Search This Blog

Sunday, 16 August 2026

चिमूर क्रांती दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन







 चिमूर क्रांती दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

Ø डाक विभागाच्या ‘चिमूर क्रांती शौर्यगाथा’ कव्हरचे अनावरण

चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्रांतिभूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी 16 ऑगस्ट हा चिमूर क्रांती दिन /शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. या अनुषंगाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज (दि. 16) चिमूर येथे शहीद स्मारकाला अभिवादन करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, चिमूरचे अपर जिल्हाधिकारी संतोष थिटे, भिसीच्या अप्पर तहसीलदार नीलिमा रंगारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

महात्मा गांधींनी 1942 मध्ये दिलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेनंतर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने चिमूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन तीव्र झाले. 16 ऑगस्ट 1942 रोजी चिमूर येथे स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोर्चा काढला. ब्रिटिश पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार व गोळीबार केला. या संघर्षात अवघ्या 16 वर्षांचे बालाजी रायपूरकर हुतात्मा झाले. चिमूरच्या क्रांतीने स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चिमूरने ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत स्वतःला ब्रिटिश राजवटीतून मुक्त केले.

चिमूरची क्रांती ही केवळ इतिहासातील घटना नसून स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिवीरांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे, असे यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.

‘चिमूर क्रांती शौर्यगाथा’ कव्हर पुस्तिकेचे अनावरण : 16 ऑगस्ट चिमूर क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय डाक विभागातर्फे ‘चिमूर क्रांती शौर्यगाथा’ या कव्हरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर डाक विभागाचे अधीक्षक एस. रामाकृष्णा, प्रवर डाकपाल व्ही.पी. भोगे, नागपूर येथील डाक विभागाच्या तृप्ती कापसे, अमोल बावणे, नितीन छापागरे, अमोल भगत, अमन कुमार, ललित बोरकर आदी उपस्थित होते.

000000

पोलिसांचा नागरिकांना दिलासा ; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द





 पोलिसांचा नागरिकांना दिलासा ; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द

Ø पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 कोटी 75 लक्ष रुपयांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण

चंद्रपूर, दि. 16 : एकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असते. आपली वस्तू कायमचीच गेली, असाच नागरिकांचा दृढ विश्वास असतो, मात्र याला छेद देत, चोरी गेलेल्या वस्तू तत्परतेने शोधून काढून चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. एकाच दिवशी तब्बल 3 कोटी 75 लक्ष रुपयाचा मुद्देमाल नागरिकांना परत करून चंद्रपूर पोलिसांनी एक आदर्श घडविला आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, चंद्रपूर शहराच्या महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार,  सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसूमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आदी उपस्थित होते.

विविध घटनांमध्ये चोरी गेलेला तब्बल 3 कोटी 75 लक्ष रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी संबंधित मालकास परत केला. यात 73 लक्ष रुपयाचे 491 मोबाईल, 245 नागरिकांचे 7 लाख रुपये थेट बँक खाते जमा, दोन ट्रक, मोटर वाहने,  दागिने आदींचा समावेश होता.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले,  चोरी गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकास सन्मानाने परत मिळाला, हा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दर्शवितो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिसांनी नागरिकांना आपल्या उत्कृष्ट कार्यातून दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अतिशय चांगले काम करत आहे

चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत अनेक कुटुंबांच्या मनात शंकाकुशंका राहतात. अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोलिसांच्या विश्वासाची गरज आहे. चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे. गुन्हा हा काही काळ लपविला जाऊ शकतो, मात्र कायद्यानुसार पूर्णवेळ त्यावर पांघरून घालता येत नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी लोकांनी यांनी जिल्ह्याला चांगली ओळख निर्माण करून दिली. भविष्यात आणखी चांगले काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

मुद्देमाल परत मिळालेले लाभार्थी  : विनोद खांडरे, अनिल बांगडे, अजय दासलवार, सुधीर जयपुरकर, मनोज वैरागडे यांना मोटर वाहने परत मिळाली. सुभाष बारधमवार, राजवीर सिंग धनवाल, रंजना कुडकेलवार, मोहम्मद खान यांना सोन्या-चांदीचे दागिने,   गिरीश साठनिया,  एडवोकेट मुरलीधर अवघडे, आलेबाला संदीप, अजय यादव यांना नगदी रक्कम तर सिंधू बिरेवाल, इना निषाद, निलेश वरभे यांना मोबाईल परत मिळाले.

पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा सन्मान : यावेळी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि प्रदीप पुल्लरवार यांचा तसेच अनिल आत्राम, वीरेंद्र यादव या पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुरक्षा मंत्र या पुस्तकाचे  मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी तर आभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी मानले.

00000000000

पालकमंत्री व वरिष्ठ अधिका-यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंगत









 

पालकमंत्री व वरिष्ठ अधिका-यांची आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पंगत

Ø विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून घेतला भोजनाचा आस्वाद;

Ø मनमोकळ्या संवादातून जाणून घेतल्या अपेक्षा

Ø विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी’ – पालकमंत्री

चंद्रपूर, दि. 16 : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद, त्यांच्या हस्ते स्वागत आणि त्यांच्यासोबत जमिनीवर पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद, अशा आपुलकीच्या वातावरणामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने आणि जिवतीच्या तहसीलदार रूपाली मोगरकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि पाटणचे सरपंच सिताराम मडावी यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद : या शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे, असे सांगत पालकमंत्री डॉ. उईके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, या विश्वासाने आई -वडील त्यांना आश्रमशाळेत पाठवतात. त्यामुळे आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, वॉर्डन आणि इतर कर्मचाऱ्यांवर विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ही एकमेकांशी जोडलेली साखळी आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत नियमित संपर्क ठेवावा. विद्यार्थ्यांनीही आतापासूनच आपल्या भविष्याचा संकल्प करून ध्येय निश्चित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे महिन्यातून एकदा मार्गदर्शन : आश्रमशाळेतील इयत्ता 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी, यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी केली.

या आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत वरिष्ठ पदांवर पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही शाळेत आमंत्रित करावे. त्यांच्या अनुभवाचा आणि यशस्वी वाटचालीचा फायदा सध्याच्या विद्यार्थ्यांना व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आहेत म्हणून आपली नोकरी आहे : शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. उईके यांनी विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. विद्यार्थी आहेत म्हणून आश्रमशाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक, वॉर्डन आणि इतर कर्मचाऱ्यांची नोकरी आहे. या विद्यार्थ्यांमुळे आपल्याला पगार मिळतो, याची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने घडवा. आपल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊ शकलो नाही, अशी खंत आयुष्यभर राहता कामा नये. उलट विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगले करता आले, त्यांचे भविष्य घडविण्यात आपलाही वाटा आहे, याचे समाधान शिक्षकांना निरंतर मिळाले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.

इथे आले म्हणून आज मंत्र्यांशी बोलता आले : विद्यार्थीनीचे मनोगत

कार्यक्रमात इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी अंतकला कोठुडे हिने व्यक्त केलेले मनोगत लक्षवेधी ठरले. पालकमंत्र्यांशी संवाद साधताना ती म्हणाली, मी घरी राहिले असते तर कदाचित मला शिकायला मिळाले नसते. आश्रमशाळेत आले म्हणून आज तुमच्यासोबत बोलता आले. मंत्री महोदयांसोबत संपूर्ण प्रशासन आज आमच्या शाळेत आले, याचा आम्हाला खूप आनंद झाला.

जेवण कसे मिळते? शिक्षक नियमित आहेत का? : पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न थेट विचारले. शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक आश्रमशाळेत राहतात का, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते का, जेवण कसे मिळते, कोणत्या विषयांचे शिक्षक उपलब्ध नाहीत, अशा विविध प्रश्नांद्वारे त्यांनी शाळेतील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतील व्यवस्थेबाबत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

ई-लायब्ररीचे उद्घाटन; लॅबची पाहणी : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आश्रमशाळेतील ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅब आणि मॅथ्स लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सोयी-सुविधांची माहिती घेतली. आश्रमशाळेतील व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सूर्यकांत पुणेकर यांनी केले. यावेळी मोठ्यासंख्येने विद्यार्थी, गावकरी व त्यांचे पालक उपस्थित होते.

000000000

दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर


 

दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर

Ø डोंगर-दऱ्या, निसरडी वाट अन् भाषेचा अडसर पार करत आरोग्य पोहचले गावात

Ø दुभाषकाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा गरोदर मातेशी संवाद

चंद्रपूर, दि. 16 : डोंगराच्या कुशीत वसलेले गाव... गावापर्यंत वाहन पोहोचू शकेल, असा रस्ता नाही... पावसाळ्यात अधिकच जीवघेणी होणारी दगड-गोट्यांची वाट... मराठी भाषेचा अडसर आणि त्यात अतिजोखीम गरोदरपण. अशा अनेक अडचणींनी वेढलेल्या जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी (वरची) येथील गरोदर मातेपर्यंत आरोग्य पथक पोहोचले आणि तिचा विश्वास संपादन करून तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल केले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) या महिलेची आयुष्मान भारत केंद्र, पाटण येथे भेट घेतली. तसेच दुभाषकाच्या माध्यमातून संवाद साधून महिलेच्या तब्बेतीची विचारपूस केली.

घोडणकप्पी हे पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे 20 किलोमीटर, तर नंदप्पा उपकेंद्रापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी गाव. येथे प्रामुख्याने आदिम कोलाम समाजाचे वास्तव्य आहे. गावाकडे जाणाऱ्या मार्गातील सुमारे 800 मीटरची डोंगराळ, दगड-गोट्यांची बिकट वाट वाहनांसाठी अडथळा ठरते. पावसाळ्यात ही वाट आणखी निसरडी आणि धोकादायक होते. त्यात भाषेची अडचण असल्याने काही मातांच्या मनात आरोग्य तपासणी व रुग्णालयाबाबत भीती असते.

एका दुर्घटनेने वाढवली होती चिंता : याच गावात 14 जून 2026 रोजी दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या संगीता तुळशीराम गेडाम यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डोंगर उतरवित असताना अतिरक्तस्रावाने वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर घोडणकप्पी येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांचे पाचवे गरोदरपण असल्याने त्यांची अतिजोखीम गरोदर माता म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या गरोदरपणातील वैद्यकीय इतिहास लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रसूतीपूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यांचा रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन (10.7 ग्रॅम) तसेच दोन सोनोग्राफी तपासण्या सामान्य असल्या तरी, सोनोग्राफीनुसार 25 ऑगस्ट 2026, तर मासिक पाळीच्या नोंदीनुसार 8 सप्टेंबर 2026 ही संभाव्य प्रसूती तारीख आहे.

आरोग्य पथक थेट पोहोचले मातेच्या घरी : डोंगराळ भूप्रदेश, पावसाळ्यातील निसरडी वाट, वाहनांची अनुपलब्धता आणि प्रसूतीच्या वेळी डोंगर उतरविताना निर्माण होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन 10 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणचे पथक घोडणकप्पी येथे पोहोचले. आव्हान केवळ डोंगराचे नव्हते. इंदिराबाईंना मराठी भाषा समजण्यात अडचण असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक होते. अशा वेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माता सखी’ने द्विभाषिक दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. माता सखीने इंदिराबाई आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या परिचित भाषेत संवाद साधत संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व समजावून सांगितले.

बुडीत मजुरी आणि मुलांची चिंता करू नका...’ : पालकमंत्री डॉ. उईके

गरोदर मातेच्या मनातील चिंता केवळ स्वतःच्या आरोग्याची नव्हती. रुग्णालयात गेल्यानंतर घरी असलेल्या मुलांचे काय, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होणार आणि पतीची रोजंदारी बुडाल्यास कुटुंब कसे चालणार, अशा व्यावहारिक प्रश्नांमुळेही कुटुंब साशंक होते. ही अडचण लक्षात घेत काल (दि.15) पालकमंत्री डॉ. उईके यांनी या कुटुंकाला दिलासा दिला. प्रसुती होईपर्यंत मातेच्या रुग्णालयातील वास्तव्यात तिच्या मुलांसाठी पाटण येथील आश्रमशाळेत एका खोलीची, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्याचे तसेच पतीच्या बुडणाऱ्या मजुरीबाबतही मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, पाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता महेश शर्मा, डॉ. छाया शेडमाके, स्टाफ नर्स सुषमा शिरभये, अनुसया येमले, पल्लवी फुलझेले, सुपरवायझर यशोदा राठोड आदी उपस्थित होते.

जिवती -घोडनकप्पी रस्त्यासाठी प्रशासनाचा पुढाकार : घोडनकप्पी हे गाव मौजा कोलमगुडा परिसरास जोडलेले असून, सदर गावास जाण्यासाठी घोडनकप्पी पोचमार्ग हा रस्ता अस्तित्वात आहे. सदर रस्ता वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातून जात असल्याने, रस्त्याच्या विकासासाठी संबंधित वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. घोडनकप्पी हे कोलमगुडा गावाच्या डोंगराच्या खालच्या बाजूस वसलेले आहे. सदर भागामध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने, केवळ डांबरीकरण केल्यास रस्त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भौगोलिक व पर्जन्यमानाच्या परिस्थितीचा विचार करून, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता प्रस्तावित असून 52.97 लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

०००००००

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वाटेवर - पालकमंत्री डॉ. अशोक उईके









 

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वाटेवर -  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम उत्साहात

Ø जलसंधारण सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.15 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी महिला व पुरुष आणि  तरुणांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, सुधाकर अडबाले यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती येाजनेचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील 23 हजार 508 शेतक-यांच्या कर्जखात्यात 175 कोटी प्राप्त झाले आहे. महिलांना शेतक-याचा दर्जा देण्याचे विधेयक शासनाने पावसाळी अधिवेशनात पारीत केले आहे. त्यामुळे आता महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 6 हजार 20 पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्ह्यात भुमी अभिलेख विभागातर्फे स्वामित्व योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 70 हजार 980 नागरिकांना सनद उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 1 हजार 203 गावांचे मूळ गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून 2 लक्ष 12 हजार मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा - 2 अंतर्गत 17 हजार 755 घरकुल पूर्ण तर जनमन अंतर्गत 235 घरकुल पूर्ण झाले आहे. राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, पारधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, मोदी आावास, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना अंतर्गत एकूण 51 हजार 378 घरकुल पूर्ण झाली आहेत. सन 2026-27 साठी चंद्रपूर जिल्ह्याचे वार्षिक पत उद्दिष्ट 10 हजार कोटी आहे. पहिल्या तिमाहीतच 4 हजार 836 कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी 994 कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

पाणलोट विकास व शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचा आजपासून शुभारंभ झाला, असे घोषित करून या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मृद व जलसंधारण सप्ताह निमित्त लोगोचा शुभारंभ करण्यात आला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार : अवयव दान केलेले संजय खाटीक, बबन आंबेकर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सहाय्यक परिचारिका उज्वला सोयाम, वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग, विवेक मसराम, राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार प्राप्त अरुण केदार, लीलाराम पिदुरकर, तुळशीराम मोरे, हरिश्चंद्र कोडापे यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात यशस्वी कामगिरी करणारे सोमाक्षी गुंडावार, वृद्धी राठी, सुमिरन सहारे, संघवी हेडावू यांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

००००००