Search This Blog

Thursday, 19 February 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा







छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा

Ø चंद्रपूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, जि.प. शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 19) सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, महानगर पालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे (माध्य.) अश्विनी सोनवणे (प्राथ.), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते

 यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ होताच विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा, पोवाडे, आकर्षक झाँकी व घोषणांच्या माध्यमातून राष्ट्राभिमान जागविला. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – महात्मा गांधी चौक – आझाद बगीचा – गिरणार चौक मार्गे होत शेवटी मनपा पार्किंग येथे समारोप करण्यात आला.

रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयुक्त महानगरपालिका यांच्या हस्ते तीन सामूहिक व तीन वैयक्तिक पारितोषिके (ट्रॉफी व पेन सेट) प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेला देण्यात आला. या शाळेतील विद्यार्थी निरव चहारे यांनी शिवचरित्रावर प्रभावी पोवाडा सादर केला. द्वितीय क्रमांक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर तर तृतीय क्रमांक पीएमश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबुपेठ, चंद्रपूर यांनी मिळविला.

या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, सामाजिक व महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक, खेलो इंडिया खेळाडू, एन.एस.एस., एन.सी.सी., क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी व शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. एकूण 22 शाळा व महाविद्यालयांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे तसेच प्रशासन अधिकारी सुनील आत्राम, मेरा युवा भारतचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

००००००

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा


 

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 19 :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागाचा आढावा घेऊन सुचना केल्या.

बैठकीला महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, मनपा उपायुक्त संजय चिद्रावार आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसदर्भात असलेल्या अंतर्गत तक्रार समितीचे ऑडीट करावे. या समित्या केवळ कागदावर न राहता ॲक्टीव्ह असल्या पाहिजे. जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला अचानकपणे भेट देऊन तपासणी करावी. अवैधरित्या चालणारे सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटरवर कडक कारवाई करा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करून द्या.

प्रत्येक शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे असली पाहिजे. त्याची नियमित साफसफाई करून पाण्याची व्यवस्था ठेवावी. आदिवासी विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींना ने-आण करणा-या पालकांची खात्री झाल्याशिवाय इतर कोणाहीसोबत पाठवू नये. त्यांना अधिकृत ओळखपत्रे द्यावीत तसेच त्याची नियमित तपासणी करावी. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील यंत्रणेला सोबत घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करा. नागरिकांची लोकोपयोगी कामे वेळेत आणि जबाबदारीने करा, अशा सुचना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या.

विविध विभागाचे सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सादरीकरण करतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाह प्रतिबंध, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी असलेल्या योजना आदींबाबत माहिती दिली. तसेच आरोग्य विभागांतर्गत अल्पवयीन मुलींची प्रसुती, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र,  विशाखा समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर महिलांसाठी विशेष उपाययोजना यांच्यासह शिक्षण विभाग, कामगार कल्याण विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर महानगर पालिका आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.

००००००

सर्व वाहन चालक/मालकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे

 सर्व वाहन चालक/मालकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे

Ø अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 19 :  अलीकडच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल (एपीके) तसेच मोबाईल एसएमएस / व्हॉट्सॲपद्वारे पाठविल्या जाणा-या खोट्या लिंकमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व वाहन चालक / मालकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे. तसेच अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही व्हॉट्सॲपद्वारे व इतर मोबाईल ॲपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी. तसेच RTO service.apk, mParivahan_Update.apk अशा अनधिकृत APK ॲप्स / लिंक डाऊनलोड करू नये. कारण त्याद्वारे ओटीपी, बँकिंग माहिती व मोबाईल मधील इतर संवेदनशील  माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व वाहन चालक / मालक तसेच सर्व नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य दक्षता घ्यावी. तसेच याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर किंवा वाहतुक विभागाची संपर्क करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

असे असतात फसवणुकीचे संदेश : 1) आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरीत दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येतात व लगेच दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. 2) डीएल (वाहन चालविण्याचा परवान) सस्पेंड होणार आहे, त्वरीत तपासणी करा.

या शासकीय संकेतस्थळांचा करा वापर : 1) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) करीता https://vahan.parivahan.gov.in 2) ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) करीता https://sarathi.parivahan.gov.in 3) परिवहन सेवा करीता https://www.parivahan.gov.in आणि 4) ई-चलन पोर्टल करीता https://echallan.parivahan.gov.in वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे gov.in ने समाप्त होतात. Com, online, site, in अशा डोमेनवरील कोणतीही वेबसाईट नागरिकांनी उघडू नये.

येथे करा तक्रार : 1. नॅशनल सायबर क्राईम पोर्टल https://www.cybercrimer.gov.in 2. सायबर फसवणूक हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा 3. जिल्हा सायबर पोलिस स्टेशन.

०००००००

संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025-26 ला उत्स्फुर्त प्रतिसाद

 संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025-26 ला उत्स्फुर्त प्रतिसाद

Ø न्यायमुर्ती जावळकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मार्गदर्शन

मुंबई/चंद्रपूर, दि. 19 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांच्यामार्फत हे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जात आहे.

या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) न्या. एम. एस. जावळकर, यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक अमूल्य मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी उत्तरे देत संविधानाबद्दल जागरूक नागरिकत्वाची भावना दृढ केली. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त (समाज कल्याण) इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन मोनाल थुल यांनी केले. डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. आरती तायडे यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली. राज्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला.

००००००

आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू

 आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू

Ø ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्चपर्यंत

चंद्रपूर, दि. 19 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता आरटीई 25 टक्के प्रवेश आरक्षणांतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2026-27 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. जिल्ह्यातील 184 शाळांमधील 1630 प्रवेशाच्या राखीव 25 टक्के जागांवरील प्रवेशाकरीता 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेण्यात येत आहे.

सदर प्रवेशाकरीता पालकांनी http://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. बालकांच्या पालकांनी आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचण किंवा अन्य काही शंका असल्यास तालूका स्तरावरील पंचायत समिती / गटसाधन केंद्र येथील मदत / सहाय्य केंद्राशी संपर्क करावा. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणर नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तरी पात्र व इच्छूक पालकांनी सदर प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे (प्राथ.) यांनी कळविले आहे.

००००००