Search This Blog

Tuesday, 28 July 2026

सुधारीत निकषानुसार भरावे लागणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज


 सुधारीत निकषानुसार भरावे लागणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज

Ø अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 पर्यंत

चंद्रपूर, दि. 28 : माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाने ग्रामपंचायत स्तरावरील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी सुधारीत गुणांकन पध्दती लागू केल्यामुळे जिल्ह्यातील 633 ग्रामपंचायत स्तरावरील सदर केंद्र मंजुरीसाठी नव्याने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2026 आहे.

 यापूर्वी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी 2 मार्च 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून 20 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्याच्या www.chanda.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या 9 जुलै 2026 च्या पत्रान्वये मंजुरीसाठीच्या गुणांकन निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित गुणांकन पद्धती लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी राबविण्यात आलेली मंजुरीची प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील, शासनाने विहित केलेल्या सुधारित अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सुधारीत निकषानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर रिक्त सेवा केंद्रांची ग्रामपंचायतनिहाय यादी, अर्जाचा नमुना, सुधारित अटी व शर्ती तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती www.chanda.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, व संबंधित तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक व परिपूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 27 July 2026

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त


 

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत आतापर्यंत 43 हजार 968 पात्र शेतक-यांच्या याद्या चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 757 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7211 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी (दि.27) आढावा घेतला.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण,ॲग्रीस्टॅक नोंदणी व इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरीत करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था), जयसिंग राजपुत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आदी उपस्थित होते.

०००००००

28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी


28 व 29 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 27 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 28 व 29 जुलै 2026 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : अति मुसळधार पावसात नागरिकांनी घरात आश्रय घ्यावा, मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्यापासून दूर राहावे, रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे, खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवू नये, पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहावे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना  काय करावे आणि काय करू नये : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

वादळ, वारा, मुसळधार व अतिमुसळधार पावसात नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

Sunday, 26 July 2026

आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला


आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची परीक्षा २ ऑगस्टला

Ø सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. २६ : आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या ४७८ रिक्त जागांसाठी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार होती. मात्र, परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या परीक्षा केंद्र बदलाबाबतच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून परीक्षा केंद्र व वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २८ जुलै २०२६ रोजी शिफ्ट-२ मध्ये होणार होती. मात्र, आता या परीक्षेच्या दिनांक व शिफ्टमध्ये बदल करण्यात आला असून, संबंधित उमेदवारांची परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी शिफ्ट-१ मध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांनी पसंती दिलेल्या परीक्षा केंद्रांपेक्षा लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील परीक्षा केंद्र, दिनांक, शिफ्ट व वेळ यांची खात्री करावी, असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

00000000

कर्जमुक्ती याद्यांची प्रसिध्दी


 

कर्जमुक्ती याद्यांची प्रसिध्दी

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ अंतर्गत पात्र शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या आहेत. सदर याद्या नागरिकांना पाहता याव्यात, यासाठी गाव, चावडी, संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आदी ठिकाणी लावण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषद समोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द करतांना जिल्हा उपनिबंधक (सहाकारी संस्था) जयसिंग ठाकूर, सीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्र. व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी आर.पी. दरवे, बँक शाखा सचिव किशोर लोनगाडगे व इतर अधिकारी