Search This Blog

Tuesday, 15 September 2026

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान


 

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान

Ø माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

मुंबई/ चंद्रपूर दि. 15 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

विविध विभागांच्या योजनांची माहिती

प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे.

शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.

कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

आंतरविभागीय समन्वयावर भर

‘लोकसंवाद-२०२६’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रत्यक्ष गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना थेट आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी

शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

ज्या गणेश मंडळांना  या  कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मुंबई शहर व उपनगर गणेश मंडळानी माहिती व जनसंपर्क विभाग,मंत्रालय मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

मंडळ ते मुख्यालय स्तरावर होणार महसूल लोक अदालत


मंडळ ते मुख्यालय स्तरावर होणार महसूल लोक अदालत

Ø 7 ऑक्टो, 4 डिसें 2026 आणि 17 फेब्रुवारी 2027 रोजी आयोजन

चंद्रपूर, दि. 15 : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनातसुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार आणि मंडळ स्तरावर 7 ऑक्टो व 4 डिसेंबर 2026 रोजी आणि 17 फेब्रुवारी 2027 रोजी ‘महसूल लोक अदालत’ घेण्यात येणार आहे.

अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत (चंद्रपूर, बल्लारपूर, मुल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना, राजुरा आणि जिवती) तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर अंतर्गत (चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही) येथे तसेच चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी आणि राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार (कोठारी, तळोदी आणि भिसी) तसेच मंडळ स्तरावर महसूल लोक अदालतीचे आयेाजन करण्यात आले आहे.

अशी राहील प्रक्रिया : 1) सुनावणीचे वेळी तडजोड योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यांवर अंतिम आदेश पारीत करून प्रकरण कायमस्वरुपी निकाली काढण्यात येईल 2) महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान मध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रकरणांची सुनावणी ही एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिका-यांचे आवाहन : वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची महसूल संदर्भात प्रकरणे असतील, त्या नागरिकांनी अधिवक्त्यांमार्फत या महसूल लोक अदालतीमध्ये सदर प्रकरणे ठेवावी. अधिवक्त्यांनी सुध्दा पुढाकार घेऊन आपसी तडजोडीची प्रकरणे महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढावी. जेणेकरून पक्षकांराचा वेळ आणि पैसा वाचेल व प्रकरण निकाली निघाल्याचे समाधान पक्षकारांना मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

बाप्पाच्या आठवणी व छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी 'बाप्पा डॉट ऑर्ग’ उपक्रम

 

बाप्पाच्या आठवणी व छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी 'बाप्पा डॉट ऑर्ग’ उपक्रम

Ø नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 14 : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हा सण आनंदाने साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी आणि या उत्सवाशी संबंधित कौटुंबिक कथा, बाप्पाचे फोटो, व्हिडीओ आदी बाबी डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (www.bappa.org) हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा, माहिती व छायाचित्रांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नोंदणी करणाऱ्या कुटुंबाला प्रमाणपत्र : आपल्या गणेशोत्सवाची माहिती यशस्वीरीत्या सादर करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभाग व नोंदणी पूर्णतः मोफत : नागरिकांना, 9136172681 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून किंवा Bappa.org या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. तसेच सोशल मिडीया फेसबुक, इंन्स्टाग्राम, युट्यूब, वरील @BappaOrg या सोशल मीडिया हँडलवरही उपक्रमाची माहिती उपलब्ध आहे.

००००००

Monday, 14 September 2026

बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

 

बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Ø बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा  ‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रम

Ø चिचपल्ली येथे ‘जागतिक बांबू सप्ताह 2026’चा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 14 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली.

बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांनी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. बांबूचा उपयोग केवळ पारंपरिक वस्तू तयार करण्यापुरता मर्यादित नसून आधुनिक डिझाईन, कलाकृती, शाश्वत उत्पादने आणि उद्योजकतेसाठीही प्रभावीपणे होऊ शकतो, असा संदेश या गणेशमूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला.

या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेलाही नवे स्वरूप मिळाले आहे. निसर्गाशी सुसंगत असलेल्या बांबूचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘बांबूचा बाप्पा’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला बीआरटीसीचे संचालक उमेश वर्मा, वनक्षेत्रपाल सतीश शेंडे, चिचपल्लीचे सरपंच चंदन उचेकर, न्यू एरा क्लिनिक सोल्युशनचे सचिन धात्रक आणि बीआरटीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बांबू हे ‘हरित सोने’ असून बांबूवर आधारित पर्यावरणपूरक उत्पादने, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ अंतर्गत तांत्रिक सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा समारोप १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिना’च्या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना 'बांबू फॉर द फ्युचर - फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोवेश' अशी असून बांबू संशोधन, नवोपक्रम, शाश्वत उपजीविका आणि हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

००००००

Sunday, 13 September 2026

भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन


 

भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे आवाहन

Ø भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात

नागपूर, दि. १३ :  भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे भेट देणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय समितीसमोर सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

     विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात याबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मनपा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

   राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीनुसार, राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अन्य संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सिव्हिल लाईन्स येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष  मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

सूचना व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वीय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. तसेच nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी विहित मुदतीत ई-मेलद्वारे आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यमान परीक्षा प्रणाली व विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल प्रक्रियेपर्यंतची सुरक्षा, प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी आणि मूल्यांकन याबाबत सूचना अपेक्षित आहेत.

तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली याबाबतही सूचना देता येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अभिप्राय समिती  समोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००