Search This Blog

Wednesday 19 October 2022

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि.19 ऑक्टोबर: जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विधीज्ञ, पक्षकार व नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामाएवढेच महत्त्व असते. व त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात, या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क, खर्च लागत नाही.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन. आय अॅक्ट (धनादेश न

वटणे), बँकांची कर्ज वसूली आदी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विविह- विच्छेदन वगळता), इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे समझोता योग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटिगेशन) प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वत: येऊन किंवा हेल्पलाईन फोन नंबर 07172-271679, कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment