Search This Blog

Tuesday, 9 June 2026

ग्रामीण जनतेसोबत कलेक्टर, सीईओंचा लोकसंवाद



 

ग्रामीण जनतेसोबत कलेक्टर, सीईओंचा लोकसंवाद

Ø बोर्डा, घंटाचौकी, वलनी गावातील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर, दि. 09 : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यातील जनता सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. त्यामुळे दिवसा गावातील नागरिकांची भेट होऊ शकणार नाही व त्यांच्याशी संवादही साधता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, थेट रात्रीच्या वेळी गावात पोहचले आणि लोकसंवादातून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सोमवारी (दि. 8) रात्री पंचायत समिती, चंद्रपूर अंतर्गत येणा-या ग्रामपंचायत बोर्डा,  घंटाचौकी व वलनी  या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला व विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

घंटाचौकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शैक्षणिक व बालविकास उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच शाळा व अंगणवाडीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांना स्वावलंबन, उद्योजकता व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोर्डाच्या सरपंचा पल्लवी तोडासे चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वलनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन उपस्थित युवक व महिलांसोबत संवाद साधतांना  गावातील पाणीपुरवठा योजना, महिला बचत गट, उपजीविका विकास, कृषी व संलग्न व्यवसाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

बोर्डा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे, आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे व ग्रामविकासासाठी लोकसहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला. यावेळी उपसरपंच दीपक खनके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास या उपक्रमाची मोलाची मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी पंचायत समितीतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी विविध योजनांची  माहिती ग्रामस्थांना दिली.

०००००

एचआयव्हीसह जगणा-या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ

 

एचआयव्हीसह जगणा-या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ

चंद्रपूर, दि. 09 : देशात एचआयव्ही / एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल उचलत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली  चंद्रपूर जिल्ह्यात ‘मिशन एड्स सुरक्षा’ या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 1 डिसेंबर 2027 पर्यंत जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविणे हा आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत एचआयव्हीसह जगणारे जे नागरिक आहेत, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

यात 3600 एचआयव्हीग्रस्त नागरिकांना बाल संगोपन योजनेचा लाभ, 5172 जणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, 28 नागरिकांना मिशन वास्तल्य योजना, 771 नागरिकांना शिधापत्रिका, 53 जणांना अंत्योदय योजना, 269 जणांना आधारकार्ड वाटप, 4700 नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र वाटप, तर 2869 एचआयव्हीग्रस्त नागरिकांना बस पास योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

राज्यात सध्या अंदाजे 4 लाख रुग्ण एचआयव्हीसह जगत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 13796 नागरिक एचआयव्हीबाधित असून 6650 रुग्ण उपचारावर आहेत. संसर्गाचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून 2027 पर्यंत ‘एडस्‍ मुक्त जिल्हा आणि 2030 पर्यंत ‘एडस् मुक्त महाराष्ट्र’ करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

अंमलबजावणीसाठी ठोस रणनीती :

1) टेस्टिंग कव्हरेज : आयसीटीसी केंद्रासोबतच पीएचसी व अन्य आरोग्य केंद्रात एचआयव्ही / सायफिलीस, हिपॅटायटीजच्या चाचण्या वाढविणे. 2) उपचारात सातत्य : एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचार सोडून देणार नाही यासाठी 48 तासात फॉलोअप घेणे. 3) माता बाल आरोग्य : गर्भवती महिलांची 100 टक्के तपासणी करून बालकांना संसर्गापासून वाचविणे 4) उच्च जोखमीचे गट : स्थलांतरीत कामगार, इंजेक्शनद्वारे औषध घेणारे आणि लैंगिक कामगारांसाठी सुरक्षा पध्दतीचा अवलंब करणे. 

००००००००

चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’चे आयोजन

 

चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’चे आयोजन

चंद्रपूर, दि. 09 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपुरच्या वतीने संडे ऑन सायकल रॅली घेण्यात आली.  या रॅलीची सुरवात बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल येथून झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले.

विविध गटातील नागरिकांनी, खेळाडूंनी एकत्र येत 'अर्धा तास रोज, फिटनेस का डोज' चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. या सायकल रॅलीदरम्यान खेळाडूं‌नी, नागरिकांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्व अधोरेखित केले. सायकलचा नियमित वापर केल्यास शारीरिक तंदूरुस्ती वाढते. इंधनाची बचत होवून पर्यावरणाचे रक्षण होते, असे मत अनेक खेळाडूंनी व्यक्त केले.             

चंद्रपूर शहरात घेण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता आरोग्यविषयक जनजागृती करणारी चळवळ ठरावी. या माध्यमातून नागरिकांमध्ये सायकलची आवड वाढावी व दर रविवारी असा उपकम राबविला जावा, अशी अपेक्षा जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी व्यक्त केली. सदर रॅली आंबेडकर कॉलेज, रामनगर रोड, पाण्याची टाकी, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवास, बॅडमिंटन हॉल जिल्हा क्रीडा संकुल या मार्गाने जावून रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर संदीप उईके, विठ्ठल भालेराव, नंदू अवारे, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, मनोज पंधराम, रोशन भुजाडे, विजय डोबाले, क्रीडा मार्गदर्शक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

शेळी पालन, कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण


 शेळी पालन, कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 09 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता 9 ते 13 जून 2026 या कालावधीमध्ये पाच दिवसीय शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबडयांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व सरक्षण, प्रतिबंधात्मक उपाय, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ज्ञ व शासकीअधिका-यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी www.mced.co.in या वेबसाईट वर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी संदीप जाने, मिलींद कुंभारे. स्मिता पेरके यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

००००००

तूर बियाणे घटकाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा


तूर बियाणे घटकाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा

चंद्रपूर, दि. 09 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षक अंतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत शेतकऱ्यांनी  राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2026-27 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तूर 50 टक्के अनुदानावर तसेच तूर मिनीकिट 100 टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली अर्ज करावा

अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे करीता अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

००००००