4 ते 7 डिसेंबरपर्यंत कलम 36 लागू
चंद्रपूर, दि. 02 : जिल्ह्यात 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पाळण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम ३६ चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये खालील नमुद केल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणुक काढण्याबाबत त्या ठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिका-यांना देण्यात आले आहे. यात
अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, ब) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, क) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश, ड) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, फ) कलम ३३, ३५, ३७ ते ४०,४२ ,४३ व ४५ मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.
सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे. सदर आदेश दिनांक 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.
००००००

No comments:
Post a Comment