Search This Blog

Friday, 22 May 2026

सण – उत्सव शांततेत साजरे करू या!


 

सणउत्सव शांततेत साजरे करू या!

Ø जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन

Ø जिल्हा शांतता समितीची बैठक

चंद्रपूर, दि. 22 : पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पेालिस विभागाच्या वतीने आयेाजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, सहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, शहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सोशल मिडीयावर फेक किंवा निगेटिव्ह मॅसेज दिसला की त्वरीत पोलिस विभाग किंवा सायबर टीमला कळवावे. वेळेवर फॅक्ट चेक करावे, जेणेकरून अफवा पसरणार नाही. विशेष म्हणजे पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त अकुनूरी नरेश म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित रहावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध्करून दिले जाईल. साफसफाई व इतर आवश्यक उपाययेाजना मनपाने केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.

पोलिस प्रशासन सजगपोलिस अधिक्षक नोपाणी

ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोमांसची तस्करी होऊ नये, यासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील अफवांवर किंवा चुकीच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबरची टीम 24 बाय 7 कार्यरत आहे. काही चुकीचे आढळल्यास पोलिस विभाग किंवा 112 क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावी. जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.

नागरिकांनी केल्या सुचना : ईद निमित्त शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी प्रशासनाला सुचना केल्या. यात 1) विद्युत पुरवठा अखंडीत राहावा 2) पाणी पुरवठा नियमित व्हावा 3) कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा 4) गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवावे 5) असामाजिक तत्व व विघातक लोकांना गर्दीपासून दूर ठेवावे 6) सोशल मिडीयावर अफवा पसरू नये, यासाठी गांभियाने दक्षता घ्यावी 7) शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे 8) अवैध होर्डीग्जवर कारवाई करावी.

०००००००

आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

 

आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विविध आश्रमशाळांमधील 9 वी आणि 11 वी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बांबू काम, टेराकूटाचे विविध वस्तू बनवणे, मेहंदी, रांगोळी आर्ट, योगा, आर्चरी, विविध वाद्य वाजवणे, कराटे, लाठी काठी, गोंडी पेंटिंग यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर विषय शिकवण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि ते शिक्षक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात 24 तास विद्यार्थ्यांना उपलब्ध होते.

सदर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तसेच पुढील भविष्यामध्ये त्यांना बांबू टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करता यावे, या उद्देशाने 40 आदिवासी विद्यार्थ्यांना चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र’ (बीआरटीसी) येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बांबू प्रशिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतल्याचे अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

०००००

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 25 मे रोजीची यात्रा स्थगित

 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 25 मे रोजीची यात्रा स्थगित

चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनेमुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनासुरू करण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 25 मे ते 30 मे या कालावधीत महाबोधी मंदीर बुध्दगया (बिहार) येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव लाभार्थ्यांना घेऊन जाणारी 25 मे रोजीची यात्रा स्थगित करण्यात आली असून यात्रेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

०००००००

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा

 

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø पशुसंवर्धन आयुक्त पाटील यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 22 :  राज्यातील गाई-म्हशीच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023 लागू केला आहे. मात्र, अद्यापही क्षेत्रीय स्तरावरील खाजगी कृत्रिम रेतन सेवादाता व संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी अधिनस्त अधिका-यांना दिले आहेत.

राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. उत्तम दर्जाच्या वळूंचा वापर करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ जनावरांची पैदास वाढवणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्र, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांना प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरता येईल. या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाची' स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाला केंद्रांची तपासणी, झडती व नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली असल्याने संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी प्राधिकरणाकडे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

दंड व शिक्षेच्या तरतुदी : 1) कलम 45 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र धारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर 50 हजार रुपयांपर्यंत दंड, 2) नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे, अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर 1 लक्ष रुपयांपर्यंत दंड,  3) नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची / दिशाभूल करणारी जाहिरात किंवा प्रसिद्धी केल्यास, दोष सिद्ध झाल्यावर 6 महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा 2 लक्ष रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे  : फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करा, सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासा व नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्या, कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून आपल्या पशुधनाचे संरक्षण करा.

शेतकऱ्यांना होणारे फायदे : सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन, उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढ, वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास, दुग्ध व्यवसायात स्थैर्य व आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

०००००००

1 जून रोजी लोकशाही दिन


 1 जून रोजी लोकशाही दिन

चंद्रपूर, दि.22 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. तसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

जून 2026 महिन्याचा पहिला सोमवार 1 जून रोजी येत असल्याने या दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावा. तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, तद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००