Search This Blog

Friday 23 June 2023

खरीप हंगामातील पीक नियोजन

 


खरीप हंगामातील पीक नियोजन

चंद्रपूर, दि. 23 : भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. यावर्षी 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले नाही. मान्सूनचे आगमनास विलंब होत असल्याने शेतकरी काळजीत आहे. या दृष्टीकोणातून शेतक-यांनी पेरणी करताना काय दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन पीक परिस्थितीत काय नियोजन करावे याबाबत, कृषी मंत्र्यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेवून सर्व संबंधितांबरोबर चर्चा केली.

हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Monsoon Period) येण्याचा कालावधी 24 ते 25 जून असेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार दि. 24 व 25 जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

यासंदर्भात शेतक-यांनी पुढीलप्रमाणे पीक नियोजन करावे : 1) शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये.  2) सर्वसामान्यतः शेतक-यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. 3) शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. 4) मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये. 5) पेरणी करताना साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. 6सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. 7) पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी. 8) जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन (मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा.

राज्यात मान्सूनचा अंदाज घेवून पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणेखते व किटकनाशके शेतक-यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शेतक-यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणा-या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होइल यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतक-यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी 1800-2334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment