Search This Blog

Tuesday 13 December 2022

मानवी हक्क आणि कर्तव्य यांचा मेळ घालून युवकांनी देशाला प्रगतीवर न्यावे - न्यायाधीश नेहा पंचारिया

 




मानवी हक्क आणि कर्तव्य यांचा मेळ घालून युवकांनी देशाला प्रगतीवर न्यावे

-न्यायाधीश नेहा पंचारिया

Ø आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 13 : मानवी हक्क आणि कर्तव्य याचा मेळ घालून युवकांनी देशाला प्रगतीवर न्यावे, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश नेहा पंचारीया यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आबेंडकर भवन, दिक्षाभुमी, चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला न्यायाधीश नेहा पंचारीया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सहसचिव कुणाल घोटेकर, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे उपप्राचार्य नरेंद्र टिकले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे. तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी दरवर्षी 10 डिसेंबरला जगभरात "आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस" साजरा केला जातो. असे सांगून जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती नेहा पंचारीया म्हणाल्या, जगामध्ये मानवी हक्क कसा महत्त्वाचा आहे, तो जगात, देशात कधीपासून लागू झाला? तेव्हापासून तर सद्यस्थितीपर्यंत नागरिकाचे, कर्तव्य, जबाबदारी व मूल्य याबाबत मार्गदर्शन केले. नागरिक, बालक, महिला, पुरुष, कामगार, कैदी, प्रत्येकांचे मानवी हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्तरावर जगण्याचा अधिकार आहे. जात, धर्म, आर्थिक विषमता, गरिबी या कारणावरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय करता येत नाही. सोबतच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत महाविद्यालयामध्ये कसे व्यवहार करावे, रॅगिंग कायद्यासोबतच विविध कायद्याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांनी चांगला नागरिक म्हणून देशातील, जगातील सर्व मानवासोबत न्यायाचे, सामाजिक बंधुत्व, प्रेम याची शिकवण मानवी हक्क कायद्याने दिली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्य व जबाबदारी नुसार आपले जीवन व्यथीत करावे, असे न्यायमूर्ती पंचारिया यांनी यावेळी सांगितले.

            आंतरराष्ट्रीय मानवधिकार दिन या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सहायक आयुक्त अमोल यावलीकर मानवाधिकार दिनाचे महत्त्व व या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत मानवाधिकार, ॲट्रॉसिटी व आंतरजातीय विवाह कायदा, विविध योजना घेऊन सामाजिक न्याय विभाग कार्य करीत असतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व व उद्देश त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत मांडले. तर कायदा व सुव्यवस्था, नागरीकांचे कर्तव्य, जबाबदारी याविषयावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दहेगांवकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मानवाधिकार कायद्याचा अभ्यास करावा. जेणेकरून, भावी आयुष्यामध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था, कर्तव्य, जबाबदारी कशी राहील व त्यानुसार चांगला नागरीक म्हणून आपले नाव लौकिक मिळवणे या सोबतच आपले कर्तव्य पार पाडणे सहज सोपे जाईल. मानवी हक्क कायद्याला अबाधीत राखण्यासाठी देशातील युवकांची जबाबदारी खूप मोठी आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.विश्वनाथ राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी मानले.

कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, सोमय्या पॉलीटेक्नीक तसेच  शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment