Search This Blog

Friday, 21 August 2026

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत



 

सण-उत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा  – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø गणेश मंडळांना वेळेत परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवा

Ø स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर

Ø सोशल मीडियावर सायबर टीमची 24x7 नजर; लेझर लाईटला पूर्णपणे बंदी

चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे. आगामी ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा, गणेशोत्सव आदी सण-उत्सव सर्वांनी परस्पर सहकार्य, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत. तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे शुक्रवारी (दि.21) आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, मनपाचे उपायुक्त संजय चिद्रावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समिती व दक्षता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात गणेश मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू असणार आहे. जिल्ह्यातील इतर नगर परिषदांनीही अशी व्यवस्था सुरू करून गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या वेळेत द्याव्यात. ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत.

गणेशोत्सव काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि गणेश मंडळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. निर्माल्य आणि इतर कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम विसर्जन टँकची माहिती नागरिकांना आधीच उपलब्ध करून द्यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडळांनी किमान दोन सीसीटीव्ही लावावेत – पोलिस अधीक्षक आयुष नोपानी

जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले की, कोणताही कार्यक्रम पूर्व परवानगीशिवाय आयोजित करू नये. मंडप किंवा होर्डिंग उभारताना सार्वजनिक जागा व्यापली जाणार नाही, तसेच नागरिक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर रोखण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करावे. मूर्तीचे विडंबन होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून समाजकंटकांना ओळखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा हद्दीत घोषित करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये ध्वनी प्रदूषण खपवून घेतले जाणार नाही. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनी संबंधित नगर परिषदांशी समन्वय साधून तालुका स्तरावर सायलेंट झोन निश्चित करावेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर टीम 24x7 कार्यरत आहे. लेझर लाईटच्या वापराला पूर्णपणे बंदी असून उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नोपानी यांनी केले.

नागरिकांनी मांडल्या सुचना : बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. विसर्जनाची योग्य व्यवस्था करणे, भूमिगत गटारांच्या कामामुळे रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊ न देणे, डीजेचा वापर टाळणे, गावपातळीवर चोख बंदोबस्त ठेवणे, अफवांवर विश्वास न ठेवणे व त्या पसरू न देणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, गर्दीचे योग्य नियोजन करणे, पीओपीच्या मूर्ती टाळणे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा असामाजिक तत्त्वांची माहिती तातडीने पोलिसांना देणे, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करणे आणि सण-उत्सवांच्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत राहील याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, आदी सूचनांचा यात समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम गव्हाणे यांनी केले. संचालन मंगला आसुटकर यांनी केले, तर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी आभार मानले.

०००००

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

Ø 28 ते 30 ऑगस्टदरम्यान क्रीडा व तंदुरुस्तीविषयक कार्यक्रम

Ø खेलेगा भारत, जितेगा भारत संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 21 : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. क्रीडा ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे. याच व्यापक उद्देशाने सन २०२६ मध्ये खेलेगा भारत, जितेगा भारत या थीमवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 28 ते 30 ऑगस्ट 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत विविध क्रीडा, तंदुरुस्ती, जनजागृती आणि लोकसहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, युवक मंडळे, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

पहिला दिवस – क्रीडा नायकांचा गौरव : 28 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात यावी. विविध प्रोत्साहनात्मक खेळ, क्रीडा आव्हाने, भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव, राष्ट्रीय व स्थानिक क्रीडा नायकांच्या प्रेरणादायी कामगिरीची माहिती देणे आदी उपक्रम आयोजित करता येतील.

दुसरा दिवस – ‘एक घंटा खेल के मैदान में’ : 29 ऑगस्ट रोजी  एक घंटा खेल के मैदान में, एक वर्ग, एक खेळ, शिक्षक विरुद्ध विद्यार्थी मैत्रीपूर्ण सामने, क्रीडा आव्हाने, पारंपरिक व देशी खेळ तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव यासारख्या उपक्रमांचे आयोजन करता येईल. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी क्रीडा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवावा.

तिसरा दिवस – सायकलिंग, पदयात्रा आणि धावणे : 30 ऑगस्ट रोजी सामूहिक क्रीडा शपथ घेऊन ‘सायकल ऑन संडे’, पदयात्रा, धावणे व रॅली यासारखे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्थानिक खेळाडू, क्रीडापटू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहर, शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा संघटना तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आपल्या स्तरावर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करून क्रीडा संस्कृतीचा विस्तार आणि निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

०००००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी


 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

            चंद्रपूर, दि. 21 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे 21 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांसाठी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची माहिती उपलब्ध करुन दिले जाईल. किंवा 9156073306 या मोबाईल नंबरवर SSB-६६ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉट्सॲप व्दारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

            एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.

(अ) कम्बाईंड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (ब) एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.

०००००००

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 21 : जिल्हयातील माजी सैनिक/ विधवांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वर्ग 12 वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले असल्यास प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत.

            त्याकरीता ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर असून अर्ज भरण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2026 आहे. तरी मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे स्कॅन करून प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चूकीचा अर्ज भरलेला असल्यास नाकारल्या जाईल. तरी सर्व संबंधित माजी सैनिक/ विधवांनी आपापल्या पात्र पाल्यांचे ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2026 पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.

०००००

रस्ता सुरक्षा उजळणी शिबिराच्या तारखेत बदल

 

रस्ता सुरक्षा उजळणी शिबिराच्या तारखेत बदल

            चंद्रपूर, दि. 21 : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दर बुधवारी आयोजित करण्यात येणारे रस्ता सुरक्षा उजळणी शिबीर 26 ऑगस्ट 2026 रोजी सार्वजनिक सुटटी (ईद-ए-मिलाद) असल्याने अंशतः रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे सदर रस्ता सुरक्षा उजळणी शिबीर या आठवडयात बुधवार ऐवजी गुरुवार दि. 27 ऑगस्ट रोजी नियमित वेळेवर रस्ता सुरक्षा हॉल येथे आयोजित करण्यात येईल. पुढील आठवडयापासुन हे शिबीर पुर्ववत दर बुधवारीच आयोजित केले जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

०००००००