Search This Blog

Wednesday 11 November 2020

जिल्ह्यात 54 धान खरेदी केंद्र सुरू

 जिल्ह्यात 54 धान खरेदी केंद्र सुरू

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 11 नोव्हेंबर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतुने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन 2020-21 या पणन हंगामासाठी जिल्ह्यात 54 धान खरेदी केंद्रे सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मान्यता दिली आहे. यात बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन यांचेमार्फत 27 केंद्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य़ सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. यांचेमार्फत 27 धान केंद्र अशी एकूण 54 धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे.

असे आहे धान खरेदी केंद्रे:

बिगर आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत.

मुल तालुक्यातील मुल व राजोली, सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द), व्याहाड (बु) व पाथरी, सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, रत्नापूर व सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील कोर्धा,  नागभीड व तळोधी (बा), ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही, चौगान, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, आवळगांव व अऱ्हेर नवरगांव, चिमूर तालुक्यातील चिमूर व नेरी, गोंडपिंपरी तालुक्यातील गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दिक्षित येथे धान खरेदी केंद्र असणार आहे.

आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या,पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत. नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापुर, कोजबी, गिरगाव, जिवनापूर, गोविंदपुर, वाढोणा येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडीमेंढा, लाडबोरी, मुरमाडी, कळमगाव (गन्ना), शिवणी, नाचणभट्टी येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. चिमूर तालुक्यातील डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव (देश), मासळ, टेकेपार, मोटेगाव येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु), वडधा (बु), भटाळा तर भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे धान खरेदी केंद्र असणार आहे.

असा आहे धान खरेदीचा कालावधी :

खरीप पणन हंगामासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च  2021 पर्यंत तर खरीप पणन हंगाम (रब्बी/उन्हाळी)      साठी दिनांक 1 मे 2021 ते 30 जून 2021 पर्यंत आहे.

आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाचे धानाकरिता प्रति क्विंटल रु.1 हजार 888 व साधारण धानाकरिता प्रति क्विंटल रु.1 हजार 868 असे शासनाने ठरवून दिलेले असून या किमतीमध्ये बोनसचा समावेश नाही.

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या निर्देशात बसणारे धान खरेदी केल्या जाईल. तसेच, धानासाठी आर्द्रतेचे प्रमाण जास्तीत जास्त़ 17 टक्के इतके राहील. तेव्हा शेतकऱ्यांनी स्वच्छ व कोरडे असलेले धान खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे. विहीत प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता असलेले धान खरेदी केंद्रावर स्विकारल्या जाणार नाही.

 

शेतकऱ्यांनी त्यांचे गाव ज्या खरेदी केंद्रास जोडलेले आहे, त्याच केंद्रावर धान विक्रीसाठी घेवून जावे. दुसऱ्या खरेदी केंद्रावर धान खरेदी केल्या जाणार नाही. धान विक्रीकरीता शेतकऱ्यांनी त्यांचे केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे लागणार आवश्यक कागदपत्रे:

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता येतांना सोबत आधारकार्ड व चालू असलेले बँकेच्या बचत खात्याचे पासबुक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे, असा चालु वर्षाचा 7/12 उतारा आणणे अनिवार्य राहील. तसेच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सीमांत, लघु, मध्यम व मोठे शेतकरी अशी जमीन धारणेवर आधारीत तसेच अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, इतर व अवर्गीकृत अशी वर्गवारी करावयाची असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर त्याबाबत माहिती द्यावी.

तालुकानिहाय खरेदी केंद्राची नावे व त्या केंद्राला जोडलेली गांवे याबाबत जिल्हा पणन अधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., प्रादेशिक कार्यालय, चंद्रपूर यांचेकडून माहिती प्राप्त़ करून घ्यावी. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर काही अडचणी आल्यास बिगर आदिवासी क्षेत्राकरिता जिल्हा पणन अधिकारी व्ही.के.गोगिरवार (मो.क्र.8828501090) व आदिवासी क्षेत्राकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक व्यवस्थापक जी.आर.कोटलावार (मो.क्र. 9422946396) यांचेशी संपर्क साधावा.

धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापारी, दलाल, मध्यस्थांच्या मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांनी धानाचे विक्री केली असल्यास त्यांना चालु वर्षाचा नमुना 7/12 व बँक खात्यांचा तपशील देणे टाळण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment