सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन
चंद्रपूर, दि. 25 : शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून, या पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे. पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (तंबाखुवरील पाने खाणारी अळी, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) 71 टक्क्यांपर्यंत, फक्त उंटअळयामुळे 50 टक्क्यांपर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते.
सध्या स्थितीत सोयाबीन पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे किर्डीचे वेळीच निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंबनाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे शास्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
तंबाखुवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) : या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया, समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. अळ्या मोठ्या झाल्यानंतर त्या शेतात सर्वत्र पसरतात व पानांना मोठी अनियमित छिद्रे पाडून पाने खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पानांची चाळणी झाल्यासारखी अवस्था होते. पिकाला फुले आल्यानंतर या अळ्या फुले खाऊन नुकसान करतात, परिणामी पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
उंटअळया : या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः 15 ते 20 दिवसांनी होतो. अळ्या पानांवर लहान, अनियमित आकाराची छिद्रे पाडून नुकसान करतात, त्यामुळे पिकातील शेंगा लागणे व दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घटू शकते. तसेच ह्या अळ्या फुले व शेंगाही खातात.
सध्यस्थितीत एकात्मिक व्यवस्थापन : सोयाबीन पिकांचे वेळोवेळी किडींचे सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी व केसाळ अळया यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत. तंबाखुची पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी 15 ते 20 प्रति हेक्टरी लावावेत. शेतात इंग्रजी 'T' अक्षरासारखे 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत.
तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाई या बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी, प्रादुर्भाव आढळून येताच करावी. पाने खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. या किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर प्रति लिटर पाण्यातून फ्लूबेंडामाईड 39.35% एससी 0.3 मिली किंवा क्लोरेंन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 0.3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.90% ईसी 0.85 मिली किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18% एससी 0.5-0.6 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 5.25% + इंडॉक्साकार्ब 4.50% एससी 1.65-1.75 मिली किंवा अॅसिटामीप्राईड 25% बायफेथ्रिन 25% डब्लूजी 0.5 ग्रॅम या पैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
वरील सर्व कीटकनाशकाचे प्रमाण साध्या / नॅपसॅक पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे. शेतात कीटकशकांचा वापर करतांना हातमोजे, तोंडावर मास्कचा, डोळ्यावर चष्माचा वापर करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment