ग्रामपंचायतींत कृषी ग्रंथालये
नाविण्यपूर्ण योजनेचा थाटात शुभारंभ
चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर: जिल्ह्यातील नागरिकांची उपजिविका साधरणातः शेतीवर अवलंबून आहे. या जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी विषयक नवतंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, हा दृष्टीकोन उराशी बाळगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील संपूर्ण ग्राम पातळीवर कृषी ग्रंथालयांची निर्मिती केली जात आहे. या ग्रंथालयांची कल्पना स्थानिक ग्राम पंचायतींनी शेतकर्यांना द्यावी. एक नव्हे तर तब्बल 227 पुस्तकांतील वेगवेगळे कृषीविषयक ज्ञान शेतकर्यांना मिळेल. ही ग्रंथालये शेतकर्यांची आर्थिक प्रगती साधणारी ठरावीत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांची प्रगती झाली. तर देशाची प्रगती निश्चित होईल. शेतकर्यांनी या माध्यमातून हरीतक्रांती घडवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेतून कृषी ग्रंथालय निर्मितीचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात झाला. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. उदय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळभोर, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे आदींची उपस्थिती होती.
राहुल कर्डिले यांनी वाचनामुळे ज्ञान वाढते.कृषी ग्रंथालयातील पुस्तके हे एक शस्त्र आहे. या शस्त्राच्या माध्यमातून शेतकर्यांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. उदय पाटील यांनी शेतीविषयक संदेश दिला. उपस्थितांनी यावेळी मार्गदर्शन केले.
शेतकर्यांना शेतीविषयक नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यांच्या उत्पन्नात भरभराटी यावी, यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. आता शेतकर्यांना त्यांच्या गावातच कृषी विषयक ज्ञानाच्या माहितीचा खजीना मिळणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 800 ग्राम पंचायतींमध्ये कृषी ग्रंथालयाची निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येकी ग्राम पंचायत स्तरावर दोन आलमारी देण्यात आली असून, त्यात हळद लागवड, कापूस लागवड, किडरोग नियंत्रण, सेंद्रीय शेती, विषमुक्त शेती, शेतीपुरक पक्षी यासह 227 पुस्तकांचा भांडार उपलब्ध राहणार आहे. या योजनेसाठी 3 कोटी 20 लाखाचा निधी खर्च केला जाणार आहे. याप्रसंगी कृषी विषयक पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर 10 ग्राम पंचायतींना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर किरवे यांनी केले. संचालन व आभार जिल्हा कृषी अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment