Search This Blog

Friday, 15 May 2026

जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी


जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी

Ø मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर

चंद्रपूर, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने 'विशेष सखोल पुनरीक्षण' (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्याचाही या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक कुटुंबातील मतदारांची माहिती तपासण्यात येईल. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नावे शोधून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच, पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांकडून नमुना 6 भरून घेण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल..) कडे नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुने उपलब्ध राहतील.

भारत निवडणूक आयोगाने या मोहिमेत राजकीय पक्षांचाही सक्रिय सहभाग अपेक्षित धरला आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथ लेव्हल एजंट बीएलए) नियुक्त करण्याबाबत सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मतदार याद्यांतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे व मृत मतदारांची नोंद कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमध्ये प्रत्येक मतदान क्षेत्रात प्रत्यक्ष घरभेटीद्वारे मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. या मोहिमेत बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळतील. तसेच आवश्यक ते बदल, वगळणी व नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया राबवतील. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराकडून घरभेटीच्या वेळी कागदपत्रे संकलित केली जाणार नाहीत. तथापि, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

तसेच, ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांबाबत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नाव असल्याची संभाव्य कारणे स्थानिक चौकशीद्वारे नोंदविण्यात येणार आहेत. अशा मतदारांची यादी ग्रामपंचायत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना त्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

एसआयआर मोहिमेकरीता जिल्ह्यातील आकडेवारी : एकूण मतदार 18 लक्ष 68 हजार 5 असून यात पुरुष मतदारांची संख्या 9 लक्ष 44 हजार 721, स्त्री मतदार 9 लक्ष 23 हजार 234 तर तृतीयपंथी मतदार 50 आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 47864 असून 85 वर्षांवरील वयोवृध्द मतदारांची संख्या 12437 तर दिव्यांग मतदार 9 हजार आहेत.

महत्त्वाचे वेळापत्रक : 1) बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी 20 जून ते 29 जून, 2) घरोघरी पडताळणी मोहीम 30 जून ते 29 जुलै, 3) मसुदा मतदार यादी प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 5) अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026. मतदारांना मागील सखोल पुनरीक्षणातील नोंदी तपासण्यासाठी Voters' Service Portal या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे मतदार स्वतःची माहिती तपासू शकतात.

मतदारांना आवाहन : 'शून्य त्रुटी' मतदार यादी तयार करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीसाठी आल्यास नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वसुमना पंत यांनी केले आहे.

००००००

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा ; शिक्षकावर गुन्हा दाखल

 

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा ; शिक्षकावर गुन्हा दाखल

चंद्रपूर, दि. 15 : भद्रावती  तालुक्यातील नवीन चिचोर्डी जि.. प्राथमिक शाळेतील शिक्षक धनराज विठ्ठल मगरे यांना मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी (बीएलओ) म्हणून मतदान केंद्र क्र. 299 मधील मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) च्या  कामाकरीता नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांनी निवडणुकीसारख्या अति महत्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआआर चे काम जानेवारी 2026 पासून सुरू आहे. परंतु मतदान केंद्रस्तरीय अधिकारी धनराज मगरे, हे मतदार यादी संबंधातील महत्वाची कामे करीत नसल्यामुळे त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. परंतु त्यांच्या एसआयआर च्या  कामामध्ये कोणतीही  प्रगती दिसून आली नाही. मगरे यांना वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही त्यांनी कामात टाळाटाळ केली. तसेच मागील एक महिन्यांपासून 35 टक्केच्या वर काम केलेले नाही. एसआयआर च्या अंत्यत महत्त्वाचे कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

26 एप्रिल पासून 12 मे 2026 पर्यंत एसआयआर कामाचा आढावा घेतला असता त्यांच्या कामात कोणतीही सुधारणा आढळून आली नाही. लेखी नोटीस देऊनसुध्दा श्री. मगरे हे कामाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे निवडणूकीसारख्या अति महत्वाच्या कामामध्ये कामचुकारपणा केल्याचे सिध्द होत असल्यामुळे त्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32 व म.ना.से. (शिस्त व अपिल) अधिनियम 1979 अन्वये कर्तव्यात कसूर केल्यामुळे धनराज मगरे, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यास उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पर्यवेक्षक कोमल जोशी यांनी 14 मे 2026 रोजी भद्रावती पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

००००००

शासकीय कामानिमित्त आता जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही

 

शासकीय कामानिमित्त आता जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही

Ø जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी चॅटबोट व अभ्यागत सेवा फॉर्म उपलब्ध

चंद्रपूर, दि. 15 : पश्चिमी आखाती देशात युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी नागरिकांनी काटकसरीचे धोरण अवलंबविण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, नागरिकांचा त्रास वाचावा तसेच येण्याजाण्याकरीता लागणा-या पेट्रोल – डिझेलची बचत व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून चॅटबोट क्रमांक व ऑनलाईन अभ्यागत सेवा फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

‘चांदा महसूल मित्र’ या नावाचे हे चॅटबोट असून 9284061588 या क्रमांकावर आता महसूल विभागाशी संबंधित सेवा, नागरिकांच्या अडीअडचणी, तक्रारींचे निराकरण नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकाचा वापर करावा. तसेच जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांना कामानिमित्त भेटण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात न येता अभ्यागत सेवा फॉर्मच्या माध्यमातून आपली समस्या / तक्रार निदर्शनास आणून देता येईल. या अभ्यागत सेवा फॉर्म मध्ये 1) अभ्यागताचे पूर्ण नाव 2) मोबाईल क्रमांक 3) ई-मेल आयडी (असल्यास) 4) पत्ता / गाव / तालुका 5) कामाचे स्वरुप 6) संबंधित कार्यालय / शाखा / अधिकारी /  कर्मचारी नाव (असल्यास) 7) कागदपत्रे अपलोड करून सदर फॉर्म सबमीट करावयाचा आहे. या लिंकद्वारे संबंधित  https://docs.google.com/forms/d/e/FAIpQLSfwVvlCvdfLZVZNEW_a-FedlRxveAlrmmd५०९२OlkeL-gA/viewform?usp=publish-editor नागरिक आपले म्हणने मांडू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००

जिल्हाधिका-यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे उद्घाटन


 

जिल्हाधिका-यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर व राणी हिराई उमेद मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांचे हस्ते करण्यात आले.

15 ते 17 मे 2026 या कालावधीमध्ये खास चंद्रपूरकरांसाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अस्सल आणि रसाळ कोकणचा राजा, हापूस आंबा थेट कोकणातील बागातून चंद्रपूर मध्ये उपलब्ध असणार आहे.  या आंबा महोत्सवामध्ये अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा थेट शेतकऱ्यांच्या भागातून नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले विशेष म्हणजो घातक रसायने किंवा कार्बाईड विरहित आंबे, रत्नागिरी येथील प्रसिद्ध काजू, वाजवी दरामध्ये विक्रीस उपलब्ध असणार आहे.

या संधीचा लाभ घेण्याकरिता 15 ते दिनांक 17 मे 2026 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत राणी हिराई उमेद मार्ट, जुबली हायस्कूल, हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर येथे उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले.

०००००००

शासकीय वाहनांचे निर्लेखनकरीता अर्ज आमंत्रित

 शासकीय वाहनांचे निर्लेखनकरीता अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 15 : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडील मारुती स्वीफ्ट डिझायर (क्र. एम.एच. – 12, .एच. 9131) या शासकीय वाहन निर्लेखन करून लिलावद्वारे विक्री करावयाचे आहे. त्यासाठी इच्छुक  नोंदणीकृत व्यक्ती/ संस्था/डीलर यांच्याकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत. सदर वाहन सद्यस्थिती नादुरुस्त असून 2012 चे मॉडल आहे.

अटी व शर्ती : लिलाव अर्ज नि:शुल्क असून कार्यालयातून प्राप्त करावा. अर्जासोबत बयाणा रक्कम 2 हजार रुपये, सह जिल्हा निबंधक  वर्ग 1 चंद्रपूर यांच्या  नावाने डिमांड ड्राफ्ट स्वरुपात जोडणे अनिवार्य आहे. बयाणा रक्कम विना परतावा राहील. रोखीने रक्कम स्विकारली जाणार नाही. वाहनाची पाहणी सुट्टीचे दिवस वगळून 12 मे ते 22 मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत करता येईल. लिलाव अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 मे 2026 आहे. प्राप्त अर्ज 27 मे रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येईल. लावण्यात येणारी बोली ही रक्कम 5 हजार किंवा त्याच्या पटीत असेल 

निविदा सादर करण्याचा पता : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल क. 4, पहिला  मजला, चंद्रपूर. -मेल- jdrchandrapur@gmail.com

अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत वरील पत्त्यावर संपर्क साधावा, असे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी कळविले आहे.

०००००००