जिल्हा माहिती कार्यालयात संविधान दिन
चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय समाजामध्ये प्रचंड असमानता होती. त्या काळात फक्त श्रीमंतांना मतदान करण्याचा अधिकार होता. परंतु संविधानामुळे भारतात समानता प्रस्थापित होऊन सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाले. त्यामुळे संपूर्ण समाज भयमुक्त झाला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेविका विमलताई गाडेकर यांनी व्यक्त केली. जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर मार्फत आयोजित संविधान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना महिलांना अनेक अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले असून समाजातील प्रत्येक मागासवर्गीय वंचित घटकाला समानतेचा अधिकार प्राप्त झाला. मानवतेची जाण असणारा समाज निर्माण व्हावा. याकरिता व्यवहार कसे असावे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हित जोपासत असताना दुसऱ्याचे अहित होणार नाही याची काळजी काळजी घेण्याची जाणीव संविधान आपल्याला करून देते. प्रत्येकाला जगण्याचा, वावरण्याचा व आनंदमय जीवन जगण्याचा अधिकार असून त्याला तो प्राप्त करण्यासाठी संविधानाने प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी मार्गदर्शन करताना देशातील जनतेला खरे स्वातंत्र्य संविधानाला मान्यता मिळाल्यानंतरच मिळाले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी संविधानाबद्दल माहिती सांगितली. सोबतच जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी संविधानाची उद्देशिका उपस्थितांना समजावून सांगितली. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सचिन दळवी तर आभार सुरज साळुंके यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment