Search This Blog

Thursday, 13 August 2026

पालकमंत्र्यांच्या हस्ते 9.05 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते 9.05 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता होणार आहे.

 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. वुईके जनतेला उद्देशून संबोधित करतील. यानंतर त्यांच्या हस्ते, उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.

००००००

Wednesday, 12 August 2026

उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. सामंत



 

उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. सामंत

Ø उद्योगांच्या मनुष्यबळासाठी चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्राची निर्मिती

Ø उद्योग विभाग, एमआयडीसी, आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 12 : उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलेले भूखंड वर्षानुवर्षे विनावापर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एमआयडीसीची जमीन उद्योग उभारणीसाठी आहे, त्याचा गैरवापर करू दिला जाणार नाही. उद्योजकांनी भूखंड घेऊनही उद्योग सुरू न केल्यास ते भूखंड परत घेऊन नवीन व इच्छुक उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.12) उद्योग विभाग, एमआयडीसी तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत (दूरदृष्यप्रणालीद्वारे) तर अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पोटे, मुख्य अभियंता राजेश जंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कारले, चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात एमआयडीसी क्षेत्रातील 200 भुखंड अनेक वर्षांपासून पडीत होते, असे सांगून उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, भुखंड घेऊन उद्योग सुरू न करणा-या या  200 जणांना नोटीस देण्यात आली आहे. यापैकी 67 भुखंड रद्द केले आहे. एमआयडीसीतील भूखंडांचे वाटप एका व्यक्ती अथवा उद्योगाच्या नावावर असताना प्रत्यक्षात त्याचा वापर दुसऱ्याच व्यक्तीकडून केला जात असेल तर त्याची तपासणी करा. भूखंडांचा वापर अवैध व्यवसायांसाठी होत असल्याचे आढळल्यास तातडीने कारवाई करावी. तसेच एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबतही कठोर भूमिका घेत भुखंड मोकळे करावे.

गोडपिंपरी औद्योगिक परिसरात 67.67 हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले आहे, तेथे पायाभूत सुविधांची कामे तातडीने हाती घेण्यात येईल. तसेच तेथे ‘ट्रायबल क्लस्टर’ विकसित करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना नियमित प्रशिक्षण द्यावे. ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने अधिकाधिक युवक-युवतींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा. स्वयंरोजगारासाठी पुढे येणाऱ्या युवक-युवतींना बँकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. पात्र उमेदवारांची कर्जप्रकरणे विनाकारण नाकारू नयेत, अशा स्पष्ट सुचनाही डॉ. सामंत यांनी दिल्या.

चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्राची निर्मिती : जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी चंद्रपूर येथे उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. उद्योगांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यानुसार स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यावर भर राहणार आहे. चंद्रपूर मधील आयटीआय संस्थांनाही उद्योगांशी जोडून उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे उद्योगांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होऊन जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल, असे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

चंद्रपूरचा पॅटर्न राज्यात राबविणार : चंद्रपूर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सुरू केलेल्या छापेमारीमुळे अवैध व्यवसायांना प्रतिबंध करण्यास मदत होत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राज्यातील इतर औद्योगिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन : नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन करताना शेतकरी व जमीनधारकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पद्धतीने पूर्ण करावी. एमआयडीसी बाबत गोंडपिपरी येथील शेतक-यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असून या बैठकीला आपण स्वत: ऑनलाईन उपस्थित राहू, अशी ग्वाही डॉ. सामंत यांनी दिली.

००००००

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन



 

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन

Ø उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची उद्योजकांसोबत चर्चा

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. वीज, पाणी व इतर मुलभुत सुविधा येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक उद्योगांची चंद्रपुरात यायची तयारी आहे. सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन असून चंद्रपूरला 80 टक्के आहे. आता मात्र गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांनाही 100 टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चंद्रपूर येथील बैठकीत घेतला.

बुधवारी (दि.12) जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत डॉ. सामंत यांनी जिल्ह्यातील उद्योगांबाबत चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. पुढे उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर करीता सुध्दा 360 कोटी रुपये मंजूर झाले असून राज्य शासनाच्या वतीने 180 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने 90 कोटी तर स्थानिक खनिज विकास निधीतून 90 कोटी देण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रात आता 20 टक्के जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) आरक्षित ठेवण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात 20 टक्के जागा एमएसएमईसाठी आरक्षित केल्याने छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काढून घेतलेले 18 भूखंड त्वरीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्यातील उद्योग चालले तरच बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा करण्यावर आपला भर राहील. उद्योगांचे नुकसान होऊ देणार नाही. कृषी आधारित उद्योगासाठी कृषी विभागाने उद्योग विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा उद्योगांनासुद्धा प्रोत्साहन देण्यात येईल. उद्योगाच्या इकोसिस्टीम मध्ये येथील स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. मोठ्या उद्योगांना लघु उद्योगांकडून कडून काय अपेक्षा आहे, याबाबत उद्योगांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेण्यात येईल. दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार झालेले दोन उद्योग भद्रावती परिसरात आले आहेत. यात न्यू एरा क्लिनटेक एनर्जी आणि ग्रेटा एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे, असेही उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पोटे, मुख्य अभियंता राजेश जंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कारले, चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा, न्यू एरा क्लिनटेकचे सचिन धात्रक, ग्रेटा एनर्जीचे वैभव कालकुटे, लॉयड्स मेटलचे प्रशांत पुरी, संदीप भाटिया, सुबोध कासुरकर, मिनाक्षी वाळके आदी उपस्थित होते.

००००००

डेटा मायग्रेशनकरीता जुन्या सेवार्थ प्रणालीतील कामकाज 20 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

 

डेटा मायग्रेशनकरीता जुन्या सेवार्थ प्रणालीतील कामकाज 20 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

Ø जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सर्व शासकीय कार्यालयांना सुचना

चंद्रपूर, दि. 12 : वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी वित्त विभागाच्या 1 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागू केली आहे. या सेवार्थ प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणाली मधील सर्व कर्मचा-यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित (डेटा मायग्रेशन) करण्याची प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्ध पातळीवर सुरू आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना, जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही नवीन कामकाज किंवा बील निर्मिती 20 ऑगस्ट 2026 नंतर करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर (संपूर्ण जिल्हा व तालुके) अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचा-यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच डेटा मायग्रेशनची प्रक्रिया आणि नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जुलै 2026 चे वेतन देयक तयार करणे इत्यादी कामकाज 20 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. याबाबत कोणालाही मुद्दतवाढ मिळणार नाही, असे निर्देश लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांनी दिले आहे.

तरी सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये डेटा मायग्रेशन व पायलट देयक तयार करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाशी समन्वय साधून विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करावे. यासाठी सर्व कोषागार / उपकोषागार कार्यालय सुटीच्या दिवशी सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.

००००००

Tuesday, 11 August 2026

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात


उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 11 : राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे 12 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा उद्योग विभागाबाबत आढावा बैठक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या अनुषंगाने आढावा बैठक, तसेच खादी व ग्रामोद्योग बाबत आढावा बैठक, दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे उद्योजकांसमवेत संवाद, दुपारी 1 वाजता लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक, दुपारी 3 वाजता मराठी भाषा विभाग आढावा बैठक व साहित्यिकांसोबत संवाद, दुपारी 3 वाजता नियेाजन भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता आनंदवन आश्रम, वरोराकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता आनंदवन आश्रम, वरोरा येथे भेट, सोयीनुसार आनंदवन येथून चंद्रपूरकडे प्रयाण आणि शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव.

००००००

क्रीडा प्रबोधिनीत सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश


क्रीडा प्रबोधिनीत सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश

चंद्रपूर, दि. 11 : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.

