Search This Blog

Tuesday, 25 August 2026

महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे - अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

 




महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे

- अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

Ø लोक अदालतीच्या धर्तीवर महसूल लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 25 : राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियानचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मदत होईल. या अदालतीमध्ये अधिवक्ते व पक्षकारांनी सहभागी होऊन सदर अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय येथील बार असोसिएशनच्या कार्यालयात आयेाजित कार्यक्रमात डॉ. व्यवहारे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन, उपाध्यक्ष ॲङ अमन मारेकर, सचिव ॲङ अभिजित किन्हीकर आदी उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शेतजमीन या विषयावर मोठा लढा दिला, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचविणे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे मूळ सुत्र होते. त्यामुळेच राज्य शासनाने त्यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान सुरू केले आहे, सदर अभियान संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. विविध कारणांमुळे हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे पक्षकारांमध्ये आपसी समझेाता करून सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या अधिवक्त्यांकडे अशी महसुली प्रकरणे आहेत, त्यांनी संबंधित पक्षकारांसोबत बोलून यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, जेणेकरून महसुली प्रकरणांची संख्या कमी करून पक्षकारांना दिलासा मिळेल, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम म्हणाले, पक्षकारांचा, अधिवक्त्यांचा व महसूल यंत्रणेचा वेळ वाचावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये कधीकधी अतिशय शुल्लक प्रकरणे असतात. दोन्ही पक्षकारांना योग्य पध्दतीने समजावून सांगितले तर या माध्यमातून त्यांना वेळेत न्याय मिळू शकतो. आपसी संवाद/तडजोड झाली तर प्रकरणे लवकर निकाली निघतील. यात पक्षकारांचा सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन म्हणाले, शेतक-यांना आपल्या केसेस लढण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिवक्ता आणि पक्षकार यात सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे सचिव ॲङ अभिजित किन्हीकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिवक्ता श्री. सातपुते यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

ईद निमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


 

ईद निमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपुर शहरामध्ये 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा, जनतेला त्रास तसेच तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता चंद्रपुर शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजतापासून दुपारी 3 वाजेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी दिले आहे.

कोहीनुर ग्राउंड-दस्तगीर चौक -मिलन चौक -गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट-कस्तुरबा रोडने कोहीनूर ग्राऊंड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.

नागपूरकडून शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कुल- सवारी बंगला चौक -नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.

नागपुर, वणी, घुग्घुस, गडचांदुरकडे जाणा-या प्रवाशांनी रहमतनगर, नगीनाबाग व इतर परीसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहेमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मुलकडून येणा-या वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जावयाचे असल्यास बसस्टँड- एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोलपंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

जनतेने जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतुक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

००००००

सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन



 सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

चंद्रपूर, दि. 25 : शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून, या पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे. पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (तंबाखुवरील पाने खाणारी अळी, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) 71 टक्क्यांपर्यंत, फक्त उंटअळयामुळे 50 टक्क्यांपर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते.

सध्या स्थितीत सोयाबीन पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे किर्डीचे वेळीच निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंबनाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे शास्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) : या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया, समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. अळ्या मोठ्या झाल्यानंतर त्या शेतात सर्वत्र पसरतात व पानांना मोठी अनियमित छिद्रे पाडून पाने खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पानांची चाळणी झाल्यासारखी अवस्था होते. पिकाला फुले आल्यानंतर या अळ्या फुले खाऊन नुकसान करतात, परिणामी पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

उंटअळया : या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः 15 ते 20 दिवसांनी होतो. अळ्या पानांवर लहान, अनियमित आकाराची छिद्रे पाडून नुकसान करतात, त्यामुळे पिकातील शेंगा लागणे व दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटू शकते. तसेच ह्या अळ्या फुले व शेंगाही खातात.

सध्यस्थितीत एकात्मिक व्यवस्थापन : सोयाबीन पिकांचे वेळोवेळी किडींचे सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी व केसाळ अळया यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत. तंबाखुची पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी 15 ते 20 प्रति हेक्टरी लावावेत. शेतात इंग्रजी 'T' अक्षरासारखे 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी, प्रादुर्भाव आढळून येताच करावी. पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. या किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर प्रति लिटर पाण्यातून फ्लूबेंडामाईड 39.35% एससी 0.3 मिली किंवा क्लोरेंन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 0.3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.90% ईसी 0.85 मिली किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18% एससी 0.5-0.6 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 5.25% + इंडॉक्साकार्ब 4.50% एससी 1.65-1.75 मिली किंवा अॅसिटामीप्राईड 25% बायफेथ्रिन 25% डब्लूजी 0.5 ग्रॅम या पैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.

वरील सर्व कीटकनाशकाचे प्रमाण साध्या / नॅपसॅक पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे. शेतात कीटकशकांचा वापर करतांना हातमोजे, तोंडावर मास्कचा, डोळ्यावर चष्माचा वापर करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 24 August 2026

एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास


 एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास

Ø दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

Ø पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित प्रसूती

चंद्रपूर, दि. 24 : दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे एका मातेचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास सुखरूप पूर्ण झाला. दुर्गम घोडणकप्पी  येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांनी 23 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरोदर मातांपर्यंत नियमित आरोग्यसेवा पोहोचविणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असते. घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावातही आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईंच्या गर्भावस्थेच्या सुरुवातीपासून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. घरी जाऊन नियमित तपासण्या, रक्तवाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स, गोळ्या आणि औषधोपचार देत त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

इंदिराबाईंची ही पाचवी गर्भधारणा असल्याने प्रसूतीदरम्यान संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक दक्षता आवश्यक होती. आई आणि बाळ दोघांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना 10 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथकाने त्यांची नियमित देखरेख सुरू ठेवली. पुढील तपासण्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आणि डॉ. स्नेहल कासारे यांच्या मार्गदर्शनात हृदयाची ECHO आणि ECG तपासणीही करण्यात आली.

पंधरा दिवसांची काळजी अन् विश्वासाची साथ

गरोदर मातेला जवळपास पंधरा दिवस आरोग्य संस्थेत ठेवणे हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नव्हते. तिची मानसिक तयारी करणे, तिचा विश्वास संपादन करणे आणि प्रत्येक टप्प्यावर आपुलकीने आधार देणे तितकेच महत्त्वाचे होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संयम आणि संवेदनशीलतेने ही जबाबदारी पार पाडली.

या प्रयत्नांमध्ये इंदिराबाईंच्या कुटुंबीयांची भूमिकाही मोलाची ठरली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत उपचार आणि रुग्णालयातील वास्तव्यासाठी पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय देखरेख कोणत्याही खंडाशिवाय सुरू ठेवता आली. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे इंदिराबाईंची सुरक्षित प्रसूती झाली. त्यांच्या कुशीत 3.1 किलो वजनाची सुदृढ चिमुकली आली. आई आणि बाळ सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटले. ही केवळ प्रसूती नाही, सामूहिक प्रयत्नांचा विजय

इंदिराबाईंची कहाणी ही एका मातेच्या सुरक्षित प्रसूतीपुरती मर्यादित नाही. आरोग्य कर्मचारी, माता, कुटुंब आणि गावकरी यांच्यात विश्वास व समन्वय असेल, तर दुर्गम भागातील आव्हानांवरही मात करता येते, याचे हे उदाहरण आहे.

प्रत्येक गरोदर मातेने वेळेवर तपासणी करून घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि जोखीम आढळल्यास प्रसूतीपूर्वीच आरोग्य संस्थेत दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि गावानेही गरोदर मातेला आवश्यक सहकार्य केल्यास माता व बालमृत्यूचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.

आरोग्यसेवा देणारे आणि आरोग्यसेवा घेणारे यांच्यात विश्वास आणि सहकार्याची साखळी मजबूत झाली, तर दुर्गम भागातील प्रत्येक मातेला सुरक्षित मातृत्वाची संधी देता येऊ शकते. घोडणकप्पी ते पाटण असा इंदिराबाईंचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास याच विश्वासाचे प्रतीक ठरला आहे.

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसह  अधिकाऱ्यांनी घेतली होती इंदिराबाईची भेट : 15 ऑगस्ट रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासह जिल्हाधिकारी वसूमना पंत , मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इंदिराबाईची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. तसेच इंदिराबाईच्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

००००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा


 मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा

Ø पहिल्याच करारातून 89.60 लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.

प्रतिक्रिया :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

०००००००