Search This Blog

Friday, 12 June 2026

रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जीएमसी मध्ये रक्तदान सप्ताह


रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जीएमसी मध्ये रक्तदान सप्ताह

Ø अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी व जवानांचा सहभाग

Ø नागरिक व सामाजिक संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 : जिल्ह्यातील रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेता स्थानिक कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जरी विभाग, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मार्ड संघटना आणि सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन 2025 मध्ये 15 हजार 258 रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5 हजार 102 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रक्तसंकलन वाढविण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय सर्जन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्जन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सरदेशपांडे, महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. संजय घाटे, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मयुर बंडावर आणि ज्येष्ठ सर्जन डॉ. मंगेश टिपणीस उपस्थित होते.

रक्तदान सप्ताहांतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तकेंद्र प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. स्वाती देरकर, डॉ. मिलिंद झाडे, राकेश शेंडे तसेच मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. मयुर सदवाणी व सचिव डॉ. शोएब शेख यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्वेच्छेने रक्तदान करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास सहकार्य करावे.  शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याने रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

000000

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांचे यश


 

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांचे यश

चंद्रपूर, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अखत्यारित असलेले एक महत्वाचे कार्यालय आहे. शालेय स्तरावर विदयार्थ्यांना मराठी विश्वकोशाची ओळख व्हावी व सामान्य ज्ञान मिळावे, याकरीता इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठयपुस्तकात मराठी विश्वकोशावर आधारित एका पाठाचा समावेश करून मंडळाच्या वतीने इयत्ता नववीमधील विदयार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील विश्वभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विश्वभारती विद्यालयाची ममता कोसारे व सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला तर याच विद्यालयातील वैभव पोहोणकर या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक अजय पवार व सौरव बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट व ३ हजार रुपये रक्कमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, तहसीलदार प्रिया कवळे यांच्यासह शाळेतील शिक्षक अजय पवार, सौरभ बोरकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

000000

महिला सक्षमीकरण मेळाव्यातून शासकीय योजनांची माहिती


 

महिला सक्षमीकरण मेळाव्यातून शासकीय योजनांची माहिती

Ø कोरपना येथे आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजन

चंद्रपूर, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने कोरपना येथील स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळेत विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंअंतर्गत महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. आदिवासी महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर विशेष उपस्थिती म्हणून कोरपनाच्या तहसीलदार पल्लवी आखरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा उद्योग केंद्राच्या निलीमा घरट, उमेदचे मोहित नैताम आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्रकल्प अधिकरी विकास राचेलवार, यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांकरिता आदिवासी विकास विभाग, आदिवासी महिलांचे स्वतंत्र बचत गट उमेद / माविम यांच्या सहकार्याने सुरू करणार असून महिला सक्षमीकरणाकरिता या बचतगटांना आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग यांच्याद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना वित्त पुरवठा करण्यात येईल. तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता विशेष योजना प्रस्तावित करण्यात येतील. विरांगणा राणी दुर्गावती योजनेअंतर्गत नवीन महिला बचतगटांची स्थापना करून आदिवासी विकास विभागातर्फे १०० टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले

यावेळी श्रीमती आखरे यांनी, महसूल विभागातर्फे महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनांची माहिती दिली. तसेच पात्र व गरजू महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भस्मे यांनी वन स्टॉप सेंटर (माझी कन्या / सखी वन स्टॉप सेंटर) योजनेअंतर्गत कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचार पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन आदींबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रतिनिधी घरट यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून, नवीन, सूक्ष्म व लघु उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना विशेष प्राधान्य आणि आर्थिक साहाय्य दिले जाते, याबाबत मार्गदर्शन केले. उमेदचे मोहीत नैताम यांनी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) ही ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय योजना असल्याचे सांगून उमेद अभियानांतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य (उदा. बिनव्याजी कर्ज), मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी मान्यवरांनी  दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ केले. संचालन प्राथमिक शिक्षिका प्रिती कुत्तरमारे यांनी तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार यांनी मानले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले, मुख्याध्यापक भाऊराव खडसे, ज्ञानेश्वर गावंडे, सरिता सोयाम, स्वप्नील उराडे, ऋतीक मडावी, भरत आत्राम, अश्विनी कोरंगे, प्रमोद कोडापे, मनोज तुमडाम, प्रेमदास मेश्राम, रोशन मरापे व सुभाष आत्राम स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

000000

माविमच्या वतीने सिदूर येथे शेवगा लागवड



माविमच्या वतीने सिदूर येथे शेवगा लागवड

चंद्रपूर, दि. १२ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ संलग्नित खुशिया लोकसंचालित साधन केंद्र चंद्रपूरद्वारे सिदूर या गावात दोन एकर क्षेत्रात शेवगा लागवडची सुरुवात करण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत ३ वर्ष शेवगा उत्पादित केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, शेवगा क्लस्टर म्हणून विकसित होण्याचे ध्येय तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, पारंपारिक पिकांव्यतिरीक्त इतर पीक शेतात घेण्याचा उद्देश आहे.

यावेळी महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे,  सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भोयी,  खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे, सिदूरचे उपसरपंच संजय गणफाडे, व्यवस्थापक शारदा हुसे, अंबुजा फाऊंडेशनचे क्षेत्रीय समन्वयक विवेक शेंडे, वैभवी उलामाले, संगिता ढेंगळे, रोशन्ती सागोरे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

तत्पूर्वी गावात ४० महिलांनी जीवामृत दशपर्णी व गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. रासायनिक शेती न करता सेंद्रिय पध्दतीने शेती  करण्याकडे कल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणानंतर गावात मिश्र गट तयार करण्यात आले असून २० कुटुंबानी गट शेती करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या फार्मर क्लबमध्ये सिदूर या गावाचा अत्यंत चांगला सहभाग आहे.

000000

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लस मात्रांचे वाटप

 

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लस मात्रांचे वाटप

चंद्रपूर, दि. १२ : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू झाले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्यात एकूण लस उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सर्व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी, पुरवण्यात आलेली लस क्षेत्रीय स्तरावर वेळेत पोहोचवताना तिची शीत साखळी कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. गोटपॉक्स लस मात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशुंचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. लसीकरणाच्या विहित नमुन्यातील बिनचूक आणि एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत विभागनिहाय संस्थेकडे सादर करावा, अशा सूचनाः पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहया  खान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय  यांना केल्या आहेत.

हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष : गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवावी. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्यात यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे.

पशुधनाच्या सुरक्षितेला प्राधान्य : लंपी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. पशुपालकांनी यासाठी  विभागास सहकार्य करावे, असे आवाहन  आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000000