वन अकादमीमध्ये हवामान बदल व पर्यावरण संरक्षण विषयावर कार्यशाळा
Ø शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांकरीता आयोजन
चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकादमी) चंद्रपूर येथे हवामान बदल व प्रतिबंध (Climate Change and Mitigation) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत बल्लापूर तालुक्यातील विविध शाळेतील 84 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हवामान बदल व त्यांचे दुष्परिणाम या विषयी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी तसेच या गंभीर समस्येवर शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून वनप्रबोधिनी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा, सत्र संचालक एस. एस दहीवले, एस. के. गवळी, खुशाल रामगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी शालेय स्तरावर पयर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्व पटवून दिले व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यशाळेत पर्यावरण व परिस्थितीकी, हवामान बदल - कारणे व परिणाम त्यावरील प्रतिबंध व उपाययोजना हवामान बदल रोखण्यासाठी वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्व, टाकावू पदार्थाचे हरित पर्यावरणपूरक नियोजन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध वनस्पती आणी त्यांची हवामान समतोल व कार्बन शोषणात भूमिका व जैवविविधतेचे महत्त्व समजावून घेण्याची संधी मिळाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शालेय संस्थामधील विद्यार्थ्यांकरीता अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करून युवा पिढीचा पर्यावरण संवर्धनात सक्रीय सहभाग वाढविण्याकरीता वन प्रबोधिनी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अपर संचालक उमेश वर्मा (प्रशिक्षण) यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र चेटूले, कुमार पस्पुनुरवार आणी वन प्रबोधिनीतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
000000

No comments:
Post a Comment