Search This Blog

Monday, 18 May 2026

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Ø वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरीता 18 जून रोजी मतदान

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार - वर्धा - चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतर्गत 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम : 1) अधिसूचनेची प्रसिद्धी - 25 मे 2026, 2) नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची अंतिम तारीख - 1 जून 2026, 3) नामनिर्देशन पत्राची छाननी - 2 जून रोजी, 4) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख - 4 जून रोजी, 5) मतदानाचा दिनांक - 18 जून 2026 रोजी, 6)  मतदानाची वेळ - सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, 7) मतमोजणी दिनांक - 22 जून रोजी, 8) निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येण्याची तारीख - 25 जून 2026 आहे.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, चंद्रपूर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 1) निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, 2) निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा, 3) निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली आहेत.

वरील निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उपरोक्त तिन्ही जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकूण 40 स्थानिक स्वराज्य संस्थेतील 977 पात्र मतदार, मतपत्रिकेद्वारे आपले मतदान नोंदविणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

०००००००

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’



 जिल्ह्यातील 187 गावांमध्येजन भागिदारी अभियान

Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 18 : अनुसूचित जमातींच्या सामाजिक व आर्थिक उत्कर्षासाठीप्रधानमंत्री जनजातीय न्याय अभियानआणिधरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानयांचे एकत्रिकरण करून केंद्र शासनाच्यावतीनेआदि कर्मयोगी अभियानराबविण्यात येत आहे. आदि कर्मयागी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 187 गावांमध्ये आदि सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून या गावांमध्ये आताजन भागिदारी अभियानराबविण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी 18 ते 25 मे 2026 या कालावधीत सदर गावांमध्ये विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 18) बैठक घेऊन सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

जन भागिदारी...सर्वात दूर, सर्वात पहिलेया संकल्पनेवर आधारीत, जिल्ह्यातील 187 गावांमध्ये 19 ते 25 या कालावधीत गाव पातळीवर व्यापकता शिबिरे व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येईल. 20 मे रोजी संबंधित अधिकारी कर्मचारी, आदि कर्मयागी व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शिवार फेरीचे आयेाजन, 21 मे 23 मे या कालावधीत आदि सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण आणि जलद निपटा-यासाठी दररोज सुनावणी, 24 मे रोजी दस्तऐवजीकरण व विविध प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच 25 मे रोजी अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे, याबाबत नियोजन करण्यात आल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, आजपासून सुरू झालेले जन भागिदारी अभियान, आपापल्या क्षेत्रातील गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणांनी आठवड्याभराचे नियेाजन करावे. विशेष शिबिरांचे आयोजन करून घरकुल, पट्टे वाटप, राशन कार्ड सोबतच अग्रीस्टॅक व फार्मर आयडीबाबतही मार्गदर्शन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जन भागिदारी अभियानाचे उद्दिष्ट्ये : 1) आदि सेवा केंद्र असलेल्या 187 गावांमध्ये योजनांची माहिती पोहचविणे 2) ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, बचत गट यांच्या माध्यमातून जनजागृती 3) लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन 4) तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता 5) आदि सेवा केंद्रात प्राप्त झालेल्या तक्रारींची जनसुनावणी व निवारण 6) आरोग्य तपासणी, सिकलसेल जागरुकता, पोषण संदेश 7) राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे.

०००००००

औषधी दुकानांच्या संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता उपाययोजना

 

औषधी दुकानांच्या संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता उपाययोजना

Ø औषधांसाठी संपर्क करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

संपाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुकानिहाय काही औषधी दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा.

चंद्रपूर : बंटी घाटे (मो. 9604789005), जितेंद्र राजा (मो. 9850378781), प्रशांत जाजू (मो. 9422136075), आकाश येरगुडे (मो. 9021974393), सुमीत बावणे (मो. 9420659964), विनय सबनीस (मो. 9422837633). घुग्घुस : गंधर्व भगत (मो. 9922517194), बल्लारपूर : निशीकांत खैरे (मो. 9422139388), राजुरा : कैलास रेंगुटवार (मो. 9270122185), कोरपना : लक्ष्मीकांत देवतडे (मो. 9545667783), जिवती : मोहमद देशमुख (मो. 9881013685), पोंभुर्णा : विजयपाल पिपरे (मो. 7875676215), गोंडपिपरी : रविंद्र सोनुले (मो. 9421718752), भद्रावती : अविनाश पारोदे (मो. 9850738755), वरोरा : मनिष पिंपळशेंडे (मो. 9420304403), चिमूर : अजय चौधरी (मो. 9421721256), मूल : मनिष येलट्टीवार (मो. 9326109977), सिंदेवाही : राजेंद्र पशीने (मो. 9423608223), सावली : गजानन टोंगे (मो. 9422191804), नागभीड : विजय बोरकर (मो. 9423638561), ब्रम्हपुरी : सुरेश अटवार (मो. 9423642205).

आणिबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी सहायक आयुक्त (औषधे) सुहास सावंत (मो. 8600026385) आणि औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. 9096414104) यांच्याशी संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. सावतं यांनी कळविले आहे.

०००००००

Friday, 15 May 2026

जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी


जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी

Ø मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर

चंद्रपूर, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने 'विशेष सखोल पुनरीक्षण' (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्याचाही या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक कुटुंबातील मतदारांची माहिती तपासण्यात येईल. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नावे शोधून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच, पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांकडून नमुना 6 भरून घेण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल..) कडे नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुने उपलब्ध राहतील.

भारत निवडणूक आयोगाने या मोहिमेत राजकीय पक्षांचाही सक्रिय सहभाग अपेक्षित धरला आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथ लेव्हल एजंट बीएलए) नियुक्त करण्याबाबत सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मतदार याद्यांतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे व मृत मतदारांची नोंद कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमध्ये प्रत्येक मतदान क्षेत्रात प्रत्यक्ष घरभेटीद्वारे मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. या मोहिमेत बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळतील. तसेच आवश्यक ते बदल, वगळणी व नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया राबवतील. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराकडून घरभेटीच्या वेळी कागदपत्रे संकलित केली जाणार नाहीत. तथापि, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

तसेच, ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांबाबत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नाव असल्याची संभाव्य कारणे स्थानिक चौकशीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत. अशा मतदारांची यादी ग्रामपंचायत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना त्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

एसआयआर मोहिमेकरीता जिल्ह्यातील आकडेवारी : एकूण मतदार 18 लक्ष 68 हजार 5 असून यात पुरुष मतदारांची संख्या 9 लक्ष 44 हजार 721, स्त्री मतदार 9 लक्ष 23 हजार 234 तर तृतीयपंथी मतदार 50 आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 47864 असून 85 वर्षांवरील वयोवृध्द मतदारांची संख्या 12437 तर दिव्यांग मतदार 9 हजार आहेत.

महत्त्वाचे वेळापत्रक : 1) बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी 20 जून ते 29 जून, 2) घरोघरी पडताळणी मोहीम 30 जून ते 29 जुलै, 3) मसुदा मतदार यादी प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 5) अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026. मतदारांना मागील सखोल पुनरीक्षणातील नोंदी तपासण्यासाठी Voters' Service Portal या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मतदार स्वतःची माहिती तपासू शकतात.

मतदारांना आवाहन : 'शून्य त्रुटी' मतदार यादी तयार करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीसाठी आल्यास नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वसुमना पंत यांनी केले आहे.

००००००

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा ; शिक्षकावर गुन्हा दाखल

 

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा ; शिक्षकावर गुन्हा दाखल

चंद्रपूर, दि. 15 : भद्रावती  तालुक्यातील नवीन चिचोर्डी जि.. प्राथमिक शाळेतील शिक्षक धनराज विठ्ठल मगरे यांना मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी (बीएलओ) म्हणून मतदान केंद्र क्र. 299 मधील मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) च्या  कामाकरीता नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी निवडणुकीसारख्या अति महत्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआआर चे काम जानेवारी 2026 पासून सुरू आहे. परंतु मतदान केंद्रस्तरीय अधिकारी धनराज मगरे, हे मतदार यादी संबंधातील महत्वाची कामे करीत नसल्यामुळे त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. परंतु त्यांच्या एसआयआर च्या  कामामध्ये कोणतीही  प्रगती दिसून आली नाही. मगरे यांना वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही त्यांनी कामात टाळाटाळ केली. तसेच मागील एक महिन्यांपासून 35 टक्केच्या वर काम केलेले नाही. एसआयआर च्या अंत्यत महत्त्वाचे कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

26 एप्रिल पासून 12 मे 2026 पर्यंत एसआयआर कामाचा आढावा घेतला असता त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा आढळून आली नाही. लेखी नोटीस देऊनसुध्दा श्री. मगरे हे कामाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे निवडणूकीसारख्या अति महत्वाच्या कामामध्ये कामचुकारपणा केल्याचे सिध्द होत असल्यामुळे त्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32 व म.ना.से. (शिस्त व अपिल) अधिनियम 1979 अन्वये कर्तव्यात कसूर केल्यामुळे धनराज मगरे, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यास उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पर्यवेक्षक कोमल जोशी यांनी 14 मे 2026 रोजी भद्रावती पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

००००००