Search This Blog

Wednesday, 12 August 2026

उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. सामंत



 

उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. सामंत

Ø उद्योगांच्या मनुष्यबळासाठी चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्राची निर्मिती

Ø उद्योग विभाग, एमआयडीसी, आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 12 : उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलेले भूखंड वर्षानुवर्षे विनावापर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एमआयडीसीची जमीन उद्योग उभारणीसाठी आहे, त्याचा गैरवापर करू दिला जाणार नाही. उद्योजकांनी भूखंड घेऊनही उद्योग सुरू न केल्यास ते भूखंड परत घेऊन नवीन व इच्छुक उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.12) उद्योग विभाग, एमआयडीसी तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तर अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पोटे, मुख्य अभियंता राजेश जंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कारले, चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात एमआयडीसी क्षेत्रातील 200 भुखंड अनेक वर्षांपासून पडीत होते, असे सांगून उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, भुखंड घेऊन उद्योग सुरू न करणा-या या  200 जणांना नोटीस देण्यात आली आहे. यापैकी 67 भुखंड रद्द केले आहे. एमआयडीसीतील भूखंडांचे वाटप एका व्यक्ती अथवा उद्योगाच्या नावावर असताना प्रत्यक्षात त्याचा वापर दुसऱ्याच व्यक्तीकडून केला जात असेल तर त्याची तपासणी करा. भूखंडांचा वापर अवैध व्यवसायांसाठी होत असल्याचे आढळल्यास तातडीने कारवाई करावी. तसेच एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबतही कठोर भूमिका घेत भुखंड मोकळे करावे.

गोडपिंपरी औद्योगिक परिसरात 67.67 हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले आहे, तेथे पायाभूत सुविधांची कामे तातडीने हाती घेण्यात येईल. तसेच तेथे ‘ट्रायबल क्लस्टर’ विकसित करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना नियमित प्रशिक्षण द्यावे. ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने अधिकाधिक युवक-युवतींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा. स्वयंरोजगारासाठी पुढे येणाऱ्या युवक-युवतींना बँकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. पात्र उमेदवारांची कर्जप्रकरणे विनाकारण नाकारू नयेत, अशा स्पष्ट सुचनाही डॉ. सामंत यांनी दिल्या.

चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्राची निर्मिती : जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी चंद्रपूर येथे उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. उद्योगांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यानुसार स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यावर भर राहणार आहे. चंद्रपूर मधील आयटीआय संस्थांनाही उद्योगांशी जोडून उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे उद्योगांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होऊन जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल, असे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

चंद्रपूरचा पॅटर्न राज्यात राबविणार : चंद्रपूर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सुरू केलेल्या छापेमारीमुळे अवैध व्यवसायांना प्रतिबंध करण्यास मदत होत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राज्यातील इतर औद्योगिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन : नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन करताना शेतकरी व जमीनधारकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पद्धतीने पूर्ण करावी. एमआयडीसी बाबत गोंडपिपरी येथील शेतक-यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असून या बैठकीला आपण स्वत: ऑनलाईन उपस्थित राहू, अशी ग्वाही डॉ. सामंत यांनी दिली.

००००००

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन



 

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन

Ø उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची उद्योजकांसोबत चर्चा

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. वीज, पाणी व इतर मुलभुत सुविधा येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक उद्योगांची चंद्रपुरात यायची तयारी आहे. सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन असून चंद्रपूरला 80 टक्के आहे. आता मात्र गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांनाही 100 टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चंद्रपूर येथील बैठकीत घेतला.

बुधवारी (दि.12) जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत डॉ. सामंत यांनी जिल्ह्यातील उद्योगांबाबत चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. पुढे उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर करीता सुध्दा 360 कोटी रुपये मंजूर झाले असून राज्य शासनाच्या वतीने 180 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने 90 कोटी तर स्थानिक खनिज विकास निधीतून 90 कोटी देण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रात आता 20 टक्के जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) आरक्षित ठेवण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात 20 टक्के जागा एमएसएमईसाठी आरक्षित केल्याने छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काढून घेतलेले 18 भूखंड त्वरीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्यातील उद्योग चालले तरच बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा करण्यावर आपला भर राहील. उद्योगांचे नुकसान होऊ देणार नाही. कृषी आधारित उद्योगासाठी कृषी विभागाने उद्योग विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा उद्योगांनासुद्धा प्रोत्साहन देण्यात येईल. उद्योगाच्या इकोसिस्टीम मध्ये येथील स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. मोठ्या उद्योगांना लघु उद्योगांकडून कडून काय अपेक्षा आहे, याबाबत उद्योगांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेण्यात येईल. दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार झालेले दोन उद्योग भद्रावती परिसरात आले आहेत. यात न्यू एरा क्लिनटेक एनर्जी आणि ग्रेटा एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे, असेही उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पोटे, मुख्य अभियंता राजेश जंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कारले, चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा, न्यू एरा क्लिनटेकचे सचिन धात्रक, ग्रेटा एनर्जीचे वैभव कालकुटे, लॉयड्स मेटलचे प्रशांत पुरी, संदीप भाटिया, सुबोध कासुरकर, मिनाक्षी वाळके आदी उपस्थित होते.

