Search This Blog

Thursday 10 February 2022

पालकमंत्र्याच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळणार गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी

 




पालकमंत्र्याच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळणार गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी

Ø मेंडकी आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेअतंर्गत साडेपाच हजार हेक्टरवर सिंचनाचा लाभ

चंद्रपूर, दि. 10 फेब्रुवारी : गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पातील उजव्या मुख्य कालव्यामधील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेली 24 गावे उंचावर असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नव्हते. सदर गावे सिंचनापासून वंचित राहत होती. या भागातील शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना माहीत होताच सिंचनाच्या संदर्भात गोसेखुर्द विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच या उपसा सिंचन योजनेसंदर्भात प्रस्ताव तातडीने तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आयोजित बैठकीत दिले. त्यामुळे साडेपाच हजार हेक्टरवर आता सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे.

मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या विविध जलसिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पासंदर्भात उद्भवलेल्या समस्या मांडल्या. या बैठकीस लघु पाटबंधारे विभागाचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.देवगडे उपस्थित होते.

मेंडकी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात मेंडकी, माणिकपूर रिठ, गणेशपुर, नवेगाव खुर्द, कोरेगाव रिठ, शिवसागर तुकुम, शिवसागर गावगल्ला, रुद्रापूर-भानापूर ही गावे समाविष्ट करण्यात आली असून सदर गावाचे एकूण लागवडीलायक क्षेत्र 2051 हेक्टर आहे. तर अड्याळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात अड्याळ तुकुम, अड्याळ गावगन्ना, चोरटी, वायगाव, भगवानपुर, साखरा, साखराचक, रानपरसोडी, दुधवाही, चांदगाव, धमणगाव, हत्तीलेंढा, पारडी, कोसंबीचक, नवेगावपांडव, किरमिटी, वसाळामक्ता, भिकेश्वर, गोवारपेठ, तेलनडोंगरी ही गावे समाविष्ट करण्यात आली असून सदर गावाचे एकूण लागवडीलायक क्षेत्र 3,500 हेक्टर आहे,

यावेळी बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, संपूर्ण उपसा सिंचन योजना विजेवर चालविल्या जाते. वीज बिलाचे पैसे भरल्या जात नाही म्हणून काही वर्षानंतर या उपसा सिंचन योजना बंद पडतात. म्हणून सदर उपसा सिंचन योजना सोलर वर सुरू करावी जेणेकरून, विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना भुर्दंड बसणार नाही. त्यामुळे या उपसा सिंचन योजना बारमाही सुरू राहतील व परीसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळेल आणि या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल.

जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, ब्रह्मपुरी तालुक्यातील 24 गावातील शेतीसाठी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याकरिता मेंढकी उपसा सिंचन योजनेस आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळणे, गोसीखुर्द प्रकल्पाचा घटक भाग असलेल्या आसोलामेंढा धरणाच्या उंची वाढ कामास त्वरीत मान्यता मिळणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमीन पर्यटनासाठी देण्यासंदर्भात, हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजूरीबाबत प्रस्ताव तयार करून ते नियामक मंडळास सादर करावे, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या उपसा सिंचन योजनेस तत्त्वतः मान्यता दिली असून नियामक मंडळाकडे हा प्रस्ताव ठेवण्यात येईल त्यानंतर अंतिम मंजुरी शासन देईल. त्यासाठी लागणारा पर्याप्त निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले. त्यामुळे आता या परिसरातील उपसा जलसिंचन योजना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

00000

No comments:

Post a Comment