संविधान दिनाला जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माहिती आपल्या दारी अभियानाला सुरुवात
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: शेतकरी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे. शेतीच्या उपयोगी असलेले तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर पोचण्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. आज संविधान दिवसासारख्या पवित्र दिवसाला जिल्हा माहिती कार्यालयाने शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याचा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल असा आशावाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी भवन येथे चित्ररथ अनावरण सोहळ्यात बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चनाताई जीवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, कृषी विकास अधिकारी एस. किरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कोकोडे, सिद्धार्थ फुलझेले, रोशन रामटेके, मौर्यकांत गोहने, विठ्ठल कोठे, पर्वतराव कुळमेथे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांच्या दारी या अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धी व प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याकडून योजनेची अंमलबजावणी असे या अभियानाचे स्वरूप आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अंतर्गत 70 टक्के निधी शेतकरी योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 15 चित्ररथ गावोगावी फिरणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ बहुतेक गावात जाऊन शेती संदर्भातील योजनांची प्रसिद्धी करणार आहे. या चित्ररथाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून त्यांना गावोगावी फिरण्यासाठी रवाना करण्यात आले. तसेच आठवडी बाजाराच्या ठिकाणी आणि आणि जास्तीत जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये हे पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शेतकऱ्यांना योजना संदर्भात संपूर्ण माहिती देता यावी. या दृष्टिकोनातून 3 लाख पत्रकांचे जिल्हाभरातील प्रत्येक शेतकऱ्याला वितरण करण्यात येणार आहे. तसेच या आठवडाभर स्थानिक वृत्तपत्राच्या साह्याने प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सोबतच जिल्हाभरात योजनांचे फलक लावण्यात आले आहे.
शेतकऱ्याच्या उन्नतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. याद्वारे शेतीसंदर्भात संदर्भातील योजनांची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जिथे आवश्यकता आहे. तिथे डब्लूडब्लूडब्लू डॉट आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असून जिल्ह्याला सिंचनक्षम जिल्हा बनवण्यासाठी कृषी विभागाच्या सिंचनासंदर्भातील योजनांचा लाभ घ्यावा. यात काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केलेल्या हॅलो चांदा या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
|
000
No comments:
Post a Comment