प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य
Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हयातील ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे.
समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्य, तसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहिल.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी, (पीओएसएच) ॲक्ट यांचे आदेशान्वये सदर अधिनियमात दिल्याप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिनियमांतर्गत तक्रार करण्यास काही अडचण जात असल्यास संपर्क साधावा.
ज्या कार्यालयात दहा पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत किंवा मालकाविरुध्द तक्रार आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्थानिक तक्रार समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी. सदर अंमलबजावणीत कोणी कसुर केल्यास 50 हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतुद कायद्यात नमुद आहे.
ज्या आस्थानेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याची महिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, सार्ई बाबा वार्ड, चंद्रपूर येथे किंवा disttwcdocha@gmail.com disttwcdocha@rediffmail.com या संकेतस्थळावर येथे सादर करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment