Search This Blog

Friday, 4 September 2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज

Ø देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही सहभागी होण्याची संधी

Ø तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके

चंद्रपूर, दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य महोत्सवांतर्गत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षापासून ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात उत्साहपूर्ण वातावरणात तसेच विविध विधायक व समाजोपयोगी उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यावर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

 देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांसाठी स्वतंत्र तीन पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे आणि तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके जिंकण्याची संधी साधावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष शं. कुमरे यांनी केले आहे.

00000000

Wednesday, 2 September 2026

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करा

 

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करा

Ø सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

Ø हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश

मुंबई, चंद्रपूर/  दि. 2 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती प्रशांत खेडेकर, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. खेडेकर यांनी नमूद केले.

23 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर, 2026 पासून विविध 10 केंद्रांवर तर 65 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर, 2026 पासून आयोजित करण्यात येणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. प्रशांत खेडेकर, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

000000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार

Ø  चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 : सन 2026 च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 17 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या अथवा पूर्तता करू शकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. इच्छुक मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे mahotsav.pida@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

स्पर्धेचे निकष, नियम व इतर सविस्तर माहितीसाठी संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्याचे सादरीकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

चंद्रपूर जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत


चंद्रपूर जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

Ø  पक्षकार व नागरिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपसी समझोत्याद्वारे प्रकरणे निकाली काढण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अभय लाहोटी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

आपसी समझोत्याने प्रकरणांचा त्वरित निपटारा

झटपट निकाल हे लोक अदालतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आपसी समझोता आणि सर्वसंमतीने त्वरित निकाली काढता येतात. लोक अदालतीमध्ये झालेल्या निर्णयाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याइतकेच महत्त्व असून त्याची अंमलबजावणी ही करता येते.

लोक अदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. वादांचा सामंजस्याने कायमस्वरूपी निपटारा होतो आणि भविष्यातील वाद टाळण्यास मदत होते. विशेष म्हणजे या कार्यवाहीसाठी स्वतंत्र शुल्काचा खर्च करावा लागत नाही.

विविध प्रकारची प्रकरणे ठेवता येणार

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपातील तडजोडयोग्य प्रकरणे, कलम १३८ एन.आय. ॲक्टअंतर्गत धनादेश न वठण्याची प्रकरणे, बँक कर्जवसुली, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, जमीन अधिग्रहण, कामगार कायद्याखालील प्रकरणे, मालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विवाह विच्छेदन वगळता) तसेच विद्युत कायद्यांतर्गत तडजोडयोग्य वाद सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवता येणार आहेत.

याशिवाय न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रि-लिटीगेशन प्रकरणे, महसूलविषयक प्रकरणे, पाणीपट्टी आणि वीजबिलासंबंधी तडजोडयोग्य प्रकरणे देखील आपसी समझोत्यासाठी लोक अदालतीसमोर ठेवता येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क

ज्या नागरिकांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०७१७२-२७१६७९ किंवा कार्यालयीन मोबाईल क्रमांक ८५९१९०३९३४ वर संपर्क साधता येईल.

विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तडजोडयोग्य प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव  सुधीर इंगळे यांनी केले आहे.

000000

चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांचा 18 सप्टेंबरला ई-लिलाव

 चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांचा 18 सप्टेंबरला ई-लिलाव

Ø ई-लिलाव-नि-निविदा पद्धतीने ताडी अनुज्ञप्ती मंजूर होणार

चंद्रपूर, दि. 2 : चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांच्या ताडी वर्ष 2026-27 करिता अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी जाहीर ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत निविदा शासनाच्या अधिकृत महाटेंडर्स संकेतस्थळावर दि. 1 सप्टेंबर 2026 पासून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या या 16 ताडी दुकानांचा जाहीर लिलाव ऑनलाईन ई-लिलाव-नि-निविदा पद्धतीने दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती, प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती शासनाच्या महाटेंडर्स (www.mahatenders.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत याबाबतची अधिक माहिती प्राप्त करता येईल.

जिल्ह्यातील संबंधित ताडी दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी याची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांनी केले आहे.

00000000