Search This Blog

Monday, 29 June 2026

सीडीसीसी बँकेच्या 43816 पात्र शेतक-यांची माहिती पोर्टलवर अपलोड

 

सीडीसीसी बँकेच्या 43816 पात्र शेतक-यांची माहिती पोर्टलवर अपलोड

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना - 2026

चंद्रपूर, दि. 29 : आजही शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका या क्षेत्राला बसत आहे. अनियमित पाऊस, पूर, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ हे निसर्गाचे चक्र सुरूच असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व पीक कर्जाची थकीत रक्कम माफ करून खरीप हंगामात पुन्हा पीक कर्ज मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) 43 हजार 816 पात्र शेतक-यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी सांगितले.  

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले एक किंवा अनेक बँकांचे अल्पमुदत पीक कर्ज, 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाच्या रकमेसाठी शासनाच्या वतीने 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यास वरील रक्कम संबंधित शेतक-यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यास उर्वरीत 2 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम राज्य सरकार बँकेत जमा करणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात आहे. या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 43862 खातेदारांपैकी 43816 पात्र खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरीत 46 जणांमध्ये 10 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण नसून 36 जणांच्या माहितीमध्ये तांत्रिक अडचण आहे.

अशी आहे अपलोड झालेल्या तालुकानिहाय पात्र खातेदारांची संख्या : चंद्रपूर तालुका 1122 (पोर्टलवर अपलोड 1122), सिंदेवाही 2410 (अपलोड 2405),  राजुरा 3014 (अपलोड 3014), नागभीड 3859 (अपलोड 3851), भद्रावती 2093 (अपलोड 2092), ब्रम्हपुरी 4672 (अपलोड 4670), चिमूर 5452 (अपलोड 5451), पोंभुर्णा 2189 (अपलोड 2187), मूल 2033 (अपलोड 2033), वरोरा 4084 (अपलोड 4076), कोरपना 5671 (अपलोड 5663), सावली 2802 (अपलोड 2794), गोंडपिपरी 3894 (अपलोड 3891) आणि बल्लारपूर तालुका 567 (अपलोड 567).

शेतकऱ्यांसाठी आवाहन : योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह 'आपले सरकार सेवा केंद्रात' किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल.

००००००

शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी 219 अधिकारी जि.प. शाळांना भेटी देणार

 

शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी 219 अधिकारी जि.प. शाळांना भेटी देणार

Ø विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकांचे वाटप

            चंद्रपूर, दि. 29 : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 30 जून 2026 पासून होणार आहे. पहिला दिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून विदयार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे व आनंद व्दिगुणीत व्हावा, याकरिता शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधी तसेच सर्व अधिकारी नजिकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देवून सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुध्दा  आदिवासी बहूल गावातील शाळांना भेटी देणार आहेत.

जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी आणि राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग-2 वरील एकूण 219 अधिकारी जिल्हा परिषद शाळांना भेटी  देऊन शाळा प्रवेशोत्सव  कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येईल. इयत्ता 1 ली च्या वर्गात प्रवेश घेतलेल्या बालकांचे फुल देवून स्वागत करण्यात येणार आहे.

शाळेत दाखलपात्र प्रत्येक मुलाचा व शाळाबाहय मुलांचा शोध घेवून नियमित शाळेत प्रवेश देणे, विशेषतः प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर सर्व मुली शाळेत दाखल करणे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. प्रवेशोत्सवाचे वेळी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. शिक्षकाव्दारे वर्षभर करावयाच्या कामाचे नियोजन व संकल्प करून 100 टक्के पटनोंदणी, उपस्थिती आणि दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा निर्धार करण्यात येणार आहे, असल्याचे शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.

००००००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील त्रुटी पुर्ततेकरिता मुदतवाढ

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील त्रुटी पुर्ततेकरिता मुदतवाढ

Ø 7 जुलैपर्यंत मुदत, विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द

चंद्रपूर, दि. 29 : सन 2025-26 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज करण्यात आलेल्या परंतु कागदपत्रातील त्रुटीमुळे प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 7 जुलै पर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जातील त्रुटीची पूर्तता केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्रुटीची पूर्तता करून अर्जाची प्रत ऑनलाईन व ऑफलाईन रित्या (कागदपत्रासह) 07 जुलै 2026 पर्यंत सहायक आयुक्त, समाज काल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. जे विद्यार्थी 7 जुलै पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईनरित्या कार्यालयामध्ये सादर करणार नाही, असे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सदर विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.

सदर विद्यार्थ्याची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच या कार्यालयाचे वेबसाईट www.acswchandrapur.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

चिमूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये 30 जून रोजी प्रवेशोत्सव व पालक मेळावा

 

चिमूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये 30 जून रोजी प्रवेशोत्सव व पालक मेळावा

चंद्रपूर, दि. 29 : आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरच्या अधिपत्याखालील शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 च्या प्रारंभानिमित्त 30 जून रोजी प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांभुळघाट, चंदनखेडा, चिंधचक आणि कोसंबी (ग.) येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असून, दहावी व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांसाठी विविध शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना विमान प्रवासासह अभ्यास सहल, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, बोलका वर्ग, जेईई-नीट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण, भारत दर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही पालकांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात बैलबंडी, ढोल-ताशे व बँड पथकासह प्रभातफेरीने होणार असून, शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पेन, पेन्सिल, इतर शैक्षणिक साहित्य तसेच शालेय गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) मच्छिंद्र डुले तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सर्व मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. प्रवेशोत्सव व पालक मेळाव्यास सर्व पालक, ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी केले आहे.

०००००००

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ

 

वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ

Ø मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम

मुंबई / चंद्रपूर, दि. 29 : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चरणसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

चरण सेवेकरिता समन्वय : वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 11 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती व मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी चरण सेवा, वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयातून 12 हजारांहून अधिक प्रशिक्षित डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय व फिजिओथेरपीचे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असतील.

3 हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे मालिश : आषाढी वारीदरम्यान दररोज अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांवर मोठा ताण येतो. पायांना सूज, वेदना, फोड, स्नायूंचा ताण व थकवा यांसारख्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी प्रशिक्षित वैद्यकीय पथके व स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायाची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयांकडे संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 3 हजार लिटर आयुर्वेदिक तेलाची व्यवस्था करण्यात आली असून, गरजेनुसार पालखी मार्गावर रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

8 आरोग्य रथाद्वारे जनजागृती : चरण सेवेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैलीचा संदेश तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन 8 आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून पालखी मार्गावरील वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच, वारकऱ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी पालखी मार्गावरील निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी राबविण्यात आलेल्या 'चरण सेवा' उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या उपक्रमाद्वारे सुमारे 1 लाख 75 हजार वारकऱ्यांना थेट चरण सेवा, वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, तर 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला होता. यंदाही अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत चरण सेवा, वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य जनजागृती प्रभावीपणे  पोहोचविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' : 'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' या संकल्पनेवर आधारित 'चरण सेवा' हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देणारा अभिनव उपक्रम आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सुरक्षित, सुदृढ आणि सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख तसेच पालखी मार्गावरील नागरिकांना 'चरणसेवा' आणि आरोग्य जनजागृती उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

चरणसेवा म्हणजे काय? : संत तुकाराम महाराजांनी "तुज मागणें तें देवा, आम्हां तुझी चरण सेवा" या अभंगातून चरण सेवेचे महत्व अधोरेखित केले आहे. त्याच सेवाभावातून प्रेरणा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'चरण सेवा' उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. आषाढी वारीत अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायावर मोठा ताण येत असल्याने त्यांना औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायाची मालिश, फिजिओथेरपी, आधुनिक मसाज उपकरणांच्या साहाय्याने स्नायूंना आराम, सूज, वेदना व फोडांवर प्राथमिक उपचार तसेच आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना दिलासा देत सेवाभावातून आधार देणारी हीच 'चरणसेवा' होय. संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावाच्या विचारांना आधुनिक वैद्यकीय सुविधांची जोड देत वारकरी परंपरा आणि लोकसेवेचा सुंदर संगम या उपक्रमातून घडविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वातून आणि सेवाभावी दृष्टिकोनातून 'चरण सेवा' उपक्रम साकार झाला आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सुविधांची जोड देणारा हा एक अभिनव उपक्रम असून, आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना दिलासा देतानाच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून होत आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष विविध संस्थांच्या समन्वयातून यंदाही ही चरण सेवा अधिक व्यापक स्वरूपात वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

०००००