Search This Blog

Tuesday 23 February 2021

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला


 शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी :  पुढील पाच दिवसात दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात आंशिक ढगाळ हवामान राहून कमाल तापमान ३४.८ ते ३७.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.८ ते १८.३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शेतकऱ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पुढीलप्रमाणे हवामान आधारीत कृषी सल्ला दिला आहे.

उन्हाळी भुईमूंग-पेरणी –

१.उगवणीनंतर १० दिवसाच्या आत खांडया भरून घ्याव्यात.

२.तननाशकाच्या सहाय्याने तन  व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉस इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० टक्के एस.एल.१०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टरी ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा –फुल ते घाटे अवस्था

१.परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची तात्काळ काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा इमामेक्टीन बॅझोएट ५ टक्के एस.जी. ३ ग्रम किंवा क्लोरॉनट्रीनीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी धान –फुटवे अवस्था

१.         उन्हाळी धान पिकाच्या रोवणीस ३० दिवसानंतर उरलेल्या ५० टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा २५ टक्के (५४किलो) युरीया प्रति हेक्टरी दयावे. खते दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावे.

२.         गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी दाणेदार फोरेट १० टक्के १० किलो किंवा दाणेदार क्विनालफॉस ५ टक्के ५ किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये ५ ते ७ सें.मी. पाणी असतांना टाकावे.

३.         पिकाची वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सेंमी व फुटवे फुटण्याच्या अवस्थेत ३ ते ५ सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.

गहु- दाण्याची दुधाळ अवस्था

१.गहु पिकांमधील उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमिषाचा वापर करावा त्यासाठी धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमोडिओलॉन एकत्र मिसळावे. १० ग्रॅम विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे व बिळाचे तोंड बंद करावे.

२.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी  १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई –फुल ते बोन्डे

करडई पिकाची पाने व बोन्डे पिवळया पडल्यानंतर पिकाची ताबडतोब कापणी करावी व मळणी करून बी अलग करावे व बियाणे स्वच्छ करून, वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

लाखोळी-शेंगा पक्वता

लाखोळी पिकाची पक्वतेनुसार काढणी कापणी करून उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले बियाणे स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी तीळ- वाढीची अवस्था

१.उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नागे भरावेत. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात १० ते १५ सें.मी. अंतर ठेवावे.

२.आवश्यकतेनुसार २ ते ३ कोडपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. तीळ पीक एक महिण्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

भाजीपाला पिके- वाढीची अवस्था

भाजीपाला पिकावरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस.एल. २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारण्या दर १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा. सदर माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment