Search This Blog

Tuesday, 28 July 2026

29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


29 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Ø जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूर, दि. 28 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सदर आदेश जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले असून नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय 07172 - 250077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आदेशात नमूद आहे.

०००००००

29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

 

29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 29 व 30 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे सोबतच मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

पात्र शेतक-यांसाठी आधार ई-केवायसी पूर्णपणे मोफत


पात्र शेतक-यांसाठी आधार ई-केवायसी पूर्णपणे मोफत

Ø ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’

चंद्रपूर, दि. 28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’ सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. सदर प्रक्रिया राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत करण्यात येत असून शेतक-यांना आता आधार ई-केवायसी करीता कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. कर्जमुक्तीसाठी आधार ई-केवायसी शासनाने पूर्णपणे मोफत केली आहे.  

ई-केवायसी सेवेसाठी संबंधित केंद्रचालकांना स्वतंत्रपणे सेवा शुल्क अदा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रामार्फत करण्यात आलेल्या यशस्वी  ई-केवायसी संख्येच्या आधारे, लागू सेवा शुल्काची गणना करून महाआयटी मार्फत प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संबंधित केंद्र चालकाच्या खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी सुविधा पूर्णतः विनामूल्य असल्यामुळे ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे.

यात 1) ई-केवायसी साठी कोणत्याही शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे शुल्क घेण्यात येऊ नये. 2) प्रत्येक संबंधित केंद्रावर ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे, असा सूचना फलक दर्शनी भागात लावण्यात यावा. 3) कोणत्याही केंद्रचालकाकडून शेतकऱ्यांना ई-केवायसी साठी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा असे निदर्शनास आल्यास सदर बाबीची तात्काळ पडताळणी करून संबंधितांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 4) जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेचे नियमित संनियंत्रण करण्यात यावे व ई-केवायसी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

वरील सुचनांची सर्व संबंधित यंत्रणा व आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांच्या आदेशात नमुद असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

००००००

एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारुप मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी पुन्हा एक संधी


 एसआयआर मोहिमेंतर्गत प्रारुप मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी पुन्हा एक संधी

Ø 17 ऑगस्ट ते 16 सप्टें. 2026 पर्यंत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध

चंद्रपूर, दि. 28 : राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम चालू असून सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी गृहभेटीस येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून द्यावयाचा आहे. गणना अर्ज भरून व त्यावर स्वाक्षरी करून दिलेल्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील.

ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील त्यांच्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026  या कालावधीत, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.

या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा/विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती एका वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे व कलम 23 (3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, म.रा. यांनी कळविले आहे.

००००००

25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप


 25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप

Ø विशेष अभय योजनेंतर्गत दिलासा

चंद्रपूर, दि. 28 : सिंधी वसाहतींमधील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी आणि त्यांना फ्री-होल्ड (भोगवटादार वर्ग-1 / सत्ताप्रकार-अ) करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-2025’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील 25 सिंधी विस्थापितांना जमीन नियमानुकूलचे आदेश वाटप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात करण्यात आले.

पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी विस्थापितांचे निर्वासित इसम (नुकसान भरपाई व पुनर्वसन) अधिनियम, 1954 व तदनुषंगिक नियमांनुसार पुनर्वसन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने सदर कायद्याच्या कलम 34 नुसार आपले अधिकार सन 1971 पासून महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत. 24 जानेवारी 1973 शासन अधिसुचनेनुसार राज्यात भरपाई संकोष मालमत्ता घोषित करण्यात आलेल्या आहेत. सदर भूखंडांच्या अधिकार अभिलेखात भोगवटादार वर्ग-2 अथवा ब/ब-1/ब-2 सत्ता प्रकार अशा नोंदी असल्याने व विस्थापितांकडे जुने पुरावे नसल्याने अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी महसूल व वन विभागाने शासन निर्णय 15 मे 2025 अन्वये ‘विशेष अभय योजना-2025’ लागू केली आहे.

 योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व सवलती : सद्यःस्थितीत निवासी वापरासाठी असलेल्या जमिनीकरिता 2.5 टक्के आणि वाणिज्यिक वापराच्या जमिनीकरिता 5 टक्के सवलतीचे अधिमूल्य आकारण्यात येत आहे.

ग्राह्य पुरावे : रेफ्युजी कार्ड, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, घरपट्टी/पाणीपट्टी पावती, वीज बिल, ताबेपावती, मतदार ओळखपत्र, मालमत्ता पत्रक, 7/12 नोंदी इत्यादी पुरावे ग्राह्य धरले जातात.

सदर शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार चंद्रपूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी व पुराव्यांची सखोल पडताळणी करून चंद्रपूर तालुक्यातील एकूण 25 पात्र सिंधी विस्थापित अतिक्रमणधारकांना जमिनीचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री-होल्ड करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन : ‘विशेष अभय योजना-2025’ ही 15 मे 2027 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे. चंद्रपूर तालुक्यातील ज्या सिंधी विस्थापित नागरिकांनी/धारकांनी अद्याप आपले निवासी व वाणिज्यिक भूखंड नियमानुकूल व फ्री-होल्ड करून घेतलेले नाहीत, त्यांनी आवश्यक दस्तऐवजांसह तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे त्वरित संपर्क साधून  या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

००००००