Search This Blog

Friday, 10 July 2026

31 जुलै पर्यंत करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी


31 जुलै पर्यंत करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी

चंद्रपूर, दि. 10 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विद्यमान अटी व शर्तीनुसार खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 या एक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे.

योजनेची वैशिष्ट्ये: 1. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक आहे. 2. शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी डिजिटल पीक सर्व्हेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. 3. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा राहील. 4. ही योजना अधिसुचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसुचित क्षेत्रासाठी लागू असेल. 5. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. 6. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. 7. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. 8. बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळुन आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या डीबीटी द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल.

योजना कार्यान्वीत यंत्रणा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे या विमा कंपनीकडून राबविण्यात येत असून कंपनीचा पत्ता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, 9 वा मजला, ऑफिस ए, वेस्टलँड सेंटर वन बिल्डिंग, बी सेक्टर परिहार चौकाजवळ, डी.पी. रोड, औंध, पुणे, ईमेल आयडी supportagri@iffcotokio.co.in.

खरीप 2026 मध्ये विमा संरक्षण / जोखमीच्या बाबी : योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पीकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील.

विमा संरक्षित रक्कम / विमा हप्ता : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंमाम 2026 साठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. 1) भात (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 65 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1300 रुपये) 2) ख. ज्वारी (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 33 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 330 रुपये), 3) सोयाबीन (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 62500 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1250 रुपये), 4) तूर (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 47 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 940 रुपये) 5) कापूस (विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 65 हजार रुपये, शेतक-यांनी भरायची रक्कम 1300 रुपये).

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप 2026 हंगामाकरीता विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरू करण्यात आले आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

000000

इयत्ता 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना

 इयत्ता 10 वी  व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना

चंद्रपूर, दि. 10 : इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा, तालुका, जिल्हा, विभागातून सर्व साधारण विद्यार्थ्यांमधुन प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो.

योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी. सी. सादर करावे. 31 जुलै 2026 पर्यंत प्रस्ताव सादर न केल्यास, पात्र विद्यार्थी पुरस्कारापासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

०००००००

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक


भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक

चंद्रपूर, दि. 10 : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला आहे, तो अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती ही संपूर्ण अभ्यासक्रमाकरीता लागु करण्यात येत असते. त्यामुळे शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्याने कोणताही अभ्यासक्रम अर्धवट सोडू नये. याबाबत विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन समाजकल्याण कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

अनेक विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी किंवा कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न करतात. मात्र, प्रवेश प्रक्रियेत अपेक्षित जागा न मिळाल्यास किंवा 'गॅप' टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए, बीएससी किंवा बीकॉम सारख्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. याच काळात विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात आणि त्यांना लाभही मिळतो. परंतु, पुढील शैक्षणिक वर्षात जेव्हा या विद्यार्थ्यांची निवड प्रत्यक्ष हव्या असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (उदा. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक) होते, तेव्हा तांत्रिक नियमांमुळे त्यांना त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळणे कठीण होते. नियमानुसार, एकदा शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, नवीन प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतो.

शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते. एकदा ही रक्कम जमा झाल्यानंतर, ती पुन्हा शासनाला चलनाद्वारे परत करण्यासाठी कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. परिणामी, एकदा चूक झाल्यास विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीचा लाभ कायमचा गमवावा लागतो, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

महाविद्यालयांना समुपदेशनाच्या सूचना : शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान रोखण्यासाठी, यंदाच्या वर्षात बीए, बीकॉम, बीएससीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या वेळीच योग्य समुपदेशन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थी अनावधानाने अशा अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरणार नाहीत. जर विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणार असेल आणि सध्या केवळ 'बॅकअप' म्हणून बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल, तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाशी सविस्तर चर्चा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

मूल येथील रोजगार मेळाव्यातून 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

 

मूल येथील रोजगार मेळाव्यातून 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

Ø विविध नामांकित कंपन्यांकडून मार्गदर्शन व मुलाखती

चंद्रपूर, दि. 10 : मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे आयेाजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून विविध कंपन्यांमार्फत 121 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथामिक निवड करण्यात आली आहे. तर 52 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यात 312 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सुचना केंद्र, मा.सा. कन्नमवार शासकीय आौद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल आणि क्रांतीकारी खुदीराम बोस शा. औ. प्र.संस्था, सावली यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर रोजगार मेळाव्याचा उद्देश संस्थेतील प्रशिक्षणार्थी, आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच बेरोजगार युवक-युवतींना विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.

या मेळाव्यात औद्योगिक क्षेत्रातील संभाजीनगर येथील इंड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लिमि. आणि एन.आर.बी. बिअरींग, नाशिक येथील एन.व्ही.के. पावर तर चंद्रपूर येथील व्ही. आर. एंटरप्रायझेस, पार्श्व किया मोटर्स प्रा. लि., वैभव एंटरप्रायझेस, व्ही वन सी एंटरप्रायझेस या आस्थापनांनी सहभाग नोंदविला. सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थेची कार्यपद्धती, उपलब्ध पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य विकास, वेतनश्रेणी, सेवा अटी, पदोन्नतीच्या संधी तसेच उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या बदलत्या गरजांविषयी उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, शिस्त, कार्यसंस्कृती आणि व्यावसायिक आचारसंहिता याबाबतही माहिती दिली.

यानंतर सहभागी कंपन्यांकडून पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलाखतीत सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्यामुळे उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची, त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची तसेच रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली. संस्थेच्या प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रोशन गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला.

००००००

पीएम-यशस्वी योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 पीएम-यशस्वी योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 10 : इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेतून देण्यात येणा-या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत ‘टॉप क्लास एज्युकेशन वउ स्कुल फॉर ओबीसी, ईबीसी, डीएनटी स्टुडंट’ योजना ही भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेद्वारे इतर मागासवर्ग, आधिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जाती या समाजातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता 9 ते 12 वीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश या विद्यार्थ्यांमधील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणासाठी आधार देणे हा आहे. जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पीएम यशस्वी योजनेतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरीता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर भरण्यात यावे.

इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जाती या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासकीय मदतीतून भागविणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे. लाभार्थी हा इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थी असावा. वार्षिक कुटुंबिय उत्पन्न कमाल 2 लाख 50 हजार रुपये असावे. मागील वर्षातील गुणांच्या आधारे मेरीट यादीनुसार निवड पद्धत असणार आहे.

तसेच ज्या विद्याथ्यांनी सन 2025-26 मध्ये इयत्ता 9 वी किंवा 11 वी मध्ये असताना या योजनेसाठी अर्ज केला होता, त्यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या अर्जाचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या तारखा (शैक्षणिक वर्ष 2026-27) : 1) ऑनलाईन अर्ज भरणे सुरू - 01 जून 2026 पासून,

2) विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत - 31 ऑक्टोबर 2026, 3) शाळांकडून अर्ज पडताळणी - 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापुर्वी योजना लागु असल्याची खात्री शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यामार्फत करावी व अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर कडून आपला अर्ज ऑनलाईन पडताळला गेला आहे की नाही, याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

००००००