Search This Blog

Tuesday, 23 June 2026

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत




 एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत

चंद्रपूर, दि.23 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रृटीरहित व सर्वसमावेशक ठेवण्याकरीता महाराष्ट्रात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एसआयआर मोहिमेंतर्गत 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील 70-राजुरा मतदारसंघात 92.99 टक्के मॅपिंग, 71-चंद्रपूर मध्ये 70.18 टक्के मॅपिंग , 72-बल्लारपूर मध्ये 87.25 टक्के मॅपिंग, 73-ब्रम्हपुरी 92 टक्के मॅपिंग, 74-चिमूर 93.13 टक्के मॅपिंग, 75-वरोरा मतदारसंघात 88.04 टक्के मॅपिंग अशी एकूण सहाही मतदारसंघात सरासरी मॅपिंगची टक्केवारी एकूण 86.56 आहे.

जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 15 लक्ष 56 हजार 064 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांची नोंदणी, मतदारांच्या तपशीलांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, दुबार नोंदीची तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, दुरुस्ती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी विहित कालावधीत दावे व हरकती सादर कराव्यात. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. सदर प्रक्रियेमध्ये बूथस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी घेऊन  मतदारांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

असे आहे वेळापत्रक : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1) प्रशिक्षण व पूर्वतयारी - 20 ते 29 जून 2026, 2) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी - 30 जून ते 29 जुलै 2026, 3) मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै 2026 पर्यंत, 4) प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी- 5 ऑगस्ट 2026, 5) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026, 6) दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 आणि 7) अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी- 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये इन्युमरेशन फॉर्मचे डाउनलोड कार्य 100 टक्के पूर्ण झाले आहे.

००००००

शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

 

शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

Ø रक्त संकलन तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

चंद्रपूर, दि. 23 : रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ‘रक्तदान हेच जीवनदान’ असे म्हटले जाते. आपल्या रक्तदानामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. मंगळवारी नियोजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केले.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नियेाजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे रक्तदान शिबीर आयेाजित करण्यात आले होते. यात २२ ते २५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नायब तहसीलदार अजय मेकलवार यांच्यासह इतर कर्मचा-यांचा समावेश होता.

शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये १५ हजार २५८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत जवळपास साडेपाच  रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात विविध मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

 

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

Ø विवरणपत्र दखल न केल्यास 10 हजारांचा दंड

मुंबई /चंद्रपूर, दि. 23 : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल (PSP) वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांद्वारे कळविले आहे.

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 मधील कलम 14(1) (ब) व 14(3) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी 30 जून 2026 पर्यंत ऑनलाइन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.

०००००००

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि.23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा  पुरस्कार देण्यात येतो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासिन प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी जावून अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००

महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्कारासाठी नामांकन सादर करा


महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्कारासाठी नामांकन सादर करा

चंद्रपूर, दि.23 : पद्म पुरस्कार - पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून प्रजासत्तक दिनाच्या (2027) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे. या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगिरीची दखल घेणे हा असून कला, साहित्य व शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरीसेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील / विषयांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जाते.

त्याअनुषंगाने भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय यांनी महिला सक्षमीकरणामध्ये यशस्वी कामगिरीची सर्वोच्च पायरी व योगदान दिले आहेत. त्या पात्र व्यक्तिंनी पद्म पुरस्कार- पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार करीता http://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात 31 जुलै 2026 पर्यंत आवेदन करावे. पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होईल, असे महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.

००००००