Search This Blog

Saturday, 20 June 2026

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित



 

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

Ø प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, चंद्रपुरातही आयोजन

चंद्रपूर, दि. 20 : प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा आदी  उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना श्री. जोरगेवार म्हणाले, या योजनेत नियोक्ते व कर्मचारी या दोघांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते, हे या योजनेचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. चंद्रपूरचा उत्पादन व खाणकाम केंद्र म्हणून होणाऱ्या विकासावरही त्यांनी भर दिला. ही दोन्ही क्षेत्रे श्रमप्रधान असल्याने ही योजना या प्रदेशातील स्थानिक आस्थापनांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे : कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ एक योजना नाही. तर प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळकटी देतानाच उद्योग आणि मनुष्यबळ यांच्यात भक्कम दुवा निर्माण करणारा एक उपक्रम आहे. ही योजना एकाच वेळी दोघांनाही पाठबळ देते. आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून तितक्याच प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. जवळपास 20 लाख युवकांनी आपल्या पहिल्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले असून, हा टप्पा पूर्ण केल्यानंतर सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान आधीच मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

2 हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हे पाठबळ केवळ आर्थिक मदत नसून, ते देशाने आपल्या युवकांच्या परिश्रमांना दिलेली मान्यता व त्यांच्या भविष्याविषयीचा विश्वास दर्शवते. गेल्या 12 वर्षांत भारताच्या रोजगार व्यवस्थेत झालेल्या महत्त्वपूर्ण परिवर्तनाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ‘रोजगाराला सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सामाजिक संरक्षणाशी जोडण्यावर शासनाचा भर राहिला आहे’ असे ते म्हणाले.

०००००००

अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई


अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Ø 4 ग्राहकांसह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल ; 21950 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थाई टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यास आवश्यक ते साहित्य / सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान 4 ग्राहक मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ, अंबादास नानाजी थेरे हे प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे, हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व  ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरिक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे, जवान जगदिश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर विलास महाकुलकर यांनी सहभाग घेतला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल : या मोहिमेत देशी दारुच्या 200 सीलबंद बाटल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या अशी एकूण 15270 रुपये किंमतीची दारु, काउंटरवर असलेली 2750 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 21950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन : नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारु, अवैध मद्यपान अड्डे किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्याची माहिती मिळाल्यास, त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999  व व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133  वर त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.

0000000

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विशेष ग्रामसभा

 प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विशेष ग्रामसभा

Ø निवड झालेल्या गावांमध्ये 23 ते 25 जून या कालावधीत आयोजन

चंद्रपूर, दि. 20 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उपक्रमांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आणि तळागाळातील सहभाग बळकट करण्याच्या उद्देशाने, चंद्रपूर जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांमध्ये 23 ते 25 जून 2026 या कालावधीमध्ये ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामसभांना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या ग्रामसभेमध्ये 1) प्रधानमंत्री आदर्श  ग्राम योजनेची उद्दिष्टे आणि घटक यांविषयी जनजागृती मोहीम, 2. अनुसूचित जातीच्या गावाच्या विकासात्मक गरजांची ओळख व प्राधान्यक्रम निश्चित करणे, 3. सामुदायिक सहभागाची उभारणी आणि पंचायती राज संस्था व ग्रामीण विकास संस्थांचा सहभाग, 4. विविध उपजीविका, शिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे, 5. योजनेंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा आणि इतर केंद्र/राज्य सरकारच्या योजनांशी समन्वय, 6. 'आदर्श ग्राम' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये 50 सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे आणि 15 ग्रामीण पायाभूत सुविधा परिपूर्ण करण्याचे नियोजन, 7. ग्रामसभेत आदर्श ग्राम योजनेचे शासन निर्णय वाचून दाखविणे, तसेच संबंधित गावांचे बेस लाईन स्कोर समजावून सांगणे, 8. ज्या गावांना निधी मिळून 2 वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. त्याच्या खर्चाचा व उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची स्थितीचा आढावा घेणे आदी विषय घेण्यात येणार आहे.

ग्रामसभेमध्ये ग्राम महसुल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, मख्याध्यापक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, समाज कल्याण निरीक्षक/वसतिगृहाचे गृहपाल, स्थानिक अनुसूचित जातीचे बचत गट, ग्राम संस्था पदाधिकारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, सफाई कर्मचारी, बँक सखी, स्थानिक सीएससी केंद्र चालक इ. कर्मचारी यांचा समावेश आहे.

तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी 23 ते 25 जून रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

oooooo

Friday, 19 June 2026

प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी






 

प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी

Ø बेलसणी, भटाळी, उर्जानगर येथील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

Ø नुकसान भरपाईबाबत शास्त्रीय पध्दतीने धोरण निर्माण करण्याची ग्वाही

चंद्रपूर, दि. १९ : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग तसेच कोल वॉशरीजमुळे निघणारी धूळ, हवेतील धुळीचे कण, कोल वॉशरीतून निघणा-या प्रदुषित पाण्याचा मानवी जीवनावर तसेच शेतीव्यवसायावर होणारा परिणाम प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (दि. १९) चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बेलसणी, भटाळी, उर्जानगर या प्रदूषण ग्रस्त भागाची पाहणी करून पिडीत शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

शासनामध्ये काम करतांना धोरण, नियम, कायदा असणे महत्वाचे आहे, असे सांगून अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले, प्रदुषणामुळे होणा-या शेतीच्या नुकसानभरपाईबाबत शासनाचे अधिकृत धोरण अथवा कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज चंद्रपूर येथे आलो. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मोठ्या प्रमाणात होणा-या प्रदुषणाचा तसेच शेतीच्या नुकसानभरपाईचा मुद्दा  शासनाकडे मांडला. त्यांच्याच प्रयत्नामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण तयार होत आहे.

उद्योगांच्या प्रदुषणामुळे या क्षेत्रात समस्या नक्कीच आहे, शेतीचे नुकसान होत आहे, ही नुकसानभरपाई कोणी द्यायची, कोणत्या दराने द्यायची, कधीपर्यंत द्यायची, याबाबत शास्त्रीय पध्दतीने निर्णय घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) प्रतिनिधींची नियमितपणे बैठक घेण्यात येईल. चर्चा व अभ्यास करून शेतीच्या नुकसानभरपाईबाबत एक निश्चित धोरण तयार करून शासनाला अहवाल सादर केला जाईल. पिडीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ पध्दतीने ही समिती काम करेल, अशी ग्वाही अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी दिली.

उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त : आमदार सुधीर मुनगंटीवार

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या प्रदुषणामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त आहे. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीच्या नुकसानभरपाई करीता शासनाने समिती गठीत केली आहे. विकास खारगे हे अभ्यासू, निष्ठावंत, संवेदनशील तसेच प्रामाणिक अधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा अनेक वर्षे होत राहील. या अहवालात शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीचे धोरण (एमएसपी) अंतर्भुत असावे. एमएसपी बदलला तर नुकसानभरपाईची रक्कम वाढेल, असे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतीचे नुकसान, गावाचे पुनर्वसन, नोकरीत स्थानिकांना रोजगार, उद्योगासाठी शेतजमिनीचा योग्य भाव, आदी विषयांबाबत माहिती दिली.

 या ठिकाणी दिल्या भेटी : या दौ-यात अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज मुळे होणारे प्रदुषण, भटाळी येथील वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे होणारा पुराचा धोका तसेच उर्जानगर येथील रोप-वे मुळे होणा-या प्रदुषणाची पाहणी केली.

विविध विषयांबाबत आढावा बैठक : श्री. खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित विषयांवर आढावा बैठक घेतली. यात नवीन गंगापूर (ता. पोंभुर्णा) महसूली दर्जा प्रदान करून संगणीकृत गाव नमुना सातबारा उपलब्ध करून देणे, मौजा पाहमी (ता. चंद्रपूर) हे गाव ग्रामपंचायत निंबाळाला जोडणे, झरी व पेठ ही गावे पिंपळखुट ग्रामपंचायतीला जोडणे, देवाडा व जुनोना ही गावे चंद्रपूर तालुक्यात समाविष्ट करणे या विषयांवर गावक-यांशी व संबंधित अधिका-यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदारद्वय सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

000000

एकल महिला धोरणाबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे अभिप्राय नोंदवावेत - निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार


 

एकल महिला धोरणाबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे अभिप्राय नोंदवावेत - निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार

चंद्रपूर, दि. 19 : राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक व विषयतज्ज्ञांनी अत्यंत संवेदनशीलपणे आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार यांनी केले.

पुढे ते म्हणाले, समाजात अनेकदा एकल महिलांना अपेक्षित सन्मान व आधार मिळत नाही. त्यांच्या समस्या, अडचणी आणि भावनिक संघर्ष समजून घेऊन शासनाने तयार करावयाच्या धोरणामध्ये त्यांचे हित जपले जावे. त्यासाठी सर्व घटकांनी सकारात्मक व संवेदनशील दृष्टिकोनातून अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशान्वये तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड. दक्षिणा जुनगरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी दामोधर कुमरे, जिल्हा समन्वयक माविम प्रदीप काठोळे आदींनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी एकल महिला धोरणाची उद्दिष्टे व अपेक्षित अभिप्राय याविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीत उपस्थित एकल महिला व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी पुनर्विवाह, रोजगार, कौशल्य विकास, मुलांचे शिक्षण, सामाजिक सुरक्षा व सक्षमीकरण यासंदर्भातील सूचना मांडल्या. त्यावर मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत शासनाच्या प्रस्तावित धोरणामध्ये या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले. या बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००००००