सावली तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम
चंद्रपूर, दि.1 एप्रिल : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि 19 मार्च 2025 च्या शासन निर्णयान्वये सावली तालुक्यामध्ये ‘जिवंत सातबारा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील खातेदारापैकी मय्यत खातेदार असतील, अशा मय्यत खातेदारांचे वारस चढविण्याबाबत 1 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत तलाठी यांच्यामार्फत गावांमध्ये होणाऱ्या चावडी वाचनमध्ये नागरिकांनी मय्यत खातेदारांची माहिती तलाठ्यांना देणे, यावरून तलाठी गावातील मय्यत खातेदारांची यादी तयार करतील.
6 ते 20 एप्रिल पर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यु दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञापत्र, घोषणा पत्र, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवकाचा दाखला, सर्व वारसांचे नाव, मत्ता, दुरध्वनी क्रमांक, रहिवासी बाबत पुरावा) तलाठ्याकडे सादर करावे. 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तलाठी फेरफार घेवून मय्यत खातेदारांचे नाव सातबार वरून कमी करून वारसांचे नावे दर्ज करतील.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment