Search This Blog

Wednesday, 24 June 2026

जिल्हाधिका-यांकडून पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीचा आढावा



जिल्हाधिका-यांकडून पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीचा आढावा

चंद्रपूर, दि.24 : गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 24) आढावा घेतला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, मा.सा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी करावी. तेथे सीसीटीव्ही व्यवस्थित आहे की नाही, याची सुध्दा पाहणी करा. त्यांचा रेकॉर्ड तपासावा. डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असेल तर केवळ परवानगी असलेल्या मेडीकलमधूनच गर्भपाताच्या औषधी विक्री करता येते. अवैधरित्या अशा औषधांची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रकारची माहिती देणा-यांचे नेटवर्क वाढवा. जेणेकरून धडक मोहीम राबविता येईल. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचासुध्दा शोध घ्या. तेथेही अवैध गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले.

            पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत खबरी योजनेनुसार, कोर्टात केस दाखल झाल्यानंतर खबरीला शासनाकडून एक लक्ष रुपये बक्षीस देण्यात येते. तसेच खबरीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. डिकॉय केस करीता मदत करणा-या गर्भवती महिलेलासुध्दा कोर्टात केस दाखल झाल्यानंतर एक लक्ष रुपये बक्षीस देण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

००००००

Tuesday, 23 June 2026

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत




 एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण - जिल्हाधिकारी वसुमना पंत

चंद्रपूर, दि.23 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रृटीरहित व सर्वसमावेशक ठेवण्याकरीता महाराष्ट्रात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एसआयआर मोहिमेंतर्गत 86.56 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील 70-राजुरा मतदारसंघात 92.99 टक्के मॅपिंग, 71-चंद्रपूर मध्ये 70.18 टक्के मॅपिंग , 72-बल्लारपूर मध्ये 87.25 टक्के मॅपिंग, 73-ब्रम्हपुरी 92 टक्के मॅपिंग, 74-चिमूर 93.13 टक्के मॅपिंग, 75-वरोरा मतदारसंघात 88.04 टक्के मॅपिंग अशी एकूण सहाही मतदारसंघात सरासरी मॅपिंगची टक्केवारी एकूण 86.56 आहे.

जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 15 लक्ष 56 हजार 064 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांची नोंदणी, मतदारांच्या तपशीलांची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे, दुबार नोंदीची तपासणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मतदारांनी मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, दुरुस्ती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी विहित कालावधीत दावे व हरकती सादर कराव्यात. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. सदर प्रक्रियेमध्ये बूथस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी घेऊन  मतदारांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

असे आहे वेळापत्रक : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1) प्रशिक्षण व पूर्वतयारी - 20 ते 29 जून 2026, 2) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी - 30 जून ते 29 जुलै 2026, 3) मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण- 29 जुलै 2026 पर्यंत, 4) प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी- 5 ऑगस्ट 2026, 5) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026, 6) दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी- 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 आणि 7) अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी- 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये इन्युमरेशन फॉर्मचे डाउनलोड कार्य 100 टक्के पूर्ण झाले आहे.

००००००

शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

 

शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान

Ø रक्त संकलन तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

चंद्रपूर, दि. 23 : रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ‘रक्तदान हेच जीवनदान’ असे म्हटले जाते. आपल्या रक्तदानामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. मंगळवारी नियोजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केले.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नियेाजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे रक्तदान शिबीर आयेाजित करण्यात आले होते. यात २२ ते २५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नायब तहसीलदार अजय मेकलवार यांच्यासह इतर कर्मचा-यांचा समावेश होता.

शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये १५ हजार २५८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत जवळपास साडेपाच  रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात विविध मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

 

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

Ø विवरणपत्र दखल न केल्यास 10 हजारांचा दंड

मुंबई /चंद्रपूर, दि. 23 : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल (PSP) वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांद्वारे कळविले आहे.

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 मधील कलम 14(1) (ब) व 14(3) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी 30 जून 2026 पर्यंत ऑनलाइन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.

०००००००

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि.23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा  पुरस्कार देण्यात येतो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासिन प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी जावून अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००

महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्कारासाठी नामांकन सादर करा


महिला सक्षमीकरणामध्ये पद्म पुरस्कारासाठी नामांकन सादर करा

चंद्रपूर, दि.23 : पद्म पुरस्कार - पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून प्रजासत्तक दिनाच्या (2027) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे. या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगिरीची दखल घेणे हा असून कला, साहित्य व शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरीसेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील / विषयांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जाते.

त्याअनुषंगाने भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय यांनी महिला सक्षमीकरणामध्ये यशस्वी कामगिरीची सर्वोच्च पायरी व योगदान दिले आहेत. त्या पात्र व्यक्तिंनी पद्म पुरस्कार- पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार करीता http://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात 31 जुलै 2026 पर्यंत आवेदन करावे. पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होईल, असे महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.

००००००

हिंदु खाटीक जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

 हिंदु खाटीक जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

चंद्रपूर, दि. 23 :  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळमार्फत हिंदु खाटीक जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2026-27 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांचे, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांचे, थेट कर्ज योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांचे, एनएसएफडीसी मुदती कर्ज योजनेअंतर्गत 3 लाभार्थ्यांचे, एनएसएफडीसी सुक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत 3 लाभार्थ्यांचे व एनएसएफडीसी शैक्षणीक योजनेअंतर्गत 1 लाभार्थ्यांचे असे एकू15 लाभार्थ्यांला कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

1) अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत, सदर योजनेत 25 हजार पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व 25 हजार पर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बैंकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

2) बिजभांडवल योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. 75 टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

3) घेट कर्ज योजना :  प्रकल्प मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 45 हजार रुपये कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते व 5टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

4) एनएसएफडीसी मुदती कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा 1 लक्ष 40 हजार ते 50 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मुल्याच्या 90 टक्के पर्यंत कर्ज महामंडळामार्फत 8 टक्के पर्यंत द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार रुपये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 7 वर्ष पर्यंत करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

5) एनएसएफडीसी सुक्ष्मपत पुरवठा : प्रकल्प मर्यादा 1 लक्ष 40 हजार रुपये, प्रकल्प मर्यादेच्या 9 लक्ष पर्यंत कर्ज, महामंडळामार्फत 6.50 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते. 

6) एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना : कर्ज मर्यादा 40 लक्ष, प्रकल्प मर्यादेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज, महामंडळामार्फत 6.50 टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 12 वर्षात करावी लागते. 10 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

वरील दिलेले योजनांचे अर्ज भरण्याकरीता व माहिती करीता हिंदु खाटीक समाज आर्थीक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपर येथे संपर्क करावा. अधिक माहितीकरीता दूरध्वनी क्र. 07172 -25354.

००००००

Monday, 22 June 2026

शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत


शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत

चंद्रपूर, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर, ता. चिमूर, येथे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित छायाप्रतींसह 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर, येथे उपस्थित राहावे.

रिक्त पदांचा तपशील : 1. शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), येथे मराठी (इयत्ता 6 वी ते 8 वी) करीता 1 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए., डी.एड., इंग्रजी विषयाकरीता (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद – बी.ए., डी.एड., मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी)  1 पद – एम.ए., बी.एड.

2. शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे विषय इंग्रजी (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.ए., डी.एड.,विषय-विज्ञान (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.एस्सी., डी.एड., विषय-मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड.

अटी व शर्ती : 1. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल, 2. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व आर्थिक तरतूद उपलब्ध झाल्यानंतर मानधन/वेतन अदा करण्यात येईल. 3.आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी अथवा जास्त करण्याचा, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा पदे संपुष्टात आणण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांना राहील. 4.मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय राहणार नाही.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाळेशी अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश


चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश

चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी मोहर्रम सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स (यात्रा) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने 25 जून व 26 जून 2026 रोजी भाविकांना समाधी दर्शनासाठी कारागृह परिसरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या पश्चिम दिशेला मुख्य तट क्र. 02 जवळ असलेल्या पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मोहर्रम सणानिमित्त उर्सचे आयोजन करण्यात येते. या उर्सासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील विविध समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात. 

उर्स कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कारागृह परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. तथापि, सुरक्षा व शिस्तीच्या दृष्टीने कारागृह परिसरात मोबाईल फोन, कॅमेरा तसेच पेढे, बर्फी किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास संबंधित भाविकास प्रवेश नाकारण्यात येईल.

भाविकांनी कारागृह प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी यावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक, चंद्रपूर जिल्हा कारागृह यांनी केले आहे.

००००००

मोहरम उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू


मोहरम उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 36 लागू

            चंद्रपूर, दि. 22 : मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी निर्गमित केले आहेत.

मोहरम उत्सव. 17 जून ते 26 जून 2026 या कालावधीत साजरा होत असून दि. 2526 जून रोजी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम व मिरवणुका आयोजित केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 24 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून 26 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत विशेष निर्देश लागू राहतील.

सदर आदेशान्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मिरवणुका व सभांमधील लोकांच्या वर्तनाबाबत निर्देश देणे, मिरवणुकांचे मार्ग व वेळ निश्चित करणे, धार्मिक स्थळांच्या परिसरात आवश्यक निर्बंध लागू करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य, ढोल-ताशे व ध्वनिक्षेपकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक सभा, मिरवणुका, वाद्य वाजविणे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच घोषणाबाजी यासाठी संबंधित पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे.

मोहरम उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

००००००

Sunday, 21 June 2026

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा – जिल्हाधिकारी पंत







 

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा – जिल्हाधिकारी पंत

Ø आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी केली योगासने

चंद्रपूर, दि. 21 : आजचे जीवन हे धावपळीचे झाल्यामुळे मानव हा सतत मानसिक आणि शारीरिक तणावात असतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविला तर आपण निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, खेलो इंडिया, शिक्षण विभाग आणि पंतजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.21) जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पंत बोलत होत्या. यावेळी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.

 योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जागतिक स्तरावर योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. रोज एक तास आपण नियमितपणे योगा केला तर आपले आजार आणि मानसिक तणाव नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी निरोगी जीवनासाठी योगासने करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, पुरातन काळापासून भारतात योग अस्तित्वात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. माणसाचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी रोज योगा करावा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईची बॅटरी रोज चार्ज करतो, त्याचप्रमाणे किमान 1 तास योगा केला तर आपण निरोगी राहू, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

तर महापौर संगिता खांडेकर म्हणाल्या, योगामुळे आपला फायदा असून निरोगी राहण्यास मदत होते. नियमितपणे योगा करावा व तंदुरुस्त राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी केले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक संदीप उईके, नंदू आवारे, खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भुजाडे, पतंजली योग समितीचे सुधाकर श्रीपूरकर, वैजंती गहूकर, शुभांगी डोंगरवार, निलिमा चरडे, अरुणा शिरभये, कविता मंघानी, सुभाष राजुरकर, सविता कोट्टी, संजय मंघानी, रोशन बावणे, सुवर्णा लोखंडे, प्रिती येलीचपुरवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार : जागतिक योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी ज्योती देऊरकर, मिशन लक्षवेध मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेलो इंडियाचे अंकिता चव्हाण आणि सोहम मोरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जलतरण तलावातही योगासने : मुख्य शासकीय कार्यक्रमापूर्वी जिल्हा क्रीडा संकूल येथील जलतरण तलावात 89 वर्षीय कृष्णाजी नागपूरे यांच्यासह सूवर्णा नागपुरे कामडे, संजीव कुमार जयपुरकर आणि प्रदीप मोहनापुरे यांनी ‘वॉटर योगा’ करून उपस्थितांची मने जिंकली.

उपस्थितांनी केली ही योगासने : यावेळी उपस्थितांनी स्कंदचक्रासन, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्टासन, उत्तांगपंडूतासन, वक्रासन, भुजंगासन, उत्तंगपादासन, पवनउत्तासन, शवासन, कपालभारती प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम, अनुलोमविलोम आदी योगासने केली.

०००००००

Saturday, 20 June 2026

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित



 

पंतप्रधानांच्या हस्ते 2400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

Ø प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, चंद्रपुरातही आयोजन

चंद्रपूर, दि. 20 : प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा आदी  उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना श्री. जोरगेवार म्हणाले, या योजनेत नियोक्ते व कर्मचारी या दोघांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते, हे या योजनेचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. चंद्रपूरचा उत्पादन व खाणकाम केंद्र म्हणून होणाऱ्या विकासावरही त्यांनी भर दिला. ही दोन्ही क्षेत्रे श्रमप्रधान असल्याने ही योजना या प्रदेशातील स्थानिक आस्थापनांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली.

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे : कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ एक योजना नाही. तर प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांच्या आकांक्षांना बळकटी देतानाच उद्योग आणि मनुष्यबळ यांच्यात भक्कम दुवा निर्माण करणारा एक उपक्रम आहे. ही योजना एकाच वेळी दोघांनाही पाठबळ देते. आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून तितक्याच प्रथमच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. जवळपास 20 लाख युवकांनी आपल्या पहिल्या नोकरीत सहा महिने पूर्ण केले असून, हा टप्पा पूर्ण केल्यानंतर सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान आधीच मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

2 हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हे पाठबळ केवळ आर्थिक मदत नसून, ते देशाने आपल्या युवकांच्या परिश्रमांना दिलेली मान्यता व त्यांच्या भविष्याविषयीचा विश्वास दर्शवते. गेल्या 12 वर्षांत भारताच्या रोजगार व्यवस्थेत झालेल्या महत्त्वपूर्ण परिवर्तनाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ‘रोजगाराला सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सामाजिक संरक्षणाशी जोडण्यावर शासनाचा भर राहिला आहे’ असे ते म्हणाले.

०००००००