Search This Blog

Friday 21 July 2023

मतदारांच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी


मतदारांच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी

Ø 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम

Ø  बीएलओना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 : राज्यात आजपासून (दि.21) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. तसेच घरी येणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार आहे.

या उपक्रमामुळे राज्यातल्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचं आणि अद्ययावतीकरणाचं काम सुलभ होऊ शकणार आहे. हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे. त्यामुळे जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील, तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावे. ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही, अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरूस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत  झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्याने सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत, असेही मुख्य निवडणूक अधिकारी (म.रा.) श्रीकांत देशपांडे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.  

०००००००

No comments:

Post a Comment