Search This Blog

Thursday 16 July 2020

जून महिन्यात जिल्ह्यात 1 लाख 84 हजार 436 क्विंटल अन्नधान्य वितरण : राजेंद्र मिस्कीन


जून महिन्यात जिल्ह्यात 1 लाख 84 हजार 436
 क्विंटल अन्नधान्य वितरण : राजेंद्र मिस्कीन
जिल्ह्यात अन्नधान्याची कुठलीही कमतरता नाही
चंद्रपूर,दि. 16 जुलै : कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून जून महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना तब्बल 1 लाख 84 हजार 436 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. याविषयीची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे. या काळामध्ये अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 15 लाख 53 हजार 223  आहेत. या लाभार्थ्यांना 1 हजार 533 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे जून महिन्यामध्ये सुमारे 50 हजार 413 क्विंटल गहू, 47 हजार 177 क्विंटल तांदूळतर 1 हजार 352  क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु,लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 5 हजार 59 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माहे जून महिन्यामध्ये सुमारे 75 हजार 593 क्विंटल तांदूळतर 7 हजार 664 क्विंटल डाळ वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत माहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य वितरण करायचे असून यामध्ये 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असून एपीएल योजनेचे धान्य वाटपाची मदत सुद्धा माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जून महिन्यामध्ये आत्मनिर्भर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मोफत तांदूळ व चना वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण 4 हजार 26 क्विंटल  तांदूळ तर 301 क्विंटल अख्खा चना वाटप करण्यात आला आहे.
चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई:
जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत दुकानदारांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम व अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment