जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशाचे अद्यायावतीकरण उपक्रमात बल्लारपूरची निवड
चंद्रपूर, दि. 27 : राज्यातील जमिनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय योजना 2024-25 अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशा अद्ययावत करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी नागपूर विभागातील बल्लारपूर तालुक्याची पहिल्या टप्यात निवड करण्यात आली आहे.
राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड झाली असून एकूण 18 तालुक्यामध्ये हा अद्ययावतीकरणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. जमिनीच्या सध्याच्या धारकाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करून शासकीय अभिलेख अद्ययावत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
निवड झालेल्या बल्लारपूर तालुक्यातील 5 गावांची या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 1) आष्टी 2) कळमना 3) जोगापूर 4) कोर्टामक्ता 5) कोर्टातुकुम या गावांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यात निवडलेल्या पाचही गावातील सर्व्हे नंबरचे नकाशे, गटनकाशे, टिपण आणि पोटहिस्सा नकाशे यांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या डिजीटल डेटाची पडताळणी देखील पूर्ण झाली असून पूढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे भुमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप यांनी सांगितले. तसेच सर्व खातेदारानी पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भूमि अभिलेख बल्लारपूरचे उपअधिक्षक अनिल देशमुख यांनी केले आहे.
प्रकल्पाचे फायदे : 7/12 आणि नकाशा यातील विसंगती संपल्यामुळे जमिनीचे व्यवहार पारदर्शक होतील. पोटहिस्सा मोजणीमुळे जमिनीच्या सिमावरून होणारे वाद कमी होतील. शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा अचुक डिजीटल नकाशा उपलब्ध होईल.
००००००

No comments:
Post a Comment