Search This Blog

Tuesday, 4 August 2026

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या




जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Ø नागभीड तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि. 4) नागभीड तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिका-यांनी,  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वेळेत व सुलभ पद्धतीने मिळावीत, यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांना शासकीय सेवा अधिक कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. जमिनीच्या डिजिटायझेशनबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून कामाची गती वाढविणे, नोंदी अचूक ठेवणे व पारदर्शकता राखणे, तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

            विविध विकासकामांची पाहणी : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदाम, नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी करून दर्जेदार व विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. याशिवाय, नगर परिषद नागभीड अंतर्गत सुरू असलेल्या नमो उद्यान प्रकल्पास भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दौ-याप्रसंगी प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, अपर तहसीलदार शेखर पुणसे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गट विकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख वंदना नाईक, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी चांदेकर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.

०००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण


मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण

Ø पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन

मुंबई /चंद्रपूर, दि. 04 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय 47) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.

प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.

अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.

या आर्थिक सहाय्यामुळे 25जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.

वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. त्याच भावनेतून प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी बाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन


 जिल्हास्तर मैदानी खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूर, दि.04 : खेलो इंडिया उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता 8 ऑगस्ट रोजी खेळाडू निवळ  चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.          यापुर्वी ही चाचणी 30 जुलै 2026 रोजी ठेवण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सदर चाचणी रद्द करण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी खेळाडूंची निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.

14 वर्षे आतील मुले /मुली  यांनी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. खेळाडूचा जन्म 30 जुलै 2013 ते 30 जुलै 2015 या कालावधीत असावा. उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्म दाखला प्रत सोबत आणावे. खेळाडूंनी पासपोर्ट साईज 2फोटो सोबत आणावे.

उपरोक्त निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील व महानगरपालिका शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करून चाचणीच्या दिवशी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो.न. 9423673232) व खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षक रोशन भूजाडे (मो.न. 7798174435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

००००००

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन बाल कल्याण समितीची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 04 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाईल्ड हेल्पलाईन , बाल कल्याण समिती त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

बालविवाह प्रतिबंध, बालकामगार माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत योजनांची माहिती जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तालुका बाल संरक्षण समिती, ग्राम तथा वार्ड बाल संरक्षण समिती संख्याबाबत माहिती तसेच जिल्ह्यातील बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांचे समक्ष व पोलिसांमार्फत येणाऱ्या  केसेसची माहिती सादर करण्यात आली.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, अतिश चव्हाण, सायली पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, तसेच व्ही.सी. माध्यमातून सर्व तहसिलदार विधी सेवा प्रा., अधिक्षक, समाजकल्याण व बाल कल्याण समितीचे सर्व सदस्य, बाल न्याय मंडळ सर्व सदस्य उपस्थित होते.

००००

Saturday, 1 August 2026

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव


 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांचा गौरव

चंद्रपूर, दि. 01 : महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त आज (शनिवार) जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी  विशालकुमार मेश्राम यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी, महसूल विभाग हा शासनाचा सर्वाधिक लोकाभिमुख विभाग असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असंख्य जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती, जनगणना, निवडणुका, अतिक्रमण प्रकरणे, पट्टे वाटप, नियमाकूल प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्ते योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विविध कामांद्वारे महसूल विभाग नागरिकांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरी असो वा ग्रामीण भाग, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी व मंडळ अधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार आणि उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी हे अधिकारी-कर्मचारी चोवीस तास तत्परतेने कार्यरत असतात. कोणत्याही अडचणीच्या वेळी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्वरित प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्यांचे प्रथम प्राधान्याने निराकरण करण्यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनीही उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्याची माहिती दिली.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, संजय गांधी योजनेचे लाभार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक महसूल अधिकारी  अजय मेकलवार यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, आशा सेविका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), सहाय्यक कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००