जिवती तालुका स्तरावरील जनता दरबार उत्साहात पार
७/१२ संगणकीकरणावर भर
चंद्रपूर, दि. 02 : जिवती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज (2 मार्च) तालुका स्तरावरील जनता दरबार कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, ओमप्रकाश गौड, जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर, गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, गटशिक्षणाधिकारी अमर साठे, तालुका कृषी अधिकारी माधुरी गावडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अवधेष फटींग, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता धिरज तंदीवार, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे, महावितरण कंपनीचे अभियंता जयस्वाल, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता राठोड तसेच नगर पंचायत जिवतीचे मुख्याधिकारी साठोने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, 'आपले सरकार सेवा केंद्र' मधील तक्रारी निकाली काढाव्यात. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ द्यावा.
सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला निर्देश दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांनी प्रास्ताविकतेत तालुक्यातील ७/१२ संगणकीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यात एकूण १३,४६० इतके ७/१२ अभिलेख असून त्यापैकी महसूल विभागाच्या ८,२२२ अभिलेखांपैकी ६,४१५ अभिलेख संगणकीकृत झाले आहेत. सुमारे १,८६० अभिलेख संगणकीकरणासाठी शिल्लक असून जवळपास ३,८०० अभिलेख संशयित स्वरूपातील आहेत. त्याबाबत रद्द करण्याची कार्यवाही उपविभागीय कार्यालय, जिवती येथे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ३,१६७ अभिलेख वन विभागाच्या नावे असल्याची माहिती देण्यात आली.
निवासी जिल्हाधिकारी श्री .कुंभार यांनीही ७/१२ संगणकीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी प्रशासनाच्या कार्याला दुजोरा देत, ज्यांचे ७/१२ अभिलेख संशयित यादीत आहेत त्यांच्या मूळ हक्कांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच जमीन मोजणी प्रक्रियेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यानंतर उपस्थित नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. विविध महसुली, जमीन नोंदी, मोजणी, प्रमाणपत्रे तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. संबंधित विभाग प्रमुखांनी तात्काळ मार्गदर्शन करून काही प्रकरणे जागेवर निकाली काढली, तर उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. भगत यांनी तर आभार तलाठी सागर कोडापे यांनी मानले. यावेळी महसूल, वन, भूमी अभिलेख, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, नगर पंचायत आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा जनता दरबार नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या : यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडून प्रशासनाला निवेदन सादर केले. यात सातबारा संगणकीकरण करून जमिनीची त्वरित मोजणी करून देणे, नगरपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नोंदवही उपलब्ध करून देणे, घरकुल बांधकामाकरिता पाच ब्रास मोफत रेती त्वरित उपलब्ध करून देणे, भूमी अभिलेख, महसूल विभाग व वन विभाग यांनी संयुक्तरित्या मोजणी करून देणे, अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, आदी विषयांची निवेदने देण्यात आली.
००००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment