Search This Blog

Friday, 18 September 2026

आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा


 

आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा

Ø पालक सचिवांकडून विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 18 : गरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना नामांकित रुग्णालयात उपचार घेता यावे, या दृष्टीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत (आभा) कार्ड हे अतिशय महत्वाचे आहे. या कार्डचे वाटप करून नागरिकांपर्यंत त्याचे फायदे पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सुचना राज्याचे अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

नियेाजन सभागृह येथे विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्ह्यातील काही विषय शासनस्तरावर प्रलंबित असतील तर त्याबाबत अवगत करावे, जेणेकरून संबंधित विषयाला गती देता येईल, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी म्हणाले, शेतीसंदर्भात माहितीकरीता आवश्यक असलेल्या ‘महाविस्तार’ ॲप बाबत शेतक-यांना अवगत करावे. जिल्ह्यातील शेतक-यांनी पेरणी केली असून आतापर्यंत केवळ सरासरीच्या 59 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा खंड पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. शेतक-यांना कर्जवाटप करतांना राष्ट्रीयकृत बँकांनी गांभिर्य राखावे.

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, पुर्वोत्तर राज्यातून आता आपल्या भागात हत्तींचे आगमन होत आहे. मानवी वस्तीजवळ ते पोहचणार नाही, याची काळजी वन विभागाने घ्यावी, असे श्री. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, नैसर्गिक आपत्ती, वन विभाग, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य विभाग आदींचा आढावा घेतला.

सादरीकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची पावसाची सरासरी 1084 मि.मी आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 1254 मि.मी (115 टक्के) पाऊस पडला होता. यावर्षी मात्र जून ते 15 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या केवळ 646 मि.मी. (59 टक्के) पाऊस पडला आहे. 11 तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात यावर्षी भात, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर पिकांची 4 लक्ष 68 हजार 771 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

००००००

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी 17 ऑक्टो. पर्यंत विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता

प्रमाणपत्रासाठी 17 ऑक्टो. पर्यंत विशेष मोहीम

Ø इच्छुक विद्यार्थ्यांनी पडताळणी अर्ज तातडीने सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ एल. गायकवाड यांनी केले आहे.

शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये MHT-CET, NEET, JEE, MBA, B.Ed., Ph.D., B.Sc. Agriculture, B.Pharm., B.Sc. Nursing आदी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. तसेच तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थीही या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.

यासोबतच शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी आपला विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तातडीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावा.

अपूर्ण प्रकरणांसाठी तुटीपूर्तता शिबिर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत; मात्र आवश्यक पुरावे किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे ज्यांची प्रकरणे अपूर्ण अथवा तुटीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीही 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष ‘तुटीपूर्तता शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. अर्जामध्ये काही त्रुटी अथवा आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची तातडीने पूर्तता करून प्रकरण पूर्ण करून घ्यावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक सत्र 2026-27 मधील प्रवेश प्रक्रियेत कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

००००००

चिचपल्ली येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ


 चिचपल्ली येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ

चंद्रपूर, दि. 18 : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने चिचपल्ली येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

चंद्रपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी श्री. पाल, गटशिक्षण अधिकारी श्री. यादव, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. यारेवार, विस्तार अधिकारी (पंचायत) मिनाक्षी बन्सोड, स्वच्छता समन्वयक श्री. खानझोड तसेच तालुका स्वच्छता व्यवस्थापक आशिया शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाची उद्दिष्टे, अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच ग्रामस्तरावरील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, आरोग्य संस्था तसेच इतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती किंवा अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढवावा. तसेच अभियानातील उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सेवा संकल्प’ मधून शासकीय योजनांची जनजागृती : ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, नागरिकांना आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन करणे तसेच शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष स्वच्छता मोहीम : प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचपल्ली येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातून आरोग्य केंद्र परिसराची साफसफाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी आणि वादविवाद स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांपर्यंतही स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.

