Search This Blog

Monday, 27 July 2026

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त


 

43968 पात्र शेतक-यांच्या याद्या जिल्ह्याला प्राप्त

Ø पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत आतापर्यंत 43 हजार 968 पात्र शेतक-यांच्या याद्या चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36 हजार 757 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7211 शेतक-यांचा समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी (दि.27) आढावा घेतला.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण,ॲग्रीस्टॅक नोंदणी व इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरीत करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था), जयसिंग राजपुत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष सोनोने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment