Search This Blog

Monday, 14 September 2026

बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

 

बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Ø बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा  ‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रम

Ø चिचपल्ली येथे ‘जागतिक बांबू सप्ताह 2026’चा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 14 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली.

बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांनी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. बांबूचा उपयोग केवळ पारंपरिक वस्तू तयार करण्यापुरता मर्यादित नसून आधुनिक डिझाईन, कलाकृती, शाश्वत उत्पादने आणि उद्योजकतेसाठीही प्रभावीपणे होऊ शकतो, असा संदेश या गणेशमूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला.

या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेलाही नवे स्वरूप मिळाले आहे. निसर्गाशी सुसंगत असलेल्या बांबूचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘बांबूचा बाप्पा’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला बीआरटीसीचे संचालक उमेश वर्मा, वनक्षेत्रपाल सतीश शेंडे, चिचपल्लीचे सरपंच चंदन उचेकर, न्यू एरा क्लिनिक सोल्युशनचे सचिन धात्रक आणि बीआरटीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बांबू हे ‘हरित सोने’ असून बांबूवर आधारित पर्यावरणपूरक उत्पादने, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ अंतर्गत तांत्रिक सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा समारोप १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिना’च्या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना 'बांबू फॉर द फ्युचर - फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोवेश' अशी असून बांबू संशोधन, नवोपक्रम, शाश्वत उपजीविका आणि हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

००००००

Sunday, 13 September 2026

भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन


 

भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन

Ø भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात

नागपूर, दि. १३ :  भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे भेट देणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय समितीसमोर सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

     विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात याबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मनपा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

   राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीनुसार, राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अन्य संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सिव्हिल लाईन्स येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष  मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

सूचना व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वीय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. तसेच nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी विहित मुदतीत ई-मेलद्वारे आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यमान परीक्षा प्रणाली व विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल प्रक्रियेपर्यंतची सुरक्षा, प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी आणि मूल्यांकन याबाबत सूचना अपेक्षित आहेत.

तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली याबाबतही सूचना देता येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अभिप्राय समिती  समोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 1139 प्रकरणे यशस्वीपणे निकाली


चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 1139 प्रकरणे यशस्वीपणे निकाली

Ø मोटार अपघाताच्या 84 प्रकरणांत 10.38 कोटींची नुकसानभरपाई मंजूर

Ø दाखलपूर्व प्रकरणांत 86.31 लाख रुपयांची वसुली

चंद्रपूर, दि. 13 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली  12 सप्टेंबर 2026 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 10 हजार 46 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि 10 हजार 344 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 27 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि 112 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 1 हजार 139 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसानभरपाईची 84 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 10 कोटी 38 लाख 9 हजार 670 रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये 86 लाख 31 हजार 205 रुपयांची वसुली करण्यात आली. धनादेश अनादराच्या प्रकरणांपैकीही 34 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालत ही पक्षकारांना परस्पर सामंजस्याने व तडजोडीच्या माध्यमातून वाद निकाली काढण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचण्यासोबतच प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरचे सचिव एस. एस. इंगळे यांनी दिली.

००००००

Saturday, 12 September 2026

सागवान वस्तूंच्या फिरत्या विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन




 

सागवान वस्तूंच्या फिरत्या विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Ø माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम

Ø महिला सक्षमीकरणासह स्थानिक रोजगाराला चालना

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सागवान वनसंपदा आणि महिलांचे कौशल्य यांची सांगड घालून महिलांना रोजगार व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने सागवान लाकडापासून निर्मित विविध वस्तूंचे फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्य भारती, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहायक विभागीय व्यवस्थापक रुपेश पाटील, वन संरक्षण अधिकारी संभाजी कोंडेवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, जिल्हा प्रकल्प सल्लागार भूषण मुंजेकर, नरेंद्र बनकर, अमित चवरे, खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे, व्यवस्थापक शारदा हुसे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दर्जेदार सागवानाची ओळख अधिक व्यापक करणे आणि त्याचवेळी महिलांना रोजगार व विपणनाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या अभिनव उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील वनसंपदेचा योग्य वापर करून महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न माविम आणि एफडीसीएमच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या फिरत्या विक्री केंद्रात सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक मूर्ती, विविध प्रकारचे फर्निचर, खुर्च्या, टेबल, दरवाजे, कटिंग बोर्ड, मोमेंटो, नेमप्लेट, शोभेच्या वस्तू तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाचे सागवान लाकूड, आकर्षक डिझाईन आणि महिलांच्या कौशल्यातून साकारलेल्या कलाकुसरीमुळे या उत्पादनांना विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.

या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या लघुउद्योगांना चालना मिळणार आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार सागवान लाकडापासून तयार केलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उत्पादनांबाबत अधिक माहितीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित खुशिया लोकसंचालित साधन केंद्र, चंद्रपूर येथे संपर्क साधता येईल.

००००००

महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील प्रलंबित अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत निकाली काढा

 


महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील प्रलंबित अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत निकाली काढा

Ø विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 : शैक्षणिक वर्ष 2023-24, 2024-25 आणि 2025-26 मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाडीबीटी 1.0 पोर्टल 15 सप्टेंबर 2026 पर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी पोर्टलवरील प्रलंबित अर्जांबाबतची आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील महाविद्यालयांच्या लॉग-इनमध्ये प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये विद्यार्थी स्तरावरील त्रुटींची दुरुस्ती करून संबंधित अर्ज पुनःप्रक्रियेसाठी पाठविणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक पडताळणी व कार्यवाही पूर्ण करून अर्ज पुढील प्रक्रियेसाठी सादर करावेत.

विद्यार्थी स्तरावर अर्ज प्रलंबित असल्यास संबंधित विद्यार्थी व पालकांनी अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करून 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यामुळे अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी व पालकांची राहील. यासाठी समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन अर्ज तसेच नवीन अर्जदारांची नोंदणी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोर्टलवरील आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती तसेच प्रोफाइल नियमितपणे अद्ययावत ठेवावे.

महाडीबीटी 1.0 पोर्टलवरील जुन्या शैक्षणिक वर्षांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या या अंतिम मुदतीचा लाभ घेऊन विद्यार्थी, पालक आणि संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही 15 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

००००००