कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषी उपाययोजनांचा अवलंब करावा
चंद्रपूर, दि. 20 ऑगस्ट: सध्याचे पाऊसमान व त्यामुळे झालेल्या वातावरणातील बदलामुळे कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येत आहे. सध्याच्या किडीस पोषक वातावरण असून या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किडीचे वेळीच व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शेतकरी बंधूंनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
अशा आहेत उपाययोजना:
शेतकरी बंधूंनी त्वरित किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाटारॅक्टीन 1500 पीपीएम 25 मिली, 10 लिटर या प्रमाणात फवारणी करावी. फेरोमन सापळयातील ल्युर त्याच्या क्रियाशीलतेनुसार वेळेवर बदलावे.
बोंडे, पात्या व फुले मध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के पर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्राम किंवा ल्यांबडा सायहॅलोथ्रिन 4.9सीएम,10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिलि प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दोनवेळेस 4 ग्राम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र कीटकनाशके जसे प्रोफेनोफोस 40 टक्के क्लोरोपायरीफॉस 50+ सायपरमेथ्रिण 5 टक्के 20 मिली 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नुसार व गरजेनुसार शिफारशीत कीटकनाशकांचा तातडीने वापर करावा जेणेकरून पुढील प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यात मदत होईल.फेरोमन सापळयातील ल्यूर्स वेळच्यावेळी बदलावे. शेतकरी बंधुंनी पिकांचे निरीक्षण करून कामगंध सापळ्यातील पतंगाची संख्या, प्रादुर्भाव यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करावी.
00000
No comments:
Post a Comment