Search This Blog

Sunday 28 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात पहिल्या दिवशी 2778 युवकांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड


* उद्या देखील हजारो युवकांच्या होणार मुलाखती
* नोंदणीकृत उमेदवारांनी एसएमएस प्रमाणेच येण्याचे आवाहन
* बल्लारपूर मध्ये 74 दिव्यांगांना पहिल्या दिवशी मिळाली नोकरी
* हजारो मुलांच्या शांततामय मुलाखतींचे कौशल्य विकास मंत्र्यांकडून कौतुक

चंद्रपूर दि. 28 ऑक्टोबर- 38 हजार नोंदणीकृत उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी मुलाखत झालेल्या जवळपास 20 हजार उमेदवारांपैकी 2778 उमेदवारांना बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात नोकरी मिळाली आहे. निवड झालेली ही संख्या लक्षणीय असून एका मोठ्या आयोजनातून एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने युवकांना वेगवेगळ्या आस्थापनेवर काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या आयोजनावर काम सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी राज्यातील 53 प्रतिष्ठित कंपन्यांना बल्लारपूर येथे  आणण्यात आयोजकांना यश आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी 2 हजार 778 उमेदवारांना वेगवेगळ्या आस्थापनांनी पसंती दिली आहे.
राज्याचे वित्तनियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, आमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी येथे आजपासून हा रोजगार मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीची निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर नेमक्या किती लोकांना रोजगार मिळाला याबाबतची उत्सुकता होती. आयोजन समितीकडून रात्री 8 वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी 2778 लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आपली पसंती दाखवली आहे. यामध्ये 74 दिव्यांग व्यक्तींचा देखील समावेश आहे.

पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
या आयोजनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून केलेल्या अथक परिश्रमामुळे व आमदार अनिल सोले यांच्या फॉर्च्यून फाउंडेशनने  केलेल्या टेक्निकल सपोर्टमुळे पहिल्याच दिवशी आपल्या जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा आनंद असल्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले आहे. या आयोजनामागे हजारो हात असून त्याच्या सकारात्मक ऊर्जेतून जिल्ह्यातील गरीब, गरजू मात्र गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जॉब मिळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या योजनेत सहभागी झालेल्या कंपन्यांनी उद्या देखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर द्यावेत्यांची निवड करावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर व परिसरातील मुले अतिशय मेहनती असून सचोटीने वेगवेगळ्या आस्थापणासाठी काम करतीलअशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
निवडीचा आकडा उत्साहवर्धक :ना.निलंगेकर
 ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातील या मोठ्या आयोजनात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाती मोठ्या प्रमाणात नोकऱ्या पडतील, असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वाटत होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या निवड प्रक्रियेतून अडीच हजारावर मुलांची निवड झाल्याबद्दल अतिशय आनंद वाटतो. राज्य शासन कौशल्य विकासाबाबत अतिशय आग्रही असून लोकांच्या हाताला कौशल्ययुक्त कामातून रोजगार मिळावा हे राज्य शासनाचे धोरण आहे. चंद्रपूर मध्ये याबाबत भरीव काम झाल्याचे अतिशय समाधान आहे. शांततामय मुलाखतीसाठी मी आयोजकांचे कौतुक करील तितके कमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
                                                0000

No comments:

Post a Comment