Search This Blog

Tuesday 13 July 2021

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी गुल्हाने

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

चंद्रपूर, दि. 13 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेत सहभागी व्हावे आणि आपले पीक सुरक्षित व संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा समितीची सभा नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, कृषि विकास अधिकारी जि.प. शंकर किरवे, जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडीयाचे व्यवस्थापक श्री. झा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री. खिरटकर उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी म्हणाले, चंद्रपुर जिल्हयासाठी भारती एक्सा जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती झाली असून ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छीक आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2021 आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के असून पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, पिकाच्या पेरणीपूर्वी /लावणीपुर्वी नुकसान, अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकुल घटकामुळे अधिसुचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी /लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे. तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ.बाबीमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनात 50 टक्के हुन अधिक काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी /काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून  ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

योजनेत सहभागी होण्यासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतक-याने आपला 7/12 चा उतारा, बैंक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंम घोषणापत्र घेवून विमा हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी किंवा www.pmfby.gov.in याशासकीय विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा, त्याची पावती लगेच मिळते. आपण नोंदविलेल्या मोबाईलवर SMS येतो, कॉमन सर्विस सेंटर (CSC)आपले सरकारच्या मदतीने विमा योजनेत सहभागी होऊ शकतो.

नुकसान भरपाई मिळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे आकस्मात नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनीस,संबंधित बँक, कृषि/महसुल विभाग किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्र.१८००१०३७७१२ यावर कळवावे, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हयातील सर्व तालुका कृषी अधिकारी, भारती अॅक्सा जनरल इन्शुरंस कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी पंकज कुशवाह आदी दुरदृश्यप्रणाली व्दारे उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment