नियोजन करून भयमुक्त वातावरणात काम करा.
चंद्रपूर दि. १० ऑक्टोबर : आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. आपण निवडणूक विभागाच्या वतीने काम करीत आहो, हे लक्षात घेऊन क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अधिक दक्षतेने आणि कार्यक्षमतेने २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी दिले .
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्रसंबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित रिपोर्ट सादर करावा. आपण प्रभावीपणे कार्य कराल तर कुठेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही. निवडणूक विभागातर्फे आपणास अधिकार देण्यात आलेले आहेत. यांचा वापर निष्पक्ष निवडणूक होण्यास करा त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा सखोल आणि काळजीपूर्वक अभ्यास करावा. तसेच मतदान दिवसाकरिता बूथ मॅनेजमेंट प्लान तयार करावा.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात. तसेच मतदान प्रक्रिया निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावयाचे आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून गावनिहाय मतदान केंद्रांचा सखोल अभ्यास करावयाचा आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे म्हणाले की , विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने दक्ष राहिले पाहिजे. आपल्या क्षेत्रातील गावे, मतदान केंद्र, ईव्हीएम मशिनविषयी सखोल माहिती ठेवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान निर्भय वातावरणात आणि जास्तीत जास्त होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने 1950 हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र तसेच जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी 1950 या हेल्पलाईन नंबरची प्रसिद्धी करावी, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदार यादी, मतदान केंदे व निवडणुकीसंदर्भात इतर माहिती पाहता येत असल्याने याची आपल्या मतदान केंद्रांवर व परिसरात प्रसिद्धी करावी. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पोलिंग बुथवर मतदान पथक, पोलीस पथक, साहित्य वेळेआधी पोहचण्याची खात्री करणे, संबंधित रिपोर्ट कंट्रोल रूमला लगेच कळविणे इव्हीएम - व्हीव्हीपॅट सिलिंग, मॉक पोल सर्टिफिकेट सर्वांनी तयार केले याची खात्री करणे इत्यादी विविध कामे जबाबदारीने पार पाडावी. याशिवाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कामकाजाची रुपरेषा, कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीशी संबंधित कायद्यांची माहिती, चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, मतदारसंख्या याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हीव्हीपॅट इव्हिएम मशीनविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ३ तास चाललेल्या या प्रशिक्षण शिवीरास क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment