Search This Blog

Monday, 6 July 2026

6 महिन्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये 119 गुन्हे दाखल


6 महिन्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये 119 गुन्हे दाखल

Ø 39 लक्ष 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Ø अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हास्तरीय समितीचा आढावा

चंद्रपूर, दि. 6 : अंमली पदार्थाची विक्री, साठवणूक आणि सेवन संदर्भात गत सहा महिन्यात पोलिस विभागाने 119 प्रकरणात 158 जणांवर गुन्हे दाखल केले असून एकूण 39 लक्ष 54 हजार 68 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गांजा बाळगल्याप्रकरणी 15 केसेस मध्ये 27 जणांवर गन्हे, एमडी पावडर बाळगल्याप्रकरणी 8 केसेस मध्ये 15 जणांवर गुन्हे, पॉप्पी स्ट्रॉच्या एक प्रकरणात 2 जणांवर गुन्हे तर अंमली पदार्थाच्या सेवन प्रकरणी 95 केसेसमध्ये 114 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस विभागाने सांगितले.

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले असून या अनुषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, योगेश हिवसे, अन्न व औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त सुहास सावंत, उपशिक्षणाधिकारी गणेश येळणे, टपाल खात्याचे प्रशांत कन्नमवार आदी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, नशामुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास त्वरीत पोलिस विभागाला द्यावी. आजच्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा – महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित कराव्यात. जिल्ह्यातील रासायनिक उत्पादने करणा-या कारखान्यांची नियमित तपासणी करावी. यात संबंधित कंपनीचे नाव, स्थापना कधी झाली, कशाचे उत्पादन होते आदी बाबी काटेकोरपणे तपासाव्यात. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याशी समन्वय ठेवावा. तसेच एमआयडीसी परिसरातील खाली जागांवर अवैधरित्या कशाचे उत्पादन केले जाते का, याचीसुध्दा तपासणी करावी. वन विभाग तसेच कृषी विभागाने जिल्ह्यात कुठेही गांजा, खसखसची लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.

००००००

सरी वरंबा पीक पध्दतीमुळे पीक उत्पादकतेत होणार वाढ


सरी वरंबा पीक पध्दतीमुळे पीक उत्पादकतेत होणार वाढ

Ø कृषी विभागाची मुलस्थानी जलसंधारण मोहीम

चंद्रपूर, दि. 6 : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि एलनिनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने कृषी विभागामार्फत चंद्रपूर तालुक्यात मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा शेतकऱ्यांसोबत समन्वय साधून विविध जलसंधारण तंत्रांचा प्रभावी प्रसार करत आहे.

रुंद सरी-वरंबा पद्धत, सरी-वरंबा पद्धतीवर बेड लागवड, उताराला आडवी मशागत आणि उताराला आडवी पेरणी यांसारख्या तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतातच मुरते, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो आणि पिकांची जोखीम कमी होते. तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 18 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, भात, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे सरी-वरंबा पद्धतीचा स्वीकार वर्षानुवर्षे वाढत आहे. खरीप 2024 मध्ये 30 टक्के, 2025 मध्ये 34 टक्के आणि चालू सन 2026-27 मध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या 14 हजार 279 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 8 हजार 485 हेक्टर, म्हणजेच सुमारे 60 टक्के क्षेत्र सरी-वरंबा पद्धतीखाली आले आहे.

 

शेणगाव आणि बेलसणी परिसरातील शेतांमध्ये सरी-वरंबा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ड्रोन चित्रीकरणातून स्पष्टपणे दिसून येतो. या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य वापर, मृदासंवर्धन आणि अधिक उत्पादन यांचा सुंदर संगम साधला जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून जलसंधारण, मृदासंधारण आणि आधुनिक पीक व्यवस्थापनाचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरत आहे. ‘सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करा, पाणी आडवा पाणी जिरवा, उत्पादन वाढवा आणि शाश्वत शेतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा’ असे तालुका कृषि अधिकारी अनिकेत माने यांनी कळविले आहे.

००००००

कोरपना येथील भूमी अभिलेख कार्यालयात नियमानुसारच काम

 

कोरपना येथील भूमी अभिलेख कार्यालयात नियमानुसारच काम

Ø उपअधिक्षक यांचे स्पटीकरण

चंद्रपूर, दि. 6 : कोरपना येथील भुमी अभिलेख उपअधिक्षक कार्यालयात शेतकरी, अर्जदार व खातेदार यांच्याकडून मोजणी अर्ज, नक्कल अर्ज, फेरफार अर्ज सर्व प्रकरणे ऑनलाईन व इतर पत्र ई - ऑफीसला स्विकारण्यात येतात. मोजणी काम, फेरफारचे काम, नक्कल अर्ज व इतर सर्व कामे विहीत मुदतीत व नियमानुसारच होत आहे. कोणतेही मुदतबाह्य प्रकरणे सदर कार्यालयात शिल्लक नाही. सर्व कर्मचारी हे कार्यालयात येणाऱ्या खातेदार/अर्जदार यांची कामे विहीत मुदतीत करून देत असून कोणाकडूनही पैशांची मागणी होत नसल्याचे उपअधिक्षक अ.के.  फटिंग यांनी स्पष्ट केले आहे.

उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, कोरपना येथील आस्थापना लहान आहे. वर्ग-3 पद समुह 4 चे 8 पदे आहेत. त्यापैकी एक कर्मचारी पुणे येथे प्रतिनियुक्तीवर आहे. एक कर्मचारी जनगननेसाठी सेवावर्ग, एक कर्मचारी एसआयआर निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर आहे. उर्वरीत पाच कर्मचा-यांमार्फत पांदण रस्ता, सरकारी पट्याची, ई मोजणी व्हर्जन 2.1 मधील मोजणी प्रकरणे, कजाप, ईतर कार्यालयीन कामे करण्यात येत आहे. त्यामुळे काही कामामध्ये थोड्याफार प्रमाणात विलंब होवू शकतो.

कार्यालयात कोणत्याही दलालामार्फत काम केले जात नाही. कार्यालयात परस्पर जनतेचे काम नियमानुसार करून देण्यात येत आहे. कोणासही वेठीस धरण्यात येत नाही. तसेच कार्यालयात येणाऱ्या जनतेकडून कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केल्यास त्यांनी कार्यालय प्रमुखाचा भ्रमणध्वणी क्रमांक 8605442956  यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आल्याचे उपअधिक्षक श्री. फटींग यांनी कळविले आहे.

००००००

विशेष लेख : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

 विशेष लेख :                                                                                                             


डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

चंद्रपूर : शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात न ठेवता त्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणारी ही योजना ठरत आहे. व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज घेणे तसेच हे कर्ज नियमितपणे भरणे आवश्यक आहे. जे शेतकरी या दोन्ही अटी पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज परत मिळते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषि पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनपर सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने दि.24.11.1988 रोजी घेतला होता. त्यानुसार दि.2.11.1991 च्या शासन निर्णयानुसार पीक उत्पादन प्रोत्साहन योजना दि.6.4.1990 पासून अंमलात आणण्यात आली. या योजनेनुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून रुपये 10 हजार अथवा त्यापेक्षा कमी रकमेचे पीक कर्ज घेणाऱ्या व या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्यांना 4 टक्के लाभाची रक्कम मंजूर करण्यात येत होती. शासनाने सदर योजनेअंतर्गत पात्र कर्जाच्या कमाल मर्यादेमध्ये वेळोवेळी सुधारणा केली आहे.

26 एप्रिल 1999 च्या शासन निर्णयानुसार योजनेचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना करण्यात येऊन योजनेतील पीक कर्जाची मर्यादा 15 हजार वरून 25 हजार करण्यात आली. 28 जून 2010 च्या शासन निर्णय योजनेतील पात्र पीक कर्जाची कमाल मर्यादा व योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यानुसार योजना त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणेसह राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडील अल्पमुदत पीक कर्जास लागू करण्यात आली. तसेच 50 हजार पर्यंतच्या पीक कर्जासाठी वार्षिक 4 टक्के दराने व 50 हजारावरील परंतु 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी वार्षिक 2 टक्के दराने व्याज सवलत सन 2010-11 पासून लागू करण्यात आली. दि. 19.10.2011 च्या शासन निर्णयानुसार कमाल पीक कर्जामध्ये व व्याज सवलतीच्या रकमेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार 1 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्जासाठी वार्षिक 3 टक्के दराने व 1 लाखापेक्षा जास्त परंतु 3 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्जासाठी 2 टक्के दराने व्याज सवलत 2011-12 पासून लागू करण्यात आली.

राज्य शासनाने रु. 3 लाखापर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जासाठी वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवालत सन 2021-22 पासूनच्या पीक कर्जास लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

योजनेचा उद्देश : पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पीक कर्जाच्या विहीत मुदतीमधील संपूर्ण परतफेडीस प्रोत्साहनपर व्याज सवलत देणे.

योजनेचे स्वरुप :  1) सन 2021-22 पासून वित्तीय संस्थांकडून 3 लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची प्रतीवर्षी दिनांक 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत अनुज्ञेय राहील. 2) त्रिस्तरीय पतपुरवठा संस्थांकडील संबंधीत कर्जदार शेतकरी जर पीक कर्जाची संपूर्ण परतफेड विहीत मुदतीत करीत असेल तर, केंद्र शासनाच्या याच प्रकारच्या योजनेप्रमाणे, त्यास व्याज सवलतीचा आगाऊ लाभ देण्यात यावा व त्याच्याकडून फक्त मुद्दल रक्कमेची वसुली करावी. 3) 3 लाखावरील रक्कमेच्या कर्जाबाबत पूर्ण रक्कमेच्या वसुलीनंतरच 3 लाख रक्कमेपर्यंतच्या रक्कमेवर व्याज सवलत देता येईल.

योजनेअंतर्गत पात्र कर्जे : 1) सदर योजनेसाठी वित्तीय संस्थांमार्फत थेट शेतकऱ्यांना देण्यात आलेली अल्पमुदतीची पीक कर्जे लाभास पात्र राहतील. 2) 3 लाखापर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. 3 लाखाहून अधिक रक्कमेच्या अल्पमुदती पीक कर्जामध्ये 3 लाखापर्यंतच्या कर्ज रक्कमेवर व्याज सवलत अनुज्ञेय राहील. 3) सन 2021-22 पासून उचल केलेल्या अल्पमुदती पीक कर्जास योजना लागू राहील. 4) वित्तीय संस्थांमार्फत नियमित पद्धतीने अथवा किसान क्रेडीट कार्डद्वारा वितरीत केलेली कर्जे योजनेअंतर्गत लाभास पात्र राहतील. 5) अल्पमुदतीचे खावटी / अन्य कर्ज, तसेच अन्य शेती- बिगरशेती कर्ज योजनेअंतर्गत लाभास पात्र असणार नाहीत. 6) थकीत पीक कर्जाच्या वसुलीस त्याचप्रमाणे केवळ व्याज रक्कमेची वसुली करुन /वसुली न करता नुतनीकरण केलेली कर्ज योजनेअंतर्गत लाभास पात्र असणार नाहीत.

वित्तीय संस्था : सदर योजनेचा लाभ त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणेसह राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीला (SLBC) संलग्न असलेल्या खाजगी क्षेत्रातील बँका व लघुवित्त बँका यांचेमार्फत थेट शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुदती पीक कर्जास योजना लागू राहील.

व्याज सवलत परिगणना : 1) पीक कर्जाच्या उचल तारखेपासून संपूर्ण कर्ज परतफेडीच्या तारखेपर्यंत जेवढे दिवस कर्जाचा वापर झाला आहे तेवढ्या दिवसासाठी व्याज सवलत अनुज्ञेय राहील. 2) राज्य शासनामार्फत पीक कर्जाच्या वसुलीस / परतफेडीस नैसर्गिक आपत्तीच्या वा तत्सम कारणास्तव मुदतवाढ दिल्यास व्याज सवलतीची परिगणना मुदतवाढ दिलेल्या तारखेपर्यंत करावी.

अनुदान मागणी /वितरण कार्यपध्दती : 1) संबंधित सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांनी विहीत विवरणपत्रातील लाभधारकांची यादी त्यांनी घेतलेले कर्ज, परतफेडीची रक्कम व दिनांक इत्यादी तपशिलासह अनुदान मागणी तालुका सहाय्यक /उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे चार प्रतीमध्ये दाखल करावी. 2) राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँका व लघुवित्त बँकांनी अनुदान मागणीचा प्रस्ताव विहीत नमुन्यात तयार करुन बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकाकडून तपासून प्रमाणित करुन घ्यावा व लेखापरीक्षकाच्या प्रमाणपत्रासह प्रस्ताव या कार्यालयाकडे दोन प्रतीत सादर करावा. 3) शासनाच्या विशेष घटक योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या कर्जदार सभासदांचे व्याज सवलत मागणीचे प्रस्ताव स्वतंत्रपणे तयार करुन विशेष घटक योजनेतंर्गत प्राप्त तरतुदीमधून लाभ देण्यात यावा.

पीक कर्जाच्या विहित मुदतीमधील संपूर्ण परतफेडीसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्ररित्या 3 लाखापर्यंतच्या कर्जावर वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत देण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदती पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापारी बँकांना एक टक्का दराने व्याज परतावा योजना व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी 2.50 टक्के दराने व्याज परतावा स्वतंत्रपणे शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत नागपूर विभागात मार्च अखेरपर्यंत 2 लक्ष 97 हजार 366 लाभार्थी शेतकऱ्यांना 52 कोटी 96 लाख 65 हजार रुपये वितरित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही 1 लक्ष 41 हजार 646  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32 कोटी 60 लक्ष 8 हजार रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.  ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात न ठेवता त्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारी महत्त्वाची योजना ठरली आहे.        

                                                                       

                                                                                             राजेश का. येसनकर

                                                          जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

००००००

Sunday, 5 July 2026

विशेष लेख कर्जमुक्तीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत... शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा अध्याय

 विशेष लेख

 

कर्जमुक्तीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत... शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा अध्याय

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींनी छळले आहे. राज्यात व्यापक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी शेतीचा मोठा भाग पर्जन्यपोषित आहे. त्यामुळे खरीपाच्या (आणि रब्बीच्याही) उत्तम हंगामासाठी पर्जनमान हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अर्थात, चांगला पाऊस पडूनही अनेकदा कीडींच्या प्रादुर्भावाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या समस्या सुटल्यावर काहीवेळा अवकाळी पावसाचा फटका बसल्यावर हातचे पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवते. पीक चांगले आल्यावर शेतीमालाच्या दरांचा प्रश्नही सातत्याने भेडसावत असतो. शेतकऱ्यांवर येणाऱ्या अशा विविध स्वरुपाच्या संकटांचा विचार करून राज्य शासनाने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.

कर्जमुक्ती योजनेचा निर्णय

राज्य सरकारने अलिकडेच 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' जाहीर करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. यावेळी थेट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

अल्पमुदतीची थकीत पीककर्जे,तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचा या योजनेत समावेश आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जखात्यांची एक किंवा अनेक बॅंकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कर्जाची रक्कम या मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या शेतकऱ्यांनाही स्वतःच्या हिस्स्याची रक्कम भरल्यावर दोन लाख रुपयांपर्यंतच्या  कर्जमाफीचे लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. यामुळे शेतकरी पीककर्जासाठी अक्षम ठरणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे.

त्या’ शेतकऱ्यांनाही लाभ

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने प्रोत्साहनपर दिलासा दिला असून अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद या योजनेत आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन ३० जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार विहित वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक वर्षांतील अल्पमुदत पीक कर्जाचीही वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील.

कल्याणकारी योजनांची जोड

राज्य सरकारचे कृषी धोरण शेतकरी केंद्रित आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, या त्रिसूत्रीवर कृषी विभागाच्या नेतृत्वात विविध योजना राबविल्या जात आहेत. सिंचन सुविधांचा विस्तार, ठिबक व तुषार सिंचनाला प्रोत्साहन, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि शेततळ्यांच्या उभारणीसाठीही विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ऊर्जेच्या खर्चात बचत व्हावी आणि दिवसा अखंडित वीज उपलब्ध व्हावी, यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ महत्त्वाची ठरली आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सिंचनासाठी शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला जातोय.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सातत्याने प्रगतीची शिखरे गाठत असताना शेतीचे क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. शेतीसाठी लागणारे मानवी श्रम तुलनेने कमी व्हावे आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे ‘स्मार्ट’ पर्याय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रसारवर मोठा भर दिला आहे. पीकांची लागवड, कीडींचे व्यवस्थापन, खत व पाण्याचे अचूक नियोजन, फवारणी, बाजारभावांचे अचूक विश्लेषण, पर्यायी बाजारपेठांची उपलब्धता, हवामानविषयक माहिती अशा अनेक बाबतीत आता ‘एआय’ साधने राज्यात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहेत. याशिवाय शेतमाल साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन, तसेच डिजिटल सेवांद्वारे शासकीय योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

           आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य आणि पायाभूत सुविधांचा संगम साधत शेतीला अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि शाश्वत स्वरूप देण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरु आहेत. कर्जमुक्तीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा हा प्रवास महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र आणि पर्यायाने शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या व्यापक प्रयत्नांचे द्योतक मानला जात आहे.

 

रमाकांत दाणी

00000