Search This Blog

Wednesday, 22 July 2026

जिल्ह्यातील 854 अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे वाटप


 जिल्ह्यातील 854 अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे वाटप

Ø 5376 जणांना त्वरीत दस्तऐवजांची पुर्तता करण्याच्या सुचना

Ø अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसे. 2026 पर्यंत.

चंद्रपूर, दि. 22 : शासकीय जमिनीवरील नझुल क्षेत्रातील तसेच शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील सन 2011 पर्यतची निवासी अतिक्रमणे मंजुर करून संबंधितांना कायमस्वरुपी हक्काचे पट्टे देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत 25 मार्च 2026 रोजी शासन निर्णय सुध्दा निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण 854 अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे वाटप केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त अतिक्रमणधारकांची एकूण संख्या 6230 एवढी आहे. यापैकी 854 अतिक्रमणधारकांनी दस्तऐवजांची पुर्तता केल्यामुळे त्यांना घरांचे पट्टे वाटप करण्यात आले आहे. यात 9 तालुक्यात तहसीलदार कार्यालयाकडून 365 लाभार्थ्यांना तर चंद्रपूर महानगरपालिका आणि 6 नगर परिषद कार्यालयाकडून 489 लाभार्थ्यांना पट्टे देण्यात आले. तसेच उर्वरीत 5376 अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाची कार्यवाही सुरू असून, अर्जदारांकडून दस्ताऐवजांची पुर्तता करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. उर्वरीत लाभार्थ्यांकडून सर्व कागदपत्रांची पुर्तता पूर्ण झाल्यानंतर त्वरीत पट्टे वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.

अशी आहे पट्टेवाटप लाभार्थ्यांची संख्या : कोरपना तहसील कार्यालयातर्फे (20 लाभार्थी), वरोरा तहसील कार्यालय (56 लाभार्थी), भद्रावती तहसील कार्यालय (5 लाभार्थी), मुल तहसील कार्यालय (58 लाभार्थी), सावली तहसील कार्यालय (95 लाभार्थी), चिमूर तहसील कार्यालय (25 लाभार्थी), सिंदेवाही तहसील कार्यालय (16 लाभार्थी), ब्रम्हपुरी  तहसील कार्यालय (60 लाभार्थी) आणि नागभीड तहसील कार्यालय (30 लाभार्थी) एकूण 365 लाभार्थी. तर चंद्रपूर महानगरपालिकातर्फे (54 लाभार्थी), बल्लारपूर नगर परिषद (101), राजुरा न.प. (112), गोंडपिपरी न.पं. (60), चिमूर न.प. (52), ब्रम्हपुरी न.प. (45) आणि नागभीड नगर परिषद कार्यालयातर्फे (65 लाभार्थी), असे एकूण 489 लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले आहे.

लाभार्थ्याचे मनोगत : मुल तालुक्यातील गडीसुर्ला येथील रहिवासी असलेले पट्टेधारक लाभार्थी गंगु उराडे म्हणाले, माझ्याजवळ हक्काची जागा नसल्यामुळे मी आजपर्यंत सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत होतो. आज मला या जागेचा कायमस्वरुपी पट्टा शासनाने दिला आहे.

समितीची रचना : 1) महानगरपालिका हद्दीत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे पट्टेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यवाही करण्यात येते. 2) उपविभाग स्तरावर नगर परिषद हद्दीत (शहरी भाग) उपविभागीय अधिकारी अध्यक्ष व न.प. मुख्याधिकारी हे सदस्य सचिव आहेत. 3) ग्रामीण भागात तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असून संबंधित गटविकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

निवासी अतिक्रमणाची पट्टे वाटप करण्याबाबत कार्यवाही : 1) ग्रामीण तसेच शहरी भागात 1500 चौ. फुटापर्यतचे क्षेत्र नियमित करणे. 2) 500 चौ. फुट क्षेत्रापर्यत सर्व निवासी अतिक्रमणे विनामुल्य नियमानुकूल करणे 3) 500 चौ. फुट क्षेत्रापेक्षा अधिक परंतु 1500 चौ. फुट क्षेत्रापेक्षा अधिक नसलेली अतिक्रमणे नियमानुकूल करताना पहिल्या 500 चौ. फुट क्षेत्रापर्यत सर्व निवासी अतिक्रमणे विनामुल्य नियमानुकूल करणे 4) 500 चौ. फुटापुढील क्षेत्रासाठी प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणा-या बाजार मुल्यानुसार किंमतीच्या 10 टक्के रक्कम तर निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक असल्यास प्रचलित बाजारमुल्याच्या 25 टक्के रक्कम आकारणे 5) अतिक्रमणधारकाचे अतिक्रमीत क्षेत्र 1500 चौ. फुट क्षेत्रापेक्षा जास्त असेल अशा अतिक्रमणधारकाचे 1500 चौ. फुट क्षेत्रापेक्षा जास्त असलेले अतिक्रमण नियमानुकूल न करता अतिक्रमण काढून टाकणे. अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेणे.

००००००

भर पावसातही महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद






 

भर पावसातही महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Ø चंद्रपूर तहसील कार्यालयाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 22 : नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा एकाच जागेवर उपलब्ध व्हाव्यात, शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयाच्यावतीने आज (दि. 22) शहरातील गांधी चौक येथे महाराजस्व अभियान घेण्यात आले. विशेष म्हणजे गत दोन दिवसांपासून चंद्रपुरात पावसाची संततधार असतांनाही भर पावसात नागरिकांनी महाराजस्व अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, तहसीलदार विजय पवार, प्रा. अशोक जिवतोडे, सुभाष कासनगोट्टुवार, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, रयतेसाठी रामराज्य आणि शिवराज्याची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार काम करीत आहे.  शासकीय कामासाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. आता मात्र एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रांचे वाटप होत आहे. 20 प्रकारच्या लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात येणार असून सर्व घटकांना न्याय देण्याची अधिका-यांची भुमिका कौतुकास्पद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाचे काम सुरू झाले आहे. नागरिकांनी त्वरीत कागदपत्रांची पुर्तता करावी. तसेच आज ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांनी शासकीय योजनांची माहिती इतरांना सांगून योजनांच्या लाभासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार तहसीलदार विजय पवार यांनी मानले.

लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ : जिल्हा मध्यवर्तीं सहकारी बँकेकडून पंचशील महिला बचत गट, शारदा महिला बचत गट, मैत्री महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट यांना कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत शंकर बुराण, हिरालाल लोनगाडगे, सुनील उरकुडे यांना प्रमाणपत्र, जिवंत सातबारा अंतर्गत बाबा वैद्य यांना लाभ, श्रवणबाळ योजनेंतर्गत सुर्यभान देवाळकर, दीपक घुगरे, माया येडे यांना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सचिन देठे यांना, राशनकार्ड वाटप अंतर्गत कल्पना तोडासे, कुंदा नेवलकर, सुषमा जगताप यांना लाभ देण्यात आला.

गोंडपिपरी येथेही महाराजस्व अभियान : गोंडपिपरी तालुक्यातील  राळापेठ येथे  आमदार देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी आनंदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 324 शेतकऱ्यांच्या जमिनी  भोगवटादार वर्ग 2 ते वर्ग 1 रुपांतर करून  7/12 वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार शुभम बाहकर यांनी केले. यावेळी महिला व बालविकास, कृषी विभाग, सेतु शाखा, श्रावणबाळ/संजय गांधी निराधार अंतर्गत विविध लाभाचे वितरण करण्यात आले.

००००००

वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

 

वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ø पीक विमा नोंदणीसाठी Farmer ID च्या अनिवार्यतेतून सूट

Ø सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै

चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी आणि जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप 2026) अंतर्गत नोंदणीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) सादर करण्याच्या अनिवार्यतेतून केंद्र शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत फार्मर आयडी नसल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात खरीप 2016 पासून राबविण्यात येत असून, खरीप 2026 व रब्बी 2026-27 या कालावधीसाठी सुधारित योजनेला शासनाने मान्यता दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची निवड करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, या अटीमुळे जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी आणि जिवती तालुक्यातील अनेक शेतकरी नोंदणी करू शकत नव्हते.

ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र शासनाने या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी च्या अनिवार्यतेतून सूट देण्याचा निर्णय घेतला. यामुळे संबंधित शेतकरी आता राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून, पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखा किंवा आपले सरकार सेवा केंद्रात विहित मुदतीत विमा हप्ता भरून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर मा. तोटावार यांनी केले आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

००००००

24 जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

24 जुलै रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संवाद व्हावा, या हेतूने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील जे.पी असोसिएट्स अॅड लांब्राराटेरियस चंद्रपूर, भारतीय बिमा निगममध्ये ॲडव्हायजर, सेल्स एक्ज्युकेटिव्ह, बीमा सखी, व्ही. आर. एंटरप्रायझेस येथे कंप्यूटर ऑपरेटर, सुपरव्हायझर, मशिन आपॅरेटर, ही पदे भरायची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे. 

तरी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे.

अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in/https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/https://

pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

००००००

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

 दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार

Ø 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 22 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था संघटना तसेच संबंधित घटकांकडून ऑनलाइन अर्ज व नामांकन 31 जुलै 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू झाली आहे. विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या अर्ज व नामांकनांचा विचार करून वर्ष 2026 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर www.awards.gov.in केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, प्रत्यक्ष अथवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यानुसार सर्व माहिती अचूकपणे भरावी तसेच दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्याचा वर्णनात्मक तपशील नमूद करून त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक-बालिका या उपश्रेणीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय प्रस्कारांसाठीची पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती www.depwd.gov.in आणि www.awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त, डॉ. भागवत रेजीवाड यांनी केले आहे.

००००००