००००००

डेटा मायग्रेशनकरीता जुन्या सेवार्थ प्रणालीतील कामकाज 20 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

 

डेटा मायग्रेशनकरीता जुन्या सेवार्थ प्रणालीतील कामकाज 20 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

Ø जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सर्व शासकीय कार्यालयांना सुचना

चंद्रपूर, दि. 12 : वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी वित्त विभागाच्या 1 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागू केली आहे. या सेवार्थ प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणाली मधील सर्व कर्मचा-यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित (डेटा मायग्रेशन) करण्याची प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्ध पातळीवर सुरू आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना, जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही नवीन कामकाज किंवा बील निर्मिती 20 ऑगस्ट 2026 नंतर करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर (संपूर्ण जिल्हा व तालुके) अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचा-यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच डेटा मायग्रेशनची प्रक्रिया आणि नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जुलै 2026 चे वेतन देयक तयार करणे इत्यादी कामकाज 20 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. याबाबत कोणालाही मुद्दतवाढ मिळणार नाही, असे निर्देश लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांनी दिले आहे.

तरी सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये डेटा मायग्रेशन व पायलट देयक तयार करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाशी समन्वय साधून विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करावे. यासाठी सर्व कोषागार / उपकोषागार कार्यालय सुटीच्या दिवशी सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.

००००००

Tuesday, 11 August 2026

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात


उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 11 : राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे 12 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा उद्योग विभागाबाबत आढावा बैठक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या अनुषंगाने आढावा बैठक, तसेच खादी व ग्रामोद्योग बाबत आढावा बैठक, दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे उद्योजकांसमवेत संवाद, दुपारी 1 वाजता लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक, दुपारी 3 वाजता मराठी भाषा विभाग आढावा बैठक व साहित्यिकांसोबत संवाद, दुपारी 3 वाजता नियेाजन भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता आनंदवन आश्रम, वरोराकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता आनंदवन आश्रम, वरोरा येथे भेट, सोयीनुसार आनंदवन येथून चंद्रपूरकडे प्रयाण आणि शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव.

००००००

क्रीडा प्रबोधिनीत सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश


क्रीडा प्रबोधिनीत सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश

चंद्रपूर, दि. 11 : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.

सन 2026-27 साठी शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत 8 क्रीडा प्रबोधिनीत मे 2026 मध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत प्रवेश अंतिम करण्यात आले होते. पुनश्च एकदा राज्य स्तरावर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यस्तर सरळ प्रवेश चाचणी कार्यक्रम अंतर्गत 17 ते 18 ऑगस्ट 2026 रोजी हँडबॉलची चाचणी होईल. खेळाडूंनी सकाळी 10 वाजता चाचणी स्थळी उपस्थित राहावे. तसेच    विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर येथे 18 ते 19 ऑगस्ट रोजी हँडबॉल चाचणी होईल. खेळाडूंनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विभागीय क्रीडा  संकुल, मानकापूर, नागपूर येथे उपस्थित राहावे

खेळाडूंसाठी सुचना : 1) सदर चाचणीकरिता येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर स्वतः करावयाची आहे. 2) संबधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा उदा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर अनुशंगिक सर्व मुळ कागदपत्रे व सुयोग्य स्पोर्ट कीटसह चाचणी स्थळी उपस्थित राहावे 3) सरळ प्रवेश चाचणीकरिता राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीयस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 4) खेळनिहाय कौशल्य चाचणीकरिता किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 5) खेळाडू 19 वर्षे वयोगटातील असावा.

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (हँडबॉल) भूषण इंगळे (मो. 7447654989) यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र हँडबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सदर चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

००००००