Search This Blog

Tuesday, 21 July 2026

चंद्रपूर जिल्ह्यात 6020 पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण

 चंद्रपूर जिल्ह्यात 6020 पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण

Ø 1367 कामे प्रगतीपथावर

चंद्रपूर, दि. 21 : शेतकरी बांधवांना शेतात जाणे-येणे सोपे व्हावे, शेतीमालाची वाहतूक जलद व कमी खर्चात करता यावी आणि कृषी यंत्रसामग्री सहजपणे शेतापर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे दळणवळणाचे मार्ग आहेत. एकप्रकारे या रस्त्यांना ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानले जाते. शेतक-यांसाठी असलेले या रस्त्यांचे महत्व लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांच्यातील एकत्रित अभिसरण योजनांमधून आतापर्यंत एकूण 6020 पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 1367 कामे प्रगतीपथावर आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त कार्यान्वय यंत्रणामार्फत सुरवातीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6351 पाणंद रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी 5276 पाणंद रस्ते सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण झालेली असून त्याचा वापर शेतकरी बांधव करत आहेत. नियोजन विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून 323 कामे जिल्ह्यात घेण्यात आली होती. त्यापैकी 237 कामे पूर्ण स्थितीमध्ये आहेत. जिल्हा खनिकर्म निधी, जिल्हा विकास योजना आणि मनरेगा या तिन्ही योजनांच्या अभिसरणातून चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना राबवली जाते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात 195 पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत 133 रस्ते पूर्ण झाले आहेत. राज्य शासनातर्फे मनरेगा योजनेतील अतिरिक्त कुशल घटकातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 512 रस्त्यांची कामे घेण्यात आली होती. त्यापैकी 374 कामे पूर्ण झाली आहेत.

14 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण भागातील अंतर्गत दळणवळणाची साधने बळकट करण्यासाठी आणि शेतमालाचा बाजारपेठेतील पुरवठा सुलभ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागातर्फे महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पाणंद रस्ता योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विधानसभास्तरीय समिती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या समितीचे अध्यक्ष हे संबंधित विधानसभेचे सदस्य आणि सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी आहेत. सदर समितीमध्ये भूमी अभिलेख, ग्रामविकास, वनविभाग, बांधकाम विभाग अशा सर्व विभागाच्या उपविभागस्तरीय प्रमुखांचे समन्वय घडवून विधानसभा स्तरावर पाणंद रस्त्यांच्या बांधकामांचे नियोजन केले जाते. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 257 रस्ते करण्याचे आराखडे तयार झाले आहेत.

अशी आहे विधानसभानिहाय पाणंद रस्त्यांची आकडेवारी : राजुरा विधानसभा मतदारसंघात मनरेगा, मातोश्री, पालकमंत्री, अतिरिक्त कुशल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत आतापर्यंत 661 कामे पूर्ण तर 244 प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 114 कामे पूर्ण, 30 कामे प्रगतीपथावर, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 1062 कामे पूर्ण, 288 कामे प्रगतीपथावर, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 1373 कामे पूर्ण, 343 कामे प्रगतीपथावर, चिमूर विधानसभा मतदारसंघात 2182 कामे पूर्ण, 412 कामे प्रगतीपथावर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 228 कामे पूर्ण, 41 कामे प्रगतीपथावर आहेत.

शेतक-याचे मनोगत : पाणंद रस्त्याच्या सुविधेमुळे कसा लाभ झाला, याबाबत बोलतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील शेतकरी राजेश नागतोडे म्हणाले, मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून आमच्या गावाचा रस्ता बांधण्यात आला आहे. शेतात जाण्यासाठी पहिले खुप अडचण होत होती, धु-याने जावे लागत होते. शासनाने पाणंद रस्ता बांधून दिल्यामुळे आता खते, बियाणे, यंत्रसामुग्री थेट शेतापर्यंत पोहचविता येते.

000000

मधमाशापालन योजनेच्या लाभासाठी अर्ज आमंत्रित

 मधमाशापालन योजनेच्या लाभासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. याकरीता पात्र व्यक्ती कडून/संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेची वैशिष्टे : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वंगुतवणुक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता

1. वैयक्तीक मधपाळ : पात्रता अर्जदार स्वाक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे

2. केंद्रचालक प्रगतशिल मधपाळ : व्यक्ती पात्रता किमान 10 वी पास, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे, व्यक्ती चे नावे किमान किंवा त्या व्यक्ती च्या कुंटूबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती/जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलली शेत जमीन तसेच लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

3. केंद्र चालक संस्था पात्रता :  संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेचे नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य ईमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी

अटी व शर्ती : लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंद पत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अधिक माहिती करीता संपर्क : जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, उद्योग भवन, दुसरा माळा, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर. मोबाईल क्रमांक : 9373287057/9322789232 , मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडल, शासकीय बंगला क्रं.7, महाबळेश्वर, जि. सातारा, पिन : 412806 दुरध्वनी : 02168 - 268264.

000000000

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 21 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपुर्ण शोध, समाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नाविन्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतीक कार्य, खेळ, नाविन्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/ जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज स्वीकारणे  सुरू झाले असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी अर्ज करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, आकाशवाणीचा मागे, चंद्रपुर कार्यलयाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

000000000

महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्काराकरीता नामांकन सादर करण्याचे आवाहन

 

महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्काराकरीता नामांकन सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 : पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या (2027) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे. या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगीरीची दखल घेणे हा असून कला, साहित्य व शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरीसेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील/विषयांमधील उत्कृष्ट कामगीरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जाते.

त्याअनुषंगाने भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय यांनी महिला सक्षमीकरणामध्ये यशस्वी कामगिरीची सर्वोच्च पायरी व योगदान दिले आहेत, त्या पात्र व्यक्तींनी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार करीता http://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 31 जुलै 2026 पर्यंत रितसर माहिती भरून  आवेदन करावे. पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, आकाशवाणीच्या मागे, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

000000000

अमृत बेकरी प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 अमृत बेकरी प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम 27 जुलै ते 02 सप्टेंबर 2026 या कालावधीत वरोरा येथे आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसांचा आहे.

अमृतच्या लक्षित गटातील ब्राम्हण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंसल, कम्मा, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, चेलमार, त्यागी, सेनगुन्थर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रशिक्षणामध्ये बेकरी उद्योगातील तांत्रिक ज्ञान, ब्रेड, केक, बिस्किट, पेस्ट्री, कुकीज तसेच विविध बेकरी उत्पादनांची निर्मिती, अन्न सुरक्षा व स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची माहिती, उद्योग व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, बँक कर्ज, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योग भेट, यशस्वी उद्योजकांशी संवाद तसेच उद्योजकता विकास याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी  26 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत. प्रशिक्षणासाठी प्रवेश क्षमता 40 उमेदवारांची असून प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन २ रा माळा, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर येथे अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

000000000