अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक
चंद्रपूर, दि. 06 : अन्न सुरक्षा व मानदे कायदा - 2006 मध्ये अन्न व्यावसायिकांची व्याख्या स्पष्ट केली आहे. पदार्थाचा व्यवसाय करणारे स्टॅालधारक व फिरते विक्रेते जसे पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आइसक्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, शरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली निड्स,बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृहउद्योग ते अन्न पदार्थाचे उत्पादक तसेच उपहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दुध विक्रेते त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदार, कॅटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचतगट, शासकीय/ अशासकीय कार्यालयातील कॅटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शना मधील अन्न पदार्थांचे स्टॉलधारक आदी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येतात.
या सर्व अन्न व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 31 अंतर्गत परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न धेता व्यवसाय करणे कायद्याचे कलम 63 अन्वये दंडनीय गुन्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी 2350 परवाना व 13035 नोंदणी प्रमाणपत्र, असे एकूण 15385 सक्रिय परवाना व नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत.
परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी त्वरित ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र करून घ्यावे. परवाना व नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपली असल्यास नूतनीकरण करण्यात यावे. सक्रिय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तिविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.अ.उमप यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment