Search This Blog

Tuesday 7 December 2021

शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

Ø कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : सद्यस्थितीत हरभरा पिक वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व यादरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून 2-3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडुन खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलो-यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व या अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.

शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करतांना घाटेअळीचे परभक्षक जसे की, बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळीचिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून घाटेअळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी कीटकनाशकाची फवारणी करु नये. पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

शेतकरी बंधूंनी आपला पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लीटर पाण्यात मिसळून कराव्यात. हरभरा पिक 50 टक्के फुलोरावर आल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पी.व्ही.(1․10 9 पीओबी,मि.लि) 500 एल. ई.,हे. किंवा क्विंनॉल्फॉस 25 ई.सी.20 मिली. तर 15 दिवसानंतर दुसरी फवारणी इमामेक्टिन बेंजोएट 5 टक्के एस.जी. 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा फ्लूबेंडामाईड 20 टक्के डब्ल्यू.जी. 5 मिलि किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी.2.5 मिली किटकनाशकांची फवारणी करावी. व हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. असे आवाहन

कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment