Search This Blog

Friday, 18 September 2026

अंगणवाडी उत्सव व पोषण माहनिमित्त भद्रावतीत जनजागृती




 अंगणवाडी उत्सव व पोषण माहनिमित्त भद्रावतीत जनजागृती


‘सेवा संकल्प अभियान’ व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम


चंद्रपूर , दि. 18 : महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासोबतच पोषण, आरोग्य, शिक्षण आणि मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृह, भद्रावती येथे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सेवा संकल्प अभियान’, ‘अंगणवाडी उत्सव’ तसेच ‘पोषण अभियानांतर्गत पोषण माह’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम, प्रशिक्षक अभिषेक मोहुर्ले, धर्मेंद्र मेश्राम, प्रिया पिंपळशेंडे, विस्तार अधिकारी स्नेहल चार्लॅकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुलींचे शिक्षण व संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, मातृ व बाल आरोग्य, संतुलित आहार, कुपोषण प्रतिबंध, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील पोषणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


अंगणवाडी केंद्र बालकांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी महिला व बालकांच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अंगणवाडी केंद्र हे केवळ पोषण आहार वितरणाचे केंद्र नसून बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. माता व बालकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अंगणवाडी यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.


गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासासाठी विविध विभागांनी समन्वयातून काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने लोकसहभाग वाढवावा आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.


सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार यांनी शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाची’ माहिती दिली. अंगणवाडी केंद्रांवर बालकांसोबत मातांनाही सहभागी करून महिलांचे आरोग्य, माता-बाल पोषण आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहितीही या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण, पोषण स्थितीचे परीक्षण, पालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व सांगितले.  यावेळी पौष्टिक आहार प्रदर्शनी आणि जनजागृती रॅली

आयोजित करण्यात आली. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी स्नेहल चार्लॅकर यांनी केले. संचालन पर्यवेक्षिका विद्या श्रीरामे यांनी तर आभार  कृतिका नैताम यांनी मानले. कार्यक्रमाला भद्रावती तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

00000

महाराजस्व अभियान व आरोग्य शिबिरातून गोंडपिपरीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ



महाराजस्व अभियान व आरोग्य शिबिरातून  गोंडपिपरीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ


नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ


गोंडपिपरी, दि. 18 : नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवा एकाच ठिकाणी सुलभ व जलदगतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोंडपिपरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.


सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात महसूल, नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी, आरोग्य आदी विविध विभागांनी सहभाग घेत नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला.


शिबिरात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभांचे वितरण करण्यात आले. वर्ग-2 ते वर्ग-1 जमिनीबाबतचे आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले. याशिवाय नवीन मतदार नोंदणीसह विविध महसूलविषयक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.


नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना कचराकुंड्यांचेही वितरण करण्यात आले. पंचायत समिती, कृषी विभाग तसेच अन्य शासकीय विभागांच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांनाही यावेळी लाभांचे वितरण करण्यात आले.


आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सेवा संकल्प अभियानात आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.


यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार शुभम बाहकर, गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, नगरसेवक राकेश पुन, गटविकास अधिकारी संजय नैताम, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

लोकसंवादातून वांढरी येथे कर्जमाफी व कृषी विषयक योजनांची माहिती





लोकसंवादातून वांढरी येथे कर्जमाफी व कृषी विषयक योजनांची माहिती


जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम


चंद्रपूर, दि. 18 : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने वांढरी  (ता. चंद्रपूर) येथे ‘लोकसंवाद–2026’ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली.


जिल्हा माहिती कार्यालय आणि वांढरी येथील नवयुवा गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पोलीस पाटील तानेबाई शेरकी , गणेश मंडळाचे उपाध्यक्ष वैभव कौरासे, सचिव कपिल शेळके, संभाजी येरगुडे, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.


कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार यांनी विविध शेतकरी कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन केले. 

यात कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी उत्पादक कंपनी, फळबाग लागवड आणि शेततळे योजनेसह कृषी विभागाच्या विविध योजनांचा समावेश होता. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या व्याप्तीत बदल करण्यात आला असून भूमिहीन शेतमजूर तसेच महिला शेतकऱ्यांनाही यामध्ये लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

अपघाती मृत्यू, सर्पदंश, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, विजेचा धक्का तसेच उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटअंतर्गत लाभ तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ अशा तरतुदींचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.


000000 

Thursday, 17 September 2026

सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ



 

सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज (दि.17) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.

सदर चित्ररथाद्वारे 15 तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या येाजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात शासकीय आश्रमशाळा समूह योजना, अनुदानित आश्रमशाळा, शबरी आदिवसी घरकुल योजना, आदिवासी मुला/मुलींकरीता शासकीय वसतीगृहे, विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश, महाराष्ट्र टायबल पब्लिक स्कूल सोसायटी एकलव्य मॉडेल निवासी शाळा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृती योजना, सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम येाजना, कन्यादान योजना, सबळीकरण व स्वाभिमान योजना, राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अबुल कलाम अमृत आहार योजनेचा समावेश आहे.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रेम राठोड, राजीव बोंगिरवार, सुधाकर गौरकर, राजेश धोटकर, सचिन आष्टुनकर, अमोल नवलकर, युवराज चव्हाण, प्रिया मून, तेजश्री चवरे, ज्ञानेश्वर गावंडे, डी.एम. कुडसंगे, प्रफुल धात्रक, ज्ञानेश्वर गोपी, प्रितम मडावी आदी उपस्थित होते.

०००००००

विसापूर येथे 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान अग्निवीर भरती रॅली

 

विसापूर येथे 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान अग्निवीर भरती रॅली

Ø ऑनलाइन प्रवेश परीक्षेत यशस्वी उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 17 : सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्या वतीने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीसाठी दि. 3 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईई) यशस्वी झालेल्या पात्र उमेदवारांना या रॅलीमध्ये सहभागी होता येणार आहे.

या भरती रॅलीमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील पात्र उमेदवार सहभागी होणार आहेत. अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन दहावी उत्तीर्ण (ऑल आर्म्स) आणि अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्ण (ऑल आर्म्स) या प्रवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स) या प्रवर्गासाठी संबंधित भरती विभागाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्ये तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव येथील सर्व जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची भरती रॅलीदेखील याच ठिकाणी होणार आहे.

ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेत यशस्वी उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या लॉग-इन तपशिलांचा वापर करून भरती रॅलीचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रत्येक उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर उपस्थित राहण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण नमूद असेल. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून निर्धारित तारीख व वेळेनुसार सर्व मूळ कागदपत्रांसह भरतीस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन सेना भरती कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.

अधिक माहिती अथवा शंका निरसनासाठी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2958867 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००