Search This Blog

Monday, 22 June 2026

शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत


शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत

चंद्रपूर, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर, ता. चिमूर, येथे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित छायाप्रतींसह 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर, येथे उपस्थित राहावे.

रिक्त पदांचा तपशील : 1. शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), येथे मराठी (इयत्ता 6 वी ते 8 वी) करीता 1 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए., डी.एड., इंग्रजी विषयाकरीता (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद – बी.ए., डी.एड., मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी)  1 पद – एम.ए., बी.एड.

2. शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे विषय इंग्रजी (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.ए., डी.एड.,विषय-विज्ञान (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.एस्सी., डी.एड., विषय-मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड.

अटी व शर्ती : 1. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल, 2. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व आर्थिक तरतूद उपलब्ध झाल्यानंतर मानधन/वेतन अदा करण्यात येईल. 3.आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी अथवा जास्त करण्याचा, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा पदे संपुष्टात आणण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांना राहील. 4.मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय राहणार नाही.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाळेशी अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश


चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश

चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी मोहर्रम सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स (यात्रा) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने 25 जून व 26 जून 2026 रोजी भाविकांना समाधी दर्शनासाठी कारागृह परिसरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या पश्चिम दिशेला मुख्य तट क्र. 02 जवळ असलेल्या पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मोहर्रम सणानिमित्त उर्सचे आयोजन करण्यात येते. या उर्सासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील विविध समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात. 

उर्स कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कारागृह परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. तथापि, सुरक्षा व शिस्तीच्या दृष्टीने कारागृह परिसरात मोबाईल फोन, कॅमेरा तसेच पेढे, बर्फी किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास संबंधित भाविकास प्रवेश नाकारण्यात येईल.

भाविकांनी कारागृह प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी यावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक, चंद्रपूर जिल्हा कारागृह यांनी केले आहे.

००००००

मोहरम उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू


मोहरम उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू

            चंद्रपूर, दि. 22 : मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी निर्गमित केले आहेत.

मोहरम उत्सव. 17 जून ते 26 जून 2026 या कालावधीत साजरा होत असून दि. 2526 जून रोजी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम व मिरवणुका आयोजित केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 24 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून 26 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत विशेष निर्देश लागू राहतील.

सदर आदेशान्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मिरवणुका व सभांमधील लोकांच्या वर्तनाबाबत निर्देश देणे, मिरवणुकांचे मार्ग व वेळ निश्चित करणे, धार्मिक स्थळांच्या परिसरात आवश्यक निर्बंध लागू करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य, ढोल-ताशे व ध्वनिक्षेपकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक सभा, मिरवणुका, वाद्य वाजविणे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच घोषणाबाजी यासाठी संबंधित पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे.

मोहरम उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

००००००

Sunday, 21 June 2026

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा – जिल्हाधिकारी पंत







 

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा – जिल्हाधिकारी पंत

Ø आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी केली योगासने

चंद्रपूर, दि. 21 : आजचे जीवन हे धावपळीचे झाल्यामुळे मानव हा सतत मानसिक आणि शारीरिक तणावात असतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविला तर आपण निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.21) जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पंत बोलत होत्या. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.

 योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जागतिक स्तरावर योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. रोज एक तास आपण नियमितपणे योगा केला तर आपले आजार आणि मानसिक तणाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी निरोगी जीवनासाठी योगासने करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, पुरातन काळापासून भारतात योग अस्तित्वात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. माणसाचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी रोज योगा करावा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईची बॅटरी रोज चार्ज करतो, त्याचप्रमाणे किमान 1 तास योगा केला तर आपण निरोगी राहू, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

तर महापौर संगिता खांडेकर म्हणाल्या, योगामुळे आपला फायदा असून निरोगी राहण्यास मदत होते. नियमितपणे योगा करावा व तंदुरुस्त राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी केले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक संदीप उईके, नंदू आवारे, खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे, पतंजली योग समितीचे सुधाकर श्रीपूरकर, वैजंती गहूकर, शुभांगी डोंगरवार, निलिमा चरडे, अरुणा शिरभये, कविता मंघानी, सुभाष राजुरकर, सविता कोट्टी, संजय मंघानी, रोशन बावणे, सुवर्णा लोखंडे, प्रिती येलीचपुरवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार : जागतिक योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी ज्योती देऊरकर, मिशन लक्षवेध मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेलो इंडियाचे अंकिता चव्हाण आणि सोहम मोरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जलतरण तलावातही योगासने : मुख्य शासकीय कार्यक्रमापूर्वी जिल्हा क्रीडा संकूल येथील जलतरण तलावात 89 वर्षीय कृष्णाजी नागपूरे यांच्यासह सूवर्णा नागपुरे कामडे, संजीव कुमार जयपुरकर आणि प्रदीप मोहनापुरे यांनी ‘वॉटर योगा’ करून उपस्थितांची मने जिंकली.

उपस्थितांनी केली ही योगासने : यावेळी उपस्थितांनी स्कंदचक्रासन, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्टासन, उत्तांगपंडूतासन, वक्रासन, भुजंगासन, उत्तंगपादासन, पवनउत्तासन, शवासन, कपालभारती प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम, अनुलोमविलोम आदी योगासने केली.

०००००००

Saturday, 20 June 2026

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित



 

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

Ø प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, चंद्रपुरातही आयोजन

चंद्रपूर, दि. 20 : प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा आदी  उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना श्री. जोरगेवार म्हणाले, या योजनेत नियोक्ते व कर्मचारी या दोघांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते, हे या योजनेचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. चंद्रपूरचा उत्पादन व खाणकाम केंद्र म्हणून होणाऱ्या विकासावरही त्यांनी भर दिला. ही दोन्ही क्षेत्रे श्रमप्रधान असल्याने ही योजना या प्रदेशातील स्थानिक आस्थापनांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे : कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ एक योजना नाही. तर प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळकटी देतानाच उद्योग आणि मनुष्यबळ यांच्यात भक्कम दुवा निर्माण करणारा एक उपक्रम आहे. ही योजना एकाच वेळी दोघांनाही पाठबळ देते. आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून तितक्याच प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. जवळपास 20 लाख युवकांनी आपल्या पहिल्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले असून, हा टप्पा पूर्ण केल्यानंतर सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान आधीच मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

2 हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हे पाठबळ केवळ आर्थिक मदत नसून, ते देशाने आपल्या युवकांच्या परिश्रमांना दिलेली मान्यता व त्यांच्या भविष्याविषयीचा विश्वास दर्शवते. गेल्या 12 वर्षांत भारताच्या रोजगार व्यवस्थेत झालेल्या महत्त्वपूर्ण परिवर्तनाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ‘रोजगाराला सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सामाजिक संरक्षणाशी जोडण्यावर शासनाचा भर राहिला आहे’ असे ते म्हणाले.

०००००००