Search This Blog

Monday, 17 August 2026

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया


 

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हाजलदूत बनून पाण्यासाठी चालूया

·         जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात जलसंधारण दिनसाजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

 

जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे  फडणवीस यांनी सांगितले.

 

जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

 

चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवाया मूलमंत्राला जगवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

0000

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

 


महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

Ø २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

चंद्रपूर, दि. 17 : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत. सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी,जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआरभागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

००००००

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरी


 

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरी

चंद्रपूर, दि. 17 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामान्य रुग्णालय येथे विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीची शपथ घेत प्रभातफेरी काढली.

          सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री कापसे गावंडे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती गावंडे यांनी, युवकांनी एचआयव्ही/एड्सबाबत अचूक माहिती आत्मसात करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भास्कर सोनारकर यांनी युवकांच्या सहभागातून जनजागृतीची मशाल पेटली, तर एचआयव्ही विषयीचा गैरसमज दूर करून प्रतिबंधाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविता येईल, असे सांगितले.

        कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी एचआयव्ही/एड्स विषयक शपथ घेतली. त्यानंतर सामान्य रुग्णालय येथून प्रभातफेरीला सुरुवात करण्यात आली. प्रभातफेरी जटपुरा गेट मार्गे वळण घेऊन आझाद बगीचा मार्गे पुन्हा सामान्य रुग्णालय येथे पोहोचली. यावेळी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, तपासणी आणि जनजागृतीविषयक संदेश देण्यात आले.

               कार्यक्रमास प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. देवेंद्र बोरकुटे, निखिल खंडारे, परिचारिका माया आत्राम उज्वला सोयाम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, निरंजन मंगरूळकर यांच्यासह विद्यार्थी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमास एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, एआरटी केंद्र, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, संबोधन ट्रस्ट, विहान संस्था, प्लॅन इंडिया संस्था, शासकीय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज आणि सुशीलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय यांनी सहकार्य केले.            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुमंत पानगंटीवार यांनी केले.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्ग तीन दिवसीय प्रशिक्षण : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय सुविधा केंद्रात व हस्तक्षेप लक्षगट प्रकल्पामध्ये कार्यरत समुपदेशकांचे प्रशिक्षण 17 ते 19 ऑगस्टपर्यंत वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात, समुपदेशन कला, प्रिटेस्ट समुपदेशन, पोस्ट टेस्ट समुपदेशन, समुपदेशनाच्या नवीन पद्धती शिकविण्यात येतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. बंडू रामटेके, डॉ सुनील भोकरे, सहसंचालक डॉ. राहुल जाधव, प्रसाद संत, हेमंत भोसले, रतन गाढवे, सचिन जाधव, निरंजन मंगरूळकर, नासिमा शेख, देवेंद्र लांजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमंत पानगंटीवार यांनी केले.

००००००

परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा

 

परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा

Ø जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश

चंद्रपूर दि. 17 : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभिर्याने दखल घेऊन सर्व जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 17) यंत्रणांचा आढावा घेऊन आपापल्या परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या गावात, तालुक्यात आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, व्हीजेएनटीच्या शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा आहेत, तेथे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींनी नियमित भेट देऊन अधिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संपर्कात राहावे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफचे मोबाईल क्रमांक आश्रमशाळेतील कर्मचा-यांजवळ असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महसूल यंत्रणेच्या अधिकारी – कर्मचा-यांचेही मोबाईल क्रमांक आश्रमशाळेत देऊन ठेवावे.

आश्रमशाळेच्या परिसरातील वाढलेले गवत, झुडपे नियमितपणे काढावे. जेणेकरून साप, विंचू आदींपासून कोणताही धोका राहणार नाही. झाडे, झुडपे असलेल्या भागात तसेच संरक्षण भिंतीलगत थिमेटचा वापर करावा. त्याची दिनांकनिहाय नोंद ठेवावी. वर्गखोल्या आणि विद्यार्थी असेलेल्या खोल्यांच्या दरवाजाखाली  रबर स्टिक लावून घ्यावी. परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार उपस्थित होते.

००००००

आरोग्य केंद्रातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्या






 

आरोग्य केंद्रातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्या

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते पाटाळा व डोंगरगाव येथील उपकेंद्राचे लोकार्पण

Ø उपचार, शस्त्रक्रिया आदींची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश

चंद्रपूर दि. 17 : आरोग्य ही नागरिकांची प्राथमिकता आहे. गावखेड्यातील गरीब नागरिक आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उपचारासाठी येत असतात. त्यांच्या आरोग्याची योग्यप्रकारे तपासणी करून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाताळा (ता. भद्रावती) आणि डोंगरगाव (ता. वरोरा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेल्या वास्तुचे आज लोकार्पण होत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याची काळजी, निगा आणि दक्षता घेणे आपले कर्तव्य आहे. केवळ आजारी पडल्यावरच नाही तर नियमितपणे आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसाळ्यात कोणकोणते आजार होऊ शकतात, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्याची चळवळ निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा. आपले गाव ‘आरोग्य संपन्न’ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करवे. तसेच वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून लोकांच्या दारापर्यंत आपली सेवा द्यावी.

आपल्या आरोग्य केंद्रात रोजची ओपीडी किती, महिन्याभरात प्रसुती किती, औषधांची उपलब्धता, कोणता कर्मचारी रजेवर आहे, आदींची दैनंदिन नोंद ठेवावी. नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. डॉक्टर आणि कर्मचा-यांनी आरोग्य केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. औषधी नाही, अशी तक्रार येता कामा नये. औषधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिली.

सुरवातीला फित कापून उपकेंद्राचे लोकार्पण झाल्यावर त्यांनी नोंदणी कक्ष तथा प्रतिक्षालय, तपासणी कक्ष, महिला आंतररुग्ण कक्ष, औषध साठा गृह, प्रसुती कक्ष आदींची पाहणी केली.

आरोग्य विषयक योजनांची माहिती दर्शनी भागात लावा : प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासनाने, नामांकित रुग्णालयात मोफत / अतिशय अल्प दरात उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या पॅनलवर असलेल्या रुग्णालयांची यादी, संपर्क क्रमांक, लागणारे आवश्यक कागदपत्र आदींची माहिती आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात लावावी. उपचारापासून कोणीही वंचित राहता कामा नये. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबतही नागरिकांना अवगत करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

पाताळा येथील आरोग्य उपकेंद्र : 82 लक्ष 52 हजार रुपये खर्च करून पाताळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोण, कावडी या गावातील जवळपास 5500 नागरिकांना 13 प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला पाताळाचे सरपंच विजेंद्र वानखेडे, भद्रावतीचे प्रभारी तहसीलदार मधूकर काळे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर आदी उपस्थित होते.

डोंगरगाव येथील आरोग्य उपकेंद्र :  डोंगरगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 54 लक्ष 62 हजार रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे. या उपकेंद्रांतर्गत डोंगरगाव, खापरी, टाकळी, निमसडा आदी गावातील 2700 नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ होणार आहे. कार्यक्रमाला वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, गटविकास अधिकारी श्री. शेंडे, माजी सरपंच इंदू खिरटकर आदी उपस्थित होते.

००००००