उष्माघात टाळण्यासाठी बांधकाम कामगार व ठेकेदारांना उपाययोजना करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 10 : उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच मालक, नियोक्ता व ठेकेदारांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी केले आहे.
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून काही वेळा उष्माघातामुळे जीवितहानीही होऊ शकते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. याच काळात इमारत बांधकाम व त्यासंबंधित कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. त्यामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. बांधकाम स्थळी पिण्याच्या थंड पाण्याची अखंड व्यवस्था ठेवावी.
कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत भर उन्हात काम करू देऊ नये. कामाच्या वेळेचे नियोजन करून पहाटेच्या वेळेत अधिक काम पूर्ण करणे योग्य ठरेल. तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी पिणे, तसेच गोड ताक, पन्हे, कोकम सरबत यांसारखी पेये घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आहारात ताजे अन्न, तांदळाची भाकरी, भाताची पेज, पालेभाज्या व फळे यांचा समावेश करावा.
काम करताना डोक्यावर टोपी, गॉगल तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकून ठेवावा.बांधकामस्थळी प्रथमोपचार पेटीत ORS पावडर व उष्माघातावरील औषधे उपलब्ध ठेवावीत. गर्भवती व आजारी कामगारांकडून काम करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या वेळेत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्याचे नियोजन करावे.
तसेच या काळात कामगारांना दुपारी 12 ते 4.30 दरम्यान शारीरिक श्रमाची कामे देऊ नयेत. चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेये टाळावीत. शिळे अन्न, जंक फूड तसेच अतितिखट व तेलकट पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment