Search This Blog

Friday, 3 July 2026

जिल्ह्यातील 1 लक्ष 41 हजार 646 शेतकऱ्यांना 32.60 कोटींचा लाभ


जिल्ह्यातील 1 लक्ष 41 हजार 646 शेतकऱ्यांना 32.60 कोटींचा लाभ

Ø डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

Ø नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

चंद्रपूर, दि. 3 : राज्य शासनाने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी  शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर केली आहे. यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लक्ष 41 हजार 646  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32 कोटी 60 लक्ष 8 हजार रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या  शेतकऱ्यांसाठी  वरदान ठरत आहे.

शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाची संपुर्ण परतफेड प्रतीवर्षी 30 जून पूर्वी केल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज सवलत, अनुदान स्वरुपात देण्यात येते. राज्य शासनाने 3 लाखांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जासाठी वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत सन 2021-22 पासूनच्या पीक कर्जास लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजना (सामान्य) (स्टेट पूल) अंतर्गत 1 लक्ष 18 हजार 624 शेतक-यांना 27 कोटी 70 लक्ष 8 हजार रुपयांचा लाभ, डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजना (सामान्य) (डीपीसी) अंतर्गत 18 हजार 417 शेतक-यांना 4 कोटी, डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजना (विघयो) अंतर्गत 2852 शेतक-यांना 50 लक्ष, आदिवासी उपयोजना डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजना (टीएसपी) अंतर्गत 773 शेतक-यांना 20 लक्ष आणि आदिवासी उपयोजना डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज व्याज सवलत योजना (ओटीएसपी) अंतर्गत 980 शेतक-यांना 20 लक्ष रुपये असे एकूण 1 लक्ष 41 हजार 646 शेतक-यांना 32 कोटी 60 लक्ष 8 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.              

ही योजना म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात न ठेवता त्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणारी ठरत आहे. व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज घेणे तसेच हे कर्ज नियमितपणे भरणे आवश्यक आहे. जे शेतकरी या दोन्ही अटी पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज परत मिळते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी या योजनेचे लाभार्थी पात्र आहेत. त्यामुळे  कर्जदार शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा एकत्र लाभ मिळणार आहे.

०००००

No comments:

Post a Comment