Search This Blog

Thursday, 20 August 2026

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय



 

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय

30 वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर मिळणार सहकार्य

आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये - पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि. 20 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत वसतिगृह प्रवेशासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात एकूण 490 शासकीय वसतिगृहे चालविण्यात येतात. या वसतिगृहांमध्ये दरवर्षी सुमारे 58 ते 60 हजार विद्यार्थी निवास करून शिक्षण घेतात. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने शासनाने 14 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका विभागाने घेतली आहे.

वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा किमान 30 वर्षे असावी, या मागणीच्या अनुषंगानेही सकारात्मक विचार करण्यात आला आहे. यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे वयाची 30 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सहकार्य करणार आहे.

विशेष म्हणजे केवळ पारंपरिक अभ्यासक्रमच नव्हे, तर पीएच.डी., एम.फिल., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण तसेच इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही, तर त्यांना ‘स्वयम’ योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेने पाहत असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवादातून सकारात्मक मार्ग काढण्यावर भर देण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा  सुरू असून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटेत आर्थिक परिस्थिती किंवा वसतिगृहाची अनुपलब्धता अडथळा ठरू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

चौकट :

ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने सकारात्मक आणि न्याय्य मार्ग काढण्याची शासनाची भूमिका आहे.

— डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर.

०००००

बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची - पोलीस अधीक्षक आयुष नोपानी


बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची - पोलीस अधीक्षक आयुष नोपानी

Ø पोक्सो, बालविवाह व बाल न्याय विषयावर समन्वय बैठक व कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 20 : बालकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक प्रकरणाकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. विशेषतः पोक्सोसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस, आरोग्य, महिला व बालविकास विभाग तसेच बाल संरक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून बालकांना होणारा त्रास कमी करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांची समन्वय बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. नोपानी बोलत होते. पोक्सो प्रकरणांमध्ये विविध विभागांचा योग्य समन्वय हा बालकाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा असल्याचे श्री. नोपानी यांनी सांगितले.

कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना विविध यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी परस्पर समन्वय, संवाद आणि योग्य कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगितले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 अॅड. अनिरुद्ध पाटील यांनी पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह प्रतिबंध, विविध प्रकरणांतील अनुभव आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता किती महत्त्वाची आहे, तसेच ‘बालस्नेही दृष्टिकोन’ म्हणजे नेमके काय, हे त्यांनी  स्पष्ट केले. बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास त्याचा बालकाच्या हितावर तसेच न्यायप्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या शेवटी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे विषयतज्ज्ञ व मान्यवरांनी निरसन केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी प्रास्ताविकातून पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह तसेच बालकांसोबत काम करताना येणाऱ्या अडचणी आणि कायदेविषयक बाबींचे पुनरावलोकन व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी केले, तर अभिषेक मोहुर्ले यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोषसिद्धी कक्षाचे एपीआय विनोद रहांगडाले, महिला व बालविकास विभागाचे अतिश चव्हाण, अजय साखरकर यांच्यासह पोलीस विभाग, आरोग्य विभाग, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने सहकार्य केले.

०००००

महिला होणार ‘कारपेंटर’; सागवान वस्तू निर्मितीचे कौशल्य प्रशिक्षण सुरू


 महिला होणार ‘कारपेंटर’; सागवान वस्तू निर्मितीचे कौशल्य प्रशिक्षण सुरू

Ø माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम ; 35 महिलांचा सहभाग

Ø महिनाभराच्या प्रशिक्षणातून महिलांसाठी रोजगाराची नवी संधी

चंद्रपूर, दि. 20 : महिलांना पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरातील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

खुशिया लोकसंचालित साधन केंद्र, चंद्रपूरच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणाचा शुभारंभ 19 ऑगस्ट रोजी एफडीसीएमचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी कोंडेवार तसेच खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक शारदा हुसे उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणात 35 महिलांनी सहभाग नोंदविला असून प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना सागवान लाकडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्रत्यक्ष प्रशिक्षणातून शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित महिलांना एफडीसीएमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महिला बचत गटांना केवळ बचत आणि कर्जपुरते मर्यादित न ठेवता त्यांना कौशल्य, उत्पादन आणि रोजगाराशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिकरीत्या पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सुतारकामात महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने माविम व एफडीसीएमने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

००००००

21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन

 

21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन

Ø नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. 21ऑगस्ट 2026 रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा : कार्यक्रमाची सुरुवात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथून होणार असून सुमारे 3 किलोमीटरची ही वॉकेथॉन जुना वरोरा नाका - प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट - प्रियदर्शनी चौक आणि परत चांदा क्लब ग्राउंड येथे आल्यानंतर तेथे विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. महा वॉकेथॉनच्या माध्यमातून पाणी बचत, जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमातील सहभागींना टी-शर्ट, कॅप, बॅज तसेच ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

रील्स स्पर्धेचेही आयोजन : महा वॉकेथॉनच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागामार्फत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 21 ऑगस्ट 2026 असा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातूनही जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

Wednesday, 19 August 2026

पालकमंत्र्यांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद







 पालकमंत्र्यांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद

Ø चंदनखेडा येथील आश्रमशाळेला भेट व पाहणी

Ø विद्यार्थ्यांसोबत पंगतीत जेवणाचा आस्वाद

चंद्रपूर, दि.19 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी 16 ऑगस्ट रोजी, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, चिमूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, सहायक प्रकल्प अधिकारी एम.व्ही. डुले, चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे, शाळेचे मुख्याध्यापक जी.बी. सोनोने, अधिक्षक डी.टी. पोटदुखे, अधिक्षिका के. व्ही. गाडगे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आपण येथे शिक्षणासाठी आलो आहोत. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होऊन आई-वडीलांचे नाव मोठे करा. तुमचा आत्मविश्वास वाढावा, अधिका-यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातील कलेक्टर, एसपी, सीईओ, आयुक्त असे वरिष्ठ अधिकारी तुमच्या भेटीसाठी येथे आले आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये टिकण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी महिन्यातून एकदा त्यांना स्पर्धा परिक्षांबद्दल मार्गदर्शन करावे.

येथील विद्यार्थी आपला केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावे. त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांमुळेच आपल्याला पगार मिळतो, त्या पगारातून आपले कुटुंब चालते, याची जाणीव ठेवून काम करा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक एक साखळी आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य कायम असावे. ही आश्रमशाळा अतिशय चांगली आहे, तिला नेहमी अग्रेसर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवा, अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

शाळेमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध करून द्या, अशी मागणी एका विद्यार्थ्याने केली. यावर तात्काळ प्रतिसाद देत, शाळेला एक क्रीडा शिक्षक देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅब तसेच मॅथ्स लॅबचे उद्घाटन केले.   

विद्यार्थ्यांसोबत पंगतीत जेवण : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश व इतर अधिका-यांनी विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.

००००००