Search This Blog

Thursday, 26 February 2026

नाविन्यपूर्ण योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

 




नाविन्यपूर्ण योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

 

Ø शैक्षणिक सहलीस जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी

 

चंद्रपूर, दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथून हिरवी झेंडी दाखवून  करण्यात आला. दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ४९ विद्यार्थी व ५ शिक्षक अभ्यास सहलीस रवाना झाले आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच नवीन ठिकाणांची ओळख, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरविषयक दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी राष्ट्रपती भवन, संसद भवन, ताज महल तसेच मथुरा, जयपूर, जोधपूर व उदयपूर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांबाबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी  आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाण व सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो. यापुढेही आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.

सहलीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत ब्लेझर, शूज, बॅग व कॅपचे वाटप करण्यात आले. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्प अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरत  आहे.

00000

Wednesday, 25 February 2026

जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण

                        

                  






                       जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण                                    

Ø गोंडपिपरी येथे जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या समस्या

Ø तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 26 : नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवणूक व्हावी, या उद्देशाने गोंडपिपरी येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय प्रशासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक तसेच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या आलेल्या समस्यांची यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी सर्व यंत्रणांना दिले.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, तहसीलदार शुभम बाहेकर, गटविकास अधिकारी संजय पुप्पलवार यांच्यासह आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्थानिक स्तरावरील तक्रारी लोकशाही दिनातच सोडविणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोकशाही दिनाबाबत सर्वांना अवगत करावे. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप त्वरित करा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळनिहाय घेऊन पात्र लाभार्थ्यांना त्यात विविध दाखले वाटप करावे. वाद असलेल्या अतिक्रमित रस्त्यांचे सिमांकन प्राधान्याने करून घ्यावे. पाणंद रस्त्यांच्या याद्या तयार करून ग्रामसेवक, तलाठी आणि सर्वेअर यांनी मौका पाहणी करावी. जलयुक्त शिवारची कामे त्वरित पूर्ण करा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावांवर लक्ष केंद्रित करून सर्व उद्दिष्टांची पूर्तता करावी. घरकुल अपूर्ण असल्यास संबंधित लाभार्थ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्या तसेच सर्व घरकुल योजनांचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या

जनता दरबारात तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्या, तक्रारी व सूचना मांडल्या. प्राप्त तक्रारींची तत्काळ नोंद घेऊन संबंधित विभागांना वेळबद्ध कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नागरिकांशी थेट संवाद साधत जिल्हाधिका-यांनी त्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने ऐकूण घेतल्या. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून नागरिकांना पारदर्शक व तातडीची सेवा देण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी दिली निवेदने : जनता दरबारात नागरिकांनी आपापल्या समस्यांची निवेदने जिल्हाधिका-यांना देऊन त्यांना समस्या सांगितल्या. यात तालुक्यातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, महसूल प्रकरणे, शासकीय योजना लाभ, जमीन फेरफार नोंद, आरोग्य सुविधा, शिक्षण व इतर स्थानिक समस्यांचा समावेश होता.

०००००००

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्थेवर परिसंवाद

 



प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्थेवर परिसंवाद

 

चंद्रपूर, दि. 26 : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रोद्योगिकी संस्थान (CIPET), चंद्रपूर यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्था या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात व यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. प्लास्टिकचा योग्य वापर, कचरा निर्मिती कमी करणे, पुनर्वापर वाढविणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती करणे हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता.

 

परिसंवादाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री (रसायने व खते मंत्रालय) हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग संघाचे अध्यक्ष मधुसुदन रुंगटा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात श्री. अहीर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. गुरनुले (प्राध्यापक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), डॉ. सत्यम मिश्रा (प्रकल्प वैज्ञानिक, निरी नागपूर) तसेच डॉ. विजयाकुमार (सह प्राध्यापक, व्हीएनआयटी नागपूर) यांनी प्लास्टिक पुनर्वापर तंत्रज्ञान, कचरा वर्गीकरण पद्धती, अत्याधुनिक प्रक्रिया तंत्रे आणि चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या परिसंवादास सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख  प्रवीण बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी प्लास्टिकचा जबाबदारीने वापर करण्याबरोबरच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेच्या संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले व युवकांनी या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी देवानंद बाबोले यांनीही तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

27 व 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

 

2728 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

 

चंद्रपूर, दि. 26 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा मराठी भाषा समितीद्वारे 2728 फेब्रुवारी रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचलनालय, चंद्रपूर येथे ग्रंथोत्सव तसेच ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते ग्रंथपुजन व ग्रंथदिंडीचे आयोजन, दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या संधी आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार आहे.

दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत वाचन संस्कृतिच्या विकासात सार्वजनकि ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद, दुपारी 3 वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 वाजता समारोपीय कार्यक्रम व आभार प्रदर्शन होईल. ग्रंथविक्री दोन्ही दिवस सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी कळविले आहे.

००००००

 

Tuesday, 24 February 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या तालुका स्तरावरील तक्रारी

 




जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या तालुका स्तरावरील तक्रारी

Ø बल्लारपूर येथे जनता दरबारचे आयोजन

चंद्रपूर, दि. 24 : नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण व्हावे, त्यांच्या समस्या यंत्रणेने जाणून घेऊन, त्या जागच्या जागी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

जनता दरबारमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळणे, अतिक्रमण नियमानुकुल करणे, बळजबरीने केलेले अतिक्रमण मोकळे करणे, मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देणे, जमीन विषयक बाबी, ऑनलाईन ७/१२, मालमत्ता गहाळ केल्याबाबत, मालकी हक्क पट्टे देणे, मोजणी, फेरफार, रस्ता मंजूर करणे अशी एकूण ५० निवेदने स्वीकारण्यात आली.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, मंत्री खासदार व आमदार यांच्याकडून आलेले संदर्भ, शासकीय कार्यालयाने नियमानुसार त्वरित कारवाई करून निकाली काढावे. धोरणात्मक बाबी असेल तर त्वरित वरिष्ठांना कळवावे. 'आपले सरकार सेवा केंद्र' मधील तक्रारी निकाली काढाव्यात. पक्के व कच्चे घरांचे प्रस्ताव त्वरित पाठवावे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ द्यावा.

यापुढे ऍग्रीस्टॅक नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. ई- पिक पाहणी करताना जेवढे क्षेत्र आहे  तेवढेच क्षेत्र पेरामध्ये येणे आवश्यक आहे.  ग्रामपंचायत स्तरावरच सर्व दाखले मिळतील, याबाबत नियोजन करावे. घरकुल मंजूर झाले मात्र अद्यापही बांधकाम सुरू झाले नाही, अशा प्रकरणांचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, न. प. मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.

या विषयांचा झाला आढावा : लोकप्रतिनिधींच्या आलेल्या संदर्भावर त्वरित कार्यवाही करणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, सर्वांसाठी घरे, महाराजस्व अभियान, पांदण रस्ते, अर्धन्यायिक प्रकरणे, वर्ग 2 मधून  1 मध्ये जमीन वर्ग करणे, शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी, ई - पीक पाहणी, विशेष अर्थसहाय्य योजना, झुडपी जंगल, ई - ऑफिस प्रणाली, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन, लखपती दिदी, आयुष्यमान कार्ड वाटप, मातृवंदन योजना, लेक लाडकी, नवीन अंगणवाडी बांधकाम आदी विषयाचा आढावा घेण्यात आला.

000000