Search This Blog

Tuesday, 8 September 2026

विशेष लेख : विद्यार्थी बोलणार, शासन ऐकणार

विशेष लेख :      


विद्यार्थी बोलणार, शासन ऐकणार

Ø भरती परीक्षा सुधारणांसाठी शासनाचा संवाद

Ø सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेकडे वाटचाल

चंद्रपूर : शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील लाखो युवक-युवती स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. अभ्यासाचे नियोजन, आर्थिक अडचणींवर मात, अनेकदा घरापासून दूर राहून तयारी आणि त्यासाठी दिलेली आयुष्यातील महत्त्वाची वर्षे—या सगळ्याचा विचार करता प्रत्येक उमेदवाराला निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था मिळणे, ही त्याची रास्त अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या याच अपेक्षेला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र शासनाने भरती परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 4 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील सध्याच्या भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर सोपविण्यात आली आहे. मात्र या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ टास्क फोर्सच्या स्थापनेपुरते मर्यादित नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स स्वतः राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे.

विद्यार्थ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत : कोणत्याही परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा प्रभावी होण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे अनुभव महत्त्वाचे असतात. याच भूमिकेतून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित घटकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा अर्जापासून प्रत्यक्ष परीक्षा, परीक्षा केंद्रावरील व्यवस्था, सुरक्षा, तांत्रिक बाबी आणि एकूण प्रक्रियेतील पारदर्शकता यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय टास्क फोर्स जाणून घेणार आहे. यातून शासनाच्या सुधारणा प्रक्रियेत विद्यार्थ्यांना केवळ लाभार्थी न मानता सक्रिय भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याचा दृष्टिकोन अधोरेखित होत आहे.

एका महिन्यात सहाही विभागांत संवाद : 1) पुणे विभाग — 12 सप्टेंबर 2026, स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

2) नागपूर विभाग — 16 सप्टेंबर 2026, स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर, ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

3) अमरावती विभाग — 17 सप्टेंबर 2026, स्थळ : अमरावती, ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

4) छत्रपती संभाजीनगर विभाग — 21 सप्टेंबर 2026, स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर, ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

5) कोकण विभाग — 29 सप्टेंबर 2026, स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई, ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

6) नाशिक विभाग — 30 सप्टेंबर 2026, स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

या संवाद प्रक्रियेमुळे विदर्भापासून कोकणापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यापर्यंत विविध भागांतील उमेदवारांचे अनुभव व अपेक्षा टास्क फोर्सपर्यंत पोहोचू शकणार आहेत.

गैरप्रकारांना प्रतिबंध; परीक्षा सुरक्षेवर विशेष भर : भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारावर अन्याय होऊ नये, यासाठी परीक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यव्यापी संवादातून प्राप्त सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, परीक्षा सुरक्षा अधिक मजबूत करणे, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करणे यासाठी आवश्यक सुधारणांच्या शिफारशी शासनाला सादर करण्यात येणार आहेत.

गुणवत्तेला न्याय देणाऱ्या व्यवस्थेकडे वाटचाल : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेहनतीला आणि गुणवत्तेला न्याय मिळण्याचा विश्वास. परीक्षेचे नियम स्पष्ट असावेत, प्रत्येक उमेदवाराला समान संधी मिळावी आणि संपूर्ण प्रक्रिया विश्वासार्ह असावी, ही विद्यार्थ्यांची मूलभूत अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि सर्वसामान्य कुटुंबांतील अनेक युवक-युवती शासकीय सेवेला आपल्या भविष्याचा आधार मानून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक कुटुंबे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक भारही उचलतात. अशा परिस्थितीत परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.

म्हणूनच भरती परीक्षा सुधारणांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना थेट सहभागी करून घेण्याचा शासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून पुढे आलेल्या समस्यांची नोंद होण्यासोबतच त्यावर व्यवहार्य उपाय शोधण्यासही मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांनीही पुढे यावे : टास्क फोर्सचा हा राज्यव्यापी संवाद म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपले मत शासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची संधी आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा असलेल्या उमेदवारांनी केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यावरील व्यवहार्य उपाय आणि सूचना देखील मांडणे गरजेचे आहे. परीक्षा सुरक्षा, पारदर्शकता, तांत्रिक व्यवस्था, उमेदवारांना मिळणाऱ्या सुविधा, प्रक्रियेतील सुलभता किंवा अन्य कोणत्याही बाबतीत विद्यार्थ्यांना आलेले अनुभव भविष्यातील सुधारणा निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

शासन ऐकणार, विद्यार्थी बोलणार आणि अनुभवातून सुधारणा घडणार, ही या उपक्रमाची महत्त्वाची दिशा आहे. भरती परीक्षा अधिक सुरक्षित करणे म्हणजे केवळ परीक्षेचे व्यवस्थापन सुधारणे नव्हे, तर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीच्या स्वप्नाचे संरक्षण करणे होय. विद्यार्थ्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून, त्यांच्या अनुभवांचा अभ्यास करून आणि त्यातून आवश्यक सुधारणा निश्चित करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा राज्यव्यापी संवाद त्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरतो.

पारदर्शक प्रक्रिया, सुरक्षित परीक्षा, गुणवत्तेला न्याय आणि विद्यार्थ्यांचा विश्वास—या चार आधारस्तंभांवर अधिक सक्षम व उमेदवाराभिमुख भरती व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

 

                                                                                राजेश का. येसनकर

                                                                        जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

०००००० 

Monday, 7 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

 

·         सहा विभागांना याच महिन्यात भेटी

·         विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

 

            मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.

 

            या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.

 

*टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक*

 

पुणे विभाग १२ सप्टेंबर २०२६

स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागपूर विभाग १६ सप्टेंबर २०२६

स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर

ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

अमरावती विभाग १७ सप्टेंबर २०२६

स्थळ : अमरावती

ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

छत्रपती संभाजीनगर विभाग २१ सप्टेंबर २०२६

स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर

ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

कोकण विभाग २९ सप्टेंबर २०२६

स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नाशिक विभाग ३० सप्टेंबर २०२६

स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.

 

            या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

 

            भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

0000

गजानन पाटील/विसंअ

सैन्य भरतीकरीता विविध विभागांनी योग्य नियोजन करावे


 सैन्य भरतीकरीता विविध विभागांनी योग्य नियोजन करावे

Ø अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Ø 2 ते 17 ऑक्टो. दरम्यान विसापूर (ता. बल्लारपूर) येथे आयोजन

चंद्रपूर, दि. 07 : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यातील उमेदवारांची सैन्य भरती रॅली (अग्निवीर) विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. सैन्य भरतीकरीता येणा-या उमेदवारांच्या सोयीसुविधांमध्ये आपण जिल्हा प्रशासन म्हणून कुठेही कमी पडता कामा नये, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी अतिशय सुक्ष्म नियोजन करावे, अशा सचुना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात, सैन्य भरती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे बोलत होते. पुढे ते म्हणाले, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, पोलिस विभाग, राज्य परिवहन विभाग आदींनी एकत्रित विसापूर क्रीडा संकूल परिसराला भेट द्यावी. आपल्याला काय काय करायचे आहे, त्यासाठी कोणत्या विभागाशी समन्वय असायला पाहिजे, आदी बाबी आधीच ठरवून घ्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक दुरुस्ती व विद्युतीकरणाशी संबंधित कामे आटोपल्यावरच इतर कामे करता येतील. त्यामुळे या कामांना गांभिर्याने घ्यावे. यात कोणतीही हयगय होऊ देऊ नका.

जिल्हा परिषदेने उमेद व माविमच्या बचत गटांमार्फत स्टेडियमच्या बाहेरील जागेत सशुल्क तत्वावर खाद्य पदार्थ व अनुषंगिक गोष्टींचे स्टॉल लावण्यास अवगत करावे. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी कुमक उपलब्ध करून द्यावी. महानगरपालिका आणि नगर परिषदेने स्टेडियम परिसरात वाढलेल्या गवतांची आणि झुडपांची कटाई करावी. परिसरात स्वच्छता ठेवावी. स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. परिवहन विभागाने उमेदवारांना ने-आण करण्याकरीता बसेसची व्यवस्था करावी. विद्युत विभागाने भरती दरम्यान अखंड वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य, डॉक्टरांची टीम तैनात ठेवावी. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरीता शिक्षण विभागाने किमान 10 शिक्षकांची नियुक्ती करावी. वन विभागाने साप व इतर वन्यप्राण्यांपासून कोणतीही हानी होणार नाही, यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवावे, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणूका कोकाटे आदी उपस्थित होते.

०००००००

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात

 राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 07 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर हे 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सफाई कर्मचा-यांच्या अडीअडचणी निवारणाकरीता आयोजित बैठकीस उपस्थिती, दुपारी 2 वाजता राखीव, दुपारी 3 वाजता चंद्रपूर महानगर पालिका येथे आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता महानगर पालिका येथे पत्रकार परिषदेला उपस्थिती, सायंकाळी 5 वाजता सफाई कर्मचा-यांच्या वस्त्यांना भेट, सोयीनुसार गडचिरोलीकडे प्रयाण.

०००००००

Friday, 4 September 2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज

Ø देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही सहभागी होण्याची संधी

Ø तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके

चंद्रपूर, दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य महोत्सवांतर्गत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षापासून ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात उत्साहपूर्ण वातावरणात तसेच विविध विधायक व समाजोपयोगी उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यावर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

 देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांसाठी स्वतंत्र तीन पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे आणि तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके जिंकण्याची संधी साधावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष शं. कुमरे यांनी केले आहे.

00000000