मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेता भारत गणेशपुरे चंद्रपुरात येणार
चंद्रपूर, दि. 9 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26” अंतर्गत जनजागृती व प्रचार-प्रसारासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे हे 10 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान ते ग्रामपंचायत सागरा (पं.स. भद्रावती), ग्रामपंचायत नांदगाव पोडे (पं.स. बल्लारपूर) आणि ग्रामपंचायत जिबगाव (पं.स. सावली) येथे भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या खास शैलीतून ते पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व पटवून देत ग्रामीण विकासातील लोकसहभागाबाबत जनजागृती करणार आहेत.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वाढविणे यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर 5 कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे. सुशासन, जलसमृद्धता, स्वच्छता, डिजिटल शिक्षण आदी सात प्रमुख घटकांवर गावांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण होऊन अभियानाची व्यापक प्रसिद्धी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभागातून व श्रमदानातून ग्रामविकासाची लोकचळवळ उभी करावी तसेच मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
0000000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)