पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून
जिल्ह्यात 1 हजार 300 मेट्रिक टन युरिया खत दाखल
आणखी युरिया खताची रॅक जिल्ह्यात येणार
चंद्रपूर, दि.16 जुलै: जिल्ह्यामध्ये धान (भात) उत्पादक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युरिया खताची मागणी वाढते. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये आरसीएफ कंपनीची पहिली युरिया खताची 1 हजार 300 मेट्रिक टनाची खेप दाखल झाली आहे.अतिरीक्त खताची खेप येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पोहचेल.
जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच शेतकऱ्यांना खत घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिली. उपलब्ध झालेल्या खताचे वाटप व्हावे यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
कृषी संचालक कृषी आयुक्तालय विजय धावटे यांनी दिलेल्या पत्रकानुसार गडचिरोली (सिरोंच्या, एटापल्ली,भामरागड), चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे खताचे आवंटन दिले आहे. यामध्ये गडचिरोली (सिरोंच्या, एटापल्ली,भामरागड) जिल्ह्यासाठी 1 हजार मेट्रिक टन, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 हजार 300 मेट्रिक टन तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 300 मेट्रिक टन आवंटन दिले आहे.
00000
No comments:
Post a Comment