Search This Blog

Thursday, 21 May 2026

जिल्हाधिका-यांनी घेतली निवडणूक नोडल अधिका-यांची बैठक



जिल्हाधिका-यांनी घेतली निवडणूक नोडल अधिका-यांची बैठक

Ø विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक - 2026

चंद्रपूर, दि. 21 : वर्धाचंद्रपूरगडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूकीकरीता विषयनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या  नोडल अधिका-यांची आज (दि.21) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर वसुमना पंत यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, शुभम दांडेकर, अतुल जटाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष (गडचिरोली), संजीव जाधवर (वर्धा) आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, प्रत्येक नोडल अधिका-यांनी आपापली जबाबदारी अतिशय गांभिर्याने पार पाडावी. तिनही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे, मतदान केंद्र ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तेथे सीसीटीव्ही, वेब कास्टिंग व इतर व्यवस्था चोख ठेवाव्यात. निवडणुकीच्या कामाकरीता आपापले मनुष्यबळ तपासून घ्यावे. अचूक मतदार यादी तयार करण्याला प्राधान्य देऊन नावाच्या अग्रक्रमानुसार मतदार यादी त्वरीत चंद्रपूर येथे पाठवावी, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

००००००

विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा


विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा

Ø समाजकल्याण विभागाच्या महाविद्यालयांना सुचना

चंद्रपूर, दि. 21 : भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2019-20 ते 2025-26 या वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना शासनाने 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर प्रलंबित अर्जासाठी कोणत्याही परिस्थितीत शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व प्रलंबित अर्जावर डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे, याची सर्व महाविद्यालयांनी नोंद घेऊन अर्ज तात्काळ निकाली काढावे, अशा सुचना समाजकल्याण विभागाने दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात यावी. त्यानुसार महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालयांच्या लॉगिनममधीलडॅशबोर्डवर प्रलंबित विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2019-20 या वर्षातील 55 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित, 2020-21 मधील 410 अर्ज, 2021-22 मधील 221 अर्ज, 2022-23 मधील 245 अर्ज, 2023-24 मधील 91 अर्ज महाविद्यालय स्तरावर व 288 अर्ज विद्यार्थीस्तरावर, 2024-25 मधील 287 अर्ज महाविद्यालयस्तर व 445 अर्ज विद्यार्थी स्तरावर, 2025-26 मधील 1230 अर्ज महाविद्यालय स्तरावर व 645 अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत सदर अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यानी तातडीने निकाली काढावेत.

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही : प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबात विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील आपला युजर नेम व पासवर्ड वापरून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी. शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्यास कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे, याची माहिती घेऊन संबंधित कागदपत्रासह महाविद्यालयाशी संपर्क साधावा. कागदपत्राअभावी शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असल्यास महाविद्यालयाच्या लॉगिनमधून संबंधित कागदपत्रे अपलोड करावी. विद्यार्थ्याने विहित मुदतीत आपला शिष्यवृत्ती अर्जाची त्रुटीपूर्तता न केल्यास सदर अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे व याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. सदर विद्यार्थ्यांची माहिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊनसुध्दा यादी पाहता येईल.

महाविद्यालयांनी करावयाची आवश्यक व तातडीची कार्यवाही : ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे परत पाठवले गेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाने तातडीने संपर्क साधावा. अर्जातील त्रुटीची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज दोन दिवसांत प्राप्त करून घेऊन मंजुरीची कार्यवाही करावी. विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आपण लाभापासून वंचित राहाल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, अशा स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात. महाविद्यालय लॉगिनमध्ये पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जावर कोणतीही दिरंगाई न करता महाविद्यालयाने तात्काळ तपासणी करून परिपूर्ण अर्जावर मंजूरीची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील शिष्यवृत्ती नियमानुसार पात्र अर्जच या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. अर्ज शिष्यवृत्ती नियमानुसार अपात्र असल्यास रिजेक्ट करावेत. महाविद्यालय लॉगिनवर अर्ज प्रलंबित ठेवू नये.   

प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास विद्यार्थी व महाविद्यालय सर्वस्वी जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी यांनी कळविले आहे.

००००००

ज्ञान भारतम् प्रकल्पांतर्गत पुरातन हस्तलेखन होणार जतन

 ज्ञान भारतम् प्रकल्पांतर्गत पुरातन हस्तलेखन होणार जतन

चंद्रपूर, दि.21 :  ज्ञान भारतम् प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखीत सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत असून सदर अभियान हे भारताच्या समृध्द हस्तलिखीत वारसाचे जतन, संवर्धन तसेच दस्तऐवजीकरण करण्यासाठी राबविण्यात येणारा एक महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे.

पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांनी दिलेल्या 'ज्ञान भारतम् तसेच संस्कृती, मंत्रालय भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शिकेनुसार देवस्थान / न्यास/ संस्थांकडे उपलब्ध असणाऱ्या  हस्तलिखितांची माहिती ज्ञान भारतम् मोबाईल ॲपमध्ये नोंदविण्याच्या सुचना विश्वस्तांना देण्यात आलेल्या  आहेत            तसेच 'ज्ञान भारतम्' पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचिन साहित्य, जसे की, हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे व इतर तत्सम यांची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान/न्यास/संस्थांनी 'ज्ञान भारतम्' पोर्टलवर करावयाची आहे.

       या अनुषंगाने संबंधित धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे वाचनालये तसेच हस्तलिखिते जतन करणाऱ्या व्यक्ती/संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहिती 'ज्ञान भारतम्' पोर्टल / मोबाईल ॲप वर नोंदवावी.          सदर साहित्याचे जतन, संवर्धन व संरक्षण होणाच्या दृष्टीने संबंधित विश्वस्तांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. पोर्टलवर नोंदणी करताना कोणताही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित साहित्याच्या माहितीसह सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चंद्रपूर यांच्यासोबत संपर्क साधावा, जेणेकरून सदर साहित्याची योग्य प्रकारे नोंद घेता येईल, असे सहायक धर्मादाय आयुक्त किशोर वानखेडे यांनी कळविले आहे.

०००००००

Wednesday, 20 May 2026

मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन

 मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन

चंद्रपूर, दि.  20 : मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमान पंत यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 चे कलम 13 (AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींनुसार अधिकारांचा वापर करून श्री. दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 च्या नियम 16 नुसार निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून निर्वाह भत्त्यावरील हक्कही बाधित होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

००००००

पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 693 उपाययोजना

 


पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 693 उपाययोजना

चंद्रपूर, दि. 20 : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा 45 अशांपर्यत पोहचला असून ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामीण पुरवठा विभागाने तालुकानिहाय 693 उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

यात विहीर खोलीकरण / गाळ काढणे / इनवेल बोरच्या 110 उपाययोजना, खाजगी विहीर अधिग्रहण करणे 16 उपाययोजना, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे 192, हातपंपासह विंधन विहीर 205, कुपनलिका 80, हातपंपाची विशेष दुरुस्ती 90 अशा एकूण संपूर्ण जिल्ह्यात 693 उपाययोजना प्रस्तावित आहे.

अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी : चंद्रपूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती – 15, विंधन विहीर – 8, कुपनलिका – 44, एकूण 77), बल्लारपूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –5, कुपनलिका – 18,  हातपंपाची दुरुस्ती – 11, एकूण 44), भद्रावती : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 6, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 2, कुपनलिका – 3,  हातपंपाची दुरुस्ती – 8, एकूण 29), वरोरा : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 5, खाजगी विहीर अधिग्रहण – 3, नळ योजना विशेष दुरुस्ती –14, विंधन विहीर – 8, कुपनलिका – 2,  एकूण 32), चिमूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 4, नळ योजना विशेष दुरुस्ती –20, विंधन विहीर – 26, कुपनलिका – 2,  हातपंपाची दुरुस्ती – 1, एकूण 53), मूल : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 1, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 9, एकूण 20), सावली : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –13, विंधन विहीर – 23, हातपंपाची दुरुस्ती - 2  एकूण 48).

 सिंदेवाही : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 13, नळ योजना विशेष दुरुस्ती –4, विंधन विहीर – 27, हातपंपाची दुरुस्ती – 21,  एकूण 65), नागभीड : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –8, विंधन विहीर – 8, हातपंपाची दुरुस्ती – 30,  एकूण 56), ब्रम्हपुरी : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 1, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 1, एकूण 12), गोंडपिपरी : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 5, नळ योजना विशेष दुरुस्ती –9, विंधन विहीर – 9, कुपनलिका – 2, हातपंपाची दुरुस्ती – 1,  एकूण 26), पोंभुर्णा : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 14, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 10, हातपंपाची दुरुस्ती – 13,  एकूण 47), राजुरा : (नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 18, कुपनलिका – 9,  एकूण 37), कोरपना : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 3, खाजगी विहीर अधिग्रहण – 13, नळ योजना विशेष दुरुस्ती –19, विंधन विहीर – 19, एकूण 54) आणि जिवती तालुक्यामध्ये (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 18, नळ योजना विशेष दुरुस्ती –35, विंधन विहीर – 37, हातपंपाची दुरुस्ती – 3,  एकूण 93) अशा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये एकूण 693 उपाययोजना करण्यात आल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमीत बेलपात्रे यांनी कळविले आहे.

००००००