चिमूरच्या क्रांती भूमीत हजारो महिलांच्या साक्षीने शहिदांना अभिवादन
शहीद दिन, रक्षाबंधन कार्यक्रमाचे चिमूरमध्ये शानदार आयोजन
दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना क्रांती भूमीत अभिवादन
चिमूर दि. 16 ऑगस्ट (जि. चंद्रपूर ): चिमूरच्या क्रांतिभूमीमध्ये शहिदांना अभिवादन करताना जमलेल्या तमाम महिला भगिनींना माझी विनंती आहे की, त्यांनी रक्षाबंधनाला आपल्या भावाकडून समान हक्काच्या, सशक्त स्त्री समाजाच्या निर्मितीचे अभिवचन घ्यावे, तशी ग्वाही आपल्या भावाकडून घ्यावी व आपणही त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज येथे केले. चिमूरच्या क्रांतिभूमीत शहिदांना अभिवादन केल्यानंतर हजारोच्या संख्येने जमलेल्या महिला समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षी क्रांती दिनाला चिमूर येथे शहिदांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या वर्षी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. चिमूरच्या बीपीएड कॉलेज मैदानावर आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात शहिदांना आदरांजली, रक्षाबंधन तसेच दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनाला अभिवादन करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला परिसरातील हजारोच्या संख्येने महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर चिमूर गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार मितेश कुमार भांगडिया, ज्येष्ठ नेते रवी भुसारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, वसंत वारजुरकर, मायाताई नन्नावरे ,डॉ. दीपक यावले,सुमनताई पिंपळापुरे, नगराध्यक्ष उमाजी हीरे, गणेश तळवेकर, रेखाताई कारेकार, मनोज मामीडवार यांच्यासह चिमूर क्रांतीतील शहीदांचे नातेवाईक व्यासपीठावर उपस्थितीत होते.
दुपारी तीन वाजता अमृता फडणवीस यांचे चिमूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शहिदांना हुतात्मा स्मारक, किल्ल्यावरील शहीद स्मारक येथे अभिवादन केले. या ठिकाणी शहिदांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर येथील बीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये उपस्थित महिलांना संबोधित केले.
दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी येथे क्रांती भूमीत शहिदांना अभिवादन केल्या जाते. चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरुद्ध उठाव झाला होता या लढ्याचे हे 77 वर्ष आहे.
आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधनानिमित्त या वर्षी परिसरातील महिलांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या होत्या. यावेळी महिलांना संबोधित करताना अमृता फडणवीस यांनी सर्वप्रथम दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. या देशाला लाभलेले अतिशय हळवे, कविमनाचे मात्र तेवढेच कणखर प्रधानमंत्री म्हणून ते इतिहासात अमर आहेत. या देशाच्या परराष्ट्र धोरणाला, आर्थिक संपन्नतेला व शैक्षणिक प्रगतीला त्यांच्या काळात गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधनानिमित्त या वर्षी परिसरातील महिलांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या होत्या. यावेळी महिलांना संबोधित करताना अमृता फडणवीस यांनी सर्वप्रथम दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. या देशाला लाभलेले अतिशय हळवे, कविमनाचे मात्र तेवढेच कणखर प्रधानमंत्री म्हणून ते इतिहासात अमर आहेत. या देशाच्या परराष्ट्र धोरणाला, आर्थिक संपन्नतेला व शैक्षणिक प्रगतीला त्यांच्या काळात गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यांच्या भाषणापूर्वी सर्व वक्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त बहिणीच्या रक्षणाचे अभिवचन आपल्या भाषणात दिले होते. हा धागा पकडून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना आता भावांकडून केवळ रक्षा करण्याचे आश्वासन नको, तर समानतेने ,समान अधिकाराने, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बहिणीला अज्ञानापासून, गरिबीपासून, वाईट प्रथापरंपरेपासून रक्षण करण्याचे अभिवचन आपल्या भावांकडून घ्यावे, असे आव्हान त्यांनी यावेळी महिलांना केले.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद सांगतांना त्या म्हणाल्या, या ठिकाणी ज्या महिला आल्या आहेत.त्यांनी विशेषत: आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे. मुलगा-मुलगी समान असे धोरण अवलंबून मुलींना देखील त्याच सक्षमतेने समाजापुढे उभे करावे, प्रगत देशासाठी सशक्त महिला समाज अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने त्यासाठी वेगळे काहीतरी केले पाहिजे. आज शहिदांना अभिवादन करून क्रांतिभूमीमधून घरी परत जाताना सक्षम महिला जगाच्या निर्मितीचा निश्चय करावा. आपल्या गावाचे, आपल्या शहराचे, आपल्या भागाचे, नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी स्त्रियांनी पुढे यावे.
आपल्या स्त्री सक्षमीकरणाचा मुद्दा आणखी समर्थपणे मांडताना त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांच्या "कदम मिला कर चलना होगा " या कवितेच्या ओळीने केला.
या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तीकुमार उपाख्य बंटी भांगडिया यांनी संबोधित करताना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आपल्या मतदारसंघातील भगिनींचे आभार मानले. यावेळी पंचायत समिती प्रशासकीय इमारत, सामाजिक न्याय विभागांतर्गत नवनिर्मित चिमूर येथील शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, चिमूर वडाळा पैकु येथील शहीद बालाजी रायपूरकर यांच्या भव्य सभागृह आणि महावितरण अंतर्गत नवनिर्मिती चिमूर तालुक्यातील जांभुळ घाट येथील 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाल्याची घोषणा केली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चिमूर मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामाचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री महोदयांनी नव्या जिल्ह्यांच्या घोषणेमध्ये चिमूरला अग्रस्थान दिले आहे. ज्यावेळी राज्यातील अन्य जिल्ह्याची घोषणा होईल त्यात चिमूर जिल्हा असेल असे स्पष्ट अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची आठवण उपस्थित जनसमुदायाला दिली. तसेच चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी पदाची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. चिमूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आमदार मितेश कुमार भांगडिया, ज्येष्ठ नेते रवी भुसारी यांनी देखील संबोधित केले. खासदार अशोक नेते यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाचे लोकसभा विजयासाठी आभार मानले. तसेच या मतदारसंघांमध्ये रेल्वेचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी आपण वचनबद्ध असून त्यासाठी संसदेच्या पटलावर प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
0000000
No comments:
Post a Comment