पालकमंत्री यांच्याकडून मोफत मास्कचे वाटप
चंद्रपूर,दि.21 मार्च : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी चंद्रपूरकरसह जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरकरांना केले.
'कोरोना’ व्हायरसच्या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी राज्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता ब्रम्हपुरी क्षेत्रात माझ्याकडून मोफत मास्कचे वाटप कार्यकार्यकडून करण्यात येत आहे. जनतेशी संपर्कात येणाऱ्या पोलीस, सरकारी दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी, छोटे व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्यासह आवश्यक नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात येत असून शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, शहरात अनावश्यक गर्दी करू नये असेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
घाबरू नका, काळजी घ्या, सतर्क राहा अशी विनंती करताना पालकमंत्री म्हणाले, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे.या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा आरोग्य खाते प्रयत्नशील आहेत.कोरोनापासून खबरदारी म्हणून जनतेला अनेक माध्यमांद्वारे वेळोवेळी आवाहने केली जात आहेत.याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्या.सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतर्कता बाळगण्याची विनंती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली..
आतापर्यंत कोरोनावर कोणत्याही प्रकारचं औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. या आजारापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंट ठेवणे व समाजात मिसळण्यापासून स्वत:ला वाचवणे हा एकमेव उपाय आहे. आतापर्यंत या आजाराने भारतात रौद्र स्वरुप धारण केलेलं नाही. पण या टप्प्यावर सावधगिरी बाळगली तरच हा आजार नियंत्रणात राहू शकतो असे पालकमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रविवारी 22 मार्चला स्वत:हून सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर न पडता जिल्ह्यातील जनतेंनी कर्फ्यूचे पालन करा असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
00000

No comments:
Post a Comment