Search This Blog

Monday, 27 July 2026

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त


 

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत आतापर्यंत 43 हजार 968 पात्र शेतक-यांच्या याद्या चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 757 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7211 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी (दि.27) आढावा घेतला.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण,ॲग्रीस्टॅक नोंदणी व इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरीत करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था), जयसिंग राजपुत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आदी उपस्थित होते.

०००००००

28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी


28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 28 व 29 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

वादळ, वारा, मुसळधार व अतिमुसळधार पावसात नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

Sunday, 26 July 2026

आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला


आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला

Ø सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. २६ : आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या ४७८ रिक्त जागांसाठी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार होती. मात्र, परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या परीक्षा केंद्र बदलाबाबतच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून परीक्षा केंद्र व वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २८ जुलै २०२६ रोजी शिफ्ट-२ मध्ये होणार होती. मात्र, आता या परीक्षेच्या दिनांक व शिफ्टमध्ये बदल करण्यात आला असून, संबंधित उमेदवारांची परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी शिफ्ट-१ मध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांनी पसंती दिलेल्या परीक्षा केंद्रांपेक्षा लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील परीक्षा केंद्र, दिनांक, शिफ्ट व वेळ यांची खात्री करावी, असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

00000000

कर्जमुक्ती याद्यांची प्रसिध्दी


 

कर्जमुक्ती याद्यांची प्रसिध्दी

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ अंतर्गत पात्र शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या आहेत. सदर याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषद समोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द करतांना जिल्हा उपनिबंधक (सहाकारी संस्था) जयसिंग ठाकूर, सीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्र. व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी आर.पी. दरवे, बँक शाखा सचिव किशोर लोनगाडगे व इतर अधिकारी

जिल्ह्यातील 70980 नागरिकांना सनद वाटप

 जिल्ह्यातील 70980 नागरिकांना सनद वाटप

Ø आधुनिक ड्रोन व जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावठाणचे भुमापन

चंद्रपूर, दि. 26 : ग्रामीण भागातील गावठाणातील मालमत्तांचे आधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांना अधिकृत मालमत्ता कार्ड/सनद देणे यासाठी केंद्र शासनाने ‘स्वामित्व’ योजना सुरू केली आहे. एकप्रकारे गावठाणातील मालमत्तेला अधिकृत ओळख आणि मालकी हक्काचा पुरावा देणारी ही महत्वाकांक्षी योजना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भुमी अभिलेख विभागातर्फे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 70 हजार 980 नागरिकांना सनद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात गावठाण क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढ, बांधकामे व मालमत्ता हस्तांतरण यामुळे मोठ्या प्रमाणावर भौगोलिक बदल झाले आहेत. अनेक गावांमध्ये गावठाणाचे अचूक अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे मालमत्तेची सीमा, क्षेत्रफळ व मालकीबाबत अनिश्चितता निर्माण होते. यामुळे मालमत्ता कर आकारणी, बांधकाम परवानगी, कर्जसुविधा, मालकी हक्कांचे संरक्षण व ग्रामपंचायतींचे प्रभावी प्रशासन यामध्ये अडचणी निर्माण होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक ड्रोन व जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावठाण भूमापन करून, मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात महसुली गावांची एकूण संख्या 1813 आहे. यापैकी गावठाण भुमापन करावयाची गावे 1203 असून सनद तयार करण्यात आलेल्या गावांची संख्या 1152 आहे. भुमी अभिलेख विभागाच्या वतीने आतापर्यंत 1 लक्ष 94 हजार 322 सनद तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी विविध शिबिरांच्या माध्यमातून आणि कार्यालयातून 70 हजार 980 सनद नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सनद वाटपाचे काम ही निरंतर प्रक्रिया आहे. यासाठी नागरिकांनी संबंधित भुमी अभिलेख कार्यालयात जावून आपले नाव व गावाचे नाव सांगून सनद प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन भुमी अभिलेख कार्यालयाने केले आहे.

तालुकानिहाय सनद उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या : चंद्रपूर तालुका (6004), वरोरा (5303), चिमूर (2707), नागभीड (6206), ब्रम्हपुरी (8915), सावली (4272), सिंदेवाही (4344), भद्रावती (6156), मुल (4223), पोंभुर्णा (3172), बल्लारपूर (2510), कोरपना (5399), जिवती (4099), राजुरा (3823) आणि गोंडपिपरी तालुक्यात (3847) असे एकूण 70 हजार 980 नागरिकांना सनद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला होणारे फायदे : 1) गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे अचूक सर्वेक्षण होऊन सीमा निश्चित झाल्यामुळे डिजिटल नकाशे उपलब्ध होतील. 2) प्रत्येक मिळकतीचे अचूक क्षेत्रफळ निश्चित होऊन त्याची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल. 3) मिळकत पत्रिकेमुळे मालकी हक्कांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होऊन ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल. 4) मिळकत पत्रिकेच्या आधारे बँक कर्ज व इतर वित्तीय सुविधा सहज उपलब्ध होईल. 5) गावातील शासन व ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागांच्या सीमा निश्चित झाल्यामुळे अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल. 6) मालमत्तांच्या स्पष्ट सिमांकनामुळे मालकी हक्क व हद्दी संदर्भातील वाद-विवाद कमी होतील. 7) ग्रामपंचायतीसाठी जीआयएस आधारित मालमत्ता कर निर्धारण नोंदवही (नमुना-8) स्वयंचलित पद्धतीने तयार होऊन कर आकारणी अधिक अचूक, पारदर्शक व कार्यक्षम होईल. 9) मालमत्ता कर संकलनात वाढ होऊन ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल 10) ग्रामपंचायतीला गावठाणाचे अद्ययावत डिजिटल नकाशे व अभिलेख उपलब्ध झाल्यामुळे कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन, विकास नियोजन व इतर प्रशासकीय कार्ये अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील.

०००००००