Search This Blog

Thursday 29 November 2018

जिल्हयातील बाल विवाह प्रतिबंधासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी


चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर  राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहे. तथापि, काही सामाजिक चालिरीती व अशिक्षित कुटुंबामध्ये अनेकवेळा हा प्रकार सामाजिक स्तरावर रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनासोबतच सामान्य जनतेचा संबंध येणा-या समाजातील मान्यवरांनी देखील पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विविध समाजातील धर्मगुरुंची तसेच या क्षेत्रात काम करणा-या सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेण्यात आली.
            या बैठकीमध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणेने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सोबतच मुले, मुली यांचा सर्वाधिक संबंध येणा-या शिक्षण विभागाने शिक्षकांनी यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. ही समस्या शैक्षणिक, सामाजिक सुधारणांची असल्यामुळे मागासलेल्या वसाहतीमध्ये काम करणा-या सर्व यंत्रणांनी यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. सर्व यंत्रणांना या संदर्भातील कायदे व अंमलबजावणीची आणीव असावी यासाठी प्रशिक्षण मोठया प्रमाणात घेण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली.
            या बैठकीला महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        0000  

No comments:

Post a Comment