Search This Blog

Monday 25 June 2018

मुद्रा लोन मागायला येणाऱ्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराची नोंद सर्व बँकांनी स्वतंत्रपणे करावी : ना. हंसराज अहिर



प्रत्येक बँकेच्या मार्फत किमान 100 लोकांना कर्ज वाटप करण्याचे  आवाहन

चंद्रपूर दिनांक 25 जून: केंद्र शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी बँकांना भरीव आर्थिक तरतूद देऊन मुद्रा बँक योजने ची सुरुवात केली. मात्र अनेक बँका आपल्या मनाप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेच्या मुळावर उठणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला सहन केले जाणार नाही. मुद्रा लोन द्या अथवा नका देऊ मात्र सुशिक्षित बेरोजगार म्हणून  कर्ज मागायला येणाऱ्या प्रत्येक तरुणाची नोंद करा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी केले आहे. खरीप पीक कर्ज वाटप व मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
            जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीमध्ये  आमदार ॲड.संजय धोटे,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्यासह खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.झा यांनी गेल्या तीन वर्षात मुद्रा बँक योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून वाटप केलेल्या कर्जाचा अहवाल सादर केला. यामध्ये 2016-17 या कालावधीत 130 कोटी, 2017-18 या वर्षात 160 कोटी तर 2018-19 या वर्षात 15 जून पर्यंत 33 कोटी रुपयाचे लोन वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यावेळी बँक निहाय आढावा ना.अहिर यांनी घेतला. काही राष्ट्रीयकृत बँकांनी अत्यल्प असे कर्ज वाटप केले असून खातेदारांची संख्या देखील कमी असल्याचे निर्देश आल्यानंतर त्यांनी या बँकांनी राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे अथवा जिल्ह्यातील गाशा गुंडाळण्यास त्यांना सांगण्यात येईल, अशा शब्दात त्यांना स्पष्ट समज दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक युवकांची त्याला लोन मिळो अथवा ना मिळो परंतु बँकेमध्ये नोंद घेतली गेली पाहिजे, असे स्पष्ट केले. यासाठी जिल्हा ग्रहणी बँकेचे व्यवस्थापक यांनी सर्वांसाठी एक आदेश जारी करावा असे स्पष्ट करण्यात आले. या नोंदीमुळे किती लोकांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज हवे आहेत याबाबतची निश्चितता पुढे येईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये मुद्रा लोन मागायला येणाऱ्या प्रत्येकाची नोंद बँकेत घेतली जाते. या संदर्भातील फलक बँकेच्या दर्शनी भागात लावण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकेतील व्यवस्थापकाने नोंदीचे काम एका कर्मचाऱ्याकडे सोपवावी, असे स्पष्ट केले. या बैठकीमध्ये मुद्रा योजनेच्या प्रसिध्दी संदर्भात मुद्रा योजनेच्या समन्वय समितीमार्फत आवश्यक प्रसिध्दी साहित्य पुरविण्यात येईल. तथापि, नोंदीची कारवाई सुरु करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सदस्यांनी नियमित खाते असणाऱ्या धारकांनाच मुद्रा बँकेची लोन दिले जात असल्याबद्दल आक्षेप घेतला. नव्या लोकांना देखील बँकेकडून लोन दिले गेले पाहिजे. मुळात ही योजना नवे व्यावसायिक तयार करणारी असून त्यासाठी बँकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रह्मपुरी, सिंदेवाही शाखांमध्ये जिल्हा परिषदेच्या योजनांबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याची तक्रार यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली. या बैठकीमध्ये उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी समज देण्यात आली. मुद्रा बँक योजना नवीन व्यावसायिक तयार करणारी योजना असून बँक यामध्ये केवळ माध्यम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुरेशी तरतूद केली असून बँकांनी यामध्ये अडथळा नंतर सुलभतेने सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे असे शेवटी आवाहनही अहिर यांनी केले. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्या पुढाकारात तयार करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँक योजना या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
                                                                   000

No comments:

Post a Comment