Search This Blog

Tuesday, 18 August 2026

नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर

 

नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर

Ø 19 ऑगस्टला दुरुस्ती पूर्ण करून सिंचनासाठी पाणी पूर्ववत सोडण्याचे नियोजन

Ø कालवा फुटल्याचे निदर्शनास येताच तात्काळ पाणी बंद करून दुरुस्तीला सुरुवात

चंद्रपूर, दि. 18 : नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला अनपेक्षितपणे भगदाड पडल्याचे निदर्शनास येताच संबंधित विभागाने तातडीने कालव्यातील पाणी बंद करून अवघ्या काही तासांत दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार, दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारपर्यंत काम पूर्ण करून सिंचनासाठी कालव्यातून पूर्ववत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. स. सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

खरीप सिंचन हंगाम 2026 करिता नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कालव्याचा काही भाग फुटल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच विभागाने तत्काळ कालव्यातील पाणी बंद केले. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी 11 वाजतापासून आकस्मिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. कालवा फुटल्यामुळे लगतच्या काही शेतांमध्ये पाणी गेले होते.

112 वर्षे जुना कालवा: नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम सन 1914 मध्ये पूर्ण झाले असून या प्रकल्पाला आता 112 वर्षे झाली आहेत. हा कालवा प्रामुख्याने जंगल भागातून जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची मुळे कालव्याच्या भरावामध्ये शिरल्याने कालव्याचा भराव कालांतराने कमकुवत होण्याची शक्यता असते.

प्राथमिक पाहणीत फुटलेल्या भागात घूस, घोरपड, उंदीर आदी वन्यजीवांमुळे भरावाच्या आतील भागात छिद्रे निर्माण झाल्याची शक्यता निदर्शनास आली आहे. अशी अंतर्गत छिद्रे बाहेरून सहजपणे दिसून येत नसल्याने पाण्याचा दाब वाढल्यानंतर संबंधित भाग कमकुवत होऊन कालवा फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

पाणी सोडण्यापूर्वी करण्यात आली होती पाहणी: खरीप सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी विभागामार्फत कालव्याची पाहणी करण्यात आली होती. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या छिद्रे व भेगांची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, सध्या कालवा फुटलेल्या ठिकाणी पाहणीच्या वेळी बाह्य स्वरूपात कोणतीही भेग अथवा छिद्र निदर्शनास आले नव्हते.

शेतकऱ्यांचे सिंचन सुरळीत ठेवण्यास प्राधान्य: कालवा फुटल्याचे लक्षात आल्यानंतर विभागाने कोणताही विलंब न करता पाणी बंद करून दुरुस्तीची यंत्रणा कार्यान्वित केली. दुरुस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असून दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत काम पूर्ण करून खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेत उपलब्ध व्हावे आणि सिंचन व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे, असे कार्यकारी अभियंता श्री सिंह यांनी कळविले आहे.

००००००

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

मुंबई,दि.१८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होत आहेत. त्यामुळे किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस निकामी झालेल्या अनेक रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली आहे. मात्र, अशा शस्त्रक्रियांसाठी खाजगी रूग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असून, त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची कार्यपद्धती अधिक गतिमान आणि रुग्णकेंद्रित करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाइन प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक वेगाने उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, मदतीसाठीचा अर्ज आता रुग्णाऐवजी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयामार्फत थेट सादर केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता राहिली नाही. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण होत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांना गती मिळणार आहे.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत : १५.७९ कोटींची मदत

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ लाख ६६ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

यकृत प्रत्यारोपणासाठी १६२ रुग्णांना ३ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.

फुप्फुस प्रत्यारोपणासाठी ०३ रूग्णांना ६ लाख रूपयांची मदत देण्यात आली.

तर, हृदय प्रत्यारोपणासाठी १६ रुग्णांना २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर उपचारांसाठी लागणारा वेळ कमी करणे, अर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करून गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळणे सोयीचे झाले आहे.

प्रतिक्रिया------

अवयव प्रत्यारोपणासारख्या खर्चिक उपचारांसाठी आर्थिक मदत वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान, अद्ययावत करण्यात आली आहे. गरजू रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. श्री. रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष.

००००००

Monday, 17 August 2026

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया


 

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हाजलदूत बनून पाण्यासाठी चालूया

·         जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात जलसंधारण दिनसाजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

 

जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे  फडणवीस यांनी सांगितले.

 

जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

 

चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवाया मूलमंत्राला जगवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

0000

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

 


महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर

Ø २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

चंद्रपूर, दि. 17 : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत. सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी,जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआरभागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

००००००

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरी


 

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती प्रभातफेरी

चंद्रपूर, दि. 17 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामान्य रुग्णालय येथे विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीची शपथ घेत प्रभातफेरी काढली.

          सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री कापसे गावंडे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती गावंडे यांनी, युवकांनी एचआयव्ही/एड्सबाबत अचूक माहिती आत्मसात करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भास्कर सोनारकर यांनी युवकांच्या सहभागातून जनजागृतीची मशाल पेटली, तर एचआयव्ही विषयीचा गैरसमज दूर करून प्रतिबंधाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविता येईल, असे सांगितले.

        कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी एचआयव्ही/एड्स विषयक शपथ घेतली. त्यानंतर सामान्य रुग्णालय येथून प्रभातफेरीला सुरुवात करण्यात आली. प्रभातफेरी जटपुरा गेट मार्गे वळण घेऊन आझाद बगीचा मार्गे पुन्हा सामान्य रुग्णालय येथे पोहोचली. यावेळी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, तपासणी आणि जनजागृतीविषयक संदेश देण्यात आले.

               कार्यक्रमास प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. देवेंद्र बोरकुटे, निखिल खंडारे, परिचारिका माया आत्राम उज्वला सोयाम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, निरंजन मंगरूळकर यांच्यासह विद्यार्थी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमास एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, एआरटी केंद्र, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, संबोधन ट्रस्ट, विहान संस्था, प्लॅन इंडिया संस्था, शासकीय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज आणि सुशीलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय यांनी सहकार्य केले.            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुमंत पानगंटीवार यांनी केले.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्ग तीन दिवसीय प्रशिक्षण : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय सुविधा केंद्रात व हस्तक्षेप लक्षगट प्रकल्पामध्ये कार्यरत समुपदेशकांचे प्रशिक्षण 17 ते 19 ऑगस्टपर्यंत वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात, समुपदेशन कला, प्रिटेस्ट समुपदेशन, पोस्ट टेस्ट समुपदेशन, समुपदेशनाच्या नवीन पद्धती शिकविण्यात येतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. बंडू रामटेके, डॉ सुनील भोकरे, सहसंचालक डॉ. राहुल जाधव, प्रसाद संत, हेमंत भोसले, रतन गाढवे, सचिन जाधव, निरंजन मंगरूळकर, नासिमा शेख, देवेंद्र लांजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमंत पानगंटीवार यांनी केले.

००००००