Search This Blog

Monday 6 December 2021

विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने



विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे  - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 6 डिसेंबर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 75 आठवड्यापर्यंत संबंधित सर्व विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. दूधे, तहसीलदार (सामान्य) यशवंत धाईत, जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक प्रीती डुडूलकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख  उपस्थित होते.

जिल्ह्यातील संबंधित सर्व विभागांनी आजादी का अमृत महोत्सवाचे नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले,  उपप्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल बचत करणे, रस्ते अपघातावर आळा घालणे त्यासंदर्भात जनजागृती करावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन आदी विषयांवर जनजागृती विषयक कार्यक्रम राबवावेत. महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घ्यावे. कौशल्य विकास विभागाने युवक-युवतींना स्वयंरोजगारासंबंधी, मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे तसेच ग्रंथालय कार्यालयाने ग्रंथप्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, संबंधित सर्व कार्यालयांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत कशा पद्धतीचे उपक्रम राबवायचे आहे, त्याबाबतची माहिती घ्यावी. आयोजित कार्यक्रमाचे व्हिडिओ, माहिती व छायाचित्रे जिल्हा माहिती कार्यालयात पाठवावीत. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या महोत्सवांतर्गत संबंधित विभागाकडून आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले यासंबंधीची माहिती जाणून घेतली.

00000

No comments:

Post a Comment