Search This Blog

Monday 15 July 2019

कौशल्याच्या आधारे जग जिंकता येते : ना. मुनगंटीवार



कौशल्यपूर्ण प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्याकरीता युवकांनी
पुढाकार घेण्याचे आवाहन
v कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत जागतिक
युवा कौशल्य दिन साजरा
चंद्रपूर. दि, 15 जुलै: अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून युद्धाच्या माध्यमातून जग जिंकता येत नसून या जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला कौशल्याच्या आधारे जिंकता येते. त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहे. त्याचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील युवकांनी उद्योगांमध्ये पुढाकार घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित युवाशक्तीला आवाहन केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 15 जुलै रोजी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक उद्धव येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.
15 जुलै रोजी देशात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. चंद्रपूरमध्ये विविध मार्गदर्शक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून बोलतांना ते म्हणाले, या दिनी फक्त कार्यक्रम आयोजित करून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याचा दिवस नाही. तर देशातील युवकांनी स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्प करण्याचा हा दिवस आहे. भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. 1750 मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारत देशाचे उत्पन्न 50 टक्के होते. परंतु आज  गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. कारण युवकांना स्वतःचे कौशल्य ओळखता आलं नाही. म्हणून आजही आपला देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. आपल्या युवकांमध्ये शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज असून त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून कौशल्य भारत योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा व कौशल्य निर्माण करून स्वतःसोबतच देशाचाही विकास साधावा. हाच खरा भारत मातेचा जयजयकार असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना  युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केलेली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती तसेच टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू केलेला असून या माध्यमातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळेची निर्मिती करण्यात आलेली असून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल. जिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व  कृषी संपत्तीची कमतरता नसून त्या आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे बांबूवर आधारित उद्योग करणाऱ्या महिला तसेच युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारत देशामध्येच लागला असून त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी करावा. जग बदलाची तसेच देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी आणि जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित युवकांना दिल्या.
नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्या देशात 2015 पासून हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथिल स्किल अँड इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेमार्फत पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थित युवांमध्ये उद्योग संबंधित शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. सोबतच विविध तज्ञांचे मार्गदर्शन  करण्यात आले. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. नरेश उगेमुगे यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास या विषयावर तर राहुल ठाकरे यांनी महाराष्ट्र हिरकणी योजना व कृषीआधारीत उद्योग याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हि-याला पैलू पाडणाऱ्या कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. या केंद्राचे संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य विकासामध्ये कार्य करणाऱ्या अग्रणी संस्थांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी तसेच कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
000000

No comments:

Post a Comment