Search This Blog

Saturday, 19 September 2026

पारधी समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करू या! — पालकमंत्री डॉ. अशोक उईके










पारधी समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प करू या!

पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø पिपरबोडी पारधी टोला येथे सेवा संकल्प अभियान व पारधी समाज मेळावा

Ø जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविणार

चंद्रपूर, दि. १९ : पारधी समाज भटकंती करणारा समाज असल्याने अनेक समाजबांधवांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यासह विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून पारधी समाजबांधवांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करू या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

पिपरबोडी पारधी टोला (चिनोरा, ता. वरोरा) येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान' व पारधी समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, चिनोराच्या सरपंच श्रीमती परचाके, धर्मेंद्र शेरकुरे, दिवाकर ननावरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्य शासनाने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना विविध शासकीय सेवा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २२ पारधी बेड्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यात येतील. क्रांतिवीर समशेर सिंह पारधी यांच्या नावाने पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पॅकेज जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी यावेळी सांगितले.

पारधी समाजातील अनेक कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका यासारखी मूलभूत कागदपत्रे नाहीत. भटकंतीच्या जीवनपद्धतीमुळे अनेकांकडे स्वतःची जागा अथवा घरकुलही नाही. त्यामुळे या समाजाला शासनाच्या विविध सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे पालकमंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने सेवा द्यावी. पारधी समाजाकडे पाहण्याचा पोलिसांचा दृष्टिकोनही सकारात्मक असावा. समाजात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. राज्य शासन पारधी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आपल्या जीवनात बदल झाला, अशी भावना पारधी समाजबांधवांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक पारधी बेड्याचे सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाला कोणत्या योजनेची आवश्यकता आहे, कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत आणि आतापर्यंत कोणत्या योजनांचा लाभ मिळाला आहे, याची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही पात्र पारधी समाजबांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिली.

सेवा संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा — आमदार करण देवतळे

आमदार करण देवतळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध योजना गावागावांत आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी पारधी बेड्यावर प्रत्यक्ष भेट देऊन समाजबांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या परिसरात अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत असून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून परिसरातील ३० ते ३५ गावांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या तसेच अन्य मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करता येतील. नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवतळे यांनी केले.

विविध योजनांच्या स्टॉलची पाहणी

कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या योजनांच्या माहिती व सेवा स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती घेतली तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. आरोग्य तपासणी शिबिरालाही त्यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन प्रदीप लोहकरे यांनी केले, तर जी. बी. सोनवणे यांनी आभार मानले.

लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कात्यायनी महिला बचत गट, खेमजाई यांना चारचाकी वाहनासाठी अर्थसहाय्य देण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अक्षय राणे यांना ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली. तसेच अंकुश रानपुरे, इंदुताई आत्राम, शशिकला टेकाम, मधुकर मेश्राम, मंगला मगरे, बाबा नेताम, हितेश नन्नावरे, दिलीप शिरकुरे आदी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००००

संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा — पालकमंत्री डॉ. अशोक उईके


 







संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा 
— पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची प्रत्यक्ष पाहणी

चंद्रपूर, दि. १९ : यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पाऊस कमी झाला असून त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस झाला नाही किंवा परतीच्या पावसाने पाठ फिरविली तर शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी आणि ठोस उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह  उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, पावसातील तूट लक्षात घेता आगामी काळातील परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात.

जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण वेळेत व्हावे. पीक नुकसानीच्या प्रकरणांमध्ये पंचनाम्यांची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पाणीसाठा, उपलब्ध जलस्रोत, पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, खरीप पिकांची सद्यस्थिती, पीक कर्ज वितरण तसेच आवश्यक कृषी निविष्ठांची उपलब्धता याबाबत संबंधित विभागांनी नियमित आढावा घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांची संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी निर्देश दिले.

वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची पाहणी

खरीप हंगाम आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी वरोरा तालुक्यातील शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन धान आणि कपाशी पिकांची पाहणी केली. कमी पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम तसेच पिकांची सद्यस्थिती त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाची स्थिती, पिकांची वाढ, सिंचनाची उपलब्धता तसेच शेतीसमोरील अडचणींबाबत माहिती घेतली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पीक परिस्थितीचा आढावा घेतला. कमी पावसाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी कृषी यंत्रणेने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसूमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

०००००

Friday, 18 September 2026

आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा


 

आयुष्मान कार्ड नागरिकांपर्यंत पोहचवा

Ø पालक सचिवांकडून विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 18 : गरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना नामांकित रुग्णालयात उपचार घेता यावे, या दृष्टीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत (आभा) कार्ड हे अतिशय महत्वाचे आहे. या कार्डचे वाटप करून नागरिकांपर्यंत त्याचे फायदे पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सुचना राज्याचे अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

नियेाजन सभागृह येथे विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्ह्यातील काही विषय शासनस्तरावर प्रलंबित असतील तर त्याबाबत अवगत करावे, जेणेकरून संबंधित विषयाला गती देता येईल, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी म्हणाले, शेतीसंदर्भात माहितीकरीता आवश्यक असलेल्या ‘महाविस्तार’ ॲप बाबत शेतक-यांना अवगत करावे. जिल्ह्यातील शेतक-यांनी पेरणी केली असून आतापर्यंत केवळ सरासरीच्या 59 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा खंड पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. शेतक-यांना कर्जवाटप करतांना राष्ट्रीयकृत बँकांनी गांभिर्य राखावे.

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, पुर्वोत्तर राज्यातून आता आपल्या भागात हत्तींचे आगमन होत आहे. मानवी वस्तीजवळ ते पोहचणार नाही, याची काळजी वन विभागाने घ्यावी, असे श्री. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, नैसर्गिक आपत्ती, वन विभाग, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य विभाग आदींचा आढावा घेतला.

सादरीकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची पावसाची सरासरी 1084 मि.मी आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 1254 मि.मी (115 टक्के) पाऊस पडला होता. यावर्षी मात्र जून ते 15 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या केवळ 646 मि.मी. (59 टक्के) पाऊस पडला आहे. 11 तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात यावर्षी भात, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर पिकांची 4 लक्ष 68 हजार 771 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

००००००

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी 17 ऑक्टो. पर्यंत विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता

प्रमाणपत्रासाठी 17 ऑक्टो. पर्यंत विशेष मोहीम

Ø इच्छुक विद्यार्थ्यांनी पडताळणी अर्ज तातडीने सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ एल. गायकवाड यांनी केले आहे.

शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये MHT-CET, NEET, JEE, MBA, B.Ed., Ph.D., B.Sc. Agriculture, B.Pharm., B.Sc. Nursing आदी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. तसेच तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थीही या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.

यासोबतच शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी आपला विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तातडीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावा.

अपूर्ण प्रकरणांसाठी तुटीपूर्तता शिबिर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत; मात्र आवश्यक पुरावे किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे ज्यांची प्रकरणे अपूर्ण अथवा तुटीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीही 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष ‘तुटीपूर्तता शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. अर्जामध्ये काही त्रुटी अथवा आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची तातडीने पूर्तता करून प्रकरण पूर्ण करून घ्यावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक सत्र 2026-27 मधील प्रवेश प्रक्रियेत कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

००००००

चिचपल्ली येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ


 चिचपल्ली येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ

चंद्रपूर, दि. 18 : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने चिचपल्ली येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

चंद्रपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी श्री. पाल, गटशिक्षण अधिकारी श्री. यादव, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. यारेवार, विस्तार अधिकारी (पंचायत) मिनाक्षी बन्सोड, स्वच्छता समन्वयक श्री. खानझोड तसेच तालुका स्वच्छता व्यवस्थापक आशिया शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाची उद्दिष्टे, अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच ग्रामस्तरावरील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, आरोग्य संस्था तसेच इतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती किंवा अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढवावा. तसेच अभियानातील उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सेवा संकल्प’ मधून शासकीय योजनांची जनजागृती : ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, नागरिकांना आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन करणे तसेच शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष स्वच्छता मोहीम : प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचपल्ली येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातून आरोग्य केंद्र परिसराची साफसफाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी आणि वादविवाद स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांपर्यंतही स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.

०००००००