Search This Blog

Sunday 28 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा : ना.सुधीर मुनगंटीवार








38 हजार नवयुवकांना स्पर्धेच्या मैदानात उतरवणाऱ्या युथ एम्पॉवरमेंट समीटचा शानदार शुभारंभ

चंद्रपूर दि 28 ऑक्टोबर : नोकरी,रोजगार,स्वयंरोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधीला उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमेंट समीट ही रोजगार युक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे. हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मानसिकता देणार आहे. बल्लारपूरवरून ही मानसिकता घेऊन लढायला सिद्ध व्हा, असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          38 हजार युवकांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याला स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनीमार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर उद्घाटक म्हणून कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी  आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे ,  चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर,बल्लारपूरचे  नगराध्यक्ष हरीश शर्मा , फॉर्च्युन फाउंडेशनचे अध्यक्ष आ.अनिल सोले , जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर , पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , बीआयटी कॉलेजचे प्रमुख बाबासाहेब वासाडे , उद्योजक श्रीकांत बडवे , अॅड. संजय वासाडे, प्रशांत वासाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युथ एम्पॉवरमेंट समिट मधील सहा सूत्रांची मांडणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व युवकांना अगदी रेल्वे,सैन्यदल,खाण क्षेत्र व अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची मार्गदर्शनाची उपलब्धता जिल्ह्यातील युवकांना आगामी काळात केले जाणार असून त्यामार्फत त्यांना ही संधी दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा सर्व सरकारी नोकरी मध्ये टक्का वाढविण्यासाठी ही मोहीम आम्ही आगामी काळात हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          मिशन कौशल्य विकास या अंतर्गत युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास करून त्यांना नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनविण्याच्या अभियानाचा प्रारंभ आहे. त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मदत घेतली जाईल. योग्य प्रशिक्षण व मुद्रा योजनाची मदत अशा पद्धतीने मिशन कौशल्य विकास,मिशन स्वयंरोजगार या जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.    
        कधीकाळी जग एकमेकांपासून दूर होते.परंतु आता जग हे ज्ञानावर चालणारे आहे.भारताची एकूण लोकसंख्या बघता दर सहा माणसामध्ये एक भारतीय असू शकतो. या संख्याबळाचा वापर करून आम्ही जगावर राज्य करू शकत नाही का ?असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ज्यांना जग जिंकण्याची आकांक्षा आहे त्यांच्यासाठी मिशन फॉरेन सर्विसेस सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
          आमचा परंपरागत उद्योग हा शेती होता. तरीही आता पारंपरिक पद्धतीने शेती करता येणार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्टच्या मदतीने पाच हजार शेतकरी  नव्या पद्धतीची शेती करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प  आहे. आगामी काळात नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची संधी मिशन शेतीतून केली जाणार आहे.
          सगळ्यांनाच नोकरी व व्यवसाय करणे शक्य नसते .मात्र अनेकांसाठी काहीतरी करण्याची एक सामाजिक उर्मी काही विशिष्ट तरूणात असते.अशा पद्धतीच्या युवकांना मिशन सोशल वर्कमध्ये नवे प्रयोग करण्याची सिद्धता या माध्यमातून दिली जाणार आहे. पोंभूर्णा येथे आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन एक मोठी कंपनी तयार केली आहे. आदिवासी महिला देखील उद्योजिका  बनू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे .
          राज्य शासनाने महिला उद्योजकांची संख्या 9टक्‍क्‍यांवरून 20 टक्के करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यासाठी आगामी काळात महिलांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासावर खूप भर आहे त्यामुळे प्रधानमंत्री यांनी स्टार्टअप , स्टॅड अप,मुद्रा आदी योजना सुरू केल्या आहेत. उद्याचे नवीन चंद्रपूर हे रोजगार युक्त असावे हे आपले स्वप्न असून यासाठी या सर्व योजनांचा उपयोग केला जाईल असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
   
हा मेळावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनतेच्या विश्वासाचे द्योतक 
                                                                - संभाजी पाटील निलंगेकर
                   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासाची संकल्पना पुढे नेत राज्य शासनाने या विभागाच्या माध्यमातून अनेक उत्तम निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू आहे .राज्यात अनेक ठिकाणी रोजगार मेळावे मी बघितले आहे पण उत्तम नियोजन व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला  हा मेळावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे. केवळ एम्प्लॉयमेंट पर्यंत मर्यादित न राहता त्यांनी एमपॉवरमेंट साठी जो पुढाकार घेतला आहे तो अभिनंदनिय आणि मार्गदर्शक असल्याचे कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले .चंद्रपूर आणि लातूर येथे मॉडेल आयटीआय साठी 15 कोटी रु. ची तरतूद करून अर्थमंत्र्यांनी औद्योगिक प्रशिक्षणातून कौशल्य विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले. युवक युवतींनी त्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
हा सर्वस्पर्शी सहा सूत्री कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याला विकासाग्रणी करेल
                                           - हंसराज अहिर
चंद्रपूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार ह्या क्षेत्रात अग्रेसर व्हावा यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो सहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर अध्यक्षीय भाषणादरम्यान म्हणाले. या जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे , लोकोपयोगी उपक्रम यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्याचे ज काम जिल्ह्यात पालकमंत्री करीत आहे . पंतप्रधानांची मुद्रा योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे.रोजगार , स्वयंरोजगार , उन्नत शेती ,कौशल्य विकास , सोशल वर्क , फॉरेन सर्व्हिसेस असा हा सर्वस्पर्शी सहा सूत्री कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याला विकासाग्रणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
       फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी या युथ एम्पॉवरमेंट समिटचे प्रास्ताविक केले. त्यांनी यावेळी या आयोजना मागची भूमिका मांडताना प्रत्येकाला नोकरी मिळेल ,असे नाही मात्र आजच्या मेळाव्यातून प्रत्येकाला भरपूर शिकायला मिळेल ,हे मात्र निश्चित असल्याचे सांगितले. विविध आस्थापना या ठिकाणी आल्या असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या मार्फत नोकरी दिली जाईल. या ठिकाणी युवकांसाठी आयोजित मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी देखील यावेळी युवकांना संबोधित केले.
आयएएस होताना त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी युवकांपुढे मांडला. परिश्रमाची तयारी ठेवून लोकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या या आयोजनातून जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले. तर आमदार अॅड. संजय धोटे यांनी जिल्ह्यामध्ये निर्माण होत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. बीआयटी प्रमुख अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी देखील यावेळी संबोधित केले. या कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रशांत आर्वे यांनी केले.

No comments:

Post a Comment