Search This Blog

Friday, 19 June 2026

प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी






 

प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची अपर मुख्य सचिवांकडून पाहणी

Ø बेलसणी, भटाळी, उर्जानगर येथील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

Ø नुकसान भरपाईबाबत शास्त्रीय पध्दतीने धोरण निर्माण करण्याची ग्वाही

चंद्रपूर, दि. १९ : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग तसेच कोल वॉशरीजमुळे निघणारी धूळ, हवेतील धुळीचे कण, कोल वॉशरीतून निघणा-या प्रदुषित पाण्याचा मानवी जीवनावर तसेच शेतीव्यवसायावर होणारा परिणाम प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज (दि. १९) चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी बेलसणी, भटाळी, उर्जानगर या प्रदूषण ग्रस्त भागाची पाहणी करून पिडीत शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार विजय पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

शासनामध्ये काम करतांना धोरण, नियम, कायदा असणे महत्वाचे आहे, असे सांगून अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले, प्रदुषणामुळे होणा-या शेतीच्या नुकसानभरपाईबाबत शासनाचे अधिकृत धोरण अथवा कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज चंद्रपूर येथे आलो. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मोठ्या प्रमाणात होणा-या प्रदुषणाचा तसेच शेतीच्या नुकसानभरपाईचा मुद्दा  शासनाकडे मांडला. त्यांच्याच प्रयत्नामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण तयार होत आहे.

उद्योगांच्या प्रदुषणामुळे या क्षेत्रात समस्या नक्कीच आहे, शेतीचे नुकसान होत आहे, ही नुकसानभरपाई कोणी द्यायची, कोणत्या दराने द्यायची, कधीपर्यंत द्यायची, याबाबत शास्त्रीय पध्दतीने निर्णय घेण्यासाठी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) प्रतिनिधींची नियमितपणे बैठक घेण्यात येईल. चर्चा व अभ्यास करून शेतीच्या नुकसानभरपाईबाबत एक निश्चित धोरण तयार करून शासनाला अहवाल सादर केला जाईल. पिडीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ पध्दतीने ही समिती काम करेल, अशी ग्वाही अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी दिली.

उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त : आमदार सुधीर मुनगंटीवार

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या प्रदुषणामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उद्योगांपेक्षा अन्न पिकविणा-या शेतक-यांचे महत्व जास्त आहे. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीच्या नुकसानभरपाई करीता शासनाने समिती गठीत केली आहे. विकास खारगे हे अभ्यासू, निष्ठावंत, संवेदनशील तसेच प्रामाणिक अधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा अनेक वर्षे होत राहील. या अहवालात शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीचे धोरण (एमएसपी) अंतर्भुत असावे. एमएसपी बदलला तर नुकसानभरपाईची रक्कम वाढेल, असे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतीचे नुकसान, गावाचे पुनर्वसन, नोकरीत स्थानिकांना रोजगार, उद्योगासाठी शेतजमिनीचा योग्य भाव, आदी विषयांबाबत माहिती दिली.

 या ठिकाणी दिल्या भेटी : या दौ-यात अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज मुळे होणारे प्रदुषण, भटाळी येथील वेकोलीच्या ओव्हर बर्डनमुळे होणारा पुराचा धोका तसेच उर्जानगर येथील रोप-वे मुळे होणा-या प्रदुषणाची पाहणी केली.

विविध विषयांबाबत आढावा बैठक : श्री. खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाशी संबंधित विषयांवर आढावा बैठक घेतली. यात नवीन गंगापूर (ता. पोंभुर्णा) महसूली दर्जा प्रदान करून संगणीकृत गाव नमुना सातबारा उपलब्ध करून देणे, मौजा पाहमी (ता. चंद्रपूर) हे गाव ग्रामपंचायत निंबाळाला जोडणे, झरी व पेठ ही गावे पिंपळखुट ग्रामपंचायतीला जोडणे, देवाडा व जुनोना ही गावे चंद्रपूर तालुक्यात समाविष्ट करणे या विषयांवर गावक-यांशी व संबंधित अधिका-यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदारद्वय सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

000000

एकल महिला धोरणाबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे अभिप्राय नोंदवावेत - निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार


 

एकल महिला धोरणाबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे अभिप्राय नोंदवावेत - निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार

चंद्रपूर, दि. 19 : राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक नियोजन भवन, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक व विषयतज्ज्ञांनी अत्यंत संवेदनशीलपणे आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार यांनी केले.

पुढे ते म्हणाले, समाजात अनेकदा एकल महिलांना अपेक्षित सन्मान व आधार मिळत नाही. त्यांच्या समस्या, अडचणी आणि भावनिक संघर्ष समजून घेऊन शासनाने तयार करावयाच्या धोरणामध्ये त्यांचे हित जपले जावे. त्यासाठी सर्व घटकांनी सकारात्मक व संवेदनशील दृष्टिकोनातून अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशान्वये तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड. दक्षिणा जुनगरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी दामोधर कुमरे, जिल्हा समन्वयक माविम प्रदीप काठोळे आदींनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी एकल महिला धोरणाची उद्दिष्टे व अपेक्षित अभिप्राय याविषयी सविस्तर माहिती दिली. बैठकीत उपस्थित एकल महिला व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी पुनर्विवाह, रोजगार, कौशल्य विकास, मुलांचे शिक्षण, सामाजिक सुरक्षा व सक्षमीकरण यासंदर्भातील सूचना मांडल्या. त्यावर मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत शासनाच्या प्रस्तावित धोरणामध्ये या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले. या बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००००००

‘नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

 नीटपरिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यातनीट’ (युजी) परीक्षा 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भात उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांने तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

1) रिपोटिंग आणि प्रवेश  : परीक्षा केंद्रांवर प्रवेश सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. अंतिम प्रवेशाची वेळ दुपारी 1.30 आहे. या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

2) अनिवार्य कागदपत्रे : उमेदवारांनी फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र, एक मूळ वैध फोटो ओळखपत्र सोबत आणावे

3) सुरक्षा आणि शिस्त : प्रवेशद्वारावर कडक तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आणि शिस्त पाळणे अनिवार्य आहे. पालकांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.

4) प्रतिबंधित वस्तू / ड्रेस कोड : उमेदवारांना खालील गोष्टी आणण्यास सक्त मनाई आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट वॉच, अभ्यास साहित्य, कागदपत्रे, कॅल्क्युलेटर, बॅग किंवा इतर कोणतीही अनधिकृत वस्तू. तसेच उमेदवारांनी दागिने, अलंकार, घड्याळे किंवा कोणतीही धातूची वस्तू घालू नये. बेल्ट, टोपी किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी नसलेले इतर साहित्य टाळावे. तपासणी सुलभ होण्यासाठी साधे आणि हलके कपडे परिधान करावेत. प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगल्यास परीक्षेच्या नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल

5) सुविधा आणि व्यवस्था : सुरक्षा, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

6) कडक उष्णतेबाबत महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी केंद्रावर येण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा. दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात राहणे टाळावे. उष्णतेमुळे होणारी घाई टाळण्यासाठी केंद्रावर लवकर पोहोचावे. ड्रेस कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हलके आणि आरामदायी कपडे घालावे. केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असेल; तथापि, उमेदवार मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणू शकतात.

7) महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी प्रवेशपत्रावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.

8) पालकांसाठी सूचना : पालकांनी परीक्षा केंद्रांजवळ गर्दी करणे टाळावे. उमेदवार वेळेवर केंद्रावर पोहोचतील याची खात्री करावी. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. सर्व उमेदवार आणि पालकांनी या परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

Thursday, 18 June 2026

जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर – पालकमंत्री डॉ. उईके







 जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर – पालकमंत्री डॉ. उईके

Ø महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान – वित्त राज्यमंत्री ॲङ जयस्वाल

Ø वस्तु व सेवा कर इमारतीचा लोकार्पण सोहळा

चंद्रपूर, दि. १८ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ पासून देशात वस्तु व सेवा कर (जीएसटी) ही एकच करप्रणाली लागू केली आहे. या सुलभ कर पध्दतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडत असून आज चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाच्या उत्तम इमारतीचे लोकार्पण होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

वस्तु व सेवा कर नुतन इमारतीचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर राज्यकर आयुक्त विजय डांगे, राज्यकर सहआयुक्त विनोद गवई आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था भक्कम होत असून आपले राज्य पुढे जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, मात्र मुंबईमध्ये महत्वाच्या बैठका असल्यामुळे राज्य शासनाच्या वतीने मी आणि राज्यमंत्री ॲङ जयस्वाल येथे उपस्थित आहोत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर येथे वस्तु व सेवा कर विभागाची उत्तम इमारत तयार झाली, असेही त्यांनी सांगितले.

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान – वित्त राज्यमंत्री ॲङ जयस्वाल

            चंद्रपूर हा उद्योग, वनसंपदेने नटलेला तसेच आर्थिक संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच सरकारच्या तिजोरीकरीता चांगले उत्पन्न दिले आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्वाचे आहे, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

            पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ‘विकसीत भारत - 2047’ चा रोडमॅप तयार केला असून आपल्या राज्याचे महत्वाचे योगदान राहणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. गडचिरोलीचे उत्पन्न पहिल्या पाच जिल्ह्यात आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. या इमारतीचे उत्कृष्ट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

         प्रास्ताविकात राज्यकर सहआयुक्त विनोद गवई म्हणाले,  सदर इमारत ही चार मजली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 29 कोटी 99 लक्ष 80 हजार रुपये  खर्च झाले आहे. सदर इमारत ही चंद्रपूर विभागाचे मुख्यालय असून या अंतर्गत चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली हे तीन जिल्हे येतात. आर्थिक वर्ष 2025-26 या कालावधीत चंद्रपूर विभागाने सुमारे 1450 कोटी इतका जी.एस.टी.महसूल गोळा केला. लक्षांक पूर्ततेच्या टक्केवारीत 122 टक्के लक्षांक पूर्ती करत चंद्रपूर जिल्ह्याने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

           तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते नुतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच फित कापून सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.

            कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि ऐश्वर्या भालेराव यांनी केले. यावेळी राज्यकर सहआयुक्त संजय पवार, प्रशांत पाटील, संजय सायगण, सहा. राज्यकर आयुक्त तेजराम मडावी, भुषण शहाणे, संतोष हेमणे आदी उपस्थित होते.

००००००००

विषमुक्त शेतीच्या क्षेत्रात सिदूर येथील शेतक-यांनी घडविला आदर्श



विषमुक्त शेतीच्या क्षेत्रात सिदूर येथील शेतक-यांनी घडविला आदर्श

Ø ५४०० लिटर दशपर्ण अर्क व २७ गांडूळ खत बेड्सची निर्मिती

Ø रासायनिक खते व किटकनाशकांना फाटा

चंद्रपूर, दि. १८ : शेतीमध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अतिवापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडत आहे. शिवाय मानवी आरोग्यावरही त्याचे परिणाम जाणवत आहे. त्यामुळे रासायनिक खते आणि किटकनाशकांना फाटा देऊन कमी खर्चात सिदूर येथील शेतक-यांनी विषमुक्त शेतीचा प्रयोग करून एक नवीन आदर्श घडविला आहे. गावातील कृषिरत्न महिला पुरुष शेतकरी गटाने तब्बल ५४०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आणि २७ गांडूळ खत बेड्स तयार करून स्मार्ट शेतीत एक नवे पाऊल टाकले आहे.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेच्या तीन दिवसीय प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन चंद्रपूर तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत काम करणाऱ्या सिदुर गावाने प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून एकत्रितरित्या संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचा विडा उचलला आहे.

 रासायनिक खते आणि कीटकनाशकांना फाटा देण्यासाठी या गटाने सामूहिक कष्टातून तब्बल २०० लीटर क्षमतेचे २७ ड्रम गोळा केले. त्या माध्यमातून ५४०० लीटर 'दशपर्णी अर्क' (नैसर्गिक कीटकनाशक) तयार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार असून विषमुक्त शेतीला मोठी गती मिळणार आहे.  तसेच केवळ कीड नियंत्रणच नव्हे, तर जमिनीची सुपीकता आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी या शेतकरी गटाने २७ गांडूळ खत बेड्स तयार केले आहेत. यामुळे जमिनीला उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत मिळणार आहे.

हा केवळ एका गटापुरता मर्यादित उपक्रम राहिलेला नाही. तर आता 'कृषिरत्न' गटातील सर्व महिला व पुरुष शेतकरी, संपूर्ण सिदुर गावात रासायनिक शेती सोडून दशपर्णी अर्क आणि गांडूळ खताचा वापर करण्यासाठी जनजागृती करत आहेत. जे शेतकरी दशपर्णी अर्क वापरणार आहेत, अशा शेतकऱ्यांना मोफत दशपर्णी अर्क देण्याचा संकल्प गटाने केला आहे. एकजुटीच्या बळावर सिदुर गावातील शेतकरी गटाने घडवलेला हा इतिहास इतर गावासांठी एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.

000000