटाच्या महिलांच्याच खात्यात कर्जाची रक्कम थेट जमा करावी, जेणेकरून कर्ज वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी बँकांना दिले.

नियोजन सभागृह येथे आज (दि. १५) तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आयोजित क्रेडीट प्लॉन सेमिनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनुने, माविमचे विभागीय सल्लागार राजू इंगळे, विभागीय उपजीविका सल्लागार अमित गाढे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, विविध बँकांचे प्रतिनिधी, लोकसंचालित साधन केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महिला बचत गटाला कर्ज मंजूर झाल्यानंतर, बँकेतील रक्कम रोख स्वरूपात काढून गावात महिलांना वाटप केली जाते. परंतु २०२६ -२७ पासून माविमद्वारे ही पद्धत बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना रोख रक्कम न देता बँकांनी आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने संबंधित सर्व बँकांना सूचना द्याव्यात. तसेच बचत गटाला कर्ज देताना बँक हप्ते पाडून देत नाही. त्यामुळे अनेकदा बचत गटांची अडचण होते. याबाबत सुद्धा अग्रणी बँकेने त्वरित कार्यवाही करावी. बँकांनी बचत गटाचे पासबुक अपडेट करून देऊन स्टेटमेंट सुद्धा उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

सन २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील १५९९ महिला बचत गटांना ५४.५५ कोटी रुपयांचे बॅक कर्ज उपलब्ध करून देण्याचा क्रेडिट प्लॅन तयार करण्यात आल्याचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी सांगितले.

000000