13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 03 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर व जिल्हामध्ये शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एस. भिष्म यांनी केले आहे.
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोकन्यायालयाचा महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरीत समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामाएवढेच महत्व असते. त्यांची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते. वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात.
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन. आय. अॅक्ट (धनादेश न बटणे), बँकांची कर्ज वसूली वगैरे प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विविह-विच्छेदन वगळता), इलेक्ट्रीसिटी अॅक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसुल, पाणीपट्टी, बीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भिष्म यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमधी ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वतः येउन किंवा हेल्पलाईन क्रमांक 27172-275679 कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934 वर संपर्क करावा, असे सचिव सुधीर इंगळे यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment