स्वगृही परतू न शकणाऱ्या मजुरांना
राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देणार – ना.विजय वडेट्टीवार
चंद्रपूर,दि.27 मार्च : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत.यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत अशा 10 हजार मजुरांना आहेत त्या ठिकाणी राहण्याची आणि भोजनासह खाण्यापिण्याची व्यवस्था तेलंगना सरकार करून देणार असल्याने त्यांच्या सह त्यांच्या नातेवाईकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मिरची तोडण्याच्या मजुरीसाठी ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही, या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील किमान 10 हजार मजूर तेलंगणा राज्यातील विविध गावात गेले असता अचानक लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे तेलंगना राज्यात अडकून पडले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.यामुळे या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसून यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहीती मजुरांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना दूरध्वनीवरून दिली.
ही माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वणीवरून संपर्क साधून तेलंगणात अडकलेल्या सर्व मजुरांना स्वगृही आणण्याची तसेच या मजुरांना आहे त्याठिकाणी राहण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीची मुख्यमंत्री यांनी दखल घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये हा विषय प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असता देशात लॉक डाउन करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील मजूर तेलंगणा राज्यात असेल तर त्या संपूर्ण मजुरांच्या खानापिण्याची, जेवणाची व राहण्याची व्यवस्था तेलंगणा सरकार करणार आणि तेलंगणा राज्यातील मजूर महाराष्ट्र राज्यात असेल तर त्या मजुरांची संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांची आहे त्याच ठिकाणी व्यवस्था होणार असल्याने कामासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना या कामात मदत करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनीही प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना दूरध्वणीवरून माहिती दिली.लॉकडाऊनमुळे या मजुरांना जिल्ह्यात परत आणता येत नसल्याने आहे त्या ठिकाणी त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणात अडकले आहेत त्यांची संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेकडून घेऊन त्यांची मोबाईल नंबर सहित संपूर्ण माहिती देण्याचे निर्देशही पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
मजुरांच्या सुरक्षिततेसाठी तेलंगणा प्रशासनाशी सतत संपर्क साधला जात आहे. जिल्हा प्रशासन ही याकडे लक्ष ठेऊन दररोज माहिती घेतली जात आहे. त्यामुळे परराज्यात असलेल्या मजुरांच्या कुटूंबियांनी काळजी करू नये,असे आवाहन पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी मजुरांच्या कुटूंबियांना केले.
00000
No comments:
Post a Comment