Search This Blog

Monday, 24 August 2026

एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास


 एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास

Ø दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

Ø पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित प्रसूती

चंद्रपूर, दि. 24 : दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे एका मातेचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास सुखरूप पूर्ण झाला. दुर्गम घोडणकप्पी  येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांनी 23 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरोदर मातांपर्यंत नियमित आरोग्यसेवा पोहोचविणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असते. घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावातही आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईंच्या गर्भावस्थेच्या सुरुवातीपासून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. घरी जाऊन नियमित तपासण्या, रक्तवाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स, गोळ्या आणि औषधोपचार देत त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

इंदिराबाईंची ही पाचवी गर्भधारणा असल्याने प्रसूतीदरम्यान संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक दक्षता आवश्यक होती. आई आणि बाळ दोघांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना 10 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथकाने त्यांची नियमित देखरेख सुरू ठेवली. पुढील तपासण्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आणि डॉ. स्नेहल कासारे यांच्या मार्गदर्शनात हृदयाची ECHO आणि ECG तपासणीही करण्यात आली.

पंधरा दिवसांची काळजी अन् विश्वासाची साथ

गरोदर मातेला जवळपास पंधरा दिवस आरोग्य संस्थेत ठेवणे हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नव्हते. तिची मानसिक तयारी करणे, तिचा विश्वास संपादन करणे आणि प्रत्येक टप्प्यावर आपुलकीने आधार देणे तितकेच महत्त्वाचे होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संयम आणि संवेदनशीलतेने ही जबाबदारी पार पाडली.

या प्रयत्नांमध्ये इंदिराबाईंच्या कुटुंबीयांची भूमिकाही मोलाची ठरली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत उपचार आणि रुग्णालयातील वास्तव्यासाठी पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय देखरेख कोणत्याही खंडाशिवाय सुरू ठेवता आली. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे इंदिराबाईंची सुरक्षित प्रसूती झाली. त्यांच्या कुशीत 3.1 किलो वजनाची सुदृढ चिमुकली आली. आई आणि बाळ सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटले. ही केवळ प्रसूती नाही, सामूहिक प्रयत्नांचा विजय

इंदिराबाईंची कहाणी ही एका मातेच्या सुरक्षित प्रसूतीपुरती मर्यादित नाही. आरोग्य कर्मचारी, माता, कुटुंब आणि गावकरी यांच्यात विश्वास व समन्वय असेल, तर दुर्गम भागातील आव्हानांवरही मात करता येते, याचे हे उदाहरण आहे.

प्रत्येक गरोदर मातेने वेळेवर तपासणी करून घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि जोखीम आढळल्यास प्रसूतीपूर्वीच आरोग्य संस्थेत दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि गावानेही गरोदर मातेला आवश्यक सहकार्य केल्यास माता व बालमृत्यूचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.

आरोग्यसेवा देणारे आणि आरोग्यसेवा घेणारे यांच्यात विश्वास आणि सहकार्याची साखळी मजबूत झाली, तर दुर्गम भागातील प्रत्येक मातेला सुरक्षित मातृत्वाची संधी देता येऊ शकते. घोडणकप्पी ते पाटण असा इंदिराबाईंचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास याच विश्वासाचे प्रतीक ठरला आहे.

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसह  अधिकाऱ्यांनी घेतली होती इंदिराबाईची भेट : 15 ऑगस्ट रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासह जिल्हाधिकारी वसूमना पंत , मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इंदिराबाईची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. तसेच इंदिराबाईच्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

००००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा


 मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा

Ø पहिल्याच करारातून 89.60 लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.

प्रतिक्रिया :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

०००००००

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

 


चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

Ø ICMR पडोली येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट व प्रीनेटल डायग्नोसिस सुविधा सुरू

Ø ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तपासणी, निदान, समुपदेशन आणि उपचारासाठी होणार मोठा फायदा

चंद्रपूर, दि. 24 : सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ICMR, पडोली येथे सिकल सेल डिसीज (SCD) आणि थालेसेमिया रुग्णांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट (CCU) आणि प्रीनेटल डायग्नोसिस (PND) या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांचा शुभारंभ करण्यात आला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्यसेवांचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधांमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांना आवश्यक तपासणी, निदान, वैद्यकीय सल्ला, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी अधिक सुलभ आणि समन्वित सेवा उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमुख/प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या माजी अध्यक्ष तथा सिकलसेल निर्मूलन कार्यगटाच्या अध्यक्ष डॉ. दिप्ती जैन, ICMR संचालक डॉ. मनिषा मदकाईकर, ICMR-NIRBID चे सायंटिस्ट प्रभाकर केदर, गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा परिषद चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते आणि जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चत्रेश्वर यांच्यासह संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्यसेवा

सिकलसेल व थालेसेमिया या अनुवंशिक रक्तविकारांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नियमित तपासणी, आजाराचे सातत्याने निरीक्षण, तज्ज्ञांचा सल्ला, योग्य उपचार आणि समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. ICMR, पडोली येथे सुरू झालेल्या नव्या सुविधांमुळे या सर्व बाबींसाठी रुग्णांना अधिक सुलभ आणि नियमित आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.

विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांसाठी या सुविधा दिलासादायक ठरणार आहेत. रुग्णांची वेळेवर तपासणी, आजाराच्या स्थितीचे नियमित निरीक्षण, आवश्यक निदान चाचण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.

प्रीनेटल डायग्नोसिसमुळे प्रतिबंधात्मक प्रयत्नांना बळ

प्रीनेटल डायग्नोसिस (PND) सुविधा सुरू झाल्याने सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांच्या संदर्भात आवश्यक वैद्यकीय निदान आणि तज्ज्ञ समुपदेशनाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि कुटुंबांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल व थालेसेमिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग, ICMR आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधा अनुवंशिक रक्तविकारांच्या सर्वसमावेशक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक पाऊल ठरणार आहेत.

जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा. तसेच सिकलसेल व थालेसेमियाबाबत नियमित तपासणी करून घ्यावी आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

Friday, 21 August 2026

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत



 

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा  – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø गणेश मंडळांना वेळेत परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा

Ø स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर

Ø सोशल मीडियावर सायबर टीमची 24x7 नजर; लेझर लाईटला पूर्णपणे बंदी

चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे. आगामी ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा, गणेशोत्सव आदी सण-उत्सव सर्वांनी परस्पर सहकार्य, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत. तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे शुक्रवारी (दि.21) आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, मनपाचे उपायुक्त संजय चिद्रावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समिती व दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात गणेश मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू असणार आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदांनीही अशी व्यवस्था सुरू करून गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या वेळेत द्याव्यात. ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत.

गणेशोत्सव काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि गणेश मंडळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. निर्माल्य आणि इतर कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम विसर्जन टँकची माहिती नागरिकांना आधीच उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडळांनी किमान दोन सीसीटीव्ही लावावेत – पोलिस अधीक्षक आयुष नोपानी

जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले की, कोणताही कार्यक्रम पूर्व परवानगीशिवाय आयोजित करू नये. मंडप किंवा होर्डिंग उभारताना सार्वजनिक जागा व्यापली जाणार नाही, तसेच नागरिक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर रोखण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावे. मूर्तीचे विडंबन होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून समाजकंटकांना ओळखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा हद्दीत घोषित करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये ध्वनी प्रदूषण खपवून घेतले जाणार नाही. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनी संबंधित नगर परिषदांशी समन्वय साधून तालुका स्तरावर सायलेंट झोन निश्चित करावेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर टीम 24x7 कार्यरत आहे. लेझर लाईटच्या वापराला पूर्णपणे बंदी असून उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नोपानी यांनी केले.

नागरिकांनी मांडल्या सुचना : बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. विसर्जनाची योग्य व्यवस्था करणे, भूमिगत गटारांच्या कामामुळे रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊ न देणे, डीजेचा वापर टाळणे, गावपातळीवर चोख बंदोबस्त ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवणे व त्या पसरू न देणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे, पीओपीच्या मूर्ती टाळणे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा असामाजिक तत्त्वांची माहिती तातडीने पोलिसांना देणे, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करणे आणि सण-उत्सवांच्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत राहील याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, आदी सूचनांचा यात समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम गव्हाणे यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी केले, तर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आभार मानले.

०००००

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

Ø 28 ते 30 ऑगस्टदरम्यान क्रीडा व तंदुरुस्तीविषयक कार्यक्रम

Ø खेलेगा भारत, जितेगा भारत संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 21 : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. क्रीडा ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे. याच व्यापक उद्देशाने सन २०२६ मध्ये खेलेगा भारत, जितेगा भारत या थीमवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 28 ते 30 ऑगस्ट 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत विविध क्रीडा, तंदुरुस्ती, जनजागृती आणि लोकसहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, युवक मंडळे, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

पहिला दिवस – क्रीडा नायकांचा गौरव : 28 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात यावी. विविध प्रोत्साहनात्मक खेळ, क्रीडा आव्हाने, भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव, राष्ट्रीय व स्थानिक क्रीडा नायकांच्या प्रेरणादायी कामगिरीची माहिती देणे आदी उपक्रम आयोजित करता येतील.

दुसरा दिवस – ‘एक घंटा खेल के मैदान में’ : 29 ऑगस्ट रोजी  एक घंटा खेल के मैदान में, एक वर्ग, एक खेळ, शिक्षक विरुद्ध विद्यार्थी मैत्रीपूर्ण सामने, क्रीडा आव्हाने, पारंपरिक व देशी खेळ तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव यासारख्या उपक्रमांचे आयोजन करता येईल. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी क्रीडा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवावा.

तिसरा दिवस – सायकलिंग, पदयात्रा आणि धावणे : 30 ऑगस्ट रोजी सामूहिक क्रीडा शपथ घेऊन ‘सायकल ऑन संडे’, पदयात्रा, धावणे व रॅली यासारखे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्थानिक खेळाडू, क्रीडापटू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहर, शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा संघटना तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आपल्या स्तरावर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करून क्रीडा संस्कृतीचा विस्तार आणि निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

०००००००