Search This Blog

Saturday 22 May 2021

कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे


 

कोविड काळात सर्वात अधिक लक्ष महिला व बालकांवर द्यावे

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकाच्या

संगोपन व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठीत

चंद्रपूर दि.22 मे: कोरोना संसर्गाच्या काळात सर्वात जास्त लक्ष महिला व बालकांवर देणे गरजेचे आहे.कोविडमुळे दोन्ही पालक दगावले असल्यास अशा बालकांची नोंद करून घेत त्याची माहिती  तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

महिला व बालकासंबंधीचे विषय तसेच त्यांच्याशी संबंधित शासकीय संस्था याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संग्राम शिंदे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेकांचे पालकत्व हरवले आहे. आई-वडील दोघांचेही निधन झाल्याने मुले अनाथ झाली आहेत.बालकांच्या जीवनावर  याचा गंभीर परिणाम होत आहे. या मुलांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.  बाल न्याय समितीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती घ्यावी त्याबाबत आढावा  घेण्यात यावा अशा सूचना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

बैठकीमध्ये मुलांचे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले होते.  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगर पालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. असेही त्या म्हणाल्या.

मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोविडच्या या महामारीत सर्वात जास्त लक्ष महिला व बालकांवर  देणे गरजेचे आहे. कोविडच्या काळात दोन्ही पालक गमावल्यामुळे  अनाथ झालेली मुले, तसेच 0 व 18 वर्षाआतील बालकांच्या दगावलेल्या पालकांची नोंद घ्यावी. कुठेना कुठे अशी मुले आढळतातच त्यांना योग्य मानसोपचार द्यावा. ग्रामपंचायत स्तरावर, पोलीस यंत्रणा, यांच्यामार्फत अशा बालकांची माहिती व्यापकतेने गोळा करून घ्यावी. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने पालकत्व गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती समन्वयाने उपलब्ध करून घ्यावी. अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्यात.

दर पंधरवाड्यातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे, निरीक्षण गृहातील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा, तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे नियोजन करावे. कोरोना काळात  महिलांवर अत्याचार होऊ नये, महिलांवर घरगुती हिंसा कुठे होत आहेत का यावर लक्ष केंद्रित करावे व त्यावर आळा घालावा. त्यासोबतच त्यांनी जिल्ह्यातील असलेली शिशुगृह व बालगृह याची माहिती जाणून घेतली व किती मुलांना शिशूगृह, बालगृहात पाठविण्यात आले आहे याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी, जिल्ह्यामध्ये बालकांच्या संरक्षणासाठी व संगोपनासाठी  टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यासोबतच कोविड काळामध्ये ज्या बालकांचे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे अशांची माहिती सुद्धा ग्राम पातळीवर, ग्रामसेवक, अंगणवाडी शिक्षिका, पोलीस पाटील यांच्याकडून वेळोवेळी उपलब्ध करून घेण्यात येत असल्याचेही सांगितले. तसेच चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांत दर्शनी भागात लावण्यात येत असल्याची ही माहिती यावेळी दिली. जिल्ह्यातील मुल तालुक्यात कोविडमुळे बालकाच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला असल्याची घटना पुढे आली आहे. त्या बालकाला नागपूर येथे नातेवाईकांकडे पाठविण्यात आले असून त्या मुलाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही बालकल्याण समितीला दिले असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

000000

No comments:

Post a Comment