Search This Blog

Thursday 30 December 2021

राज्याअंतर्गत रब्बी हंगामातील विविध पीक स्पर्धांचे आयोजन


राज्याअंतर्गत रब्बी हंगामातील विविध पीक स्पर्धांचे आयोजन

Ø सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर:  शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तरी, शेतकरी बंधूनी रब्बी हंगाम 2021 मधील पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे.

पीक स्पर्धेमध्ये तालुका हा घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकुण लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहुन अधिक आहे, अशा पिकांकरीता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी रु. 300 प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी एकदाच रु. 300 प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरुन पीक कापणीवरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी स्पर्धा पातळीनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुप पुढीलप्रमाणे राहील.  तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये, तिसरे बक्षीस 2 हजार रुपये राहील. जिल्हा पातळीवरील पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षीस 7 हजार रुपये, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये तर विभाग पातळीवर पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षीस 20 हजार रुपये, तिसरे बक्षीस 15 हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षीस 40 हजार रुपये, तिसरे बक्षीस 30 हजार रुपये याप्रमाणे राहील.

रब्बी हंगाम 2021 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment