Search This Blog

Friday 16 December 2022

क्षयरुग्णांना सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

क्षयरुग्णांना सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत मदत करण्याचे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

क्षयरोग मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींसोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय क्षयरोग विभागाने टि.बी. रुग्णांना सामाजिक सहाय्य योजना राष्ट्रपतीं यांनी  प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हा महत्वकांक्षी योजना/उपक्रम दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्णांना उत्तम निदान व उपचाराच्या सुविधा बरोबरच निक्षय पोषण आहार योजना दिली जाते. याव्यतिरिक्त सुद्धा जास्त पौष्टिक आहार जसे, शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर, प्रोटीन पावडर, आदी व इतर निदान, उपचार सुविधा, व्यावसायिक पुनर्वसन यासाठी त्यांना मदत करणे अनिवार्य असते.

ही आहेत उपक्रमाची उद्दिष्टे:

टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सहभाग वाढविणे तर कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) च्या माध्यमातून उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे आहे.

या मोहिमेद्वारे क्षयरोग दूरीकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ती, सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविणे, टीबीविरुद्ध लढण्यासाठी सामाजिक सहाय्य घेणे व क्षयरोग विषयी जनजागृती करणे. क्षयरोगाशी संबंधित समाजातील कलंक, भीती जनजागृतीद्वारे कमी करणे. क्षयरुग्णांचा व त्याच्या नातेवाईकांच्या खर्चाचा भार कमी करणे. उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहाराचा पुरवठा करणे व त्यांना परिपूर्ण उपचारांमध्ये सहाय्य करणे.

या उपक्रमांतर्गत राईस मिल, सामाजिक संस्था, को-ऑपरेटिव्ह संस्था, कॉटन जिनिंग, सोसायटी, सार्वजनिक आणि खाजगी व्यापारी संस्था, उद्योग संघटना, कार्पोरेट औद्योगिक संस्था किंवा व्यापारी असोसिएशन आणि व्यक्ती भागीदार यांच्या मदतीद्वारे क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्टपूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. या यंत्रणेद्वारे तालुका, जिल्हा अंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना किमान 6 महिने ते 3 वर्षापर्यंत दत्तक घेऊन रुग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.

या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना स्वेच्छेने काही मदत करावयाची असल्यास उपरोक्त मोहिमेमध्ये आपण तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणून वरील बाबीसाठी सहभाग नोंदवावा. तसेच https://tbcindia.gov.in या निक्षय पोर्टलवर स्वतःचे/संस्थेचे रजिस्ट्रेशन करावे, किंवा जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथील dtomhcpr@rntcp.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment