Search This Blog

Wednesday, 17 June 2026

शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळण्यासाठी दक्षता घ्या



 शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळण्यासाठी दक्षता घ्या

Ø जिल्हाधिका-यांच्या कृषी विभागाला सुचना

चंद्रपूर, दि. १७ : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतक-यांसाठी हा हंगाम अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खते – बियाणांची टंचाई भासणार नाही. शेतक-यांना कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध होईल, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, आत्माचे संचालक अरुण कुसळकर, नाबार्डचे तृणाल फुलझेले यांच्यासह कृषी निविष्ठा विक्रेते तसेच फर्टिलायझर्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते आणि बियाणांचा साठा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, कोणीही खतांची अतिरिक्त साठवणूक करू नये. सर्व शेतक-यांना वेळेवर आवश्यक खते – बियाणे मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी. विक्रेत्यांनीसुध्दा एकाच व्यक्तिला मोठ्या प्रमाणात विक्री न करता, सर्वांना खते मिळतील, याप्रमाणे विक्री करावी. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी. खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी भरारी पथकाने नियमित तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

खरीप हंगाम २०२६ करीता जिल्ह्यासाठी एकूण मंजूर आवंटन १ लक्ष ८० हजार ८०० मे. टन असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ लक्ष ४७ हजार ७१२ मे. टन साठा प्राप्त झाला. यात युरीया ४२३०६ मे. टन, डीएपी ८१९२ मे. टन, एमओपी ८३१ मे.टन, संयुक्त खते ५६८६४ मे. टन तर एसएसपी ३९५१८ मे. टन यांचा समावेश आहे. एकूण प्राप्त साठ्यापैकी ९७५६३ मे.टन साठ्याची विक्री झाली असून ५०१४९ मे. टन साठा शिल्लक आहे. तसेच बफर स्टॉकमध्ये युरीया ५००७ मे.टन आणि डीएपी ४०० मे.टन आरक्षित ठेवण्यात आल्याचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत यांनी सांगितले.

000000

सिंधी विस्थापितांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे


 

सिंधी विस्थापितांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे

Ø विशेष अभय योजनेंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. १७ : राज्यातील अधिसूचित सिंधी विस्थापित क्षेत्रातील निवासी व व्यावसायिक जमिनींचे शर्तभंग नियमितीकरण तसेच फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंधी नागरिकांचे दीर्घकालीन प्रलंबित मालकी हक्क व शर्तभंग नियमितीकरणाशी संबंधित प्रश्नांना दिलासा मिळणार असून त्यांना जागेचे पट्टे देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.१७) सिंधी समाज भवन, चंद्रपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरात नायब तहसीलदार प्रियंका मानकर, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी योगेश सागुडले, चांदा राय तसेच महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये सिंधी विस्थापित नागरिकांना विशेष अभय योजना-२०२५ बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, अधिमूल्य भरण्याची कार्यपद्धती तसेच जमिनींच्या शर्तभंग नियमितीकरण व फ्री-होल्ड प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले.

सदर शिबिरात ५७ अर्ज संपूर्णपणे भरून स्वीकारण्यात आले. प्राप्त झालेले सर्व अर्ज पुढील तपासणी व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत. पात्र प्रकरणांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000

अनुसूचित जातीतील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

 अनुसूचित जातीतील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

Ø महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला ११५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

चंद्रपूर, दि. १७ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळमार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत ३५ लाभार्थी, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत ३५ तर थेट कर्ज योजनेअंतर्गत ४५ असे एकूण ११५ लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

१) अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत, सदर योजनेत २५ हजार पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व उर्वरीत २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे.

२) बिजभांडवल योजना : प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. ७५ टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षात करावी लागते व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

३) थेट कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या ४५ हजार रुपयांपर्यंत कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये ५० हजार रुपये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ वर्षात करावी लागते व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

वरील दिलेले योजनांचे अर्ज भरण्याकरीता महामंडळाच्या mahadisha.mpbcdc.in या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावे. अधिक माहितीकरीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपर येथे तसेच दूरध्वनी क्र. ०७१७२-२५३५४९ वर संपर्क करावा, जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश

चंद्रपूर, दि. 16 :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत मुलांचे 12 (चंद्रपूर येथे 2, राजुरा येथे 2 , गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल. सावली, पोंभूर्णा व गोंडपिपरी) व मुलींचे 11 (चंद्रपूर येथे 2, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा व गोंडपिपरी) असे एकूण 23 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत.

सन 2026-27 करीता रिक्त जागांवर प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नवीन प्रि-मॅट्रिक विद्यार्थ्यांनी तसेच 11 वी कनिष्ठ महाविद्यालयात तथा इयत्ता 12 वीत प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे.

           अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, असे विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे. नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासून आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे.              

अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल 18 जून रोजी चंद्रपुरात

 

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल 18 जून रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 16 :  वित्त व नियेाजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल हे 18 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

18 जून रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथे आगमन व वस्तु व सेवाकर विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 2 वाजता चंद्रपूर वरून गडचिरोली कडे प्रयाण.

००००००