सन 2026-27 साठी शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत 8 क्रीडा प्रबोधिनीत मे 2026 मध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत प्रवेश अंतिम करण्यात आले होते. पुनश्च एकदा राज्य स्तरावर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यस्तर सरळ प्रवेश चाचणी कार्यक्रम अंतर्गत 17 ते 18 ऑगस्ट 2026 रोजी हँडबॉलची चाचणी होईल. खेळाडूंनी सकाळी 10 वाजता चाचणी स्थळी उपस्थित राहावे. तसेच    विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर येथे 18 ते 19 ऑगस्ट रोजी हँडबॉल चाचणी होईल. खेळाडूंनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विभागीय क्रीडा  संकुल, मानकापूर, नागपूर येथे उपस्थित राहावे

खेळाडूंसाठी सुचना : 1) सदर चाचणीकरिता येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर स्वतः करावयाची आहे. 2) संबधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा उदा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर अनुशंगिक सर्व मुळ कागदपत्रे व सुयोग्य स्पोर्ट कीटसह चाचणी स्थळी उपस्थित राहावे 3) सरळ प्रवेश चाचणीकरिता राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीयस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 4) खेळनिहाय कौशल्य चाचणीकरिता किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 5) खेळाडू 19 वर्षे वयोगटातील असावा.

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (हँडबॉल) भूषण इंगळे (मो. 7447654989) यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र हँडबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सदर चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

००००००

13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन

 13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन

          चंद्रपूर, दि.11 :  17 वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा ही 20 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत राहुरी जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हातील 17 वर्षाखालील मुला/मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य टिळक हायस्कुल, जिल्हा स्टेडीयम होणार आहे.

खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 नंतरचा असावा. (जन्म दाखला आवश्यक). निवड चाचणी करीता स्वत:ची किट आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो- 2 अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अहवान टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव विशाल चव्हाण यांनी केले आहे.

००००००

पशुसंवर्धन विभागात मिनी ट्रकसाठी निविदा आमंत्रित

 पशुसंवर्धन विभागात मिनी ट्रकसाठी निविदा आमंत्रित

चंद्रपूर, दि. 11 : जिल्हाअंतर्गत व जिल्ह्याबाहेर आवश्यकता भासल्यास पर प्रांतातून लागणारे द्रवनत्र व विर्यमात्रा वाहतुकीकरिता एका वर्षासाठी 2.25 ते 3 टन क्षमता (तत्सम क्षमतेचे मिनी ट्रक) असलेल्या मिनी ट्रकसाठी कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.

वाहतुकीबाबत संपूर्ण तपशिल व निविदा संबंधी सविस्तर अटी व शर्ती आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, चंद्रपुर यांचे कार्यालय आणि http://chanda.nic.in या संकेतस्थळावर बघावयास मिळतील. दरपत्रके भरण्याची मुदत 10 ते 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरपत्रके उघडण्यात येतील.

इच्छुक कंत्राटदारांनी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत आपली सीलबंद पत्रके या कार्यालयास सादर करावी. दरपत्रके प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करण्याचा अथवा त्यामधील कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा अधिकार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, चंद्रपुर यांनी राखून ठेवलेला आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सुरेशकुमार कुंभरे यांनी कळविले आहे.

००००००

14 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 14 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

            चंद्रपूर, दि.11 : जिल्ह्यातील 10 वी, आयटीआय पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे

            सदर मेळाव्यामध्ये एकूण 22 पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीत्सह (कमीत कमी तीन प्रती उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्याकरीता पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

००००००

Monday, 10 August 2026

चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टो. ते 17 ऑक्टो दरम्यान सैन्य भरती



चंद्रपूरमध्ये 2 ऑक्टो. ते 17 ऑक्टो दरम्यान सैन्य भरती

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 10 : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुल येथे 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सैन्य भरती रॅली (अग्निवीर भरती) आयोजित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेचा नुकताच आढावा घेतला. यावेळी सैन्य भरती कार्यालय, नागपूरचे डायरेक्टर कर्नल अंशित श्रीवास्तव, सुभेदार राजेंद्र सिंह, हवालदार ओम शिव कुमार, प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.

सैन्य भरती रॅलीसाठी आवश्यक बाबीवर तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या युवकासांठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कर्नल अंशित श्रीवास्तव यांनी सैन्य भरती करीता लागणारे साहित्य, येणाऱ्या अडचणी, जिल्हा प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य याबाबत सादरीकरण केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, भरती प्रक्रीयेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विसापूर स्टेडीयम उपलब्ध करून देणे, महानगरपालिकेशी समन्वय साधून साफसफाई, लाईटस व जनरेटरची व्यवस्था करावी.  सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पुरेशी कुमक उपलब्ध करून द्यावी. भरती केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखावी. उमेदवारांची मोठी गर्दी  झाल्यास गर्दीचे नियोजन व नियंत्रण करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भरती केंद्रावर येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने भरती केंद्र, मैदान, प्रवेशद्वार व इतर आवश्यक ठिकाणी तात्पुरता अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा. सर्व विद्युत वाहिन्या, खांब, मीटर व जोडण्या सुरक्षित असल्याची तपासणी करावी.

सैन्य भरती दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने रस्ते व संपूर्ण परिसराची स्वच्छता व साफ-सफाई जबाबदारी पार पाडावी. शहरातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या युवकांसाठी स्टेडिअममध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चार रुग्णवाहिका प्रथमोपचार साहित्य व आवश्यक जीवनरक्षक उपकरणांसह उपलब्ध करून द्यावी. उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तसेच आवश्यक सुचना स्थानिक भाषेत प्रसारीत करण्यासाठी शिक्षण विभागाने 10 शिक्षकांची नियुक्ती करावी, अशा  सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

००००००

‘त्या पोषण आहाराचा’ पहिला अहवाल चांगला


‘त्या पोषण आहाराचा’ पहिला अहवाल चांगला 

Ø फेरतपासणीचा अहवाल 3 महिन्यांनी उशिरा

Ø उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि. 10 : महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाक कृतीनुसार अंगणवाडी केंद्रांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त संस्थेमार्फत करण्यात येतो. अंगणवाडी केंद्रात आहार प्राप्त झाल्यानंतर लगेच मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आहाराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोणतीही तफावत दिसून आली नाही. जानेवारी महिन्यात पोषण आहाराचा पहिला अहवाल चांगला आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे यांनी स्पष्ट केले.

वितरित करण्यात आलेल्या पूरक पोषण आहारातील नमुने, फेरतपासणीसाठी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंडपिपरी व बाल विकास प्रकल्प अधिकारी पोंभुर्णा यांच्या मार्फत 18 डिसेंबर 2025 रोजी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या 30 मार्च 2026 रोजीच्या तपासणी अहवालानुसार काही नमुन्यांबाबत निर्धारित निकषांनुसार नमुना अनुरूप नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नमुना स्वीकारल्याचा दिनांक व प्रत्यक्ष आहाराच्या तपासणीचा दिनांक यामध्ये तीन महिन्याचा कालावधी लोटला गेला. तसेच पोषण आहारातील गहू आणि तांदूळ भारतीय अन्न महामंडळ यांच्याकडून उपलब्ध होतो.

सदर अहवाल प्राप्त होताच महिला व बालविकास कार्यालयाने तात्काळ गोंडपिपरी आणि पोंभुर्णा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून आहाराच्या वितरणाबाबतची माहिती व अहवाल मागवून घेतला. प्राप्त अहवालांची तपासणी केली असता, सदर पूरक पोषण आहारामध्ये जिवंत किडे असल्याबाबत डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये कोणतीही तक्रार प्राप्त नाही, प्रयोगशाळा अहवाल 30 मार्च व 22 एप्रिल 2026 ला प्राप्त आहे.

बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका/पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांना आवश्यक त्या नियमित सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आहाराचा साठा, प्राप्तीच्या वेळी आहाराची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत, रंग, वास, चव व इतर दृश्यमान बाबींची तपासणी करूनच आहाराचे वितरण करणे तसेच संशयास्पद किंवा गुणवत्तेबाबत शंका असलेला आहार बालकांना वितरित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे, ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असून, आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका आढळल्यास ती तात्काळ संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास कळविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग, जि.प.) भागवत तांबे यांनी केले आहे.

००००००

स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक


स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक

चंद्रपूर, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्ष सन 2026-27 पासून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरवले जाईल. मात्र जे विद्यार्थी वस्तीगृहाकरिता अर्ज करणार नाहीत, ते दोन्ही योजनांपासून वंचित राहतील. ज्या तालुक्यात वसतिगृहे नाहीत, तेथे हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या ऑनलाईन पोर्टलवर व्यावसाईक अभ्यासक्रम करिता तसेच मागील वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यात आलेल्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुतनीकरण करिता 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज नोंदविणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी कळविले आहे.

००००००

व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहाकरीता सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईनरित्या अर्ज नोंदणी करावे तसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह संबंधित वसतिगृह कार्यालयामध्ये सादर करावी. जे विद्यार्थी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करणार नाहीत व वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर व वसतिगृह कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

Friday, 7 August 2026

कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त

 

कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त

Ø 23 हजार 508 शेतक-यांचा समावेश

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

चंद्रपूर, दि. 07 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 च्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) 36 हजार 757 पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली होती. त्यापैकी शुक्रवारी (दि.7) सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांच्या कर्जमाफीचे 175 कोटी 78 लक्ष 55 हजार 144 रुपये बँकेला प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 कोटी 22 लक्ष पात्र शेतक-यांच्या कर्जमाफीची 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम बँकांना वितरीत केली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना, चालू खरीप हंगामात शेती कामांसाठी आर्थिक अडचण भासू नये, यासाठी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.

विशेष म्हणजे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजीटल आणि पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक अटी व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी तात्काळ करून करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

ऑफलाईन सुध्दा करता येणार तक्रार: ऑनलाईन तक्रार होत नसल्यास, संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे शेतकरी लेखी स्वरुपात ऑफलाईन तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.

००००००

बीआरटीसीत ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुरवात



बीआरटीसीत ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रमाची सुरवात

Ø पहिल्या बॅचचा उद्घाटन सोहळा

चंद्रपूर, दि. 07 : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) येथे भारतातील पहिल्या एआयसीटीई मान्यताप्राप्त ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ या अभिनव अभ्यासक्रमाचा 2026-27 (प्रथम बॅच) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

बांबू क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. देशातील बांबू उद्योगासाठी कुशल व तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सदर अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश व नागालँड राज्यातील विद्यार्थी सुद्धा आहेत. एआयसीटीई मान्यताप्राप्त डिप्लोमा अभ्यासक्रमाची एकूण प्रवेश क्षमता 60 आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बीआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक हृषिकेश रंजन, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वनअधिकारी राजन तलमले उपस्थित होते.

श्री. रामानुजम यांनी महाराष्ट्र व इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन करून येथे पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांच्या लाभ घेऊन आपली प्रगती साध्य करावी, असे आवाहन केले. तसेच इतर मान्यवरांनी बांबू विषयी माहिती देऊन, ब्राझील हा देश इथेनोलचे उत्पादन करून इंधनाच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण झाला, याबद्दल मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची यशस्वी पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमानुसार पार्श्व प्रवेश प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवी (बी.ई./बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल. 

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार यांनी प्रस्ताविकातून अभ्यासक्रमाचे महत्व या संबंधी माहिती दिली. आभार वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी मानले. यावेळी संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, बांबू उद्योजक आदी उपस्थित होते.

००००००

सिमांकन करून शिवपाणंद रस्ता मोकळा करण्यात येईल


सिमांकन करून शिवपाणंद रस्ता मोकळा करण्यात येईल

Ø म्हसली (विलम) येथील अतिक्रमणाबाबत नागभीड तहसीलदारांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि. 07 :  नागभीड तालुक्यातील म्हसली (विलम) येथील शेतात जाणा-या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतकरी वसंत गुरपुडे यांनी रस्त्यासाठी उपोषण केले होते. याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन नागभीड तहसीलदार यांनी कार्यवाही करीत भुमी अभिलेख विभागाकडून सिमांकन करण्याचे आदेशित केले. सिमांकन झाल्यानंतर, रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येऊन सदर रस्ता मोकळा करण्यात येईल, असे नागभीडचे प्रभारी तहसीलदार उमेश कवळे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या आश्वासनानंतर श्री. गुरपुडे यांनी उपोषण मागे घेतले आहे.

विलम येथील गट क्र. 203/1 च्या शेतजमिनीला जाण्याच्या रस्त्यावरून पाण्याचा पाट काढल्याने, शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याचा अर्ज वसंत गुरपुडे यांनी नागभीड तहसील कार्यालय येथे केला. या अर्जाची दखल घेऊन मेंढा किरमीटीचे मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिका-यांना मौका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केल्याशिवाय सदर रस्ता किंवा पाण्याचा प्रवाह सरळ करता येऊ शकत नाही, असा अहवाल मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिका-यांनी सादर केला.

त्यानुसार भुमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीसाठी 4 ऑगस्ट रोजी कळविण्यात आले. मात्र मोजणी प्रकरणातील सर्व तारखा निर्गमित झाल्या असून मोजणी प्रकरणाचे नोटीस संबंधितांना देण्यात आल्यामुळे तात्काळ भुकरमापक कर्मचारी उपलब्ध नाही. मात्र या प्रकरणात 10 ऑगस्ट रोजी मोक्यावर उपस्थित राहून पाणंद रस्त्याची मोजणी करण्यात येईल, असे भुमी अभिलेख कार्यालयाने कळविले.

त्यानुसार आता 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता म्हसली (विलम) येथील अतिक्रमीत रस्त्याची ग्रामपंचायत सचिव व रोजगार सेवकांच्या उपस्थितीत मोजणी होणार आहे. मोजणीच्या वेळी शिवपाणंद रस्त्यावर ज्याचे अतिक्रमण आढळून येईल, त्यांचे अतिक्रमण काढून रस्ता पुर्ववत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे नागभीडचे तहसीलदार श्री. कवळे यांनी म्हटले आहे.

०००००००

लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत


 लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत

Ø माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 07 :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर करीता माजी सैनिक प्रर्वगातून अशासकीय व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने लिपिक टंकलेखक पद भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखाती करीता हजर राहावे. अशासकीय लिपिक टंकलेखक या पदाकरीता इंग्रजी, मराठी टंकलेखन व संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,

असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

 सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

चंद्रपूर, दि. 07 :  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, प्रादेशिक कार्यालय हे मधुबन प्लाझा, मुल रोड चंद्रपूर येथून लगतच्या व्यंकटेश कॉम्प्लेक्स, पहिला माळा, मुल रोड, माउंट कॉनव्हेंट जवळ, चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले आहे, असे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

००००००

रक्षाबंधनानिमित्त रेल डाक सेवा काउंटरवर बुकिंगची सुविधा


रक्षाबंधनानिमित्त रेल डाक सेवा काउंटरवर बुकिंगची सुविधा

चंद्रपूर, दि. 07 : रक्षाबंधन सणानिमित राखी, भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी चंद्रपुर रेल डाक सेवा सॉर्टिग काउंटर, मुख्य डाक घर बिल्डींग येथे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त राखीचे पार्सल वेळेवर रवाना आणि वितरित करता यावेत, यासाठी सदर काउंटर दुपारी 4 ते रात्री 8.30 या वेळेत सुरू राहील. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतरही आपली पार्सल सोयीस्करपणे बुक करता येतील. रात्री उशिरापर्यंत बुकिंगच्या काउंटरवर स्पीड पोस्ट,पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध असतील.

नागरिकंनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा आणि भारतभर तसेच परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू, मिठाई आणि सणासुदीच्या इतर वस्तू वेळेवर पोहोचवण्यासाठी बुक कराव्यात. वितरण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी ग्राहकांनी वस्तूंचे योग्य पॅकिंग करावे, पूर्ण टपाल पत्ता व अचूक पिन कोड नमूद करावा आणि प्राप्तकर्त्याचा मोबाईल क्रमांक ‌द्यावा, असे आवाहन रेल डाक सेवा विभागाचे अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

००००००

चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 07 : संत रोहीदास चर्मोद्योग  व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील चांभार ढोर, होलार, मोची  या जातीतील समाजबांधवासाठी स्वयंरोजगाराकरिता सन 2026-27 या चालु वर्षात विशेष घटक योजना (50 हजार रुपये) व बिज भांडवल (50 हजार ते 5 लाखांपर्यंत) या योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

विशेष घटक योजनेमध्ये 25 हजार रुपये अनुदान व   बिज भांडवल योजनेमध्ये 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. 18 ते 50 वयोगटातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 5 August 2026

एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 99.69 टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण


एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 99.69 टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

Ø गणना प्रपत्र जमा करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Ø अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 27 ऑक्टोबर रोजी

चंद्रपूर, दि. 05 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम – 2026’ राबविण्यात येत आहे. ‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये’ या मुख्य उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 5 ऑगस्ट 2026 पर्यंत 17 लक्ष 97 हजार 027 मतदारांना (99.97%) गणना प्रपत्रे (इन्युमरेशन फॉर्म) वितरित करण्यात आली आहेत. यापैकी 17 लक्ष 92 हजार 133 मतदारांचे डिजिटायझेशन (99.69 टक्के) पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देऊन सुधारित कालावधी जाहीर केला आहे.

जिल्ह्यात एकूण 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता, 70-राजूरा, 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपूरी व 74-चिमूर या मतदारसंघांमध्ये एकूण 100 टक्के काम पूर्ण झाले असून 75-वरोरा येथे 99.81 टक्के तर 71-चंद्रपूर मतदारसंघात 98.63 टक्के काम पूर्ण झाले आहे.

असा आहे पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम : 1) मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ) घरोघरी भेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत, 2) मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना 17 ऑगस्ट, 3) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 24 ऑगस्ट 2026, 4) दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत, 5) नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026, 6) अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 27 ऑक्टोबर 2026

नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन : 1) सध्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन पडताळणी करत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप आपले गणना प्रपत्र (इन्युमरेशन फॉर्म) अचूक भरून जमा केले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओ कडे 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत ते जमा करावे. 2) जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. 3) लोकशाही बळकटीकरणासाठी आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

0000000

चंद्रपुरात 67 शासकीय व खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस


चंद्रपुरात 67 शासकीय व खासगी कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Ø 'पॉश' कायद्याची अंमलबजावणी न करणे भोवले

Ø ‘SHE BOX पोर्टलवरील नोंदणीसह नियमांचे पालन बंधनकारक

चंद्रपूर, दि. 5 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 (POSH Act) तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 96 शासकीय आणि 33 खासगी कार्यालये व कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी नियमांची पूर्तता न केल्यामुळे 43 शासकीय व 24 खासगी अशा एकूण 67 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

राज्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने जून 2026 पासून 4 हजारांहून अधिक तपासणी अधिकाऱ्यांमार्फत शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 3579 शासकीय आणि 3296 खासगी अशा एकूण 6875 कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नियमांची पूर्तता न केलेल्या 294 शासकीय व 378 खासगी अशा एकूण 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या कार्यालयांवर POSH Act, 2013 मधील तरतुदीनुसार 50 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत ही कारवाई केली जाणार आहे. महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांना POSH Act, 2013 मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या SHe-Box पोर्टलवर कार्यालयाची नोंदणी, अंतर्गत तक्रार समितीची स्थापना व नोंदणी, समिती सदस्यांचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे जनजागृती व प्रशिक्षण, तसेच वार्षिक अहवाल पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

तपासणीदरम्यान या बाबींची पूर्तता न झाल्याचे आढळल्यास संबंधित कार्यालय, संस्था किंवा कंपनीविरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हाधिकारी धान रोवणीच्या बांधावर

 जिल्हाधिकारी धान रोवणीच्या बांधावर

Ø महिला शेतक-यांसोबत संवाद ; जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर, दि. 05 : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात रोवणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत मंगळवारी थेट तळोधी (बा.) येथील धानाच्या बांधावर पोहचल्या. धान रोवणीमध्ये व्यस्त असलेल्या महिला शेतक-यांसोबत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिका-यांनी ऐकून घेतल्या.

पावसाचे स्वरूप, शेतीसाठी आवश्यक सुविधा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केली. तसेच शेतक-यांच्या समस्यांकडे अधिका-यांनी संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी. प्रत्यक्ष शेतात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तळोधी (बा.) येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून ऑनलाइन धान्य वितरण व्यवस्थेची तपासणी केली. तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. नगर पंचायतीतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांना त्याचा होणारा लाभ याबाबत कृषी विभाग, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. अपर तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेताना नागरिकांना शासकीय सेवा विहित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

या दौऱ्यावेळी तळोधीचे तहसीलदार शेखर पुनसे, अविनाश शेमबटवाड, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी श्री. चांदेकर आदी उपस्थित होते.

००००००