०००००००

द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतुकीसाठी कंत्राटदारांकडून दरपत्रके आमंत्रित


 द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतुकीसाठी कंत्राटदारांकडून दरपत्रके आमंत्रित

Ø 25 सप्टेंबरपर्यंत सीलबंद दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : जिल्ह्यातील पशुपालकांना पशुप्रजनन विषयक सेवा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक द्रवनत्र व वीर्यमात्रांची वाहतूक करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर यांच्यामार्फत इच्छुक वाहतूक कंत्राटदारांकडून 1 ऑक्टोबर 2026 ते 30 जून 2027 या कालावधीकरिता सीलबंद दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत तसेच आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेर आणि परराज्यातून द्रवनत्र व वीर्यमात्रांची वाहतूक करण्यासाठी 2.25 ते 3 मेट्रिक टन क्षमतेचे अथवा तत्सम क्षमतेचे मिनी ट्रक वाहन उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या कृत्रिम रेतनासाठी आवश्यक असलेल्या वीर्यमात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांच्या वाहतुकीसाठी द्रवनत्राची आवश्यकता असते. जिल्ह्यातील संबंधित केंद्रांना आवश्यकतेनुसार द्रवनत्र व वीर्यमात्रांचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी ही वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे.

दरपत्रकासंबंधी वाहतुकीचा संपूर्ण तपशील, आवश्यक वाहनाची क्षमता, वाहतुकीचे स्वरूप तसेच दरपत्रक प्रक्रियेच्या सविस्तर अटी व शर्ती जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त, चंद्रपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतची माहिती चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही पाहता येईल.

इच्छुक वाहतूक कंत्राटदारांना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून दरपत्रके सादर करता येणार असून, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दरपत्रके स्वीकारण्यात येतील. संबंधित कंत्राटदारांनी शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आपली सीलबंद दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे विहित मुदतीत सादर करावीत. विहित मुदतीत प्राप्त झालेली दरपत्रके 25 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येणार आहेत.

दरपत्रक प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करणे अथवा आवश्यकतेनुसार प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचे सर्व अधिकार जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त, चंद्रपूर यांनी राखून ठेवले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त डॉ. सुरेशकुमार कुंभरे यांनी केले आहे.

००००००

 

आदिवासी उमेदवारांच्या स्पर्धा परिक्षापूर्व प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ व्याख्यात्यांना आवाहन

 

आदिवासी उमेदवारांच्या स्पर्धा परिक्षापूर्व प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ व्याख्यात्यांना आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : आदिवासी उमेदवारांना वर्ग-3 व वर्ग-4 पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी सामान्य ज्ञानासह विविध विषयांतील पात्र, अनुभवी व तज्ज्ञ व्याख्यात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहे.

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षांविषयी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, विविध शासकीय व निमशासकीय सेवांमधील रोजगाराच्या संधींची माहिती देणे तसेच कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करणे, या उद्देशाने केंद्रामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून उमेदवारांना शैक्षणिक व रोजगारविषयक प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या आदिवासी उमेदवारांना विविध विषयांतील संकल्पना समजून घेण्यासाठी आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यानुषंगाने केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी सामान्य ज्ञान व इतर आवश्यक विषयांतील अनुभवी व्याख्यात्यांची आवश्यकता आहे.

आदिवासी उमेदवारांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक विषयांचे प्रशिक्षण देण्यास इच्छुक असलेल्या पात्र व अनुभवी व्याख्यात्यांनी केंद्राशी संपर्क साधावा. विषयातील ज्ञान व अध्यापनाचा अनुभव असलेल्या व्याख्यात्यांनी या प्रशिक्षण कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर केंद्र प्रशासकीय भवन, पहिला माळा, चंद्रपूर येथे कार्यरत आहे. अधिक माहिती व प्रशिक्षणासंदर्भातील तपशिलासाठी मनोज सिडाम यांच्याशी अथवा आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००००