शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी केले रक्तदान
Ø रक्त संकलन तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
चंद्रपूर, दि. 23 : रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ‘रक्तदान हेच जीवनदान’ असे म्हटले जाते. आपल्या रक्तदानामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. मंगळवारी नियोजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी रक्तदान केले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नियेाजन भवन येथे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे रक्तदान शिबीर आयेाजित करण्यात आले होते. यात २२ ते २५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नायब तहसीलदार अजय मेकलवार यांच्यासह इतर कर्मचा-यांचा समावेश होता.
शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये १५ हजार २५८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत जवळपास साडेपाच रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात विविध मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000

No comments:
Post a Comment